आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या ३ मूलभूत गरजा आहेत असं म्हटलं जातं. तर यांपैकी महत्त्वाची गरज असलेली गोष्ट म्हणजे वस्त्र, जे आज वेगळ्याच ठिकाणी जाऊन पोहोचलं आहे. आज पोशाख या गोष्टीला एवढी किंमत आहे की तिचा तुम्ही अंदाजसुद्धा लावू शकत नाही. तर याच पोशाखात सर्वात महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे चप्पल. हो, चप्पल ही अशी गोष्ट आहे की ज्या शिवाय तुम्ही कितीही उंची दर्जाचा पोशाख घातला तरी तो तुम्हाला अपूर्णच वाटेल.
आधुनिक युगात अशा फार कमी वस्तू आहेत की ज्या वस्तू लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. अगदी आजोबांपासून ते नातवापर्यंत सगळे वापरू शकतील अशीच एक वस्तू म्हणजे कोल्हापुरी चप्पल. दणकट, रुबाबदार, व आरामदायी अशा तीनही महत्त्वाच्या गोष्टींनी परिपूर्ण असणारी कोल्हापुरी चप्पल आज बाजारात मोठ्या प्रमाणात विकली जाते.
ही चप्पल केव्हापासून बाजारात आली? असं काय असतं या चपलेत? किंवा या चपलेचा शोध कोणी लावला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर तुम्हाला आमचा हा लेख वाचावा लागेल.
आज कोल्हापुरी चप्पल आपल्याला मोठ्या प्रमाणात वापरली जाताना दिसते. या चपलेला वापरणारा केवळ एक वर्ग नसून समाजातील सर्वच स्तरावरील पुरुष व स्त्रिया आपल्याला कोल्हापुरी चप्पल घालून वावरताना दिसतात. ही एक अशी चप्पल आहे जी गेल्या ७०० वर्षांपासून आजवर वापरली जातं आहे. इतिहासात राजे महाराजे ही चप्पल वापरायचे तेव्हा हिचे वजन तब्बल २ किलोपर्यंत असायचे.
चला तर मग, आपण कुठल्याही पोशाखावर सहजपणे घातली जाणारी ही चप्पल अद्यावत कशी होत गेली, व आज आपण वापरात असलेली कोल्हापुरी चप्पल कशी तयार झाली याची माहिती घेऊ.
कोल्हापुरी चपलेचा इतिहास तेराव्या शतकाशी जोडला गेला आहे. या चपलेला राजेशाही लोकांनी पहिल्यांदा वापरलं होत. तेव्हापासून आजपर्यंत पिढ्यानपिढ्या ७०० वर्ष ही चप्पल तयार करण्याची ही परंपरा आजही जपली आहे.
इतिहासकारांच्या मतानुसार कोल्हापुरी चप्पल अठराव्या शतकात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाली. महाराष्ट्र राज्यात तयार होत असलेली ही चप्पल कपाशी, पायतान, बक्कलनाली किंवा पुकारी अशा प्रकारच्या नावाने ओळखली जातं होती.
सुरवातीला ज्या भागात ही चप्पल तयार केली जात होती त्या भागाचं नाव या चपलेला दिलं जात होते. चप्पल तयार करण्याच्या या कलेला भारतातल्या बऱ्याच कुटुंबातील लोकांनी स्वीकारले होते व त्यांनी या कलेला सांभाळत आपली एक ओळख निर्माण केली होती. सुरवातीला ही चप्पल तयार करताना मजबुतीच्या दृष्टीने खूप जाड तळ वापरण्यात येत असायचा. कारण तेव्हाच्या उष्ण वातावरणाला व डोंगराळ भागाला अनुसरून या चपलेची निर्मिती करण्यात येत होती.
त्या जाड असलेल्या तळामुळेच या चपलेचे वजन २ किलोपर्यंत असायचे व ही चप्पल तयार व्हायला सुमारे ६ आठवडे एवढा कालावधी लागत होता. ही कोल्हापुरी चप्पल तयार करण्यासाठी म्हैस व बैलांच्या कातड्याचा वापर केला जात.
नंतर नंतर कोल्हापुरी चपलेला बदलत्या काळासोबत आधुनिकतेची जोड देत तिच्यात बदल करण्यात येत होते. पण तरीसुद्धा अजून या चपलेला म्हणावी तेवढी प्रसिद्धी काही मिळाली नव्हती. नंतर पांडुरंग पाखरे यांनी या चपलेला कोल्हापुरातून मुंबईत आणले व मुंबईकरांना या चपलेची ओळख करून दिली.
