आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताची राजधानी दिल्ली हे एक ऐतिहासिक शहर आहे. हे आपण जाणतोच की दिल्ली हे शहर गेल्या अनेक शतकापासून भारतीय राजकारणाचे केंद्रबिंदू राहिले आहे, पण एक काळ असा देखील होता ज्यावेळी या दिल्लीच्या जागी प्रचंड घनदाट आरण्य होतं.
दिल्लीच्या निर्मितीपासूनच ते राजकारणाचे केंद्र आहे. दिल्लीवर राज्य करणारे राजे महाराजे, सुलतान, मुघल सम्राट यांनी दिल्लीच्या विकासात एक मोठी भूमिका बजावली आहे.
अक्षरधाम मंदिर असो की सरोजिनी नगर बाजार, चांदणी चौक असो की लाल किल्ला, राष्ट्रपती भवन असो की ल्युटेनस कॉलनी, दिल्ली या शहराची गोष्टच निराळी आहे. बहुसांस्कृतिक विविधतेचे प्रतीक असलेल्या भारतीय राजधानीचा इतिहास देखील तिच्या इतकाच गूढ, रम्य असा आहे.
इतिहासात दिल्लीच्या स्थापनेवर अनेक इतिहासकारात मतभेद असले तरी दिल्लीच्या स्थापनेचे उल्लेख ३००० वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या महाभारत या महाकाव्यात आढळुन येतो.
दिल्लीला त्याकाळी खांडवप्रस्थ म्हणून ओळखले जात होते, आज ज्या ठिकाणी इमारतींचे जंगल पसरले आहे, तिथे एकेकाळी प्रचंड घनदाट जंगल होते. पुढे पांडवांनी त्या जंगलाचा काही भाग नष्ट करून त्याठिकाणी इंद्रप्रस्थ या नवीन नगरीची स्थापना केली होती. नंतर जेव्हा कौरव आणि पांडवात भीषण रणसंग्राम उभा राहिला त्यावेळी कौरवांकडे संधी प्रस्ताव घेऊन गेलेल्या श्रीकृष्णाने त्यांच्याकडे पाच गाव मागितले होते, त्या गावांची नावं होती पानिप्रस्थ, सोनप्रस्थ, बहाकप्रस्थ, तिलप्रस्थ आणि खांडवप्रस्थ, या गावांमध्ये खांडवप्रस्थ हे इंद्रप्रस्थ म्हणून प्रचलित पावले व त्याच ठिकाणी आजचे आधुनिक दिल्ली शहर वसलेले आहे.
महाभारताच्या काळापासून भग्नावस्थेत असलेल्या या शहराच्या जागी नंतर मौर्यानी नगर वसवले होते. थिल्लू नावाच्या राजाने या शहराचे योगिनीपुरा असे नामकरण केले होते. पण पुढे या शहराला धिल्ली या नावाने ओळखले जाऊ लागले, यातूनच आजचे दिल्ली हे नाव साकारले.
तोमर वंशाचे राजा अनंगपाल बिलेनदेव तोमर यांनी या शहरावर शासन केले होते. इसवी सन ७३६ पासून इसवी सन ११८० पर्यंत तोमर वंशाने दिल्लीवर राज्य केले होते. तोमर वंशाचा उगम हा पांडवांच्या वंशातून झाला होता, असे मानले जाते पण यावर असंख्य विवाद आहेत.
दिल्ली संग्रहालयातील काही दस्तावेजात राजा अनंगपाल याने अनंगपूर नावाच्या शहराची स्थापना केल्याचे उल्लेख आहेत. हे शहर आजच्या गुरुग्राम शहराच्या हद्दीत वसलेले होते, पुढे हा राजा आजच्या दिल्लीच्या भूमीवर आला आणि त्याने तिथे लाल कोट या नगराची स्थापना केली.
