आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात अणुविज्ञान आणि अणुऊर्जा प्रकल्पाचा पाया रचणारे डॉ. होमी भाभा हे एक विख्यातअणुशास्त्रज्ञ होते. भारताला एक सक्षम राष्ट्र म्हणून उभे राहायचे असेल तर भारताने विज्ञान क्षेत्रात प्रगती केली पाहिजे आणि नवनव्या संशोधनाला प्रोत्साहन दिले पाहिजे, असे त्यांचे मत होते.
डॉ. भाभा यांच्या मते देशाला संरक्षणाच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हायचे असेल तर अ*ण्वस्त्रांची निर्मिती केली पाहिजे. अणु उर्जेचा हिं*सेसाठी किंवा वि*ध्वंसासाठी वापर करणे त्यांना अजिबात मान्य नव्हते.
पण, त्याकाळी चीन आणि अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी अ*ण्वस्त्रे तयार केली होती. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने भारतानेही स्वतःहून अ*ण्वस्त्रांची निर्मिती करावी अशी त्यांची इच्छा होती.
तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना त्यांनी हीच बाब व्यवस्थित समजावून सांगितल्यानंतर डॉ. भाभा यांच्याच अध्यक्षतेखाली भारतात अणु संशोधनाला आणि आण्विक उर्जा प्रकल्पांना चालना देण्याकरता अणु ऊर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली.
डॉ. होमी भाभा या आयोगाचे पहिले अध्यक्ष होते. भारताला जागतिक पातळीवर आपले भक्कम स्थान निर्माण करायचे असल्यास आण्विक अस्त्रांच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण बनला पाहिजे असे त्यांचे मत होते.
१९६५ साली ऑल इंडिया रेडियोवर दिलेल्या एका मुलाखती दरम्यान डॉ. भाभा जाहीरपणे म्हणाले होते की, “जर मला परवानगी मिळाली तर केवळ १८ महिन्यांत मी भारतात अणुबॉ*म्ब बनवू शकतो.” परंतु यानंतर केवळ तीनच महिन्यात एका विमान अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. डॉ. भाभा तेंव्हा ५६ वर्षांचे होते.
एका महत्वाच्या वळणावर, देशाला त्यांची प्रचंड गरज असताना भारताने आपल्या शिरपेचातील एक हिरा गमावला होता. डॉ. भाभा यांनी भारतात अणुबॉ*म्बची निर्मिती करणे शक्य असल्याचा इशारा दिल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात त्यांचा अंत होणे केवळ योगायोग नसून यामागे घातपात असल्याचीही चर्चा त्याकाळी सुरु होती.
काहींच्या मते डॉ. भाभा यांचा मृत्यू अपघाती मृत्यू नसून हा एका कटकारस्थानाचा भाग आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्रांना भारताने अ*ण्वस्त्रसज्ज व्हावे ही बाब अजिबात रुचली नव्हती. म्हणूनच या घातपातामागे अमेरिकेचा हात असल्याचेही म्हंटले जाते.
२४ जानेवारी १९६६ रोजी सकाळी ७ च्या दरम्यान मुंबईकडून न्यूयॉर्कला निघालेले एअर इंडियाचे १०१ विमान अपघातग्रस्त झाले. आल्प्स पर्वत रांगेतील मॉंट ब्लॉक पर्वताला धडकल्याने या विमानाचा अपघात झाला.
विमान चालक आणि जिनिव्हा विमानतळ यांच्यातील संदेशवहन यंत्रणेत बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे कारण दिले जात असले तरी, काहींच्या मते ही केवळ जगाला दाखवण्यापुरते दिले गेलेले कारण आहे. या विमानात ७०७ प्रवासी होते.
कांचनगंगा नावाच्या याच विमानात भारताचे विख्यात वैज्ञानिक डॉ. होमी जहांगीर भाभा देखील होते. विमान अपघाताचे अधिकृत कारण संदेशवाहनातील बिघाड असे दिले जात असले तरी, या अपघाताचे नेमके कारण अनेक गृहीतकांच्या भोवऱ्यातच अडकून राहिले.
डॉ. भाभा यांनी कॅम्ब्रिज विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. तिथे असताना त्यांनी कॉस्मिक किरणांवर संशोधन केले होते. त्यांच्या या संशोधनाची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली होती. त्याकाळी भाभा प्रसिद्ध कॅवेंडीश प्रयोगशाळेत काम करत होते. या प्रयोगशाळेत एकाच वेळी अनेकविध विषयांवर संशोधन सुरु होते आणि डॉ. भाभा देखील याच संशोधनाचा एक भाग होते.
दुसऱ्या महायु*द्धाच्या काळात ते भारतात परत आले. त्यांनी भारतात राहूनच आपले संशोधन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. प्रसिद्ध नोबेल विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या भारतीय विज्ञान संस्था या प्रयोगशाळेत ते रुजू झाले.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. या संस्थेचे ते संस्थापक-संचालक होते.
१९५० साली भारताचे आणखी एक एअर इंडियाचे विमान मलाबार प्रिन्सेस या विमानाचा अपघातही मॉंट ब्लॉक पर्वतातच झाला होता. या विमानातील सर्व प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाला होता.
