आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
अरबस्तानचे प्रसिद्ध इमाम हुसेन करबलाच्या मैदानात दलजा नदीच्या काठी क्रूर याजिद बादशहाशी युद्ध करत करत होते. शत्रूच्या सैन्याने त्यांना चारी बाजूनी घेरलं होतं. इस्लाम धर्माचं नेतृत्व निर्दयी लोकांच्या हातात जाण्यापासून रोखण्यासाठी इमाम हुसेन यांनी मदतीसाठी दोन पत्र लिहले. यातील एक पत्र भारतात आलं.
पत्र मिळताच कपाळावर टिळा लावून यज्ञोपवीत घातलेल्या ब्राम्हणांची मोठी फौज इतिहासाच्या पानात आपले नाव कोरण्यासाठी करबलाच्या दिशेने निघाली. परंतु त्या वीरांचे सैन्य करबलाला पोहचायच्या आतच इमाम हुसेन यांचा पराभव होऊन ते मृत्युमुखी पडले होते. एवढं असूनही भारतीय वीरांचे सैन्य मागे हटले नाही, त्यांनी याजिदसोबत युद्ध केले आणि त्या युद्धात विजय मिळवला.
करबलाच्या त्या युद्धात विजय मिळवणाऱ्या त्या वीरांना पुढे ‘हुसेनी ब्राम्हण’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हे हुसेनी ब्राम्हण आहेत कोण? आणि इमाम हुसेनच्या मदतीसाठी हजारो किलोमीटरचा पल्ला ओलांडून ते का गेले? चला आज ह्या लेखामध्ये जाणून घेऊया.
मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमाम हुसेन यांच्या काळातील ही गोष्ट आहे, जेव्हा इस्लामचे पैगंबर हजरत मोहम्मद यांनी आपल्या अरबी संस्कृतीनुसार चार वारसदारांची खलिफापदी नियुक्ती केली. ते चार खलिफा होते अबू बकर, उमर, उस्मान आणि हजरत अली.
‘हजरत अली’ पैगंबर मोहम्मद यांचे जावई होते. पैगंबरांची मुलगी फातिमांचा विवाह त्यांच्याशी झाला होता. इमाम हुसेन हे यांचेच पुत्र होते. हजरत अली यांची पुढे हत्या करण्यात आली.
काही कालावधीनंतर इस्लामी राज्यात ‘ बादशहा’ आणि ‘शहेनशहा’ उदयास आले, ज्यांचे अस्तित्व इस्लामच्या विरोधात जाणारे होते. बादशहा आणि शहेनशहा यांच्यापासून इस्लामची रक्षा करण्यासाठी मोठी खलबतं सुरू करण्यात आली.
मक्का आणि इराकपासून लांब सीरियामध्ये ‘याजिद’चा उदय झाला. त्याने स्वतःला इस्लामचा सर्वोच्च शहेनशहा घोषित केले. परंतु इमाम हुसेन व त्यांच्या अनुयायीवर्गाने याला प्रखर विरोध केला.
याजिदची कार्यप्रणाली ही अत्यंत क्रूर होती. याजिदला लक्षात आलं की इमाम हुसेन जिवंत आहेत तोपर्यंत त्याच्या एकछत्री राज्याला मान्यता प्राप्त होणार नाही. याचा प्रतिशोध घेण्यासाठी त्याने पत्र लिहून युद्धाची घोषणा केली. इमाम हुसेन यांना ज्यावेळी ते पत्र मिळाले त्यावेळी ते मक्का शहरात होते. त्यांनी याजिदशी युद्ध करण्यासाठी मक्का सोडून इराकच्या दिशेने कूच केली.
परंतु हुसेन यांच्या फौजेला इराकमध्ये याजिदच्या सैन्याने यशस्वीपणे रोखून धरले. पुढे करबलाच्या मैदानात दलजा नदीच्या किनाऱ्यावर हुसेन यांना देखील रोखण्यात आले. तो मोहरमचा दुसरा दिवस होता, त्यानंतर पुढच्या ९ दिवसांत इस्लामच्या इतिहासातील सर्वात क्रूर घटनाक्रम घडून आला होता.
हुसेन यांच्या मुलांना व बायकांना अन्न पाणी न देण्याचे आदेश देण्यात आले. त्यांच्यावर याजिदचा सुभेदार इब्न जियाद प्रचंड अत्याचार करत होता.
अशा कठीण काळात इमाम हुसेन यांनी मदतीसाठी दोन पत्र लिहिले, एक पत्र त्यांनी आपल्या बालपणीचा मित्र हबीब याला लिहिले, तर दुसरे पत्र करबालापासून हजारो मैल दूर हिंदुस्थानातील मोहयाल राजा राहब दत्तला लिहिले. राहब दत्त हा एक कर्मठ ब्राम्हण होता. पत्र प्राप्त होताच त्याने ब्राम्हण वीरांची सेना करबालाच्या दिशेने इमाम हुसेन यांच्या मदतीसाठी रवाना केली. परंतु ही सेना करबलाला पोहचण्याआधीच इस्लामच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस लिहला गेला होता.
क्रूर याजिदी सैन्याने इमान हुसेन आणि त्यांच्या सोबतीला असणाऱ्या समर्थकांची हत्या केली होती.
यानंतर याजिदने इमाम हुसेन यांच्या परिवाराला महिलांना कैद करण्याचे आदेश दिले, त्यांना कैद करून त्यांची धिंड याजिदने काढली. महिला पाठीमागे चालत होत्या तर पुढे भाल्याच्या टोकावर इमाम हुसेन यांच्या मुलांची, भाऊ अब्बास व अन्य शहिदांची मुंडकी मिरवण्यात येत होती.
