आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
अफगाणच्या शेर शाह सुरीकडून पराजित झालेल्या हुमायूंने भारतातच मुघल साम्राज्याचा विस्तार सुरू केला. मुघल सत्तेशी पंगा घेणारे अनेक शासक भारतात होऊन गेले. त्यात गुजरातचा शासक बहाद्दूर शाहचे नाव खूप वरचे आहे. मुघल शासक हुमायूंलाही त्याने चांगलेच तंगवले होते. मुघलांना जेरीस आणणाऱ्या या राजाचा इतिहास मात्र काहीसा दुर्लक्षित राहिला.
बहाद्दूर शाहचे पूर्ण नाव कुतुबुद्दीन बहाद्दूर शाह. त्याने गुजरातवर फक्त बारा ते तेरा वर्षे राज्य केले. गुजरातचा राजा मुझ्झफर शाहच्या पोटी बहाद्दूर शाहचा जन्म झाला होता. मुझ्झफर शाहने आपला मोठा मुलगा सिकंदर याला आपला वारस घोषित केले. घोषणा होताच सिकंदरने प्रशासनिक अधिकार आपल्या ताब्यात घेतले. वडील मुझ्झफर शाह आणि भाऊ बहाद्दूर शाह यांनाही सिकंदर मानत नव्हता.
सिकंदर आपल्याला कपटाने मारून टाकेल या भीतीने बहाद्दूर शाहने गुजरात सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
याचवेळी बाबर दिल्लीवर कब्जा करण्याच्या प्रयत्नात होता. पानिपतच्या मैदानावर इब्राहीम लोदी आणि बाबरमध्ये जे यु*द्ध झाले त्यावेळी बहाद्दूर शाह देखील या यु*द्धात सहाभागी झाला होता. याचवेळी त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळाली आणि त्याने आपला मोर्चा गुजरातच्या दिशेने वळवला.
गुजरातमधून बाहेर पडल्यानंतर त्याने आजूबाजूच्या राज्यात आश्रय घेतला होता. आपल्याच भावाविरुद्ध बंड करण्यासाठी त्याने या राज्यांकडून मदत मागितली. वडिलांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या गदारोळाचा फायदा उठवत त्याने आपल्या भावाच्या हातून गुजरात राज्याची सूत्रे हिरावून घेत स्वतःला गुजरातचा शासक घोषित केले.
त्याकाळी दीव हा गुजरातचा प्रदेश मानला जात होता. या दीववर पोर्तुगीज गव्हर्नर निनो-डि-कुन्हा याने आक्र*मण केले. पोर्तुगीजांना शह देण्यासाठी बहाद्दूर शाहने तुर्की नौदलाची मदत घेत त्यांना पराभूत केले. शिवाय, पोर्तुगीजांकडून त्यांनी नुकसान भरपाईही वसूल केली. बहाद्दूर शाहकडून पराभूत झाल्यावर पोर्तुगीजांनी गोव्याचा रस्ता धरला.
इकडे बहाद्दूर शाहने तुर्की नौसेनेचा प्रमुख मुस्तफा खानला गुजरातच्या शाही तोफखान्याचा प्रमुख म्हणून नेमला. तुर्कांच्या पाठींब्यामुळे बहाद्दूर शाहची हिंमत वाढली होती. यानंतर त्याने माळव्यावर ह*ल्ला केला.
माळव्याचा महमूद खिलजीही बहाद्दूर शाह पुढे परास्त ठरला. माळवा जिंकल्यानंतर बहाद्दूर शाहने १५३४ साली चित्तोडवर ह*ल्ला केला.
त्याने माळवा, रायसीन आणि चित्तोड राज्यांवर कब्जा मिळवून या प्रदेशात चांगलीच दह*शत पसरवली होती. सिलहदीला बंदी बनवून त्याने रायसेनावर कब्जा केला. या प्रदेशात त्याने आलम खान लोदीला आपले प्रतिनिधी म्हणून पाठवले. आलम खान हा हुमायूंचा शत्रू होता. हुमायूंच्या शत्रूंशी हातमिळवणी केल्यामुळे हुमायूंही त्याच्यावर खार खाऊन होता.
चित्तोडचे शासक महाराणा विक्रमादित्य हे एक कमजोर शासक होते. विक्रमादित्य चितोडचे रक्षण करण्यास समर्थ नाहीत राजमाता कर्णावती यांनाही माहिती होता. म्हणून चितोडच्या आणि आपल्या सुरक्षेसाठी त्यांनी हुमायूंला विनंती केली. हुमायूंला राखी पाठवून त्याला आपले भाऊ मानले आणि एका बहिणीचे रक्षण करणे हे भावाचे आद्य कर्तव्य असल्याचे जाणवून दिले.