वास्तविक पाहता १९२० साली कोल्हापूरातील सौदागर परिवाराने या चपलेला आकर्षक व आरामदायी रुपडं दिलं होत व या चपलेचं वजन बऱ्याच प्रमाणात हलकं केलं होत. नंतर सौदागर परिवाराने या नवीन कोल्हापूरी चपलेला मुंबईतील प्रसिद्ध ‘जे जे अँड सन्स’ या चप्पल दुकानात विक्रीसाठी ठेवलं व इथे त्या चपलेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
नंतर वाढती मागणी पाहता सौदागर परिवाराला अजून काम मिळालं व ते आता काम वाढल्याने आजूबाजूच्या लोकांनासुद्धा कोल्हापुरी तयार करायला शिकवू लागले. मुंबईत या चपलेला इतका प्रतिसाद मिळाला की नंतर ही चप्पल कोल्हापुरात तयार होते म्हणून कोल्हापुरी चप्पल या नावाने ओळखली जाऊ लागली.
जर रिपोर्ट्स पाहिले तर आपल्याला असं दिसतं की या चपलेसाठी चामडं वापरलं जात व ते चामडं कोलकाता व चेन्नई येथून येते. आज कोल्हापूर जिल्ह्यात अशी अनेक कुटुंबं आहेत की ज्यांना उत्पन्न हे कोल्हापुरी चपलेतून मिळतं व ते त्यावर आपलं पोट भरतात.
आता या चपला मागणीच्या हिशोबाने तयार केल्या जातात. वेगवेगळ्या आकारात हव्या तशा कोल्हापूरी चपला आज बाजारात उपलब्ध आहेत. या चपलेच्या निर्मितीसाठी म्हैस, शेळी, बैल या प्राणांच्या कातडीचा वापर केला जातो. सर्वात आधी चामडे पाण्यात भिजवून ठेवले जाते. ज्यामुळे चामडे मऊ होऊन त्याचा दुर्गंध नाहीसा होतो. याच्यानंतर पायाच्या मापाच्या हिशोबाने चामडं कापून घेतलं जात व त्याला तेलात भिजवले जाते जेणेकरून चपलेला पाण्याने काही होणार नाही. नंतर टाच व चपलेचा तळवा (सोल) हे जोडून घेतले जातात व चपलेला डिझाइन प्रमाणे आकार दिला जातो. दोन पट्टे, अंगठेदार असे अनेक प्रकार यात असतात.
सुरवातीला कोल्हापुरी केवळ पांढऱ्या धाग्यात शिवली जात होती, पण आता वाढती फॅशन पाहता या चपलेला वेगवेगळ्या रंगेबेरंगी धाग्यात शिवली जाते. आता बाजारात कोल्हापुरी चप्पल लाल, हिरवी, गुलाबी, काळी व सोनेरी रंगातसुद्धा उपलब्ध आहे. पूर्ण चप्पल तयार झाल्यावर या चपलेला दोरे व लहानसहान मणी यांच्या साह्याने सजवले जाते व तिला सुंदर असं रूप प्राप्त होत. आता केवळ चपलाच नाही तर कोल्हापुरी बूटसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत व तरुणांनासुद्धा ते वापरायला आवडत आहेत.
भारतीय हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असणारी ही चप्पल आज फक्त आपल्या देशातच नाही तर विदेशातसुद्धा तेवढीच प्रसिद्ध आहे. वेस्टर्न कपड्यांवर सुद्धा ही कोल्हापुरी चप्पल आपली छाप पाडते. जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेसारख्या देशातसुद्धा या चपलेला मोठी मागणी आहे.
कारागीर ही चप्पल तयार करताना अशा प्रकारे करतात की तिला कुठल्याही वयोगटातील व्यक्ती अगदी सहजपणे वापरू शकतो. तरुण या चपलेला जीन्सवर तर वयस्कर लोक पायजम्यावर या चपलेला अभिमानाने वापरतात.
कोल्हापुरी चपलेचं आकर्षण फक्त पुरुषांमध्येच नाही तर महिलांमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणत आहे. बाजारात आज खास महिलांसाठी वेगवेगळ्या रंगांमध्ये कोल्हापुरी चप्पल उपलब्ध आहे. सलवार असो किंवा साडी किंवा जीन्स असली तरी सुद्धा ही चप्पल सहजपणे शोभून दिसते म्हणून या चपलेला एवढी मागणी आहे.
या चपलेची आणखी वैशिष्ट्यं म्हणजे याने शरीरालासुद्धा बराच फायदा होतो. उन्हाळ्यात ही चप्पल तुमच्या पायांना गारवा देण्याचं काम करते तसेच हिचे हलके रंग डोळ्यांना त्रास देत नाहीत आणि वजनाला हलकी असल्याने ही चप्पल पायांनासुद्धा आरामदायी ठरते.
तर कोल्हापुरी चप्पल हा भारतीय हस्तकलेच्या प्रकारांपैकी एक प्रकार आहे व तो आज अत्यंत प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात बाजारात विकला जातो. ७०० वर्षांची आपली ही परंपरा आजही बाजारात टिकून आहे ही आपल्यासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.