आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कपिल देवच्या नेतृत्वाखाली १९८३ साली भारताच्या क्रिकेट संघाने पहिला विश्वचषक जिंकला आणि जागतिक पातळीवर भारतीय क्रिकेट संघाची ओळखच बदलून गेली. आज तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय संघाचाच वरचष्मा आहे. आजवर क्रिकेटमध्ये मातब्बर समजल्या जात असलेल्या ऑस्ट्रेलियालासुद्धा मात देण्याची क्षमता भारतीय संघात निर्माण झाली आहे.
कोणताही खेळ असो. त्यामधे महत्त्वाची असते ती खिलाडूवृत्ती. खेळामध्ये हार-जीत तर होतच राहते परंतु तुम्ही किती प्रामाणिकपणे खेळता याचीसुद्धा नोंद घेतली जाते. खिलाडूवृत्तीने खेळणारा संघ नेहमीच क्रीडा रसिकांच्या आदरास पात्र राहतो.
आज आम्ही तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासातील अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, ज्यामध्ये भारताने सामना हरला होता परंतु रसिकांची मने जिंकली होती.
अनेकदा आपण पाहतो की जिंकण्यासाठी खेळाडू खिलाडूवृत्ती सोडून नको त्या मार्गांचा अवलंब करतात. पण असे खेळाडू विजयी ठरले तरी क्रीडा रसिकांच्या मनातून कायमचे उतरतात. भारतीय संघाला जिंकण्याची संधी आलेली असतानासुद्धा कप्तानाने आधी खेळातील नियमांशी प्रामाणिक राहण्याला प्राधान्य दिले. पण या एका गोष्टीमुळे या भारतीय कप्तानाचे नाव क्रीडा रसिक आजही आदराने घेतात.
ही गोष्ट आहे १९८० सालातील जेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व गुंडाप्पा विश्वनाथ यांच्याकडे होते. क्रिकेटच्या विश्वात आपले स्थान पक्के व्हावे म्हणून भारतीय क्रिकेट संघ या काळात अपार मेहनत घेत होता. परंतु फक्त जिंकणे हाच खेळाचा एकमेव उद्देश असू शकत नाही या तत्त्वावर भारतीय संघाचा पूर्ण विश्वास होता.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाचा सामना होता इंग्लंडच्या संघाशी. इंग्लंडसाठी क्रिकेट हा काही नवा खेळ नव्हता. ते या खेळात अगदी मातब्बर होते त्यामुळे सहाजिकच भारतासारख्या संघाशी खेळताना त्यांच्यातील शेखीची भावना जाणवत असे.
१९८० साली खेळल्या गेलेल्या या सामन्याला गोल्डन जुबली टेस्ट म्हणून हे ओळखले जाते. या सामन्यांमध्ये हार-जीतपेक्षाही जास्त लक्षात राहिली ती म्हणजे खिलाडूवृत्ती आणि प्रामाणिकपणा.
वानखेडे स्टेडियम फलंदाजांसाठी जमेचं आहे हे तर आपल्याला माहितीच आहे म्हणूनच टॉस झाल्यानंतर कॅप्टन गुंडप्पा विश्वनाथ यांनी पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन-तीन दिवसानंतर वानखेडे स्टेडियमवरील हीच पीच स्पिनरसाठीसुद्धा फायद्याची ठरणार होती. या विचाराने त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करण्याला प्राधान्य दिले. भारतीय संघात कपिल देवसारखे अष्टपैलू खेळाडू तर होते शिवाय ई. प्रसन्नासारखे आक्र*मक गोलंदाजही होते.
परंतु इंग्लंडच्या पट्टीच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागू शकला नाही. इंग्लंडचे इयान बॉथमसारख्या स्विंग बॉलरच्या बॉलिंगचा भारतीय खेळाडूंना अंदाज आला नाही.
त्यातच फेब्रुवारीचा महिना असल्याने सकाळी पडणाऱ्या धुक्यामुळे पीच देखील काहीशी ओलसर झालेली असायची. वेगाने बॉलिंग करणाऱ्या बॉलर्सना या परिस्थितीचा आणखीनच फायदा झाला. शेवटी २४२ धावसंख्येवरच भारतीय संघाला समाधान मानावे लागले. या सामन्यात इयान बॉथमने सहा विकेट घेतल्या होत्या.
