आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आम्ही भारतीयांसाठी औषध बनवत नाही. आमची औषधे श्रीमंत अशा पाश्चिमात्य लोकांसाठी असतात ज्यांना ते विकत घेणे परवडते.
ही दर्पोक्ती आहे मार्जिन डेक्कार या माणसाची जो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या “बायर एजी” या जर्मन कंपनीचा प्रमुख आहे. त्याच्या या वाक्याला अर्थात दु:खाची आणि संतापाची झालर आहे. त्याने हे वाक्य गर्वाने नव्हे तर उद्वेगाने म्हटलेले आहे.
भारतामध्ये त्याच्या ड्रग माफिया असलेल्या कंपनीला कसं नाक मुठीत धरून शरण यावं लागलं, त्याच्या कंपनीने कॅन्सर साठी बनवलेले औषध जे “ Nexavar” या नावाने आपल्या भारतामध्ये प्रचंड महागड्या किमती मध्ये विकले जायचे या औषधाचा जेनेरिक brand आपल्या भारतीय न्यायालयाने वैध ठरवला आणि या बायरच्या नफेखोरीला वेसन बसली. बस याचा संताप वरच्या वाक्यातून आपल्याला दिसून येतो. या बायरचा थोडासा इतिहास आपण पाहू.
बायर Agriculture, Special Polymers, Medicines या ३ क्षेत्रात काम करते.
म्हणजे शेती क्षेत्रात जेनेटिकली मॉडीफाय केलेले बियाणे तयार करणे, प्लास्टिक कोटिंग तयार करणे आणि औषधे तयार करणे हे काम ही कंपनी करते.
या क्षेत्रातील जाणकार सांगतात. शेती आणि पॉलिमरच्या क्षेत्रातून कॅन्सरचे प्रमाण वाढवणे आणि त्यावरची औषधे तयार करून ती प्रचंड मोठ्या किमतीत विकणे अशी कामे ही कंपनी करते अशा अनेक सेवाभावी संस्थांचा बायर वर आरोप आहे.
या सगळ्या लढाईची सुरुवात झाली होती २०१२ साली. जेंव्हा भारतात Nexawar अत्यंत महागड्या किमतीत विकले जायचे. वर्षभराच्या Nexavar च्या औषधांची किमत जायची जवळपास ९६,००० डॉलर्स. या औषधाचा कॅन्सर वर होणारा उपयोग पाहून भारतातील जी Controller of patent नावाची authority आहे त्यांनी या औषधाचे जेनेरिक व्हर्जन बनवण्याचे Compulsory Licence Natco Pharma या भारतीय कंपनीला दिले.
या कंपनीने Nexavar चे जेनेरिक व्हर्जन Sorafenib या नावाने बाजारात आणले. या sorafenib च्या वर्षाच्या कोर्सची किमत होती फक्त १७०० डॉलर्स. कुठे ९६,००० डॉलर्स आणि कुठे १७०० डॉलर्स.
हे जे compulsory Licencing असते त्याच्यात भारत सरकार कुठल्याही कंपनीला महागड्या औषधांचे जेनेरिक व्हर्जन बनवण्यासाठी परवानगी देवू शकते.
यात त्या औषधाची जे मूळ patenting company असते तिच्या परवानगीची आवश्यकता लागत नाही. भारत सरकार च्या या निर्णयाविरुद्ध बायर ने Intellectual Property Appellate Board यांच्याकडे अपील दाखल केले परंतु हा जेनेरिक औषध बनवण्याचा निर्णय हा लोकहिता साठी आणि कॅन्सर पेशंटसाठी घेतला गेला असल्याने बायर हा दावा फेटाळून लावण्यात आला.
बायर इथेच थांबली नाही. त्यांनी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी न्यायालयात दावा केला की त्यांच्यासारख्या फार्मा कंपन्या अत्यंत परिश्रम घेवून, अनेक वर्षे रिसर्च करून औषधे बनवतात. जेंव्हा या औषधांची जेनेरिक व्हर्जन बाजारात येवून त्यांच्याशी स्पर्धा करतात यात त्यांचे फार मोठे आर्थिक आणि बौद्धिक नुकसान सामावलेले आहे.
एका बाजूने त्यांचे म्हणणे काही लोकांना पटू शकते परंतु यामागची सत्यता मात्र फार वेगळी होती.
बायरला २००५ मध्ये अमेरिकेत Nexavar drug तयार करण्याची परवानगी मिळाली. जितका पैसा त्यांनी या औषधाच्या Research & Development वर केला होता तो त्यांनी पुढच्या वर्षभरात वसूल केला.त्याच्यानंतर निरंतर ८ वर्षे बायर या Nexavar च्या गगनाला भिडलेल्या किमतीमधून नफा लाटत राहिली.
हे सगळे मुद्दे विचारात घेवून सुप्रीम कोर्टाने बायरचा मुद्दा फेटाळला. जेनेरीक व्हर्जन असलेली औषधे किंमतीने कमी असल्यामुळे समाजातील गरीब लोकांना आपण औषधांपासून वंचित ठेवू शकत नाही या विचारावर त्यांचे अपील डिसमिस करून टाकले.
भारताच्या Natco Pharma company ला Nexavar चे जेनेरिक व्हर्जन पुढे तयार करत राहण्याचे आदेश मिळाले. हा निर्णय देशाच्या फार्मास्युटिकलच्या इतिहासातील मोठा निर्णय मानला जातो. हा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील गाजला.