इमाम हुसेन यांची चार वर्षांची मुलगी सकीनाला सीरियाच्या कैदखान्यात बंद करण्यात आले, तिथे तिचा मृत्यू झाला.
हे सगळं जेव्हा राहब दत्तला कळालं तेव्हा त्याला प्रचंड दुःख झालं. त्याने शोकात आपल्या गळ्यावर तलवार ठेवून स्वतःचे प्राण त्याग करण्याची तयारी केली पण इमाम हुसेन समर्थक अमीर मुख्तार यांनी त्याला रोखले. १० ऑक्टोबर ६८० ला दोघेही इमाम हुसेन यांच्या खुनाचा सूड घेण्यासाठी निघाले.
त्यावेळी याजिदचे सैन्य इमाम हुसेन यांच्या मस्तकाला घेऊन कुफा येथील इब्न जियादच्या महालाकडे निघाले होते. राहब दत्तने त्या सैन्याचा पाठलाग केला. ती फौज त्यांच्या गंतव्य स्थळी पोहचायच्या आत राहब दत्त यांनी इमाम हुसेन यांचे मस्तक घेऊन दमास्कसच्या दिशेने कूच केली. पुढे दमास्कसला पोहचण्या अगोदर ते एका ठिकाणी विश्रामासाठी थांबले तेव्हा त्यांच्या सैन्याला याजिदच्या सैन्याचा वेढा पडला व त्यांनी इमाम हुसेन यांचे मस्तक परत करण्याची मागणी केली.
इमाम हुसेन यांच्या मस्तकाची रक्षा करण्यासाठी राहब दत्तने एक मोठा त्याग केला, त्याने आपल्या मुलाचे मस्तक कापून इमाम हुसेन यांच्या जागी याजिदच्या सैन्याला दिले.
याजिदच्या सैन्याला मात्र याचा पत्ता लागला आणि त्यांनी ओरडुन सांगितले की हे तर इमाम हुसेन यांचे मस्तक नाही. मग राहब दत्तने त्याच्या सात मुलांचे मस्तक इमाम हुसेन यांचे मस्तक म्हणून त्यांच्यासमोर प्रस्तुत केले. त्या फौजेने तरीदेखील इमाम हुसेन यांच्याच मस्तकाची मागणी केली.
राहब दत्त यांनी मग त्यांचा प्रतिकार करण्याचे निश्चित करून युद्धात उडी घेतली. क्षणार्धात युद्ध सुरू झाले आणि हिंदू वीरांच्या सैन्याने आपल्या तेज भारतीय तलवारीने याजिदच्या सैन्याचा संहार केला. इतकंच नाही इमाम हुसेनसाठी या मोहयाली सैन्याने आपले आयुष्य त्यागले.
अशाप्रकारे भारतीय सैन्याने इमाम हुसेन यांच्या हत्येचा मोठा प्रतिशोध घेतला, युद्ध संपल्यावर मोहयाली सैन्य विजयी झाले होते. काही मोहयाली सैनिक त्याच प्रदेशात स्थायिक झाले तर काही पुन्हा मातृभूमीकडे परतले. ज्याठिकाणी या हिंदू वीरांनी पडाव टाकला होता त्या जागेला आज हिंदीया म्हटले जाते.
इतिहासात या हिंदू वीरांना हुसेनी ब्राम्हण म्हणून उल्लेखले जाते. इमाम हुसेन यांच्या हौतात्म्याचे स्मरण म्हणून हे हुसैनी ब्राम्हण मोहरमच्या दिवशी आपल्या पूर्वजांच्या आठवणीत नोहा पठण करतात. हुसेनसाठी लढणारे ब्राम्हण म्हणजे हुसैनी ब्राम्हण. बहुसंख्य हुसैनी ब्राम्हण हे अगोदर लाहोरला राहत, परंतु फाळणीनंतर ते भारतातील पुष्कर, दिल्ली आणि प्रयाग याठिकाणी स्थलांतरित झाले. प्रसिद्ध अभिनेते आणि माजी खासदार सुनील दत्त हे याच हुसैनी ब्राह्मणांचे वंशज आहेत.
राहब दत्त आणि इमाम हुसेन एकमेकांना कसे ओळखत होते? ते जाणून घेऊ
राहब दत्त अनेक उपाय करून देखील निपुत्रिक होते. त्यावेळी त्यांना कोणीतरी इमाम हुसैन यांची भेट घेण्याचा सल्ला दिला. इमाम हुसैन यांच्या जवळ त्यांनी पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली, परंतु इमाम हुसैन यांनी त्यांना सांगितले की त्यांचा नशिबात पुत्र नाही. हे ऐकून राहब दत्त दुःखी झाले. त्यांना दुःखी बघून हुसैन यांनी त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान दिले. परंतु हे अल्लाहच्या नियमानुसार नाही अशी तक्रार एकाने केली मग त्यांनी अजून एक वरदान दिले. असं करत करत त्यांनी सात पुत्रांचे वरदान राहब दत्तला दिले. ह्याच सात पुत्रांचे मस्तक इमाम हुसैन यांच्या मस्तकाऐवजी राहब दत्तने प्रस्तुत केले होते.
अशा या ७ पुत्र व ७२ सैनिकांच्या बलिदानाने हुसैनी ब्राह्मण इतिहासात अजरामर झाले!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.