राजमाता कर्णावती यांचा हा संदेश हुमायूंपर्यंत पोहोचेपर्यंत खूपच उशीर झाला होता. हुमायूं तेव्हा आपल्या कुटुंबीयांसोबत ग्वाल्हेरमध्ये होता. राखी मिळताच त्याने चितोडला जाण्यासाठी सैन्याची जमवाजमव सुरु केली. तो चितोडमध्ये पोहोचेपर्यंत बहाद्दूर शाहने चितोडवर कब्जा केला होता आणि राजमाता कर्णावतीने जोहार करून आपले आयुष्य संपवले होते.
राजमाता कर्णावतीच्या जोहरची बातमी ऐकून हुमायूंला दुःख झाले. आपल्या बहिणीला आपण वाचवू शकलो नसलो तरी तिच्या मृत्यूचा सूड उगवण्यासाठी म्हणून त्याने बहाद्दूर शाहचा पाठलाग सुरू केला. चितोडपासून एकेक राज्य जिंकत तो गुजरातपर्यंत पोहोचला. पण बहाद्दूर शाह त्याच्या हाती लागला नाही. खरे तर तिकडे उत्तरेत मोहमद लोदी या अफगाण शासकानेही मुगलांना सळो की पळो करून सोडले होते. यावेळी हुमायूंला उत्तरेत असणे गरजेचे होते आणि आता तो उत्तरेपासून खूपच दूर आला होता. बहाद्दूर शाहचा नाद सोडून देऊन तो उत्तरेकडे वळला.
हुमायूंवर परत ह*ल्ला करण्याच्या उद्देशाने बहाद्दूर शाहने काही काळ अज्ञातवासात राहण्याचे ठरवले. यासाठी त्याने पोर्तुगीजांशी मैत्रीचा हात पुढे केला. त्याने पोर्तुगीजांना दीवमध्ये किल्ला बांधण्याची परवानगी दिली.
हुमायूं माघारी फिरताच बहाद्दूर शाहने पुन्हा एकदा आपले राज्य हस्तगत करण्याचा मनसुबा आखला. यासाठी तो पुन्हा आपल्या सैन्याची जमवाजमव करू लागला.
आपले गेलेले राज्य बळकावण्यासाठी त्याने पुन्हा एकदा कंबर कसली. गुजरातवर पुन्हा एकदा बहाद्दूर शाहची सत्ता स्थापन झाली. बहाद्दूर शाह कडून मिळालेल्या सवलतीचा पोर्तुगीजांनी गैरफायदा घ्यायला सुरुवात केली. दीवमध्ये त्यांना पुन्हा प्रवेश मिळताच त्यांनी तिथे आपले साम्राज्य स्थापन केले. आपल्याच कामांसाठी बहाद्दूर शाहला तिथे पोर्तुगीजांची परवानगी घ्यावी लागत होती. पोर्तुगीजांवर विश्वास ठेवून आपण चूक केल्याची त्याला जाणीव होत होती.
पोर्तुगीज आता ताकदवान झाले होते. त्यांच्यासोबत समुद्रातून यु*द्ध करणे बहाद्दूर शाहला अशक्य वाटत होते. इतक्यात हुमायूंने पुन्हा एकदा आपला मोर्चा गुजरातकडे वळवला. हुमायूंला पुन्हा आलेले पाहून बहाद्दूर शाह अस्वस्थ झाला.
इकडे पोर्तुगीज त्याला ताकास तूर लागू देत नव्हते आणि तिकडे हुमायूंही पिच्छा सोडत नव्हता. इकडे आड तिकडे विहीर अशा दुहेरी कात्रीत सापडलेल्या बहाद्दूर शाहने तिरीमिरीत आपल्याच जहाजांना आग लावून टाकली.
पोर्तुगीजांनी त्याच्यासमोर तहाचा प्रस्ताव ठेवला. या तहाच्या बोलणीसाठी त्यांनी बहाद्दूर शाहला दीवला येण्याचे आमंत्रण दिले. हा तहाची बोलणी करण्याचा उद्देशाने दिवला पोहोचला पण पोर्तुगीजांच्या मनात काही तरी भलतेच डावपेच शिजत होते. बहाद्दूर शाह दीवला पोहोचला. ठरल्याप्रमाणे त्यांच्यात तहही झाला. तह झाल्यानंतर बहाद्दूर शाह १३ फेब्रुवारी १५३७ रोजी परत निघाला. परतीच्या प्रवासात असताना पोर्तुगीजांनी त्याची विश्वासघाताने हत्या केली आणि त्याचा मृतदेह अरबी समुद्रात फेकून दिला.
मोगलांना शह देण्याची हिंमत बाळगणाऱ्या या राजाचा असा अंत होणे हे फारच दुर्दैवी होते. बहाद्दूर शाहची कारकीर्द छोटी असली तरी त्याने या छोट्याशा कालावधीत खूप मोठी झेप घेतली होती. इतिहासात दुर्लक्षित राहिलेल्या या राजाच्या धाडसाला खरोखरच दाद द्यायला हवी.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.