आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने चक्रीवादळाचा धोका निर्माण होतो. आपल्याकडे अरबी समुद्रात निसर्ग, अंफान, ओखी, हुडहुड, कॅटरीना, वरदा अशी अनेक वादळं येऊन गेली आहेत. पण, वादळांचं हे नामकरण नेमक्या कशापद्धतीने केले जात असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.
वादळांचे नामकरण करण्याचीही एक विशिष्ट पद्धत आहे आणि त्याचाही एक इतिहास आहे. पूर्वी सर्वच वादळांना एकसारखीच नावे देण्यात येत असत. पण, त्यामुळे कोणत्या वादळामुळे कोणते नुकसान झाले, त्याचे काय परिणाम झाले, वादळाचे नेमके स्वरूप कसे होते, याची नोंद ठेवणे अधिकाधिक क्लिष्ट होत गेले.
तसेच एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वादळे निर्माण होण्याची शक्यता असते. अशा वेळी हवामान खात्याकडून दिल्या जाणाऱ्या सूचना नेमक्या कोणत्या प्रदेशातील नागरिकांसाठी आहेत, हे समजणे सोपे व्हावे म्हणूनही चक्रीवादळांना नाव देण्याची गरज भासू लागली.
मान्सूनच्या सुरुवातीला साधारणपणे अशी वादळे निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. या काळात हवामान तज्ञांकडून चक्रीवादळाच्या नावांची यादी जाहीर केली जाते. चक्रीवादळामुळे घडून गेलेल्या घटना लक्षात राहाव्यात या हेतूने १९व्या शतकापासून वादळाला नावे देण्याची प्रथा सुरु झाली.
सुरुवातीला त्याच त्याच नावांचा पुनर्वापर केला जायचा. १९५३ साली अटलांटिक क्षेत्रात चक्रीवादळाला नावे देण्याचा करार करण्यात आला. १९५३ साली ऑस्ट्रेलियामध्ये भ्रष्ट नेत्यांच्या नावावरून चक्रीवादळाला नाव दिले जायचे. तर अमेरिकेत अशा वादळांना महिलेचे नाव दिले जायचे. उदा. कॅटरीना, इरमा इत्यादी. १९७९ साली पहिल्या वादळाचे नाव पुरुषाच्या नावावरून तर दुसऱ्या वादळाचे नाव स्त्रीच्या नावावरून ठेवले जाऊ लागले.
जगभरात कुठे ना कुठे वादळाचे हे असे थैमान सुरूच असते. वादळाच्या काळात परिसरातील लोकांना जागृत करण्यासाठी त्या त्या देशातील हवामान खात्याकडून काही सूचना दिल्या जातात. या सूचना लोकांच्या लक्षात राहाव्यात, तसेच रिपोर्टिंग करताना पत्रकारांनाही या वादळांची नावे सहज उच्चारता यावीत आणि त्याबद्दलची जागरूकता वाढावी अशा हेतूने छोटी पण, अर्थपूर्ण नावे देण्याची शिफारस करण्यात आली.
२००४ साली भारतासह हिंद महासागर क्षेत्रातील पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश, मालदीव, म्यानमार, ओमान आणि थायलंड या देशांमध्ये चक्रीवादळाने थैमान घातले होते. तेव्हा या प्रदेशातील शास्त्राज्ञांनी एकत्र येऊन या वादळांना नावे देण्याची एक विशिष्ट पद्धत विकसित केली. उत्तर हिंद महासागरात उठणाऱ्या चक्रीवादळांचे नामकरण भारतीय हवामान खात्यातर्फे करण्यात येते.
भारतीय हवामान खात्याच्या किंवा एमआयटी विभागाच्या मते, “उष्णकटीबंधातील चक्रीवादळांना विशिष्ट नावं देण्याची पद्धत गेली अनेक वर्षे सुरु आहे. तांत्रिक संज्ञा किंवा अंक यापेक्षा एखादे विशिष्ट नाव पटकन लक्षात राहते. ज्यामुळे परिसरातील नागरिकांना सूचना ओळखता येतात. चक्रीवादळांसंबधी बातमी जरी द्यायची असेल तर, टीव्ही चॅनलना देखील त्याचे रिपोर्टिंग करणे सोपे जाते. तसेच वादाळांसंबधी दिल्या जाणार्या सूचना समजण्यासही मदत होते. यातून सामुहिक जागृती किंवा सतर्कता वाढण्यास मदत होते.”
