आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
शस्त्रास्त्राच्या जगतात आजवर अनेक आधुनिक शोध लागले आहेत. बंदूक, बॉम्ब, डायनामाईट, अणुबॉम्ब, पाण्यातून हल्ले करणाऱ्या पाणबुड्या, हवेतून हल्ले करणारे लढाऊ विमाने असा हा पसारा खूपच वाढला आहे. धनुष्य, तलवारी, भाले इथून सुरू झालेला हा प्रवास आज रायफलीपर्यंत पोहोचला आहे. पण हा बदल अचानक झालेला नाही, तर टप्याटप्याने झालाय आणि तो अविरत सुरूच आहे.
पण या सगळ्यात महत्वाची भूमिका बाजवली ती बंदुकीच्या दारूने. या घातक आणि स्फोटक रसायनाच्या शोधानंतर शस्त्रास्त्रांच्या दुनियेत बराच मोठा बदल झालेला आहे. या एका रसायनाच्या शोधानंतर जणू जगभर अधिकाधिक घातक शस्त्रास्त्रे निर्माण करण्याची स्पर्धाच लागली. तर अशा एकापेक्षा एक घातक शस्त्रास्त्रांच्या निर्मितीची प्रेरणा ठरलेल्या या बंदुकीच्या दारूचा शोध कसा लागला हे माहिती आहे का तुम्हाला?
बंदुकीच्या या दारूचा शोध लागला नसता तर न दिवाळीत फुटणारे फटाके निर्माण झाले असते ना अंतराळात रॉकेट लॉंच झाले असते. ही दारू बंदुकीत वापरली जात असल्याने याला गनपावडर किंवा काळ्या रंगाची असल्याने ब्लॅक पावडरही म्हटले जाते.
गनपावडरचा शोध कुणी लावला याबाबत अभ्यासकांत अनेक मतमतांतरे आहेत. पण, बहुतांश अभ्यासकांच्या मते चीनच्या ‘वी बोयांग’ या माणसाने हा शोध लावला आहे.
चीनमध्ये प्राचीन काळी अनेक लोक सोन्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न करत असत.
असेच एका किमयागाराने सोरे, गंधक आणि लाकडी कोळशाची भुकटी एकत्रित केली आणि त्याला आग लावली. या आगीमुळे मोठा स्फोट झाला. वी बोयांगने ही माहिती जमवली आणि त्यानुसार प्रयोग करून पहिला तर खरोखरच एक विस्फोटक तयार झाले.
त्यानंतर इसपू ३०० वर्षापूर्वी ‘जी हॉंग’ने यावर आणखी प्रयोग सुरू केले. कोळसा, सल्फर आणि मिठाच्या मिश्रणातून बंदुकीची दारू बनवण्याचा प्रयोग सुरू केला. या तिन्ही घटकांना एकत्र करून त्यात पोटॅशियम नायट्रेट मिसळल्यावर त्यातून बंदुकीची दारू निर्माण झाली. जी हॉंगने ही सगळी क्रिया तपशीलवार लिहून ठेवली आहे.
चीनमधील संशोधक सुन सिम्याओने लिहिलेल्या पुस्तकातही याची माहिती मिळते. त्याकाळी चीनमध्ये या रसायनाला हुओयाओ म्हटले जात असे. एका संशोधकाने या पुस्तकातून माहिती घेऊन पहिल्यांदा बंदुकीची दारू बनवण्याचा प्रयोग सुरू केला. त्याला यशही आले. पण, या प्रयोगामुळे झालेल्या स्फोटात त्या संशोधकाचे घरही जळून खाक झाल्याचे म्हटले जाते. एवढेच नाही तर, त्याच्या चेहऱ्यालाही गंभीर दुखापत झाली होती, इतका हा स्फोट शक्तिशाली होता.
मंगोलांच्या सततच्या हल्ल्याने हैराण झालेल्या चीनला बंदुकीच्या दारूच्या शोधामुळे एक नवी शक्ती सापडली होती. त्यांनी ही दारू धनुष्याच्या बाणावर लावून त्याचा वापर करणे सुरू केले. पेटत्या बाणांचा वर्षाव मंगोलांनी याआधी कधीच पाहिला नव्हता. चीनने याच्या वापराचे आणखी काही घातक मार्ग शोधून काढले. चीनच्या संग वंशीय राजांनी याचा पहिल्यांदा वापर केला.
