आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
आसाम… भारताच्या ईशान्येला वसलेलं एक विस्मयकारक राज्य. या राज्याला निसर्गानं अगदी मुक्त हातानं दान दिलेलं आहे. ‘सात बहिणी’ समजल्या जाणाऱ्या भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांपैकी आसाम सर्वात जास्त ॲक्टिव असलेलं ठिकाण आहे. मात्र, संपूर्ण देशाचा एकत्र विचार केला की, आसामचे लोक, त्यांची संस्कृती आणि त्यांचा इतिहास दुर्लक्षितचं राहिला आहे. ‘स्वातंत्र्यानंतरही’ इतकी वर्षं खरा गौरवशाली इतिहास डावलून फक्त ‘गुलामीचा’ इतिहास शिकवला गेला.
१३ व्या शतकाच्या मध्यापासून पुढील ६०० वर्षे याठिकाणी शक्तिशाली ‘अहोम’ लोकांनी राज्य केलं. बलाढ्य मुघलांना देखील अहोमांचा सामना करू शकले नाही. १६७१ मध्ये सराईघाट येथे झालेल्या यु*द्धात आसाममधील एका यो*द्ध्यानं मुघल बादशाह औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याला लाजीरवाणा पराभव स्वीकारण्यास भाग पाडलं होतं. एका अहोम सैन्य प्रमुखानं आपल्या असिम शौर्यानं इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. आजही आसाममध्ये या यो*द्ध्याला एखाद्या स्वातंत्र्यसेनानीचा मान दिला जातो. थेट मुघलांना जाऊन भिडणारा असा हा यो*द्धा होता तरी कोण?
‘लसिथ बोरफुकोन’ असं या यो*द्ध्याचं नाव. त्याच्या नेत्रदीपक विजयाचे तपशील अहोम राजांच्या अधिकृत लेखांमध्ये (बुरांजी) सापडतात. त्याच्या पराक्रमाची गाथा समजून घेण्यासाठी आपल्याला आसामच्या इतिहासाचा धांडोळा घेणं गरजेचं आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर ६०० मैल रुंद परिसरात आसामचा विस्तार होता. हा सर्व भाग उंच डोंगर आणि घनदाट जंगलांनी वेढलेला होता.
त्यावेळच्या आसामची राजधानी ‘गढगाव’ येथे होती. तर, आता सर्वात मोठं शहर असलेलं गुवाहाटी त्यावेळी ‘बोरफुकोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्हाईसरायच्या (राजाचा प्रतिनिधी) अधिपत्याखाली होतं. घनदाट जंगलं, लहान-मोठे ओढे आणि दुर्गम परिस्थितीमुळं याभागात वाहतुकीसाठी रस्ते देखील नव्हते. सर्व वाहतूक आणि व्यापार ब्रह्मपुत्रा नदीवर अवलंबून होता. ती राज्याची जीवनरेखा होती. म्हणून ब्रह्मपुत्रेच्या किनारी भागाला मोठ्या प्रमाणात सुरक्षा पुरवली जात होती.
या प्रदेशात १२२८मध्ये चीनच्या युनान येथील शान जमातीच्या चाओ लुंग सिऊ-का-फा यांनी अहोम साम्राज्याची स्थापना केली. या राजवंशाचं नाव ‘अहोम’, प्रदेशाचे नाव ‘आसाम’ हे दोन्ही ‘असमा’ म्हणजेचं ‘अजिंक्य’ या शब्दावरून आलं आहे. अहोमांनी जवळजवळ ६०० वर्षे या समृद्ध भूमीवर राज्य केलं.
ब्रह्मपुत्रेचं खोरं चांगल्या प्रतीचं लाकूड आणि हत्तींनी समृद्ध होतं. त्यामुळे सतत त्याठिकाणी शत्रू ह*ल्ले करत. अगदी मुघलांनी देखील १६ व्या शतकात अहोम साम्राज्यावर अनेकदा ह*ल्ले केले केले. मात्र, तिथे वर्चस्व प्रस्थापित करण्यात त्यांना यश आलं नाही. बंगालचा मुघल सुभेदार मीर जुमला हा एकमेव आक्र*मक होता ज्याला गुवाहाटी आणि राजधानी गढगावसह अहोम साम्राज्याचा मोठा भाग जिंकण्यात यश आलं होतं. मात्र, पाच वर्षांच्या आतच अहोमांनी पुन्हा त्याठिकाणी नियंत्रण मिळवलं.
ऑगस्ट १६६७ मध्ये, अहोम सेनानी लसिथ बोरफुकोन (सैन्य प्रमुख) यानं गुवाहाटीवर पुन्हा कब्जा केला. यामुळं मुघल सम्राट औरंगजेब संतापला आणि त्यानं आमेरचा (जयपूर) मुघल सेनापती राम सिंहला मोठ्या फौजेसह आसामच्या दिशेनं पाठवलं. १६७० मध्ये, राम सिंहच्या नेतृत्वाखाली, २१ राजपूत सरदार, ३० हजार पायदळ आणि १८ हजार तुर्की घोडदळाचा समावेश असलेला हा लवाजमा ब्रह्मपुत्रा नदीतून गुवाहाटीकडे निघाला.
मुघल चालून येत असल्याची माहिती मिळताचं लसिथनं त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आणि आसामच्या भौगोलिक स्थितीनं त्याला साथ दिली. गुवाहाटीच्या आजूबाजूला २५ मैलांच्या परिसरात पसरलेल्या घनदाट जंगलांनी आणि डोंगरांनी शहराला नैसर्गिक तटबंदी प्रदान केली होती. याशिवाय शत्रूच्या घोडदळांना मारण्यासाठी हजारो खड्डे खोदून बांबूच्या झावळ्यांनी ते लपवण्यात आले होते.
