आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
सध्या सुरु असलेला क्रिकेट वर्ल्ड कप (२०२३) भारत होस्ट करत आहे. इतिहासात पहिल्यांदाच क्रिकेट वर्ल्ड कपचा भारत सोल होस्ट असणार असून याआधी अनेकदा इतर देशांबरोबर मिळून भारताने वर्ल्ड कप होस्ट केला आहे. पण १९८७ च्या वर्ल्ड कपची बातच वेगळी होती.
१९८७ चा वर्ल्ड कप हा ट्रेंडसेटर ठरला. या विश्वचषकामुळं जागतिक क्रिकेटची पुनर्रचना झाली. आयसीसीमधील समीकरणं बदलली गेली. व्हेटो पॉवरच्या शस्त्रामुळं जागतिक क्रिकेटमधील निर्णयांवर वर्चस्व गाजवणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा माज उतरवण्याचं काम या वर्ल्ड कपनं केलं. पहिल्यांदा वर्ल्ड कपसारखी मोठी स्पर्धा इंग्लंडच्या बाहेर गेली होती.
जागतिक क्रिकेटमधील इतर देशांनी पहिल्यांदा आयसीसीमध्ये आवाज उठवण्यास सुरुवात केली होती. क्रिकेटच्या जन्मस्थानापासून वर्ल्ड कप हलवणं नक्कीचं सोपं नव्हतं. त्यासाठी दोन राष्ट्रं, जागतिक नेते, राजकारणी, क्रिकेट प्रशासक आणि व्यावसायिक यांच्यात गुंतागुंतीची बोलणी आवश्यक होती.
जगातील कोणत्याही देशाला वर्ल्ड कप स्पर्धा आपल्या दारापर्यंत नेण्यात यश आलं नव्हतं. मात्र, भारतानं ही गोष्ट साध्य करून दाखवली! त्याच भारतानं ज्या देशाला आजही पाश्चिमात्त्य जगातील अनेक लोक मदारी आणि गारूड्यांचा देश म्हणून हिणवतात. १९८७ चा वर्ल्ड कप स्पर्धा भारतात आणण्यासाठी असंख्य अडचणी होत्या. पण, ‘जुगाड’ लावण्यात माहीर असलेल्या भारतीयांनी स्पर्धा देशात आणण्याचा ‘जुगार’ खेळलाच. अन् फक्त खेळलाचं नाही तर जुगार जिंकून देखील दाखवला. १९८७ च्या वर्ल्ड कप आयोजनामागच्या रंजक गोष्टीचा आढावा घेणारा हा विशेष लेख..
१९८७ च्या वर्ल्ड कप आयोजनामध्ये अनेक जणांनी आपलं योगदान दिलं. मात्र, तीन लोकांची नावं प्रामुख्यानं घ्यावी लागतील ती म्हणजे क्रिकेट प्रशासक एन. के. पी. साळवे, भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि उद्योगपती धीरूभाई अंबानी. जागतिक दर्जाची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यासाठी त्यावेळी ‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा’च्या खिशात एक रुपया नसताना देखील भारतानं पाकिस्तानसह मिळून भारतीय उपखंडात वर्ल्डकपचं यशस्वी आयोजन करून दाखवलं.
सर्वप्रथम, भारतीय राजकारणी आणि क्रिकेट प्रशासक एन. के. पी. साळवे, कलकत्यातील व्यापारी जगमोहन दालमिया आणि शासकिय अधिकारी आय.एस. बिंद्रा यांच्या डोक्यात वर्ल्डकपची योजना तयार झाली होती. बेंबीच्या देठापासून जोर लावल्यानंतर भारताला वर्ल्डकप आयोजनाची संधी मिळाली. त्यात पाकिस्तान सहकार्य करणार हे देखील निश्चित झालं.
मात्र, परकीय चलनाचा सर्वात मोठा प्रश्न यजमानांच्या समोर आ वासून उभा राहिला होता. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा उभा करायचा म्हणजे तगडा स्पॉन्सर गरजेचा होता. त्यासाठी धीरूबाई अंबानींना विचारणा करण्यात आली होती. ते तात्काळ तयार झाले मात्र, तत्कालीन अर्थमंत्री व्ही. पी. सिंग आडवे आले. अर्थमंत्री झाल्यानंतर त्यांनी अंबांनींच्या मागे आयकर विभागाचा भूंगा सोडून दिला. परिणामी अंबानींनी माघार घेतली.
अनेक प्रयत्न करूनही पैशांची जमवाजमव न झाल्यानं एन. के. पी. साळवेंनी थेट पंतप्रधान राजीव गांधींनी गळ घातली. आपल्या आईच्या (माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) मृत्यूनंतर राजीव सत्तेत आले होते. त्यांना अनेकांचा विरोध देखील होता. अशा परिस्थितीमध्ये क्रिकेटसारख्या एका खेळावर पैसा लावणे म्हणजे नक्कीच वेडेपणाची गोष्ट होती.
