आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
प्राचीन खाणाखुणा जपणाऱ्या ऐतिहासिक अशा स्थळांचा समृद्ध वारसा भारताला लाभलेला आहे. आपल्या पूर्वजांनी प्रत्येक क्षेत्रात अगदी जीव ओतून एकेक उत्तुंग आदर्श निर्माण केले आहेत. वास्तुकला, साहित्य, संगीत, विज्ञान, अध्यात्म, अनेक क्षेत्रात बहुमोल अशा खजिन्याची निर्मिती करून ठेवलेली आहेत. प्राचीन लेणी, गुंफा, मंदिरे, राजवाडे, इत्यादींचे सौंदर्य आणि भव्यता हरवू दिल्या नाहीत.
वेगवेगळ्या कालखंडातील वेगवेगळ्या शासकांनी आपापल्या कारकिर्दीत ही परंपरा समृद्ध करण्यासाठी हातभार लावला. त्यामुळेच इथे वस्तूकलेतील उत्तमोत्तम नमुने पाहायला मिळतात. भारतातील प्रत्येक राज्यात तिथल्या सांस्कृतिक वैशिष्ट्यांनी नटलेल्या वस्तू पाहायला मिळतात.
आता मध्य प्रदेशचंच उदाहारण घ्या. इथे तर अशा प्राचीन वास्तूंचा खजिनाच आहे. मध्यप्रदेशातील तिकमगढ जिल्ह्यात एक गाव आहे, ओरछा. या शहरातील एक मध्ययुगीन किल्ला खूपच प्रसिद्ध आहे. या किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर आणि या किल्ल्याचे बांधकाम, त्याची कलाकुसर पहिली की निसर्गाचे अद्भुत सौंदर्य आणि कारागिरांची अद्भुत कलाकारी एकत्र आल्यावर किती सुंदर आश्चर्य जन्मास येऊ शकते, याचा अंदाज येईल.
हजारो वर्षांपूर्वीचा हा किल्ला आजही आपल्या वैभवाच्या तोऱ्यात तसाच उभा आहे. या किल्ल्यांचे सौंदर्यच आपल्याला इतके मोहवून टाकते की या किल्ला पाहून बाहेर पडताना पाय निघता निघणार नाही.
झाशीपासून १६ किमी अंतरावर बेतवा नदीच्या काठी वसलेल्या या ओरछा गावातील हा जुना किल्ला पर्यटकांचे आकर्षण स्थळ आहे. या किल्ल्याचा इतिहास खूप जुना आणि रोचक आहे.
सोळाव्या शतकात राजा रुद्र प्रताप सिंह बुंदेला याने याठिकाणी आपले स्वतंत्र राज्य सुरु केले तेव्हा त्याने हा किल्ला बनवून घेतला होता. १७८३ पर्यंत इथे बुंदेल वंशाचेच राज्य होते. त्यानंतर जो कोणी ओरछाच्या गादीवर बसेल त्या प्रत्येक राजाने इथल्या सौंदर्यात भर घालण्याचेच काम केले. या किल्ल्यात अनेक महाल आहेत आणि या प्रत्येकाला स्वतःचा स्वतंत्र इतिहास आहे.
राजा मधुकर सिंह यांनी या किल्ल्यात एक खास राजमहाल आणि राम मंदिर बांधून घेतले होते. १५५४ – १५९१पर्यंत त्यांनी ओरछावर राज्य केले. त्याच्यानंतर वीर सिंह देवने हे राज्य जिंकले. १६०५ ते १६२७ या वर्षात त्याने इथे शासन केले. त्यानेही ओरछा किल्ल्याच्या सौंदर्यात भर घालणारा जहांगीर महाल उभारला. हा महाल म्हणजे एक राजाचा महाल, जहांगीर महाल, रायप्रवीण महाल आणि शिश महाल. यातील शिश महाल हा सध्या मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या ताब्यात असून त्यांनी या महालाला एका हॉटेलचे रूप दिले आहे.
आपण पाहतो की अनेक किल्ले हे उंच ठिकाणावर बांधलेले असतात. परंतु ओरछाचा हा किल्ला शहरातच आहे. ओरछाच्या गौरवशाली इतिहासाचे प्रतिक, विशाल आणि भव्य!