काहीशी नाराज झालेली भारतीय टीम जेव्हा बॉलिंगसाठी उभी राहिली तेव्हा त्यांनी पूर्ण कसर भरून काढली. ५८ धावासाठी त्यांनी इंग्लडच्या ५ विकेट घेतल्या होत्या. इथून पुढे इंग्लंडच्या मधल्या फळीतील खेळाडूंचा खेळ चांगला झाला तरच हा सामना इंग्लडच्या हाताशी लागणार होता, नाहीतर भारताचा विजय पक्का होता.
पीचवर इंग्लंडचे बॉब टेलर आणि इयान बॉथमच फलंदाजी करत होते. त्यांच्यातील समायोजन कमालीचे होते आणि कदाचित त्यांची भागीदारी शेवटपर्यंत टिकली तर नक्कीच इंग्लडचा विजयावर शिक्का मोर्तब होणार ही गोष्ट ही स्पष्ट होती.
कपिल देव गोलंदाजी करत होते. गुंडाप्पा विश्वनाथ स्वतः स्लीपला उभे राहिले. कपिलच्या चेंडूने टप्पा खाल्ला आणि बॉल सरळ यष्टीरक्षक सैय्यद किरमानीच्या हातात जाऊन पडला. कपिलने जोरदार अपील केली आणि अंपायर हनुमंत राव यांनी फलंदाजाला बाद घोषित देखील केले.
बॉब टेलरला माहित होते की चेंडूचा बॅटला स्पर्श झालेला नाही तरीही अंपायरचा निर्णय अंतिम मानून तेही तंबूत परत निघाले.
गुंडाप्पा विश्वनाथ यांनीही पहिले होते की, बॉलचा आणि बॅटला स्पर्श झालेला नाही. बॉब टेलर जर परत आले आणि दोघांनी चांगला खेळ केला तर भारत हा सामना हरू शकतो हेही त्यांना माहित होते. पण, ते मैदानावरून परत निघालेल्या बॉब टेलरकडे गेले आणि त्यांना पुन्हा खेळण्याची विनंती केली.
अंपायरने फलंदाजाला बाद घोषित केलेले असतानाही प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार नियमांचे पालन करून समोरच्या खेळाडूला खेळण्याची विनंती करतो आहे, हे दृश्य पाहून सगळं स्टेडियम हेलावून गेलं. गुंडाप्पाचे हे वर्तन म्हणजे स्वतःहूनच अपयश ओढवून घेतल्यासारखे होते, हे प्रेक्षकांना देखील जाणवत होते. पण त्यांच्या प्रामाणिक वृत्तीने प्रेक्षक भारावून गेले.
झालेही तसेच! त्यांचा हाच प्रामाणिकपणा भारतीय संघाला महागात पडला. इयान बॉथम आणि बॉब टेलर यांनी भागीदारीत १७१ धावा काढल्या. सामना जिंकण्यासाठी एवढे पुरेसे होते. परंतु इंग्लंडने आणखी ५४ धावा करून कसोटीत पुढचे स्थान मिळवले.
इयान बॉथम यांनी तर या सामन्यात कमालीचे विक्रम केले. या एकाच सामन्यात त्यांनी शतकही ठोकले आणि सर्वाधिक विकेट घेणारे खेळाडूही ठरले. या सामन्यात त्यांनी ११४ धावा करून शतक ठोकले आणि संपूर्ण सामन्यात १३ विकेटही घेतल्या.
सामना तर इंग्लंडने जिंकला पण, रसिकांची मने तर कॅप्टन गुंडाप्पा विश्वनाथ यांनीच जिंकली. कारण, या व्यक्तीने यश-अपयश यापेक्षा प्रामाणिकपणा आणि सचोटी महत्वाची असते हे संपूर्ण जगाला दाखवून दिले. म्हणूनच क्रिकेट विश्वात गुंडाप्पा विश्वनाथ यांचे नाव आजही आदराने घेतले जाते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.