आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आजच्या काळात शाकाहारी आहार म्हणजे काहींना जोक वाटतो. काहींचे जेवण तर मांसाहाराशिवाय पूर्ण होत नाही. पण शाकाहार ही आहार पद्धती आजवर अनेक विद्वानांनी अंगिकारली आहे.
काळ जसा पुढे जात आहे तसा शाकाहारी आहार सुद्धा व्यापक बनत चालला आहे, मग त्याला निमित्त काहीही असो, शारीरिक सौंदर्य, आरोग्याविषयी जाणीव यांमुळे अनेक लोक आज शाकाहारी अन्नसेवनाचा अवलंब करतात. पण शाकाहारी होण्याचा ‘ट्रेंड’ हा काही अलीकडचा, एकोणिसाव्या-विसाव्या शतकातील नाही.
भारतामध्ये छांदोग्य उपनिषद हे इसवी-सनपूर्व ८ व्या ते ६ व्या शतकात रचले गेले आहे. छांदोग्य उपनिषदानुसार, ‘आहार शुद्धौ सत्त्व शुद्धिः। सत्त्व शुद्धौ ध्रुवा स्मृतिः ।। स्मृति लम्भे सर्व ग्रन्थीनां । विप्र मोक्षः।।’. म्हणजेच शुद्ध आहारामुळे मानसिक शुद्धता येण्यास मदत होते, शुद्ध मनामुळे निश्चयात्मक बुद्धीचा विकास होतो, ज्यामुळे कोणत्याही निर्णयप्रक्रियेत अडचण येत नाही आणि निश्चयात्मक बुद्धीने सर्व बंधनेही तुटतात!
शाकाहारी आहाराची सुरुवात कशी झाली हे समजून घेण्यासाठी, आपल्याला अडीच हजार वर्षांहून अधिक काळाच्या इतिहासात डोकवावं लागेल. तसेच त्यासाठी आपल्याला ग्रीस आणि भारताच्या संस्कृतीचा आढावा घ्यावा लागेल.
इसवीसनपूर्व सहाव्या शतकात संपूर्ण शाकाहार होत असे. परंतु शाकाहार यापेक्षाही फार जुना आहे. प्रागैतिहासिक काळातील शिकारी समुदाय क्वचितच मांस खात असत आणि दैनंदिन आयुष्यात ते वनस्पती म्हणजेच शाकाहारी अन्न सेवन करीत असत. परंतु आपण इसवी सनपूर्व पहिल्या सहस्राब्दीच्या शाकाहाराचा आढावा याठिकाणी घेणार आहोत.
ग्रीक गणितज्ञ आणि तत्वज्ञानी ‘पायथागोरस’ हा शाकाहाराचा सर्वात जुना समर्थक आहे. तो काही तात्विक कारणांसाठी शाकाहारी आहाराचे सेवन करीत होता. मृत्यूनंतर आत्मा अनेक सजीवांच्या शरीरातून जातो अशी गूढ संकल्पना होती.
याचवेळी मानवतेच्या सुवर्णयुगाच्या कल्पनेने संपूर्ण युरोपीय जग व्यापले होते. मानवी सुवर्णयुग म्हणजे आदर्शवादी अहिंसात्मक युग तसेच मानव आणि प्राणी संपूर्ण सुसंवादाने राहत असल्याचा काळ आहे. प्राण्यांवरील क्रू*रता टाळणे हा मानवाच्या शांततापूर्ण सहजीवनाचा एक महत्त्वाचा घटक आहे कारण प्राण्यांच्या क*त्तलीमुळे मानवी आत्म्याला क्रू*रता येते आणि समाजात अधिक हिं*साचार होतो असा पायथागोरस आणि त्याच्या अनुयायांचा विश्वास होता.
पायथागोरसचे हेच मत जेव्हा पाश्चिमात्य जगात पसरू लागला होता तेव्हाच पूर्वेकडे बौद्ध विचारांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत होता. या दोन्ही विचाराने प्राण्यांवरील हिं*साचाराला विरोध केला आणि शाकाहारी आहाराला प्रोत्साहन दिले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत जे युरोपीय लोक मांस खात नव्हते त्यांना पायथागोरीयन म्हटले जायचे, इतकी पायथागोरसची तत्त्वे प्रभावशाली होती. प्लेटो, लिओनार्डो दा विंची, बेंजामिन फ्रँकलिन, फ्रांझ काफ्का, लिओ टॉल्स्टॉय, महात्मा गांधी, अल्बर्ट आइनस्टाईन, जॉर्ज बर्नार्ड शॉ हे काही प्रसिद्ध शाकाहारी आहेत.
प्राचीन रोमच्या सभ्यतेमध्ये, पायथागोरियन आदर्शांचे पालन मोठ्या प्रमाणात केले गेले नाही. एरिनामध्ये प्राणी आणि ग्लॅडिएटर्स मारणे हे एक लोकप्रिय मनोरंजन बनलेल्या यो*द्धा संस्कृतीत, शाकाहाराची कल्पना वापरात आली नाही. तपस्या करून जे मुक्तीची अपेक्षा करीत होते तेच फक्त शाकाहारी होते. रेनायसेंन्स अर्थात पुनर्जागरण काळात प्राचीन तत्त्वज्ञांच्या रिडिस्कव्हरीमुळे आणि प्राण्यांप्रती अहिंसात्मक राहणाच्या दृष्टीने शाकाहारावादाचा पुनर्जन्म झाला.
रेनायसेंन्स अर्थात पुनर्जागरण आणि सुरुवातीच्या आधुनिक काळातील अनेक तत्त्ववेत्ते आणि विद्वानांनी मांसाहारामुळे प्राण्यांना होणाऱ्या दुःखाबद्दल लिहिले. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध लेखक ‘लिओनार्डो दा विंची’ आहेत. एकोणिसाव्या शतकात ग्रेट ब्रिटनमध्ये पहिली व्हेजिटेरियन सोसायटी स्थापन झाली आणि लंडनमध्ये पहिले शाकाहारी रेस्टॉरंट दिसू लागल्यावर या चळवळीला गती मिळाली.
विसाव्या शतकात, शाकाहारवादाला तात्विक आणि धार्मिक कारणे देणे बंद झाले आणि पर्यावरणीय चळवळ, प्राण्यांच्या हक्कांची चळवळ आणि निरोगी जीवनशैली या पार्श्वभूमीवर शाकाहारवादाला प्रोत्साहन मिळाले. भारत हा सध्या सर्वांत जास्त शाकाहारी लोक असलेला देश आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी सुमारे ४०% लोक शाकाहारी आहेत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.