त्याहीपेक्षा खालील मुद्यांमुळे चक्रीवादळांना नाव देणे गरजेचं आहे, हे जागतिक स्तरावर देखील मान्य करण्यात आले आहे.
- प्रत्येक स्वतंत्र वादळाची माहिती मिळवणे सोपे जाते.
- वादळासंबधी नेमकी काय स्थिती आहे, याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण होते.
- स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना त्यावर लक्ष ठेवून रिपोर्टिंग करणे सोपे जाते.
- एकाच भागात एकाच वेळी अधिक चक्रीवादळे असतील तर लोकांमध्ये गोंधळ निर्माण होत नाही.
चक्रीवादळाचा परिणाम इतका मोठा असतो की ते विसरणे लोकांना शक्य नाही. अशी नावे आणि त्यासोबतच त्यांचे परिणाम देखील त्याच्या कायम लक्षात राहतात. नागरिकांना काही सूचना द्यायच्या असतील तर त्या जास्त वेगाने लोकापर्यंत पोहोचवता येतात.
उष्णकटीबंधातील चक्रीवादळांची नावे ही कुणा एका विशिष्ट व्यक्ती किंवा वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमानुसार ठेवली जात नाहीत. यासाठी निवडली गेलेली नवे ही त्या त्या प्रदेशातील लोकांच्या परिचयाची असतील अशीच असतात.
प्रत्येक समुद्री भागामध्ये निर्माण होणाऱ्या वादळांची नावे ठरवण्याची एक निश्चित पद्धत ठरवली गेली आहे. उष्णकटिबंधीय चक्रीवादळ प्रादेशिक मंडळाकडे त्या समुद्री भागातील चक्रीवादळांची नावे निश्चित करण्याची जबाबदारी असते. त्यांच्या वार्षिक किंवा द्विवार्षिक बैठकीमध्ये ही नावे निश्चित केली जातात. त्या त्या प्रदेशात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना नावे देण्याची जबाबदारी ही प्रादेशिक विशेष हवामानशास्त्र केंद्राकडे असते.
बंगालची खाडी आणि अरबी समुद्र यांच्या किनाऱ्यावरील डब्ल्यूएमओ/इएससीएपी या पॅनेलमधील देशांसाठी हवामानाचा अंदाज वर्तवण्यासाठी उष्णकटिबंधीय विशेष प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र बनवण्यात आले आहे. चक्रीवादळाला नावे देण्याची जबाबदारी देखील याच केंद्राकडे सोपवण्यात आली आहे. थोडक्यात प्रादेशिक स्तरावर निश्चित करण्यात आलेल्या नियमानुसारच चक्रीवादळांची नावे ठरवली जातात.
उदाहरणार्थ, राष्ट्रीय चक्रीवादळ समिती ही अटलांटिक समुद्रातील चक्रीवादळांच्या नावाची पूर्व-निश्चित यादी तयार करते. इथे सहा याद्या बनवल्या जातात आणि आळीपाळीने ती नावे दिली जातात. याप्रमाणे, २०१८ साली बनवण्यात आलेली यादी पुन्हा २०२४ साली वापरली जाईल आणि पुढेही त्याच पद्धतीने वापरात येईल.
अगदी, ईशान्य पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळांना नावे देताना देखील ही यादी दर सहा वर्षांनी पुन्हा वापरात आणली जाते. याबाबतचे तपशील World Meteorological Organization (WMO)च्या वेबसाईटवर पाहता येतील.
जर एखाद्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि जीवितहानी झाली असल्यास ते नाव पुन्हा वापरले जात नाही. त्या वादळाचा इतिहास आणि नोंद ही एकाच विशिष्ट नावाने ओळखली जाते.
एवढेच नाही तर तुम्हाला देखील अशी काही नावे सुचवायची असतील तर सुचवू शकता. पण, त्यासाठी काही अटी आहेत.
तुम्ही सुचवलेली ही नावे छोटी अन् सुटसुटीत असावीत, ज्यामुळे प्रसारणावेळी त्याचा अर्थ कळणे सोपे जाईल. ही नावे सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील नसावीत. तसेच त्यांचा अर्थ प्रक्षोभक किंवा अनाकलनीय नसावा. कोणत्याही सांस्कृतिक गटाच्या भावना यातून दुखावल्या जाणार नाहीत याचीही दक्षता ही नावे निवडताना घेतली जाते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.