पुढे या नगराचे रूपांतर त्याने दिल्लीत केले. या राज्याने स्वतः दिल्लीवर अधिपत्य गाजवले पण त्याने आपल्या पुत्रांना आसपासच्या प्रदेशावर राज्य करण्यासाठी पाठवून दिले.
दिल्लीचे आठरावे शासक माहिपाल यांनी महिपालापूर नावाच्या नगराची स्थापना केली होती. या तोमर वंशाचे राजा अनंगपाल तोमर यांनी आपल्या पुत्रीचा पृथ्वीराज चौहनांशी विवाह रचला आणि त्यांच्या हाती सत्ता सोपवून ते वनवासाला निघून गेले होते.
तोमर वंशाने स्थापन केलेल्या लाल कोटाचा विकास दिल्लीच्या पहिल्या नगरीच्या स्वरूपात झाला. अनेक इतिहासकार म्हणतात की लाल कोट हे शहरच मूळ दिल्ली आहे. दुसऱ्या अनंगपाल तोमरने या लालकोटची स्थापना केली होती. आजही दिल्लीत या जुन्या लाल कोटाचे अवशेष आहेत. असं म्हटलं जातं की ११६४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण लाल कोटाच्या आसपासचा प्रदेशावर कब्जा करून त्याचे राय पिथोरा असे नामकरण केले होते.
पुढे मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चौहनांचा पानिपतच्या पहिल्या युद्धात पराभव केला होता आणि त्याचा गुलाम कुतुबुद्दीन ऐबकवर या प्रदेशाचा कारभार सोपवून तो मायदेशी परतला होता. पुढे घोरी मेला आणि ऐबकने स्वतःला दिल्लीचा सुलतान म्हणून घोषित केले व गुलाम वंशाची स्थापना केली.
दिल्लीच्या सुलतानांनी आपल्या साम्राज्याचा विस्तार लाल कोटपासून महरौलीपर्यंत केला आणि हाच भाग आज जुनी दिल्ली म्हणून ओळखला जातो. दिल्लीवर तीनशे वर्ष सुलतानांचे शासन होते. दिल्लीच्या सुलतानांनी पाच नवीन शहरं दिल्लीच्या आसपास वसवले.
११९२ साली कुतुब ऐबकने सुफी संत शेख ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार यांच्या सन्मानार्थ कुतुबमिनार उभा केला. त्याने कुतुबमिनारच्या परिसरात कुव्वात उल इस्लाम या मशिदीची निर्मिती केली. १२९० मध्ये राय पिथोरापासून पुढे जल्लालुद्दीन खिलजीने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला आणि दिल्लीचा आकार वाढतच गेला.
जल्लालुद्दीन खिलजीने त्याचा राजधानीची निर्मिती आजच्या महाराणी बागच्या परिसरात असलेल्या किलोखेडी येथे केली. पुढे अल्लाहुद्दीन खिलजीने मंगोल आक्रमणांपासून स्वतःच्या राज्याच्या रक्षणासाठी आपली राजधानी सिरी येथे हलवली. हा तोच भाग आहे जिथे आज ग्रीन पार्क, शहापूर जाट आणि हौज खास हे भाग आहेत.
मंगोलांनी नंतर दिल्लीवर आक्रमण केले तेव्हा अल्लाउद्दिन ८००० मंगोलांना बंदी बनवून त्यांना इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले. जे तयार झाले नाहीत त्यांना मारून टाकले. बहुतांश मंगोलांनी त्या नंतर मुस्लिम धर्माचा स्वीकार केला. या मंगोलानी १३ व्या शतकात मंगोलपुरीची स्थापना केली.
१३२० मध्ये तुर्की शासक ग्यासिरुद्दीन तुघलकाने नसिरुद्दीन मोहम्मद या सुलतानाचा पराभव करून दिल्लीवर ताबा मिळवला आणि त्याने तुघलकाबादची स्थापना केली. त्याने तिथे एक किल्ला बांधला, पुढे त्याने राय पिथोरा आणि सिरी किला जहाँपनाह नामक अजून एका शहराची स्थापना केली.