त्यानंतर इसवी सन एक हजार पासून या बंदुकीच्या दारूचा हातगोळेसारख्या शस्त्रातून प्रत्यक्ष वापर केला जाऊ लागला. बंदुकीतील दारूची निर्मिती करण्याचा मक्ता चीनकडेच होता. तेराव्या शतकापर्यंत चीनने बंदुकीच्या दारूच्या व्यापारावर संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केले होते. जगभर या रसायनाला चांगलीच मागणी होती. या व्यापारातूनच चीनमध्ये समृद्धी येऊ लागली.
या शोधानंतर संपूर्ण जगाचा इतिहासच बदलून गेला. कदाचित हा शोध लागलाच नसता तर आजचे जग काही औरच असते, नाही का?
या संशोधनाने युद्ध लढण्याच्या पद्धती बदलल्या आणि त्यापाठोपाठ अनेक प्रदेशांचे नकाशेही बदलत गेले.
काही वर्षांनी ही दारू मोठ्या लोखंडी नळीत भरून त्यामधून दूरवर हल्ले केले जाऊ लागले, यालाच तोफ असे नाव मिळाले. १३ व्या शतकात युरोपात ही बंदुकीची दारू पोहोचली आणि त्यांनी ही दारू तोफेत भरून वापरण्यास सुरुवात केली. यामुळे शत्रू सैन्याचे जास्तं नुकसान होऊ लागले. बाबर भारतात आला तेव्हा त्याच्यासोबतही त्याने या तोफा आणल्या होत्या.
चीनने तर या दारूचा वापर करून त्याकाळात रॉकेटही बनवले होते, असे म्हटले जाते. त्याचवेळी फ्रांस आणि युरोपमध्ये तोफांचा वापर जोरात सुरू झाला होता. या तोफांचा आवाज ऐकूनच शत्रूच्या मनात धडकी भरत असे. वास्को-दा-गामा पहिल्यांदा जेव्हा भारतात आला तेव्हा त्यानेही आपल्या जहाजावरून या तोफा भारतात आणल्या होत्या.
याचे खरे दुष्परिणाम तर तेव्हा समोर आले जेव्हा याचा वापर बंदुकीतून करण्यात येऊ लागला, कारण या बंदुकीमुळे लोकांतील वैराला आणखीनच खतपाणी मिळाले. बंदुकीमुळे लोकांना दहशत माजवणे, एकमेकांचा खून करणे, अशा अनेक दुष्कृत्यांची संख्या वाढू लागली. बंदुकीच्या आकारात आणि प्रकारातही बरेच बदल झाले. ज्यामुळे याला आणखी घातक रूप देण्यात आले. हळूहळू काळ पुढे गेला तसे बंदुकांमध्ये बदल होऊ लागले. त्यानंतर हवेतून मारा करणारी शस्त्रे निर्माण करण्यात आली. या शस्त्रांना वाहून नेण्यासाठी खास प्रकारची जहाजे आणि विमाने बनवण्यात आली.
काळानुरूप या बंदुकीच्या दारूच्या वापरत अनेक बदल झाले आणि हे सगळे बदल याचा अधिकाधिक विनाशक वापर कसा करता येईल याच विचाराने करण्यात आले. आजतर याच्या वापराशिवाय कुठलेही युद्ध होतच नाहीत. याच्या वापरामुळे आजची युद्धे अधिकाधिक घातक बनत चालली आहेत. दोन्ही जागतिक महायुद्धाच्या काळात संपूर्ण मानवजातीने याची संहारक शक्ती अनुभवली आहे.
बंदुकीच्या दारूचा शोध कधी लागला, कुणी लावला याबाबत मतभेद असले तरी या शोधामुळे संपूर्ण मानवजातीलाच विनाशाच्या उंबरठ्यात उभे केले आहे हे मात्र नक्की. या शोधाचा जगाला फायदा कमी आणि तोटाच जास्त झाला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.