औषध कंपन्या जे औषध तयार करतात त्याचे पेटंट घ्यावे लागते. हे पेटंट काही वर्षांसाठी असते. त्यानंतर ते खुल्या बाजारपेठेत येवू शकते. यामध्ये एक प्रोसेस असते. त्याला Evergreeneing असं म्हटलं जातं. यात औषध कंपन्या जी औषधे महागडी असतात, कंपनीला नफा मिळवून देणारी असतात. अशा औषधांचे पेटंट २०- २० वर्षांपर्यंत घेवून ठेवले जाते.
जितक्या वर्षांचे पेटंट घेतले असेल त्याला additional २० वर्षांचे पेटंट. या औषध माफिया कंपनी आपल्या औषधांच्या कंपोनंट मध्ये अगदी किंचित बदल घडवून वर्षानुवर्षे औषधांचे पेटंट घेत राहतात जेणेकरून त्यांना कुणाची स्पर्धा निर्माण नाही झाली पाहिजे.
अशीच एक बहुराष्ट्रीय फार्मा कंपनी Novartis हिने स्वत:चे एक सुप्रसिद्ध औषध Glivec अथवा Gleevec या पेटंटच्या evergreening process मध्ये बरीच वर्षे फ्रीज करून ठेवले होते. या Novartis ने त्यांच्या या Glivec नावाच्या औषधामध्ये एक छोटासा बदल करून हे औषध आता ३०% जास्त water soluble आहे असा दावा करून नवीन पेटंट साठी अर्ज केला.
एक लक्षात घ्या पेटंट महत्वाचे का असते तर ज्या कंपनीकडे पेटंट आहे तोपर्यंत दुसरी कंपनी तसे सेम औषध बनवू शकत नाही. Novartis ला हे पेटंट नाकारले गेले तेंव्हा त्यांनी अर्थात सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. सुप्रीम कोर्टाने Novartis ला सुनावले तुम्ही आमची आणि जनतेची फसवणूक करत आहात. मूळ औषध आणि या नवीन औषधा मध्ये काहीही फरक नाही त्यामुळे नवीन औषध म्हणून तुम्ही जुन्या औषधाचे पेटंट पुन्हा घेवू शकत नाही.
याच्या नंतर या Gleevec चे जेनेरिक व्हर्जन बाजारात आले. जिथे Gleevec चा वर्षाचा कोर्स २६०० डॉलर्स ला पडायचा तिथे त्याचं जेनेरिक व्हर्जन आणलं गेलं त्याच्या वर्षभराच्या कोर्स ची किंमत होती फक्त १७५ डॉलर्स.
ही खरे तर आपल्या भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट असली पाहिजे की आपल्या देशात न्यायव्यवस्थेने ड्रग माफिया असलेल्या बहुराष्ट्रीय फार्मा कंपन्यांच्या दाव्याना भीक न घालता लोकांच्या हिताचे निर्णय घेतले. भारताचे हे निर्णय जगातील बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये अर्थात गाजलेले आहेत.
आपल्याला अभिमान वाटावी अशी अजून एक माहिती म्हणजे भारताला जगाचे औषधालय असे म्हटले जाते. भारत हा जेनेरिक औषधांचा जगातील सर्वात मोठा निर्माता आहे. आपल्याकडे स्वस्तात उपलब्ध होतील अशी जेनेरिक औषधे मोठ्या प्रमाणावर तयार होतात. जगभरात ती निर्यात केली जातात.
जगभरातील जे गरीब लोक आहेत ज्यांना महागडी औषधे आणि उपचार परवडत नाही त्यांना भारतातून निर्यात होत असलेल्या जेनेरिक ड्रगचा फार मोठा आधार आहे. अमेरिका जिथे जगभरातील हजारो मोठमोठ्या औषध कंपन्या आहेत. अशा अमेरिकेत सुद्धा भारतातून लाखो रुपयांची जेनेरिक औषधे निर्यात होतात.
अमेरिकेत आरोग्याची व्यवस्था अत्यंत महागडी आहे. जवळपास ४५ लाख लोकांना तिथे कसलाही आरोग्य विमा नसल्यामुळे आरोग्य विषयक दुर्दशेला तोंड द्यावे लागते तिथे भारतातून जाणाऱ्या जेनेरिक औषध्ये या लोकांसाठी संजीवनी पेक्षा कमी नाहीत.
उदाहरणादाखल भारतातील सिप्ला ही औषध कंपनी. ही कंपनी सुद्धा जेनेरिक ड्रग तयार करून ती निर्यात करते. १९३० साली या कंपनीची स्थापना भारतामध्ये झाली. या कंपनीने २००१ साली एड्स वर प्रभावी असे एक औषध तयार केले. या औषधाचे नाव आहे Triomun. जेंव्हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बहुराष्ट्रीय फार्मा कंपन्यांनी या औषधाचे घटक वापरून जे औषध तयार केले होते त्याच्या १ वर्षाच्या कोर्सची किमत होती सुमारे १२,००० हजार डॉलर्स.त्यावेळी सिप्लाच्या Triomun च्या एका वर्षाच्या कोर्स ची किंमत होती वर्षाला ३०० डॉलर्स.
आपल्या भारतातील अनेक औषध कंपन्या या जेनेरिक औषधांच्या निर्मितीतून जगाला स्वस्त दरात औषध पुरवठा करतात. अनेक बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांच्या दादागिरीला आपण यशस्वीपणे तोंड दिलेले आहे. जेनेरिक औषध निर्मिती मधील आपला हा प्रवास निश्चित संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे.