आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारत देशाच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देणारी असंख्य मंदिरे आज या भूमीवर आहेत. या प्राचीन मंदिरातील स्थापत्याने अनेकांना भुरळ घातली आहे. आजही देशविदेशातून पर्यटक आणि अभ्यासक खास हे प्राचीन देवालय बघायला म्हणून येतात. अनेक लोक या मंदिरांना धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून भेट देतात तर अनेक लोक या मंदिरांच्या वैविध्यपूर्ण स्थापत्यशास्त्र व शिल्पकामाचा अभ्यास करण्यासाठी या मंदिरांना भेट देतात.
भारतातील अशाच काही प्राचीन देवालयांपैकी एक आहे मध्यप्रदेशातील ‘खजुराहो मंदिर’!
एक धार्मिक स्थळ असलेलं हे खजुराहोचं मंदिर जगभरात मंदिर त्याच्या भिंतींवर कोरण्यात आलेल्या कामुक शिल्पाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. अनेक शतकांपूर्वी या प्रदेशावर राज्य करणाऱ्या चंदेल राजाने या देवालयाची निर्मिती केली होती.
येथील शिल्पकला अनेक अभ्यासकांना भुरळ घालत असते. या मंदिराच्या भिंतीवर या कामुक शिल्पाकृती का निर्माण करण्यात आल्या आणि त्या मागील इतिहास काय आहे? हा प्रश्न अनेक भारतीयांना पडतो. आज या प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेऊया…
चंदेल राजवंश हा भारताच्या मध्ययुगीन इतिहासातील एक महत्त्वाचा राजवंश आहे. भारतात आलेल्या मुस्लिम आक्र*मकांशी झुंज देणाऱ्या चंदेल राजांनी आपल्या सामर्थ्याच्या बळावर आठव्या आणि बाराव्या शतकात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशाच्या सीमावर्ती भागात आपले साम्राज्य उभारले होते.
चंदेल राजवंशाला गोंड जनजातीचा राजपूत वंश मानले जाते. याच राजवंशात महाराणी दुर्गावती यांचा जन्म झाला होता. गुर्जर प्रतिहारांच्या पाडावानंतर हा राजवंश उदयास आला. सुरुवातीच्या काळात या राजवंशाला ‘चंद्रात्रेय’ वंश म्हणून संबोधित करण्यात येत होते. पुराणांमध्ये चंद्रात्रेय राजवंशाचा उल्लेख करण्यात आला आहे. हा राजवंश चंद्राच्या वंशजांनी स्थापन केल्याचे उल्लेख आढळून येतात.
‘नन्नूक’ हा या राजवंशाचा सर्वांत पहिला राजा होता. कालिंजरच्या यु*द्धात विजय मिळवल्यानंतर चंदेलांनी खजुराहो आणि त्याच्या आसपासचा प्रदेश आपल्या साम्रज्याला जोडला होता. असं म्हणतात की त्याकाळी खजुराहो एक घनदाट आरण्याचा प्रदेश होता. या ठिकाणी मोठ्या संख्येने खजुराची झाडे असल्यामुळे या प्रदेशाला लोक ‘खजुराहो’ म्हणून संबोधित करत.
यशोवर्मन या चंदेल राजाने कालिंजर क्षेत्रातील महोबा इथे आपली राजधानी वसवली. येथूनच काही अंतरावर असलेल्या खजुराहो येथे त्याने मंदिराची निर्मिती केली.
आज या मंदिरावर असलेल्या शिलालेखानुसार इसवी सन ९२५ ते ९५० या कालावधीत यशोवर्मनने खजुराहो येथे सर्वप्रथम लक्ष्मण मंदिराची निर्मिती केली. यानंतर राजा धंग इसवी सन ९५० ते ९९९ या कालावधीत सत्तेत होता. त्याने खजुराहो येथे विश्वनाथ मंदिर उभारले होते. पुढे राजा विद्याधर याने कंदारिया महादेव मंदिराची निर्मिती या परिसरात केली. इसवी सन १०३०च्या अगोदर या क्षेत्रातील सर्व मंदिरांची निर्मिती करण्यात आली होती.
