आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आजवर जगात सत्ता संपत्ती आणि स्त्री यावरून कित्येक लढाया झाल्या आहेत. अनेकवेळा सत्तेच्या हव्यासापायी नातीगोती, आपले परके, सबल दुर्बल हा कसलाही विचार न करता एकमेकांना भिडलेले लोक आपण ऐकले आहेत. रामायण, महाभारत यात काय झालं होतं?
नंतर कलिंगाच्या लढाईनंतर तो नरसंहार पाहून सम्राट अशोक उद्विग्न झाला हे ही आपण ऐकलेलं आहे. अगदी पुरातन काळापासून मानव आणि युद्ध हे एकमेकाशी जोडलेलं समीकरण आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर पहिले महायुद्ध झाले, दुसरे महायुद्ध झाले, हिटलरने ज्यू लोकांवर केलेले अत्याचार जगासमोर आले आणि जग हादरून गेले.
पण त्याही पूर्वी असे क्रूर लोक जगात होऊन गेले आहेत ज्यांनी युद्ध खेळताना लोकांवर अत्याचार करताना क्रूरपणाची सीमा ओलांडली आहे. आणि ते नामशेष झाले आहेत. आज अशाच एका नामशेष झालेल्या राज्याची, युद्धाची माहिती देणारा आजचा हा लेख.
जगाच्या इतिहासात अशी अनेक युद्धे झाली ज्यात अक्षरशः नरसंहार झालाय. त्याच्या खुणा जगभर राहिल्या. रोमन, ग्रीक अशी अनेक साम्राज्ये उदयाला आली आणि काळाच्या ओघात युद्धानंतर नष्टही झाली.
असेच एक राज्य होते बायझेन्टाईन. रोमन साम्राज्याचा पश्चिम भागातील एक तुकडा. प्राचीन ग्रीक वसाहत बायझेनटीयमवरून याचे नाव बायझेन्टाईन असे पडले. या राज्याची राजधानी होती कॉन्सटँटीनोपल.
तिसऱ्या शतकात या राज्याची स्थापना झाली आणि १४५३ साली हे राज्य ग्रीक साम्राज्यात विलीन केले गेले. मात्र बल्गेरिया विरुद्ध झालेल्या रणसंग्रामात बायझेनटाईन सैनिकांनी ख्रिश्चन सैनिकांचे जे अनन्वित हाल केले ते अंगावर काटा आणणारे आहेत.
बल्जेरीया आणि बायझेन्टाईन यांच्यात वारंवार लढाया होत असत. जवळपास ६७५ वर्षे या चकमकी सुरूच होत्या. ही युद्धे अत्यंत क्रूरपणे लढली जात. या युद्धाचे कसलेही नियम नव्हते. शत्रूला झोडपून संपवणे हे एकमेव ध्येय ठेवूनच हे युद्धाला सुरुवात करत. शत्रू पक्षाला जास्तीत जास्त नामोहरम करणे हेच एकमेव उद्दिष्ट ठेवून ही युद्धे खेळली जात. शत्रू पक्ष खिळखिळा करणे हेच दोन्ही पक्षाचे धोरण असे. सैनिकांना तेच ट्रेनिंग दिले जायचे असं म्हणायला हरकत नाही. बायझेन्टाईनचा सेनापती हाच तिथला सत्ताधीश असे. शत्रूने पुन्हा डोके वर काढू नये यासाठी तो त्यांना दहशत बसवण्यासाठी वेगवेगळे क्रूर मार्ग अवलंबत असे.
आताचं इस्तंबूल म्हणजे त्यावेळचे कॉन्सटँटीनोपल. इतिहास सांगतो की बायझेन्टाईनचे राजे अत्यंत हुशार होते. पूर्वेला आपले राज्य कसे पसरवायचे याचे ध्येयधोरण त्यांच्या डोक्यात पक्के होते. १४५३पर्यंत त्यांनी पूर्व आणि दक्षिण युरोपमधील बराच भाग काबीज केला. या दरम्यान त्यांनी भयंकर युद्धे केली.
