आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जिथवर नजर जाईल तिथपर्यंत असीमित सागर, पायाखाली छान गुळगुळीत रेत, एकीकडे अद्वितीय सूर्यास्त आणि दुसरीकडे नवीन सूर्योदय, असे दोन्ही नेत्रदीपक दृश्य पहायचे असल्यास तुम्हाला दक्षिणेतील पुद्दुचेरीला भेट द्यावी लागेल.
आज निसर्ग सौंदर्याने नटलेलं पुद्दुचेरी हे एकेकाळी भारतातील फ्रान्सचे व्यापारी केंद्र होते. ज्यावेळी संपूर्ण भारतावर ब्रिटिशांचे अधिपत्य होते, त्यावेळी पॉंडिचेरी हा काही निवडक भागांपैकी एक भाग होता जिथे फ्रेंच लोकांचे वर्चस्व होते. आज पॉंडिचेरीत फ्रेंच लोक नाहीत पण आजही फ्रेंच संस्कृतीच्या पाऊलखुणा पॉंडिचेरीत बघायला मिळतात. मच्छिमार लोकांच्या या छोट्याशा भागासाठी ब्रिटिश आणि फ्रेंचांनी अनेकवेळा यु*द्ध केलं आहे.
१५ व्या आणि १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी पश्चिमेच्या किनारपट्टीवरील अनेक महत्त्वाचे बंदर ताब्यात घेऊन व्यापार करण्यास सुरुवात केली. १७ व्या शतकात पोर्तुगीजांच्या पाठोपाठ डच लोकांनी देखील भारतात व्यापार करण्यास सुरुवात केली.
पोर्तुगीज आणि डच यांनी भारतासोबत व्यापाराच्या माध्यमातून उभी केलेली संपत्ती बघता, फ्रेंच लोकांची नजर देखील भारताकडे गेली.
१७ व्या शतकाच्या उत्तरार्धात फार उशिरा फ्रेंच लोकांचे भारताकडे लक्ष गेले. भारतात ब्रिटिशांनी देखील प्रवेश केला होता पण समुद्रावर पोर्तुगीजांचे साम्राज्य होते. फ्रेंच सम्राट चौदाव्या लुईच्या मंत्रिमंडळातील कॉल्बर्ट या मंत्र्याला भारतीय भूमीचे महत्त्व लक्षात आले होते. त्याने फ्रान्स आणि भारतातील व्यापारासाठी कंपनी देस इंडस ओरिएंटल या व्यापारी समूहाची स्थापना केली आणि या समूहाला भारताशी व्यापार करण्यासाठी रवाना केले. ही एक निमशासकीय कंपनी होती, जिच्यावर फ्रेंच सम्राटाचे देखील तितकेच वर्चस्व होते. या कंपनीच्या खर्चाचा हिशोब ठेवण्याचे काम लुईच्या मंत्र्यांकडे सोपविण्यात आले होते.
या कंपनीचा प्रमुख असलेला फ्रँक कैरो भारताच्या विविध भागांचा दौरा व निरीक्षण करण्यासाठी भारतात दाखल झाला. त्याने सर्व देशाचा दौरा करून देशाशी व्यापार करण्याची तयारी सुरु केली. १६६८ मध्ये फ्रँकने सुरत येथे भारतातील पहिल्या फ्रेंच व्यापारी संस्थानाची स्थापना केली.
१६६९ मध्ये मसुलीपट्टणम येथे त्यांनी गोवळकोंड्याच्या राजाच्या आशीर्वादाने दुसऱ्या संस्थानाची निर्मिती केली. १६७३ ला फ्रँक पॉंडिचेरीला येऊन पोहचला. याठिकाणी त्याने त्याच्या सर्व संस्थानांचे मुख्यालय बनवले. १६९२ छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटे तोडल्याने अपमानास्पद शाहीस्तेखान औरंगजेब कृपेने बंगालचा नवाब बनला होता. इथे १६९२ मध्ये फ्रँकोने त्याची मर्जी संपादन करून चंद्रनगर येथे अजून एक फ्रेंच संस्थान वसवले. अशाप्रकारे गुजरात, बंगाल आणि दक्षिण भारतात फ्रेंच लोकांनी आपले व्यापारी जाळे विस्तारले.
फ्रान्सने पॉंडिचेरी मच्छिमार लोकांच्या गावाचे रूपांतर एका व्यापारी तळात केले. त्यांनी तिथे व्यापारी केंद्र उभारले इतकेच नाही, त्यांनी तिथे त्यांची व्यापारी राजधानी तयार केली.
यामुळे पॉंडिचेरीच्या रूपात बदल घडत गेला आणि ते एक संपन्न शहर बनले. फ्रान्सचे अनेक मोठे व्यापारी आणि अधिकारी त्या भागात वास्तव्यास होते, त्यांनी या भागाचे एका चांगल्या शहरात रूपांतर केले होते. तेथील प्रत्येक गोष्टीवर फ्रेंच संस्कृतीची छाप होती तिथली घरे, गार्डन, रस्ते सगळे काही फ्रेंच वास्तुकलेतून साकारण्यात आले होते.
येथील सूर्योदय आणि सूर्यास्ताचे मनमोहक दृश्य अनुभवण्यासाठी फ्रेंच अधिकाऱ्यांनी येथे पीस टॉवर उभारले होते.