कारण, जर भारत आवश्यक ती रक्कम उभारू शकला नाही तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नाचक्की होणार होती. याशिवाय पाकिस्तानला हाताशी धरणं म्हणजे एक प्रकारची राजकीय आत्मह*त्याच होती. मात्र, राजीव यांनी ही आत्मह*त्या करण्याचा निर्णय घेतला! जोपर्यंत बीसीसीआयला प्रायोजक मिळत नाही तोपर्यंत वर्ल्डकपसाठी लागणारी रक्कम देण्याची राजीव यांनी तयारी दर्शवली. पैशांचा प्रश्न सुटल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंधांचा प्रश्न उभा राहिला.
दोन्ही देशांच्या सैन्यांदरम्यान असलेला तणाव वर्ल्डकपसाठी मारक ठरण्याची चिन्हं दिसतं होती. मात्र, कुठल्याही परिस्थितीत वर्ल्डकप भारतातचं खेळवायचा असा निश्चय केलेल्या साळवे, दालमिया आणि बिंद्रा यांनी दोन्ही सरकारांच्या दरम्यान मध्यस्थी करत हा देखील प्रश्न सोडवला.
मात्र, नकटीच्या लग्नाचे सतराशे विघ्नं अद्याप संपले नव्हते. साळवे आणि बिंद्रा यांना राष्ट्रीय प्रसारक ‘दूरदर्शन’ला सामोरं जावं लागलं. बीसीसीआय आणि दूरदर्शन दरम्यान रॉयल्टीच्या मुद्द्यावरून बिनसलं. शिवाय दूरदर्शनकडं वर्ल्डकपच्या थेट प्रक्षेपणासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पुरेसं मनुष्यबळ देखील नव्हतं. ही देखील समस्या सोडवण्यासाठी बीबीसीमधील तज्ज्ञ कीथ मॅकेन्झी यांची मदत घेण्यात आली. प्रसारणाच्या तांत्रिक बाबींवर देखरेख ठेवण्यासाठी कीथ यांची नियुक्त करण्यात आली होती.
दरम्यान, साळवे अद्यापही टायटल स्पॉन्सरच्या शोधात होते. त्यांनी देशभरातील व्यवसाय प्रमुखांशी वाटाघाटी आणि चर्चा केल्या मात्र, त्यातून आवश्यक ती रक्कम उभी राहात नव्हती. नेमक्या त्याच वेळी राजीव गांधींच्या मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आणि अर्थमंत्री असलेल्या व्ही. पी. सिंग यांच्याकडं सुरक्षा खातं देण्यात आलं. ही बातमी कळताच साळवेंनी दुसऱ्या मिनिटाला एक फोन फिरवला. दुसऱ्या बाजूला फोनवर असणारी व्यक्ती होती धीरूभाई अंबानी!
व्ही. पी. सिंग यांच्याकडून अर्थमंत्रालय जाण्यानं अंबानींची पुन्हा वर्ल्डकपमध्ये एंट्री झाली. त्यांनी संपूर्ण वर्ल्डकप स्पॉन्सर करण्याची तयारी दाखवली मात्र, त्यासाठी एक अट ठेवली. वर्ल्डकपच्या अगोदर आयोजित भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रदर्शनी सामन्यादरम्यान पंतप्रधानांच्या शेजारी आपल्याला बसवलं जावं, अशी ती अट होती. राजीव गांधींना ही अट सांगण्यात आली तेव्हा त्यांनी तात्काळ होकार दिला आणि अशा प्रकारे स्पॉन्सरशिपचं घोडं गंगेत न्हालं.
वर्ल्डकपला स्पॉन्सरशिप दिल्यानंतर धीरूभाईंनी याची जबाबदारी आपला धाकटा मुलगा आणि रिलायन्स टेक्सटाइल्सचे कार्यकारी संचालक अनिल अंबानी यांच्या खांद्यावर दिली. अनिल अंबानी एका गोष्टीबाबत अतिशय स्पष्ट होते. आयसीसीची ही स्पर्धा अनिल अंबानींच्या मते वर्ल्डकप नव्हता तर तो ‘रिलायन्स कप’ होता. वर्ल्ड कपवर आधारित सहा भागांची टीव्ही मालिका, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्टेडियममधील जाहिराती अशा कितीतरी लहान मोठ्या गोष्टींमध्ये रिलायन्सनं आपला पैसा आणि बुद्धी लावली. या गोष्टीमुळं रिलायन्सचा भारतीय क्रिकेटवर खूप मोठा प्रभाव पडला.
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून पाकिस्तानला हाताशी धरून भारतानं वर्ल्डकपचं यशस्वी आयोजन करून दाखवलं. भलेही त्यावर्षी भारत अंतिम सामन्यात नव्हता. मात्र, कलकत्त्याच्या ‘ईडन गार्डन्स’वर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा अंतिम सामना पाहण्यासाठी जमलेल्या प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.