आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
शून्याचे महात्म्य तुम्हाला माहिती आहे का? शून्य हा आकडा एखाद्या संख्येच्या मागे लावला तर त्या संख्येची किंमत वाढते आणि हाच आकडा एखाद्या संख्येच्या अगोदर लावला तर त्या संख्येची किंमत कमी होते, हे तर आपण जाणतोच. संख्याशास्त्रात या शून्याची फार महती आहे.
शून्याचे हे प्रकरण समजून घेणे तसे अवघड नाही. आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलेच असेल की शून्याचा शोध आर्यभटाने लावला. पण अशावेळी अनेकांना प्रश्न पडतो की मध्ययुगात आर्यभटाने शून्याचा शोध लावला तर प्राचीन काळी ऋषि मुनींनी रावणाची १० तोंडे आणि ३३ कोटी देव असे आकडे कसे लिहून ठेवले आहेत? याचाच अर्थ शून्याचा इतिहास हा आर्यभटाच्या आधीचा असायला हवा. आता तोच इतिहास आपण उलगडून पाहणार आहोत.
कुठलाही शोध लावणे म्हणजे एखाद्या अस्तित्वात असलेल्या वस्तू अथवा शक्तीकडे बघण्यासाठी एक नवीन दृष्टीकोन अंगीकारणे. आपण जसं म्हणतो की न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, पण मुळात गुरुत्वाकर्षण हे न्युटनच्याही आधीपासून पृथ्वीवर होते. हेच शून्याचा बाबतीत आहे.
आर्यभटाने शून्याचा शोध लावला नाही, तर त्या शून्याला सांख्यिकी स्वरूप प्रदान करण्याचे काम केले होते.
शून्य हा आधीपासूनच आपल्या संस्कृतीच्या विविध ग्रंथांत होता. दशम, पंचम आणि सहस्त्रकाची परिमाणे गेल्या कित्येक हजार वर्षांपासून आपल्याकडे अस्तिवात आहेत. आर्यभटाने फक्त शून्याचे सांख्यिकी स्वरूप समाजाला दिले.
२५०० वर्षे जुन्या संस्कृत दस्तावेजांनुसार इसवी सन पूर्व १२००-१३०० साली शून्य आणि अंश या दोन गणितीय परिमाणांचा वापर करण्यास सुरुवात झाली. संस्कृत श्लोक, गद्य आणि दोह्यांमध्ये देखील यांचा वापर करण्यात आला होता. पण याला गणितीय स्वरूप अथवा संज्ञा प्रदान करण्यात आली नव्हती. त्याकाळी जगभरात अनेक प्रकारच्या अंक प्रणाली प्रचलित होत्या, काही ठिकाणी फक्त ५ अंकांचा उपयोग करण्यात येत होता तर काही ठिकाणी १२ अंकांचा उपयोग करण्यात येत होता.
माया संकृतीत २० अंकाचा वापर करण्यात येत होता. सिंधु संस्कृतीत हा आधार बदलून १ ते ९ अंकांचा वापर करण्यास सुरुवात करण्यात आली. इथे ९ नंतर सरळ ११ यायचा कारण शून्याचा वापर सुरु झाला नव्हता. या पुराव्यामुळे जे सिद्ध झाले की उत्तर वैदिक काळात शून्याचा शोध लावण्यात आला नव्हता.
इसवी सन पूर्व १००० ते ६०० या काळाला उत्तर वैदिक कालखंड म्हणतात. याच काळात यजुर्वेद, अथर्ववेद, उपनिषदे, आरण्यके आणि ब्राह्मण ग्रंथांची रचना करण्यात आली होती. या सर्व ग्रंथांत दशांश आणि शून्याचा वापर करण्यात आला होता. त्याकाळी ऋषीमुनी हे वाऱ्याचा वेग, ऋतुचक्र, कालचक्र याची मोजदाद संख्याशास्त्राच्या बळावर करायचे.
भारताच्या गणितीय तत्त्वज्ञानावर लिहिलेल्या मॅथेमॅटिक्स इन इंडिया या पुस्तकात उंची, रुंदी, लांबी मोजण्यासाठी वैदिक काळातील लोक संख्याशास्त्राचा वापर करायचे असा उल्लेख करण्यात आला आहे. पण हे सर्व गणितीय ज्ञान या साधूसंतांनी शाब्दिक स्वरूपात लिहिले होते. त्यांनी गणितीय मोजमापासाठी शल्व सूत्रांची रचना केली होती. शल्व हे त्या दोरीचे नाव होते जिचा वापर यज्ञकुंडाचे आरेखन करण्यासाठी व्हायचा.