पुढे दिल्लीचा शासक फिरोजशहा तुघलकने फिरोजाबाद शहराची स्थापना केली. आज या शहराच्या आसपास फिरोजशहा कोटला स्टेडियम आहे. पुढे दिल्लीवर तैमुर लंग चालून आला आणि दिल्लीच्या सुलतानीला घरघर लागायला सुरुवात झाली. आजही दिल्ली शहरात सुलतानांच्या वास्तूंचे अवशेष आहेत.
बाबरच्या हल्ल्यानंतर दिल्लीचे सुलतान लयास गेले आणि मोगलाई आली. पुढे इंग्रजांनी भारतावर ताबा घेण्या अगोदर पर्यंत भारतावर मुघलकालीन वास्तुकलेचा प्रचंड प्रभाव होता. शहाजहानच्या काळात मुघलकालीन वास्तुकला चरमावर होती. आज दिल्लीत ज्या प्रमुख ऐतिहासिक वास्तू अत्यंत चांगल्या अवस्थेत आहेत त्यांची मुळे मुघल काळात रुतलेली आहेत.
१५७० मध्ये हुमायूनच्या मकबऱ्याची निर्मिती करण्यात आली. हे स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीत सामाविष्ट करण्यात आले आहे. हुमायूनच्या मृत्यूनंतर त्याचा पत्नीने हा मकबरा उभारला होता. १५४० मध्ये हुमायूनने ‘पुराना किला’ची निर्मिती करायला सुरुवात केली. हुमायुनने दीनपनाह या नावाने याची निर्मिती करायला सुरुवात केली होती पण पुढे शेरशहाच्या आक्रमणाने त्याला आपले राज्य गमवावे लागले. शेरशहाने पुराना किला या नावाने निर्माण चालू ठेवले, पुढे हुमायून पुन्हा सत्तेत आला तेव्हा त्याने पुराना किला हेच नाव कायम केले.
दिल्लीच्या शेवटच्या शहराची निर्मिती अकबराच्या नातवाने शहाजहाने केली. त्याने या शहराला शहाजहानाबाद असे नाव दिले. आज याच ठिकाणी लाल किल्ला आणि जामा मस्जिद या दोन वास्तू आहेत.
इंग्रजांनी दिल्लीवर २०० वर्ष राज्य केले आणि आजच्या आधुनिक दिल्लीचा विकास केला. लुटीयन परिसरात असलेल्या राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, साऊथ ब्लॉक, नॉर्थ ब्लॉक, संसद भवन या सर्व इमारती इंग्रजांनी उभारल्या आहेत. १९ व्या शतकात या स्मारकांची निर्मिती केली गेली होती.
ब्रिटिश सरकारचे प्रमुख वास्तुविशारद रॉबर्ट टॉर रसेल यांनी प्रसिद्ध अशा कॅनॉट प्लेस भागाची रचना केली. पण त्यांच्या निर्मितिचे काम लुटीयन आणि बेकर या तज्ञांनी केले. कॅनॉट प्लेस हा एक आधुनिक बाजार असून दिल्लीची शान आहे. एडविन लैंडस्लेयर लुटीयन या वास्तुविशारदाला आधुनिक नवी दिल्लीच्या निर्मात्याचा ‘किताब प्रदान करण्यात आला आहे.
तोमर काळापासून ते आजच्या आधुनिक दिल्लीपर्यंत हे शहर तुकड्या तुकड्यात विकसित झाले. पण या शहराचा विकास मात्र ब्रिटिश आमदानीतच झाला. आज दिल्ली शहर राजपूत, सुलतानी, मोगलाई आणि ब्रिटिश वास्तुकलेने नटलेले एक आधुनिक शहर आहे, जे आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.