खासकरून बाल्कन हा प्रदेश जिंकण्यासाठी खेळ्या खेळल्या आणि त्यांचा पाडाव झाल्यानंतर लोकांनी जनतेने कसलेही प्रश्न विचारायची हिंमत दाखवू नये म्हणून तेथील लोकांवर दहशत बसवण्यासाठी अतिशय भीषण अत्याचार केले.
जे सैनिक युद्धबंदी म्हणून सापडले होते त्यांचाही अनन्वित छळ केला. कारण त्यांना फक्त लोकांत दहशत बसवणे एवढेच धोरण माहिती होते. कारण त्या दहशतीच्या जोरावरच तर त्यांची सत्ता टिकून राहणार होती. बऱ्याचदा युद्धादरम्यान ते निष्पाप नागरिकांना पळवून नेत आणि त्यांना ओलीस ठेवत आणि विद्रूप करून परत पाठवून देत, त्यांचे ते विदीर्ण झालेले रूप पाहून अर्थातच लोक घाबरून जात. खूपदा त्या लोकांना युद्धात पाठवून मारून टाकत.
असाच एकदा बायझेन्टाईन आणि बाल्कन यांचे सैन्यबळ एकत्र करून बायझेन्टाईनने बल्गेरिया विरुद्ध लढाई करायचा मनसुबा आखला गेला. आणि हे युद्ध थोडी थोडकी नाही तर ६७५ वर्षे चालले.
यातील क्लाईडन सोबतच्या युद्धात बल्गेरीयाला बायझेन्टाईनने धूळ चारली. बल्गेरियाचा राजा सॅम्युअल स्वत: युद्धात उतरला. त्याची फौज होती केवळ १५ हजार सैनिकांची आणि बायझेन्टाईनकडील सैनिक होते ४५ हजार. कुठे निभाव लागणार होतं त्यांचा या युद्धात? हे युद्ध नव्हे तर बल्गेरियन सैन्याचे शिरकाण करणारे हत्याकांड होते.
लवकरच बायझेन्टाईनने बल्गेरियाचा पराभव केला आणि त्याचे सैन्य बंदी बनवले. आणि त्या सर्व सैनिकांना शिक्षा सुनावली गेली . ती शिक्षा इतकी भयंकर होती.
१५ हजार सैनिक पकडले गेले आणि त्यांचे १०० १०० लोकांचे गट केले गेले. प्रत्येक गटामधील ९९ जणांचे डोळे काढण्यात आले. एक बाकी ठेवला. कशासाठी? तर मायदेशी परत जाताना इतर आंधळ्या लोकांना रस्ता दाखवायला सांगायला कुणीतरी हवे म्हणून!
त्यातील काही नशीबवान होते ज्यांनी ही शिक्षा होण्याआधी पळ काढला. बाकीचे दुर्दैवी जीव भयंकर अंधत्व घेऊन बल्गेरियाला पोहोचले. आपल्या सैनिकांची ही दयनीय अवस्था पाहून त्यांचा राजा सॅम्युअल याला प्रचंड धक्का बसला ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊन तो मरण पावला.
या घोर युद्धानंतर आणि अशा भयंक शिक्षेनंतर बल्गेरिया परत कधीही युद्धासाठी उभा राहू शकला नाही. बल्गेरियाची सारी कुमक खिळखिळी होऊन गेली. ही बल्गेरियाच्या अंताची सुरुवातच ठरली. याचा राग कायमस्वरूपी बल्गेरियन जनतेने मनात ठेवला. आणि बाल्कनच्या लढ्यात बायझेन्टाईनचे वर्चस्व झुगारून देऊन त्याच्या शेवटासाठी नेटाने प्रयत्न केले आणि १०१८ साली बायझेन्टाईनचे अस्तित्व संपून गेले.
या पिढीला बायझेन्टाईन हे नावही माहिती नाही. हा देश होता हे पण सांगावे लागते. सहाशे वर्षे इतक्या लढाया केल्या, इतक्या निष्पाप जीवांचे बळी घेतले आणि शेवट कशात? नामशेष होण्यात!!!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.