‘बोधायन’, ‘आपस्तंभ’ आणि ‘कात्यायन’ ऋषींनी या शल्व सूत्रांच्या निर्मितीचे कार्य केले. बोधायन यांनी ‘पायथॅगोरसचा प्रमेय’ शोधून काढला होता.
हे सर्व शोध तब्बल ३००० वर्षांपूर्वी लावण्यात आले आहेत. ऋषीमुनींनी या शास्त्रात आरेखन, श्लोकांमध्ये दशांश आणि शून्य यांची वर्णने केली आहेत. यावरून प्राचीन भारतातील ऋषीमुनी हे संख्याशास्त्र जाणत होते, हे यावरून स्पष्ट होते. बौद्धकाळात भगवान बुद्धाने आपल्या पत्नीला जिंकण्यासाठी काही अत्यंत कठीण गणितीय कोडी सोडवल्याचे वर्णन करण्यात आले आहे. यावरून बौद्धकाळात देखील अंकशास्त्र प्रगत होते, हे सिद्ध होते. बौद्ध काळात बरेच खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होऊन गेले, ज्यांनी गणिताला एक वेगळे स्वरूप प्रदान करण्याचे काम केले.
बौद्ध भिक्षु विमल कीर्ती आणि मंजुश्री यांच्यातील संवादाचा प्रमुख विषय हा ‘शून्य’ होता. त्यांच्या संवांदातून साकारण्यात आलेल्या शून्याच्या सूत्राचे तिबेटी आणि चिनी भाषेत तब्बल ७ वेळा भाषांतर करण्यात आले. त्याच्या प्रति आज त्या भाषांमध्ये उपलब्ध असून मुळ संस्कृत प्रत नष्ट झाली आहे.
भारतात शून्याचे अस्तित्व फार जुने आहे, याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे आपल्याला युनानी गणितज्ञांच्या पुस्तकात आणि वास्तुकलांवर शून्याचा आकार कोरण्यात आलेला आढळून येतो. अनेक बौद्ध स्तुपांवर देखील आपल्याला अशाच प्रकारच्या आकृत्या आढळून येतात. ग्रीक आणि बॅबिलोनियन संस्कृतीत मात्र शून्याचे अस्तित्व आढळून येत नाही.
इसवी सन १३० मध्ये यूनानच्या अंकशास्त्रात बदल घडला. बॅबिलोनियन खगोलशास्त्री टोलेमीने षष्टिक गणना पद्धतीत शुन्याचा वापर केला होता. पण हा शून्य, आज आपण बघतो त्या शून्यापेक्षा फार वेगळा होता.
इसवी सन पूर्व ५०० मध्ये भारतात छंदशास्त्राचा आविष्कार करण्यात आला. ज्याचे श्रेय पिंगलाचार्यांना जाते. त्यांना द्विअंकीय गणिताची प्रेरणा देखील मानले जाते. पिंगलाचार्य यांनी तयार केलेल्या छंद नियमात आणि अंकशास्त्रात अनेक समानता आढळून येतात. त्यांच्या नियमांमध्ये दोन अंक आणि त्यांचे घन समीकरणाचे चतुर्घाती समीकरण देखील आढळून येते. या आधारावर भारतात इसवी सन पूर्व २०० मध्ये शून्याचा शोध लागल्याचे स्पष्ट होते.
१८८१ मध्ये खैबर क्षेत्रातील बख्शाली येथे बहुमुल्य ग्रंथ ‘बख्शाली पांडुलिपी’ची काही ताम्रपत्रे आढळून आली होती. याच ताम्रपत्रांत इसवी सन पूर्व ५०० मध्ये शून्याचा उल्लेख आढळून येतो. गणितीय ग्रंथांमध्ये इसवी सन पूर्व ३०० मध्ये ‘भगवती सूत्र’तयार करण्यात आले, यात देखील शून्याचा उल्लेख आढळून येतो. अंगरअंक सिद्धांत, रेखागणित, भिन्न, सरल समीकरण, घन समीकरण, चतुर्घाती समीकरण सोडवण्याची विधी आढळून येते. यात समुच्चय सिद्धांताचा देखील उल्लेख आढळून येतो.
