आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
“अनादि-अनंत अशा व्यापक ब्रम्हांडात आपल्याला अवाढव्य वाटणारा सूर्य हा एक लहानसा तारा. त्याच्यासमोर पृथ्वी म्हणजे सूक्ष्म ग्रह, आणि माणूस, माणूस तर अतिशय क्षुल्लक!!” वगैरे वगैरे गोष्टी आपण लहानपणापासून भूगोल आणि भौतिकशास्त्राच्या पुस्तकांमध्ये वाचत आलो आहोत. या “अनादि-अनंत” ब्रह्मांडाचं आकलनसुद्धा माणसाच्या क्षुल्लक “बुद्धीला” जमलं, पण आजचं युग पाहता माणसाच्या उपभोगवादामुळे त्याने आपली “अक्कल” गहाण ठेवली की काय असं वाटतंय.
जगासमोरील मुख्य आव्हानांमध्ये पर्यावरण, नैसर्गिक ऱ्हास ही मुख्य आव्हानं बनली आहेत. पहिल्या औद्योगिक क्रांतीनंतर मानवाने मोठ्या प्रमाणात आर्थिक प्रगती केली, उपभोक्तावाद वाढत गेला, वाहनांसारख्या शोधामुळे नैसर्गिक साधसंपत्तीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला, ज्याचे परिणाम आज मानवाला जागतिक तापमानवाढ, जागतिक तापमानवाढीमुळे पेटणारे वणवे, समुद्रपातळीतील वाढ, कोसळणाऱ्या दरडी, दरवर्षी येणारे पूर, भूस्खलन अशा कैक स्वरूपात भोगावे लागत आहेत. निश्चितपणे, या पर्यावरणावरील प्रश्नांवर उकल नाही निघाली, तर मानवी संस्कृती विनाशाकडे जाईल. याचं एक उत्तम उदाहरण आजही आपल्या डोळ्यासमोर आहे.
दक्षिण प्रशांत महासागरात, ऑस्ट्रेलियापासून ४८३५ किलोमीटरवर नौरू नावाचा एक देश आहे, नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या या देशाची लोकसंख्या पुणे शहरापेक्षा कित्येक पटीने कमी आहे, आणि क्षेत्रफळ फक्त २१ स्क्वेअर-किलोमीटर इतकेच आहे. पण हा लहानसा देशही ९१च्या दशकात चर्चेत राहीला.
नौरूची बहुसंख्य लोकसंख्या ही समुद्रकिनाऱ्यावर राहणारी होती. मुख्य बेटावर उंचच उंच पठार होते, आणि या पठारांमध्ये मोठ्या प्रमाणात साधनसंपत्ती दडली होती, एका खजिन्यासारखी!!
१९०० च्या दशकात युरोपीय सामंतशाही संपूर्ण आशियात पसरली होती, ऑस्ट्रेलियावरसुद्धा या वेळी ब्रिटिश सत्ता होती. या काळातच नौरू बेटावर असलेल्या पठारांवर फॉस्फेटचा मोठा साठा असल्याचं समजलं. फॉस्फेट प्रामुख्याने शस्त्रास्त्रांसाठी लागणाऱ्या दारूगोळ्यांमधील स्फोट*कं तयार करण्यासाठी वापरलं जातं. सत्तास्पर्धेमुळे युरोपीय शक्तींना अशा स्फो*टक-रासायनिक पदार्थांची मोठ्या प्रमाणात गरज होतीच.
सन १९०६ साली जर्मनीने पहिल्यांदा नौरूमध्ये खाणकाम सुरू करून फॉस्फेट काढायला सुरुवात केली. सात वर्षांतच, म्हणजेच १९१४ साली नौरूवर ऑस्ट्रेलियाची सत्ता स्थापन झाली. ऑस्ट्रेलियाने सन १९१४ ते सन १९६८ दरम्यान नौरूवर आपली पकड ठेवली, आणि सन १९६८ साली नौरू अखेर स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर नौरूच्या सरकारने लोकहितवादी कार्यक्रम हाती घेतले पण फॉस्फेटच्या निर्यातीलाही प्रोत्साहन दिलं.
फॉस्फेटच्या निर्यातीबरोबरच उद्योगांना चालना मिळाली आणि आपसूकच रोजगाराच्या संधीही उत्पन्न झाल्या, त्यामुळेच नौरू एक श्रीमंत देश म्हणून उदयाला आला. जगातील सर्वांत लहान द्वीप देश असलेला नौरू आता जगातील श्रीमंत देशातील यादीत वर वर जात होता. सन १९७४ साली नौरू देशाचे दरडोई उत्पन्न हे जगात दुसऱ्या क्रमांकावर होते, अमेरिकेपेक्षा तीन पटीने जास्त दरडोई उत्पन्न असलेल्या या लहानशा देशाने याच साली स्वतःची विमान प्रवासी वाहतूक, म्हणजेच एअरलाईन सुरू केली.