या किल्ल्याची तशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातील एक म्हणजे याचे प्रवेशद्वार! इथले प्रवेशद्वार अत्यंत प्रशस्त आणि खास आहे. या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर एक चौकोनी अंगण दिसते. या अंगणाच्या चारही बाजूला मोठमोठे महाल आहेत. यातील जहांगीर महाल आणि राजाचा महाल सर्वांत खास असल्याचे मानले जाते. शिवाय या ठिकाणी वेगवेगळी उद्याने आहेत. मंडप आहेत. आणि मंदिरेही आहेत. छोट्या छोट्या सुंदर बागा आहेत.
इथला जहांगीर महाल स्थापत्य शैलीसाठीच प्रसिद्ध आहे. हा महाल म्हणजे दोस्तीचे प्रतिक म्हणूनही ओळखले जाते. जहांगीर बादशहा ओरछाचे राजे वीर सिंह यांना भेटण्यासाठी येणार होता. राजा जहांगीर फक्त एकच रात्र ओरछामध्ये घालवणार होता. तरीही आपल्या प्रिय मित्राच्या स्वागतासाठी राजा वीर सिंह यांनी हा खास महाल बांधून घेतला. या महालाच्या प्रवेशद्वाराच दोन छोटे दगडी हत्ती बनवण्यात आले आहेत. कलाकुसरीचा हा एक अतिउत्तम नमुना मानला जातो. वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथात सांगितलेल्या अनेक कथांचे चित्रण इथल्या भिंतीवर पाहण्यात येते.
यातलाच आणखी एक महत्वपूर्ण महाल म्हणजे शिश महाल, ज्याला पॅलेस ऑफ मिरर देखील म्हटले जाते. या शिश महालाचे बांधकाम आणि त्याची रचना पाहून पाहणाऱ्यांची दृष्टी त्यावर खिळूनच राहतील.
इथला राय प्रवीण महाल, राज महाल आणि सुंदर महाल यांचेही खास वेगळेपण आहे.
या किल्ल्यातील मंदिरे पहिली तर डोळे तृप्त होऊन जातील. इथे राजा राम मंदिर आहे. या मंदिराचीही एक वेगळी गोष्ट आहे.
राजा मधुकरच्या स्वप्नात एकदा प्रत्यक्ष भगवान राम आले आणि त्यांनी राजाला आपले मंदिर बांधण्याचे आदेश दिले. या स्वप्नानंतर राजा मधुकर यांनी खास अयोध्येतून राम मूर्ती मागवली आणि मंदिराचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्यांनी ही मूर्ती आपल्या महालात ठेवली.
मग पुन्हा भगवान राम त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी मूर्ती महालातच ठेवण्याचे आदेश दिले. मग पुन्हा, त्यांनी महालालाच मंदिर बनवले.
ओरछा शहराच्या पश्चिमेला एका टेकडीवर बांधलेले लक्ष्मी-नारायण मंदिर आणि चतुर्भुज मंदिर देखील पाहण्यासारखे आहे. या मंदिरात चतुर्भुज विष्णूची मूर्ती स्थापन केली आहे. लक्ष्मी नारायण मंदिराच्या भिंतीवर झाशीच्या युद्धातील प्रसंग रेखाटण्यात आले आहेत.
बस, रेल्वे विमान कशाच्याही सहाय्याने तुम्ही ओरछा मध्ये पोहोचू शकता. रेल्वेने प्रवास करणार असाल तर झाशीला जाणारी कुठली ट्रेन तुम्ही पकडू शकता. झाशी पासून फक्त १६ किमी अंतरावरच हे शहर वसलेले आहे.
तुम्ही जर विमानाचा पर्याय निवडलात तर तुम्हाला खजुराहो विमानतळावर उतरावे लागेल. इथून ओरछा १४० किमी अंतरावर आहे. झाशी ते खजुराहो या रस्त्यावरच हे गाव आहे. बसने तुम्ही केंव्हाही इथे पोहोचू शकता.
भारतात असे अनेक किल्ले आहेत, ज्यामध्ये कित्येक गोष्टी दडलेल्या आहेत. कित्येक गाथा लपलेल्या आहेत. ओरछा देखील असाच एक समृद्ध किल्ला आहे, ज्यामध्ये बुंदेल राजवंशाच्या कथा सापडतील.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.