२०१७ साली डॅनियेल रॉच नावाचा एक स्विस गिर्यारोहक आल्प्स पर्वत चढून गेला तेव्हा त्याला तिथे अपघातग्रस्त विमानाचे अवशेष दिसले होते. इथे दोन्ही पैकी एका कुठल्यातरी विमानाचे अवशेष आढळून आल्याचा त्याने दावा केला.
रॉचला तिथे एका जेट इंजिनचेही अवशेष आढळून आले. त्याच्या मते एअर इंडियाच्या १०१ या विमानाला आणखी एक विमानाने धडक दिल्यानेच या विमानाचा अपघात झाला असावा.
रॉचच्या मते जर कांचनगंगा विमान जर पर्वताला धडकून अपघातग्रस्त झाले असते तर विमानातील प्रचंड मोठ्या इंधन साठ्यामुळे विमानाचा स्फो*ट झाला असता. या विमानात ४१,००० टन इंधनाचा साठा होता. माझ्या मते एका इटालियन विमानाला हे विमान धडकल्यानेच या विमानाचा अपघात झाला. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण अत्यल्प असल्याने इंधनाचा स्फो*ट झाला नसावा, असे वाटते.
होमी भाभा यांच्याबद्दल बोलताना रॉच म्हणाले,
“होमी भाभा भारताला त्यांचा स्वतःचा पहिला अणुबॉ*म्ब देणार होते. त्यामुळे हा घातपात होता की अपघात हे सांगणे कठीण आहे. मला वाटते की सत्य जगासमोर उघड करणे माझे कर्तव्य आहे. भारत सरकारने मागणी केल्यास या संबधीची सर्व कागदपत्रे मी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यास तयार आहे. शिवाय या अपघाताच्या ठिकाणी विमानातील प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू देखील पडल्या होत्या, त्याही मी भारताच्या हवाली करण्यास तयार आहे.”
परंतु, एका फ्रेंच चौकशी अहवालानुसार, हा अपघात विमानाच्या संदेसवहन यंत्रणेत बिघाड झाल्यानेच झाला. या विमानाच्या वैमानिकाला आल्प्स पर्वताची उंची आणि विमान उड्डाणाची उंची यातील मेळ चुकल्याने हे विमान सरळ पर्वतात जाऊन घुसले आणि अपघात ग्रस्त झाले.
या आयोगाने दोन अनुमान काढले आहेत – १) या विमानाच्या वैमानिकाने मॉंट ब्लॉकची स्थिती जाणून घेण्यात घोळ घातल्यामुळे हा अपघात झाला. २) वैमानिकाने असा गैरसमज करून घेतला की तो पर्वताच्या शिखरावरून पुढे गेला आहे, त्याने मॉंट ब्लॉकवरून विमान नेताना पुरेसे सुरक्षित अंतर राखले नाही.
या विमानातील एक रिसिव्हर काम करत नव्हता, त्यामुळे पायलटला विमानाच्या स्थितीबद्दल अचूक अंदाज लावता आला नाही.
२००८ साली सीआयए अधिकारी रॉबर्ट क्राव्ले आणि पत्रकार ग्रिगोरी डग्लस यांच्यातील संवाद एका पुस्तकातून प्रकाशित करण्यात आला होता. या पुस्तकात क्राव्ले यांनी यात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा हात असल्याचे म्हटले होते.
या सिद्धांतानुसार भारतासारख्या देशाने अणुसज्ज होणे अमेरिकेला अजिबात पटत नव्हते. १९४५ साली फक्त अमेरिकेकडे आण्विक अस्त्रे होती. नंतर १९६४ साली रशिया आणि चीन या देशांनीही अणू चाचणी केली. या सीआयए अधिकाऱ्याच्या मते, भारतासारख्या देशाने साठच्या दशकात अ*णुबॉ*म्बची चाचणी करणे आणि त्यावर काम करणे हा विचारच आम्हाला त्रासदायक वाटत होता.
होमी भाभा यांच्या संदर्भाने याच अधिकाऱ्याने असे वक्तव्य केले की, “होमी भाभा यांचा तो अपघात फारच भयानक होता. व्हिएन्ना इथे एका परिषदेसाठी जात असताना त्यांचा विमान अपघात घडवून आणला.”
मॉंट ब्लॉक येथे आजही त्या अपघातग्रस्त विमानातील प्रवाशांची कागदपत्रे, दागिने आणि कॅमेरा यांसारख्या वस्तू सापडतात. मात्र होमी भाभा यांच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आजही एक रहस्यच आहे.
चीन-भारत यु*द्धानंतर तर भारताला अ*ण्वस्त्रसज्ज होण्याची प्रचंड गरज होती. भारताचे तत्कालीन पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांनी देखील होमी भाभा यांच्या आण्विक अस्त्राच्या कल्पनेला होकार दिला होता.
परंतु शास्त्रींचा मृत्यू देखील अशाच रहस्यमय पद्धतीने झाला. तेही ताश्कंद करारावर सही करून झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अचानक त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे रहस्यही अजून गुलदस्त्यातच आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.