आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
सन १९४८ पर्यंत जगाच्या नकाशावर इस्त्राईल नावाचा देश अस्तित्वात नव्हता. पण या देशाची स्थापना करण्यात आली, तेव्हापासून आत्तापर्यंत या देशाने खूप प्रगती केली आणि बघता बघता इस्राईल टेक्नॉलॉजीत जगातील क्रमांक एकचा देश बनला होता.
ज्यू लोकांची भूमी म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेला इस्त्राईल, हा पॅलेस्टाईनचे एक बृहद रूप आहे. सिरिया आणि जॉर्डन या दोन देशांच्या मध्यभागी असलेल्या या चिमुकल्या देशाचा उदय कसा झाला? याची कहाणी फार रंजक अशी आहे. तर चला या मागील कथा जाणून घेऊया..
ख्रिस्ती लोकांचा प्रमुख धर्मग्रंथ असलेल्या बायबल व ज्यू लोकांचा पवित्र ग्रंथ असलेल्या ओल्ड टेस्टमेन्टमधे ज्यू लोकांच्या जन्माची गाथा सांगण्यात आलेली आहे. या ग्रंथानुसार ज्यू लोकांचा जन्म देखील हजरत इब्राहिम अथवा लॉर्ड अब्राहम यांच्यापासूनच झाला असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हजरत इब्राहिम हे इस्लाम धर्मियांनी दिलेले नाव असून, अब्राहम हे नाव ख्रिस्ती लोकांनी दिलेले आहे.
इस्त्राईलची राजधानी असलेले जेरुसलेम हे शहर ज्यू, ख्रिस्ती आणि इस्लाम या तिन्ही धर्मांसाठी पवित्र शहर आहे. ज्यू लोक जेरुसलेमला आपले जन्मस्थळ मानतात. ख्रिस्ती लोकांनुसार येशु ख्रिस्ताला याच ठिकाणी यांना मृत्युदंड देण्यात आला होता आणि इस्लामच्या मान्यतेनुसार येथील अल अक्सा मशिदीत इस्लामची स्थापना करण्यात आली होती आणि येथूनच हजरत मोहम्मद पैगंबर यांनी स्वर्गाकडे प्रयाण केले होते.
हे शहर तिन्ही धर्मांच्या आस्थेचे केंद्र आहे.
हजरत इब्राहिम उर्फ अब्राहम यांना तिन्ही धर्मांचे लोक आपला मूळपुरुष मानतात. असं म्हणतात की अब्राहमचा जन्म येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या २००० वर्षाच्या आधी झाला होता. असं म्हणतात की अब्राहमचा नातू याकूबचे दुसरे नाव इस्त्राईल होते. याकूबने ज्यू लोकांच्या १२ जातींना एकत्र केले होते. या सर्व जातींनी एकत्र केलेले हे राष्ट्र इस्त्राईल म्हणून ओळखले जाते. पण काही राजकीय कारणे अशी होती, ज्यामुळे ज्यू लोकांच्या स्वातंत्र्यावर बंधने आली होती.
इसवी सन पूर्व ६६ मध्ये ज्यू आणि रोमन लोकांमध्ये युद्ध झाले, रोमन जनरल पांपे याने जेरुसलेम सकट सर्व इस्त्राईलवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. इतिहासकारांच्या मते हजारो ज्यू लोक या युद्धात मारले गेले.
६व्या शतकापर्यंत इस्राईलवर रोमन लोकांचे राज्य होते. पण याच काळात आशियात एका नवीन शक्तीचा उदय होत होता. ती शक्ती होती इस्लामची आणि इस्लामच्याच झेंड्याखाली खलिफाचे साम्राज्य आकारास येत होते. सन ६३९मधे खलिफा उमरच्या सैन्याने रोमन सैन्याला चिरडून टाकले आणि इस्त्राईलवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. इस्त्राईलची राजधानी जेरुसलेम इथे स्थापन झालेली अरबांची सत्ता १०९९ पर्यंत कायम होती. पण १०९९मधे ख्रिस्ती लोकांनी इस्राईलवर विजय मिळवला, पण इस्त्राईलच्या ताब्यात ही सत्ता जास्त काळ टिकली नाही.