इथे एकूण ८५ मंदिरांचे निर्माणकार्य चंदेल राजांनी केले होते. या मंदिरांच्या भिंतींवर कामसूत्रातील शिल्पाकृत्या कोरण्यात आलेल्या आहेत, एकूण ६४६ शिल्पाकृत्या इथे कोरण्यात आल्या होत्या. यात भगवान विष्णू, महादेव, ब्रम्हा आणि इतर जैन धर्मीय देवतांच्या मुर्त्यांच्या देखील समावेश होता.
मंदिरावरील या शिल्पाकृतीतून अनेक पौराणिक कथांची वर्णने करण्यात आली आहेत. एका कथेनुसार हेमवती नावाच्या एका ब्राम्हण युवतीला स्नान करताना पाहून चंद्रदेव मोहित झाले. चंद्रदेवाने त्यानंतर मंत्रोच्चार करत हेमवतीला मोहित केले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हेमवतीने यानंतर एका पुत्राला जन्म दिला. अनौरस अपत्य म्हणून समाजाने त्या बालकाचा स्वीकार करण्यास नकार दिला, यामुळे हेमवतीला त्या पुत्राचे जंगलात संगोपन करावे लागले. चंद्रदेवाचा पुत्र असल्याने हेमवतीने तिच्या पुत्राचे चंद्रवर्मन असे नामकरण केले. मोठा झाल्यावर चंद्रवर्मनने स्वतःचे साम्राज्य उभारले. हेमवतीने चंद्रवर्मनला कामसूत्रावर आधारित मंदिरांच्या निर्मिती करण्याची प्रेरणा दिली होती. चंद्रवर्मनने त्याची संरचना तयार केली होती. पुढे त्याच्या वंशजांनी म्हणजेच चंदेल राजांनी त्या मंदिरांची निर्मिती केली होती.
मंदिरांच्या निर्मितीनंतर तिथे चंदेल राजवंशाचे राजे अनेक वर्षे विविध उत्सवांचे आयोजन करत होते. विजयादशमीला चंदेल राजवंशाचे राजे मंदिराच्या आवारात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करायचे. हा तोच काळ होता ज्यावेळी अरबस्तानातून मुस्लिम आक्र*मकांच्या स्वाऱ्या भारतावर चालून येत होत्या. ते आपल्या साम्राज्याचा भारतात विस्तार करत होते.
इसवी सन १०२२ साली मोहम्मद गझनवी या आक्र*मकाला भारतातील खजुराहो मंदिराची माहिती मिळाली. त्या मंदिराच्या सर्वनाशाच्या उद्देशाने त्याने बुंदेलखंडावर आक्र*मण केले. पण हा ह*ल्ला अपयशी ठरला.
गझनवी पुन्हा ह*ल्ला करणार या अगोदरच त्या प्रदेशातील हिंदू राजांनी त्याला काही रक्कम आणि दागिने देऊन पिटाळून लावले. यामुळे खजुराहोच्या मंदिराचे रक्षण झाले.
खजुराहोमध्ये एक नव्हे तर तब्बल ८५ देवालये होती. गझनवी जरी परत गेला असला तरी पुढे तेराव्या शतकात कुतुबुद्दीन ऐबकची नजर या मंदिरांवर पडली. त्याने या मंदिरांवर ह*ल्ला चढवला आणि यात अनेक मंदिरांचे नुकसान झाले. ८५ पैकी बहुतांश मंदिरे धुळीस मिळाली. पुढे १४९५ साली सिकंदर लोधी या भागावर आक्र*मण करण्यासाठी चालून आला. त्याने देखील मंदिरांना मोठ्या प्रमाणात उ*ध्वस्त केले.