लसिथकडं कमालीचं यु*द्ध कौशल्य होतं. २४ नोव्हेंबर १६२२ रोजी गारगावमध्ये (आताचं शिवसागर) मोमाई तामौली बोरबरुआ आणि कुंती मोरन यांच्या पोटी त्याचा जन्म झाला होता. त्याचे वडील मोमाई अहोम राजा प्रतापसिंहाचे सेनापती होते. लहानपणापासून तो अतिशय चाणाक्ष होता. भौगोलिक स्थितीचा उपयोग करून विविध यु*द्धनीती आखण्यात तो निष्णात होता.
आपलं हेच कौशल्य वापरून त्यानं मुघलांचा सामना करण्यासाठी विविध योजना आखल्या. मुघलांना याची अजिबात कल्पना नव्हती. मुघल माऱ्याच्या टप्प्यात आल्यानंतर लसिथनं नियोजित गनिमी ह*ल्ल्यांनी त्यांना सळो की पळो करून सोडलं. तो फक्त रात्रीच ह*ल्ला करायचा आणि सकाळपर्यंत माघारी येत असे.
लसिथच्या नैतृत्वात अहोम सैन्यानं रामसिंहला इतका छळला होता की, त्यानं लसिथला पत्र पाठवून रात्रीचे हे ह*ल्ले थांबवण्याची विनंती केली होती. मुघलांच्या या पत्राला त्यानं कमालीचं उत्तर दिलं होतं. ‘सिंह रात्रीच लढतात ही गोष्ट मुघलांनी हे लक्षात ठेवली पाहिजे’, असं उत्तर लसिथनं दिलं होतं. यावरून आपण त्याच्या आत्मविश्वासाची कल्पना करू शकतो.
रात्रीचे गनिमी ह*ल्ले हे लसिथनं रचलेल्या मानसशास्त्रीय यु*द्धाचा महत्त्वाचा भाग होता. अहोम सैन्य रात्री आक्र*मण करतं कारण, ते राक्षस आहेत, अशा काही अफवा देखील भेदरलेल्या मुघल सैन्यानं पसरवल्या होत्या. मात्र, सेनापती रामसिंहनं यावर विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि पुराव्याची मागणी केली. हा प्रकार जेव्हा लसिथला समजला तेव्हा त्यानं खरोखर राक्षसांसारखे कपडे घातलेल्या माणसांना मुघल छावणीत पाठवल्याचं म्हटलं जातं! यामुळं मुघल सैन्य आणखी भेदरलं आणि त्यांनी वाटाघाटी करण्याचा विचार केला. मात्र, औरंगजेबानं त्यांना माघार घेऊ दिली नाही. अहोमांचा नाश झालाच पाहिजे असा आदेश त्यानं सैन्याला दिला.
औरंगजेबानं आदेश दिल्यानंतर सैन्याला यु*द्ध करावच लागलं. दोन्ही सैन्यादरम्यान १६७१ च्या सुरुवातीला शेवटचं यु*द्ध झालं. मुघलांनी अहोमांची तटबंदी फोडण्याचा प्रयत्न केला. असं म्हटलं जातं, त्यावेळी सेनापती लसिथ आजारी होता. मात्र, मुघलांनी तटबंदी फोडण्याचा प्रयत्न करताच लसिथ स्वत: लढाईसाठी बाहेर पडला. आजारी असून देखील स्वत: होडी चालवत तो थेट शत्रूवर चाल करून गेला. आपल्या सेनापतीचा निर्धार पाहून अहोम सैन्य त्वेषानं लढलं आणि त्यांनी मुघल सैन्याचा नायनाट केला.
सराईघाटाची ही लढाई आसामी साहित्यात अमर झाली. आजही ब्रह्मपुत्रेच्या तीरावर ‘सराई’ नावाचं एक छोटेसं गाव वसलेलं आहे ज्याठिकाणी ही लढाई झाली होती. यु*द्धानंतर एका वर्षानी अज्ञात आजारपणामुळं लसिथ बोरफुकोनचं एप्रिल १६७२ मध्ये वयाच्या पन्नाशीत निधन झालं. अहोम राजा उदयादित्य सिंह यांनी गुवाहाटीपासून ३०५ किमी पूर्वेला असलेल्या जोरहाटमध्ये लसिथच्या सन्मानार्थ एक स्मारक बांधलं. आजही हे स्मारक आसाममधील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक आहे. सरायघाटातील विजयानंतर, अहोम राजांनी आसामवर १५० वर्षांहून अधिक काळ राज्य केलं. १८२६ मध्ये ब्रिटिशांनी ते आपल्या साम्राज्यात विलीन करून घेतलं.
लसिथ बोरफुकोनला आजही आसामचा सर्वात मोठा लष्करी नायक म्हणून आदर दिला जातो. १९९९ मध्ये, भारतीय लष्कराचे तत्कालीन प्रमुख जनरल व्हीपी मलिक यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (एनडीए) सर्वोत्तम कॅडेटसाठी ‘लसिथ बोरफुकोन सुवर्णपदक’ या पुरस्काराची सुरुवात केली. २०१६ मध्ये, लसिथ आणि त्याच्या सैन्याचं ३५ फूट उंचीचं एक स्मारक ब्रह्मपुत्रेच्या मध्यभागी उभारण्यात आलं. मुघलांच्या आ*क्रमणावेळी लसिथ बोरफुकोनचं नेतृत्व नसतं तर आसाम नक्की मुघलांच्या अधिपत्याखाली गेला असता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.