मुसलमानांनी त्यांच्याकडून पुन्हा इस्त्राईलची भूमी परत मिळवली.
ख्रिस्ती लोक आणि मुसलमान लोक एकमेकांशी इस्त्राईलच्या भूमीसाठी पुढे बराच काळ लढत होते, या लढायांना इतिहासात क्रुसेड म्हणून ओळखले जाते. सरतेशेवटी इस्लामी शासकांनी इस्त्राईलवर विजय मिळवला. १९व्या शतकापर्यंत इस्त्राईलच्या भूमीवर कधी इजिप्तच्या मुस्लिमांचे राज्य होते तर कधी तुर्की मुस्लिमांचे राज्य होते. इस्त्राईल आकारास येण्यापूर्वी त्यावर तुर्की शासकांचे नियंत्रण होते. ऑटोमन साम्राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तुर्की शासनाचा प्रमुख जगभरातील मुस्लिमांचा खलिफा होता.
१९व्या शतकात ब्रिटिश साम्राज्याने जगभरात विस्तार केला होता, दुसऱ्या बाजूला ऑटोमन साम्राज्य दिवसेंदिवस कमजोर होत चालले होते. यावेळी युरोपात प्रत्येक देशात राष्ट्रवादाची ताकद वाढत चालली होती, इटालियन लोकांना आपला वेगळा इटली तर जर्मन लोकांना आपला वेगळा जर्मनी हवा होता. त्यावेळी दळणवळणाच्या सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे देशाच्या एका कोपऱ्यातुन दुसऱ्या कोपऱ्यात पोहचणे सहज शक्य होते. यामुळे राष्ट्रवादाची विचारधारा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचणे सहज शक्य झाले. या काळात ज्यू लोकांमध्ये एक राष्ट्रवादाची भावना जागृत झाली. त्यांना आपले अस्तित्व आणि आपली ओळख जपायची होती.
ज्यू लोकांच्या मनात एका वेगळ्या राष्ट्राची कल्पना या काळात आकारास येत होती. १९व्या शतकात इस्राईलचे ज्यू लोक वेगळ्या मातृभूमीची मागणी करत होते. त्यांच्या या राष्ट्रवादाला ‘झियोनिझम’ म्हटले जाऊ लागले. हा तोच काळ होता ज्यावेळी युरोपात ज्यू लोकांवर होणाऱ्या अत्याचारांनी परिसीमा गाठली होती. ज्यू लोक या सततच्या अत्याचारांना कंटाळून पॅलेस्टाईनच्या भूमीवर स्थलांतर करत होते.
ज्यू लोकांच्या मनात एका अशा देशाची कल्पना होती, जिथे जगभरातील तमाम ज्यू लोक एका निर्णायक बहुमताने राहत असतील. पॅलेस्टाईनमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त असल्यामुळे मोठ्या विवादाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती.
१९१४ साली पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली. हा तोच काळ होतात ज्यावेळी ज्यू लोकांना त्यांच्या मातृभूमीचे स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. इस्त्राईलच्या भूमीवर ताबा असलेला तुर्कस्तान पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रिया आणि हंगेरीच्या गटात सामील झाला होता. यावेळी त्याने ब्रिटनशी शत्रुत्व पत्करले होते. ब्रिटन त्याकाळी एक शक्तिशाली राष्ट्र होते. याच काळात तुर्की शासकांनी पॅलेस्टाईनमधून ज्यू लोकांना हाकलण्यास सुरुवात केली. हे सर्व ज्यू लोक रशिया आणि युरोपातुन पॅलेस्टाईनमध्ये आले होते.