पंधराव्या ते अठराव्या शतकाच्या काळात मुघल शासकांनी कामुक शिल्पांसाठी या मंदिरांना नष्ट करण्यास सुरुवात केली. आज या सर्व आक्र*मणांनंतर देखील खजुराहो येथील केवळ २२ देवालये शिल्लक राहिली आहेत. यापैकी अनेकांचे फक्त भग्न अवशेष आढळतात. काही निवडक मंदिरांची स्थिती चांगली आहे.
ब्रिटिशांनी या मंदिरांना खरा न्याय मिळवून दिला. ब्रिटिश पुरातत्त्व संशोधकांनी या मंदिरांचा शोध घेतला. टी. एस. बर्ट हा अधिकारी या अभियानाचा प्रमुख होता. त्यांनी चंदेल राजवंशाचा स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या मंदिराचा इतिहास जगासमोर आणला.
आज एक जागतिक पर्यटन स्थळ म्हणून हे खजुराहोचे मंदिर आणि त्याचा परिसर प्रसिद्ध आहे, याचे श्रेय ब्रिटिशांनाच द्यायला हवे.
खजुराहोच्या मंदिराच्या भिंतींवर कामुक शिल्पाकृत्या मागे अनेक तर्क लावण्यात येतात. अनेक संशोधकांच्या मते या मंदिरांवरील ही चित्रे तत्कालीन राजांच्या कामेच्छेचे प्रतीक आहेत. तत्कालीन राजांनी समाजात कामसूत्राची शिकवण रुजवण्यासाठी त्यांना समजेल अशा प्रकारे या मंदिरांच्या शिल्पाकृती निर्माण केल्या होत्या. ही मंदिरे तत्कालीन लैंगिक संस्कृतीचे प्रतीक असल्याचे देखील अनेक इतिहासकार मानतात.
एका थिअरीनुसार त्याकाळी गौतम बुद्धांच्या प्रभावाने बहुसंख्य लोक बौद्ध धर्माचा स्वीकार करत होती, अशावेळी हिंदू पंडितांनी समाजाचे स्वास्थ्य टिकवून ठेवण्यासाठी तत्कालीन राजवंशांना अशा मंदिरांची निर्मिती करून स्त्री व पुरुषांमध्ये कामेच्छा जागृत करण्याचे आवाहन केले होते. त्याचाच भाग म्हणून ही कामुक शिल्पे साकारण्यात आली असा दावा देखील अनेक संशोधकांनी केला आहे.
काही आध्यात्मिक गुरूंनी या मंदिराच्या बाह्य भागावर असलेल्या कामुक आकृत्यांचा साधनेशी संबंध जोडला आहे. त्यांच्या मते मंदिराचा बाह्य भाग हा काम आणि वासनेचे प्रतीक असून आतील भाग हा श्रद्धेचे प्रतीक आहे. ज्यावेळी भक्त मंदिरात प्रवेश करतो त्यावेळी तो त्याच्या कामवासनेला देवळाच्या बाहेरच ठेवतो आणि संपूर्णपणे श्रद्धेने देवतेला शरण जातो, हेच सांगण्याचा उद्देश हे शिल्प कोरण्याच्या मागे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
खजुराहोचे मंदिर हे भारताच्या प्राचीन परंपरेचे प्रतीक तसेच स्थापत्य आणि वास्तुकलेचा एक अप्रतिम नमुना आहे. आजही मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. १९८६ साली युनेस्कोने देखील या मंदिराचे महत्त्व ओळखले होते आणि खजुराहोचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला होता. पुरातत्त्व संशोधकांच्या बरोबरीने सेक्स एक्सपर्ट्सदेखील या मंदिराकडे आकर्षित होत असतात. अनेक पाश्चात्त्य संशोधकांनी या शिल्पांचा अभ्यास करून पुस्तकांचे लेखन केले आहे. अशा प्रकारचे हे जगातील एकमेव मंदिर आहे.
जर भविष्यात तुम्हाला मध्य प्रदेशात जाण्याची संधी मिळाली तर ‘खजुराहो’च्या या मंदिराला आवश्य भेट द्या.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.