गुप्तकाळातील शून्य दशमिक स्थानमान संस्थेत देखील शून्याचा उल्लेख आढळतो. हा भारताचा स्वर्णकाळ होता, ज्यात ज्योतिषशास्त्राचा विकास करण्यात आला होता. याच काळात इमारतींवर शून्याची आकृती कोरली गेली. शालिवाहन नरेश नागार्जुनाने शून्यवादाची स्थापना केली होती.
शून्यवाद ही बौद्ध परंपरेची एक शाखा आहे. या शाखेनुसार शून्याच्या व्यतिरिक्त बाकी कशाचेच अस्तित्व नाही. इसवी सन १६० ते १९९ मध्ये नागार्जुनाने शून्यवादावर बराच अभ्यास केल्याचा आढळतो.
आर्यभट्टाचा जन्म इसवी सन पूर्व ४७६ मध्ये झाला. त्यावेळी भारताला पिंगलाचार्य आणि नागार्जुन यांच्या शून्याशी निगडित सिद्धांत चांगलाच परिचित होता. आर्यभटाने नवीन अक्षरांश पद्धत जन्माला घातली. ही पद्धत नागर्जुनाच्या सिद्धांताने प्रेरीत होती.
आर्यभटाने १ अब्जापर्यंत संख्यांचे लेखन आर्यभटीय या पुस्तकात केले. यात त्याने मागील संख्या ही पुढच्या संख्येच्या तुलनेत दहापटीने लहान आहे, असा उल्लेख केला आहे.
गुप्त काळात ब्रम्हगुप्त, श्रीधराचार्य, महावीराचार्य यांच्यानंतर आर्यभटाने गणितावर सर्वात चांगले कार्य केले होते. ब्रम्हस्फुट सिद्धांतात ब्रम्हगुप्ताने शून्याला ‘अ-अ=0’ अशा प्रकारे वर्णिले होते. श्रीधराचार्य यांच्या त्रिशविका या ग्रंथानुसार एखाद्या संख्येत शून्य मिळवल्यास त्या संख्येत बदल होत नाही आणि जर शून्याने त्या संख्येला गुणल्यास ती संख्या शून्य होते.
सातव्या शतकात ब्रम्हगुप्ताने शून्य आणि इतर अंकांवर अनेक प्रयोग केले. त्याच्या अनुयायांनी गणिताला कंबोडियापर्यंत पोहचवले. तिथून हे गणितशास्त्र चीनला पोहचले. कंबोडियामधूनच गणिताचा अरब राष्ट्रांत देखील प्रचार प्रसार झाला. बाराव्या शतकात भारतात शोधण्यात आलेला शून्य युरोपात पोहचला. अरब देशांमध्ये शून्याला सिफर म्हणून संबोधित करण्यात आले.
लॅटिन, इटालियन, फ्रेंच, शून्याला झिरो म्हटले जाऊ लागले. ५०० वर्षांपूर्वी भास्कराचार्यानी शुन्याद्वारा भागण्याची विधी त्यांच्या लीलावती या ग्रंथात सांगितली आहे. त्याचे उत्तर अनंत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले आहे.
गणितात शून्याचे महत्त्व आर्यभटाच्या काळात ओळखले गेले. शास्त्रात शून्याचे अनेक अर्थ काढण्यात आले. त्यात शून्याला निराकार सर्वव्यापी अशी संज्ञा प्रदान करण्यात आली आहे. महाभारतात भीष्माने भगवान विष्णूंचा उल्लेख शून्य असा केला आहे. आदि शंकराचार्यांनी शून्याला प्रकृतीचा सर्वात विशेष गुण म्हटले आहे. नागार्जुन आणि नाथ संप्रदायाने देखील शून्याची आपल्या पद्धतीने व्याख्या केली आहे.
शून्य ही जगाला भारताकडून देण्यात आलेली सर्वांत मोठी भेट आहे. आज शून्याच्या अस्तित्वामुळे गणित आणि विज्ञानाच्या क्षेत्रात आपण वेगळी उंची गाठण्यात सफल ठरलो आहोत. भारताच्या प्राचीन सभ्यतेने जगाला शून्याच्या रूपाने एक अशी भेट दिली आहे, जी रोमन आणि ग्रीक लोकसुद्धा देऊ शकले नाहीत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.