पहिल्या महायुद्धामुळे इस्त्राईलच्या भूमीवर राहणाऱ्या अरबी लोकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. या परिस्थितीमुळे ब्रिटनने अरबस्तान आणि पॅलेस्टाईनला तुर्की शासनाच्या जाचातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा केली. पण यासाठी त्यांनी अरबी देश आणि पॅलेस्टाईनच्या जनतेला तुर्कस्तानच्या विरोधात एकत्र येण्याची विनंती केली.
पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटन आणि फ्रान्सच्या दरम्यान एक गुप्त करार करण्यात आला. या कराराला रशियाचे देखील समर्थन होते. या करारानुसार युद्धानंतर मध्य आशियातील कुठल्या देशावर कोणाचे नियंत्रण राहील, हे ठरवण्यात आले होते. या करारानुसार जॉर्डन, इराक आणि पॅलेस्टाईनचा समावेश ब्रिटनमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला.
१९१७ साली ब्रिटिशांचे सचिव लॉर्ड बेलफोर आणि ज्यू नेते लॉर्ड रोथसचाइल्ड यांच्यात एक गुप्त पत्रव्यवहार करण्यात आला. या पत्रात लॉर्ड बेलफोर यांनी पॅलेस्टाईनला ज्यू लोकांचे राष्ट्र बनवण्यासाठी ते तत्पर असल्याचे म्हटले होते. लॉर्ड बेलफोर यांच्या या घोषणेला ‘बेलफोर घोषणा’ म्हणून आधुनिक इतिहासात महत्वाचे स्थान आहे. त्याकाळी पॅलेस्टाईनची लोकसंख्या पॅलेस्टाईनच्या एकूण लोकसंख्येपेक्षा ती चतुर्थांशापेक्षा अधिक होती. यामुळे तिथे बेलफोर यांच्या घोषणेचा जोरदार विरोध करण्यात आला.
पहिले महायुद्ध संपल्यानंतर १९२० साली इटली येथे पार पडलेल्या रेमो कॉन्फरन्समध्ये मित्र राष्ट्रांनी अमेरिकेसह ब्रिटनला पॅलेस्टाईनला ज्यू लोकांच्या भूमीप्रमाणे विकसित करण्याचा जनादेश दिला. याव्यतिरिक्त तिथल्या शासनावर देखील ब्रिटिश लोक नजर ठेवतील, असे ठरवण्यात आले.
पॅलेस्टाईनमध्ये स्वतःचे राष्ट्र निर्माण करू पाहणाऱ्या ज्यू लोकांच्या मनात त्यांच्या आसपास राहणाऱ्या बहुसंख्य मुस्लिमांची भीती होती. मुस्लिम लोक कुठल्याही क्षणी सत्तेचा ताबा घेतील अशी भीती त्यांना वाटत होती. अरबी मुस्लिमांना देखील पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांना वाटा द्यायचा नव्हता. यानंतर अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली की ज्या भागावर ब्रिटनला पॅलेस्टाईनचे ज्यू वंशियांचे राष्ट्र निर्माण करायचे होते त्या भागाचे दोन तुकडे करण्यात आले.
ज्यू लोकांच्या मातृभूमीचा एक मोठा भाग ट्रान्सजॉर्डनच्या रूपाने ज्यू लोकांच्या हातातून निसटला. ज्यू लोकांना वाटले की त्यांच्यासोबत विश्वासघात झालेला आहे, यामुळे त्यांनी ब्रिटिशांचा विरोध करण्यास सुरुवात केली.
याचा काळात पोलंड आणि पूर्व युरोपात ज्यू लोकांवर करण्यात येणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती., यामुळे मोठ्या संख्येने ज्यू लोकांनी पॅलेस्टाईनचा दिशेने पलायन करण्यास सुरुवात केली होती. जर्मनीत हिटलरच्या राज्यात लाखो ज्यू लोकांची कत्तल करण्यात आली. इथून मोठ्या संख्येने ज्यू लोक पॅलेस्टाईनच्या दिशेने प्रयाण करू लागले.