१९७४ सालच्या आर्थिक वर्षाचे उत्पन्न हे २२५ मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर इतके अवाढव्य होते. (म्हणजेच सुमारे १२ अब्ज ३० कोटी ६० लाख ९१ हजार ७२२ भारतीय रुपये)
फॉस्फेटच्या अतिरिक्त निर्यातीमुळे या देशाला जितका फायदा झाला तसाच तोटाही झालेला दिसतो. या नव्या नवरीची नवलाई पुढचे सुमारे वीस वर्षं तग धरून राहिली..
पण त्या फॉस्फेटचा साठा हा “अमर्याद” नव्हता, हा साठा कधीच संपणार नाही, त्यामुळे उत्खनन करून काढत राहा, अशा भ्रामक मनस्थितीतील सरकार आणि जनता १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला फॉस्फेटचे साठे संपले हे कळल्यानंतर भानावर आले.
नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर मानवाने नियंत्रण न आणल्यास भविष्यात कशी भीषण परिस्थिती उद्भवू शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून नौरू या द्वीपराष्ट्राकडे बघण्यास काही हरकत नाही.
१९९० च्या दशकापासून नौरू देशाची फॉस्फेटच्या निर्यातीवर आधारलेली अर्थव्यवस्था ढासळू लागली. सरकारने बांधकाम क्षेत्रात गुंतवलेला निधी वाया गेला, कारण लोकांना कामच उरलं नाही, बेरोजगारी वाढली, ७०च्या दशकात उर्जितावस्थेला आलेली अर्थव्यवस्था ज्या वेगाने उर्जितावस्थेला गेली त्याच वेगाने कोसळली, आणि अर्थशास्त्रात ज्याला “बॉटमलेस पिट” म्हणतात, ती स्थिती निर्माण झाली, म्हणजे अर्थव्यवस्थेला फक्त उतरती कळा लागली आणि या देशात आर्थिक महामंदीचं संकट उभं राहिलं.
अनेक वर्षांत पर्यटन व्यवसायाचा विकासही या देशाने केला नव्हता, अनियंत्रित खाणकामामुळे जमिनीची सुपीकता नष्ट झाली, या बेटावरील सुमारे ८०% जमीन नापीक बनली. ४०% समुद्री जीव सम्पले होते. थोडक्यात अनियंत्रित खाणकामामुळे होत्याचं नव्हतं झालं.
‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ हेच खरं ठरलं. सरकारने आपली तिजोरी भरण्यासाठी अनेक बेकायदेशीर मार्ग अवलंबले. बेकायदेशीर सावकारी, पैसे मिळवण्यासाठी म्हणून निर्वासितांना आश्रय देणं, परदेश प्रवासाच्या परवान्यांची (पासपोर्टस्) विक्री असे अनेक अवैध प्रकार चालवले गेले. अशा अवैध कारभारामुळे संयुक्त राष्ट्र परिषद (युनायटेड नेशन्स), आर्थिक सहकार्य आणि विकास संघटना (ओ. इ. सी. डी.), अँमनेस्टी इंटरनॅशनल या जागतिक संघटनांद्वारे अनेक आरोप या देशावर लावण्यात आले, त्यामुळे जगातील अन्य विशेषतः या संस्थांचा सदस्य असलेला कोणताही देश या देशाबरोबर आर्थिक संबंध ठेऊ शकला नाही.
आजही हा देश अनेक प्रश्नांसोबत झुंजतोय, येथील ६१% तरुणांमध्ये अति-स्थूलतेचं प्रमाण आहे, ४७% तरुण हे वेगवेगळ्या व्यसनांच्या आहारी गेलेत, तर सुमारे ४०% लोकसंख्या टाईप-2 डायबेटीसने बाधित आहे. नौरूतील आरोग्य, बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि क्षितिजावर स्पष्ट दिसत असलेलं समुद्रस्तराच्या वाढत्या पातळीचा धोका ही संकटं मानवाला धोक्याचा इशारा देणारी आहेत.
आपले डोळे उघडे ठेवून मानवाने या देशाकडे पाहावं, आणि फक्त “विकास” नव्हे, तर “शाश्वत विकासासाठी” प्रयत्नशील राहावं, हाच उद्देश. फक्त एक दिवस पर्यावरण दिन साजरा करून काही होणार नाही, सम्पूर्ण मानवजातीने आपल्या पुढच्या पिढ्यांना जगण्यासाठी पृथ्वी एक नंदनवन म्हणून विकसित करावं लागणार आहे. जगातील सर्वच विचारसरणीच्या सरकारांनी शाश्वत विकास आणि पर्यावरण रक्षण हे समान ध्येय समोर ठेऊन काम करायला हवं, नाहीतर आपलीही अवस्था “नौरू”सारखी व्हायला वेळ लागणार नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.