इथे फ्रेंच लोक सहकुटुंब, सहपरिवार वास्तव्य करायचे. त्यांनी याठिकाणी लायब्ररी बांधली, चर्च उभारले पण त्यांनी याठिकाणी इतर युरोपियन देशांप्रमाणे मंदिरांचा वि*ध्वंस केला नव्हता. इथे फ्रेंच स्टॅच्यू होते, ज्यात चुंबन घेणाऱ्या दाम्पत्याला दाखवण्यात आले होते. इथल्या खाद्यसंस्कृतीवर देखील फ्रेंच प्रभाव पडून याठिकाणी फ्रेंच किचन तयार करण्यात आले होते, ज्यात फ्रेंच डिशेस होत्या. या खाद्यपदार्थांची चर्चा बंगालपर्यंत होती.
फ्रेंच लोकांचे भारतीय राजांशी चांगले संबंध होते आणि हीच बाब पोर्तुगीजांना व डच लोकांना खटकत होती. डच आणि पोर्तुगीजांनी पॉंडिचेरीसाठी अनेक वेळा फ्रेंचांशी यु*द्ध केले. एका यु*द्धात डच लोकांनी फ्रेंच लोकांचा पराभव केला आणि पॉंडिचेरी ताब्यात घेतली. यानंतर पॉंडिचेरीतून काही काळासाठी फ्रेंच हद्दपार झाले होते पण पॉंडिचेरी नसल्याने फ्रेंच लोकांच्या इतर भागातील व्यापारावर परिणाम होऊ लागल्याने त्यांनी डचांशी करार करून सहयोगाने व्यापाराचे धोरण स्वीकारले.
पुढे फ्रेंच लोकांना व्यापारात नुकसान होऊ लागल्याने त्यांनी सुरत आणि चंद्रनगरचे बंदर बंद केले. त्याऐवजी त्यांनी यानम, कारिकल, माहे या नवीन बंदरावरून व्यापार करण्यास सुरुवात केली. तेव्हासुद्धा त्यांच्या व्यापाराचे केंद्र हे पॉंडिचेरीच होते. १८ व्या शतकाच्या मध्यापर्यंत पॉंडिचेरी एक मोठे शहर बनले होते.
१८ व्या शतकात फ्रेंच आणि ब्रिटिश दोघेही मुघल सत्तेच्या कमकुवतपणाचा फायदा उचलत देशावर आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छित होते. दक्षिण भारतातील वर्चस्वासाठी ब्रिटिश आणि फ्रेंच लोकांमध्ये चार वेळा यु*द्धे झाली. ही सर्व यु*द्धे पॉंडिचेरीच्या वर्चस्वासाठी होती. १७४६ -१७४९ मध्ये झालेल्या यु*द्धात फ्रेंच विजयी झाले. त्यांच्या बुस्सी नामक अधिकाऱ्याने या यु*द्धात मोठे शौर्य गाजवले होते. यामुळे उत्तर भारतात ७ वर्ष फ्रेंच लोकांना नियंत्रण प्रस्थापित करता आले.
पुढे १७४९-५१ या काळात दुसरे युद्ध लढले गेले यात रॉबर्ट क्लाइव्हच्या चातुर्याने ब्रिटिशांचा विजय झाला. फ्रेंच पराभूत झाल्याने पॉंडिचेरी ब्रिटिश अधिपत्याखाली आली. यानंतर ब्रिटिशांनी पॉंडिचेरीवर फ्रेंचांशी करार केला आणि पॉंडिचेरी पुन्हा फ्रेंच लोकांना परत मिळाली. यानंतर फ़्रेंच सेनापती काउंट लालीने ब्रिटिशांवर आक्रमण केले. यात ब्रिटीशानी फ्रेंच लोकांचा पराभव करत पॉंडिचेरी पुन्हा जिंकली.
काही काळाने फ्रेंचांनी पुन्हा पॉंडिचेरीवर आक्रमण केले आणि तिला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त केले. यानंतर ब्रिटीशांनी पॉंडिचेरी सोडून इतर भारतावर लक्ष केंद्रित केले आणि भारत स्वातंत्र्य होईपर्यंत पॉंडिचेरी फ्रेंच लोकांच्या ताब्यात आली.
भारत स्वतंत्र झाला आणि संस्थानांचे विलीनीकरण प्रक्रिया सुरु झाली. पॉंडिचेरी भारतात आली पण त्यावेळी कारिकल, यानम, माहे यांच्यासह पॉंडिचेरी एक होता. त्यावर आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूने आपला अधिकार सांगण्यास सुरुवात केली. अखेरीस केंद्र सरकारने हा प्रदेश १९६२ साली केंद्रशासित घोषित केला. २००६ साली पॉंडिचेरीचे पुद्दुचेरी असे नामकरण करण्यात आले.
आजही पुद्दुचेरीत फ्रेंच कॉलनीज आहेत. तिथे फ्रेंच लोक आजही राहतात, फक्त आज ते स्वतःला भारतीय म्हणवून घेतात. जर तुम्हाला फ्रान्सला जायला परवडत नसेल तर तुम्ही पॉंडिचेरीत जाऊन फ्रेंच संस्कृतीचा आनंद घेऊ शकता!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.