लाखोंच्या संख्येने ज्यू लोक पॅलेस्टाईनमध्ये येऊन पोहचल्याने तेथील अरबी मुस्लिम लोकांशी त्यांचे खटके उडायला लागले आणि दोघांमधील संघर्ष विकोपाला गेला. याच काळात १९३६ साली या आगीत तेल ओतल्यासारखी एक घटना घडली-
ब्रिटिश फौजेकडून अरबी मुस्लिमांचा एका धर्मगुरुची हत्या केली, यामुळे अरबी मुस्लिम पेटून उठले आणि त्यांनी ब्रिटिश-ज्यू युतीच्या विरोधात संघर्ष पुकारला, या संघर्षात मोठ्या संख्येने मनुष्यहानी झाली.
दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर ब्रिटनमधील शक्तिकेंद्र बदलण्यास सुरुवात झाली, एक महत्त्वपूर्ण सत्ताकेंद्र म्हणून अमेरिकेने ब्रिटनची जागा घेतली. या काळात ज्यू लोक मोठ्यासंख्येने पॅलेस्टाईनच्या दिशेने येत होते, काही ज्यू गटांनी वेगवेगळ्या देशातून ज्यू लोकांना पॅलेस्टाईनमध्ये एकत्र करण्यास सुरुवात केली होती. आता ब्रिटनवर पॅलेस्टाईनमध्ये ज्यू लोकांच्या पुनर्वसनासाठी दबाव वाढतच चालला होता.
एकीकडे ब्रिटिशांची महायुद्धामुळे परिस्थिती खालावली होती, त्यांची जागतिक शक्ती संपुष्टात आली होती, दुसरीकडे त्यांना ज्यू लोकांच्या संघर्षासाठी विनाकारण आपली सैन्य शक्ती खर्च करावी लागत होती. अ
खेरीस ब्रिटनने स्वतःला पॅलेस्टाईन प्रश्नापासून वेगळे केले. १९४५ साली संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आला होता. आता संयुक्त राष्ट्रसंघाने पॅलेस्टाईनच्या मुद्द्याकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.
२९ नोव्हेंबर १९४७ साली संयुक्त राष्ट्र संघाने अरबी बहुल आणि ज्यू बहुल अशा दोन राज्यात विभागणी केली. ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू लोकांचे पवित्र स्थळ असलेले जेरुसलेम हे आंतरराष्ट्रीय नियंत्रणाखाली आणण्यात आले. या व्यवस्थेच्या अंतर्गत जेरुसलेमला कॉर्पस स्पेक्ट्रम म्हणण्यात आले होते. यानुसार जेरुसलेमवर आंतरराष्ट्रीय शासनाचे नियंत्रण राहील असे जाहीर करण्यात आले होते.
ज्यू लोकांनी हा प्रस्ताव संमत केला पण अरबांनी याला स्वीकरण्यास नकार दिला. यामुळे विभागणी करता आली नाही. दोन्ही देशांची विभाजन प्रक्रिया जटिल होती. या विभाजनात ७० टक्के लोकसंख्या असणाऱ्या अरबांना फक्त ४२ टक्के क्षेत्र मिळाले. पण मुळात त्यांचा दावा हा ९२ टक्के क्षेत्रावर होता, यामुळे अरबी लोकांनी हा प्रस्ताव नाकारला.
१९४८ सालापर्यंत ब्रिटिशांनी आपले सैन्य माघारी बोलावले. यामुळे ज्यू-अरब संघर्षाला अजून धार चढली. संधी साधत ज्यू लोकांनी इस्त्राईलची स्थापना केली. पुढे संयुक्त राष्ट्रसंघाने देखील इस्त्राईलला मान्यता दिली.
आजही इस्त्राईल आणि अरबी राष्ट्रांचा संघर्ष असाच सुरु असून आजही असंख्य निष्पाप लोकांनी आपला जीव या संघर्षात गमावला आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.