आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
घाशीराम कोतवालाचे नाव महाराष्ट्रात गाजले ते श्री. विजय तेंडुलकर यांनी लिहिलेल्या नाटकामुळे. खरंतर, नाटक, सिनेमा आणि मालिका ही काही इतिहासाची साधने नाहीत. परंतु, या समाज माध्यमांचा पगडा सामान्य जनतेवर असल्याने त्यात दाखवले जाते, ते सर्व खरे असा विश्वास, अशी एकंदर भावना जनमानसांत तयार होते.
अर्थात, नाटकात काय दाखवले किंवा काय नाही याबद्दल हा लेख नाही. तर, घाशीराम कोण होता व कोतवाल म्हणून त्याने कोणती कामगिरी बजावली हे सांगण्यासाठी या लेखाचा प्रपंच.
घाशीराम सावळादास हा मुळचा औरंगाबादचा. पुण्यात पेशवे कारभार बघत होते त्यावेळी अनेक कुटुंबे आपले नशीब आजमावायला या शहरात आली. तसाच घाशीरामसुद्धा आला. पुण्यात आल्यावर घाशीरामची ओळख ही नाना फडणीस यांच्याशी झाली. घाशीरामचे पुणे दरबारात येणे होते. तसेच, त्याने त्या दरबाराच्या दुसऱ्या एका सावकाराचा हवाला घेतला होता.
नाना फडणीस यांच्याशी घाशीरामाची चांगली ओळख झाली होती. त्यामुळे सन १७७७ साली घाशीरामाला कोतवालीची वस्त्रे मिळाली व सन १७८२मध्ये कोतवाल पदावर त्याची कायमस्वरूपी नेमणूक झाली.
‘शहराच्या पेठा, पुरे व कसबे येथील किरकोळ कजिया, पेठेचे कमाविसदार यांनी मनास आणावा; मातबर कजिया असल्यास कोतवालीकडे मनास आणून हलकी गुन्हेगारी घेत जाणे. रस्त्याचा गल्लीचा व घरचा कजिया लागेल त्याचा इन्साफ कोतवालाने करावा’, ही कामे कोतवाल या पदावर असणारी व्यक्ती करत असे.
थोडक्यात, कोतवाल म्हणजे सध्याचा महापौर. घाशीरामची कोतवाल पदी नियुक्ती करताना त्याच्याशी २० कलमी करार केला गेला. या २० कलमात घाशीरामाने करावयाच्या कामांचा उल्लेख केला आहे.
कोतवाली पदी नेमणूक करताना घाशीरामाला पेशव्यांनी पुढील आज्ञा दिल्या होत्या.
१. कोतवालाच्या कार्यालयातील कारकून व शिपाई यांना कामावरून कमी करण्याआधी पांडुरंग कृष्ण सरअमीन या वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी.
२. नारायण व शनिवारात (पेठ) मनुष्यवस्ती खूप वाढली आहे, त्यामुळे त्या भागात दोन नवीन पेठा वसवाव्यात.
३. शहरातील निरनिराळ्या भागातील गुप्त बातम्या पेशव्यांच्या कानावर रोज घालाव्यात.
४. शहरातील चोऱ्यांवर नीट लक्ष ठेवून गुन्हेगारास त्वरीत शासन करावे.
५. विवाहित बायकांना वेश्या व्यवसाय करायला परवानगी देऊ नये.
घाशीरामाने कारभार हातात घेण्याआधी पुण्यात चार चौक्या होत्या. घाशीरामाने नारायण व शनिवार पेठेत दोन नवीन चौक्या बसवल्या. घाशीरामाच्या हाताखाली तीन अधिकारी होते. त्यांच्याकडे कोतवालीतील तीन खाती सोपवली होती.
मुजुमदाराकडे दस्तैबज, अर्ज वगैरे लिहिण्याचे काम असे. दुसऱ्याकडे कागदापत्रे सांभाळण्याचे काम असे आणि तिसरा जमाबंदीचा अधिकारी असे. तिघांचा मिळून पगार वर्षाला ६४० रू. खर्ची पडत.
घाशीराम कोतवाल झाल्यावर पुण्यातील पोलीस ठाण्यांची संख्या ६ झाली. नवीन चौक्या व वाढलेला कारभार यांच्यामुळे या पोलीस चौक्यांचे उत्पन्नसुद्धा वाढले. सन १७९०च्या आसपास या पोलीस ठाण्यांचे उत्पन्न जवळपास २७ हजारांच्या आसपास गेले होते.
खालील पद्धतीने हे उत्पन्न जमा होत असे –
नजर – माल मिळकत सज्त्रानाच्या ताब्यात आल्याबद्दलची सरकारास द्यावी लागे ती कमावीस.
घरविक्रीकर कर.
पाट दाम (पाट लावण्यावर कर).
गवयांकडून फी.
दंड.
बेवारसी मालमत्ता.
जुगाराबद्दल दंड.
वजने, मापे, कापड इत्यादींवर सरकारी छाप मारण्याची फी.
घाशीरामाच्या काळात सन १७९१ साली पुण्यात दंडाला पात्र असे फक्त २३४ गुन्हे घडले होते.
यावरून घाशीरामाचा कारभार किती चोख होता याची कल्पना येते. या गुन्ह्यात सरकारच्या परवानगीशिवाय वेश्या होणे, परवानगीशिवाय बकरी मारणे, बेवारसी प्रेताची वाट लावणे, स्वत:ची जात चोरणे, कुंटिणपणा करणे, वेश्या व्यवसायाकरिता मुली विकत घेणे, एक नवरा जिवंत असतांना दुसरा करणे, बायकोला काडी मोडून दिल्यानंतरही तिला घेऊन राहणे, कोळ्यांना चाकरीस ठेवणे अशा गुन्ह्यांचा प्रामुख्याने समावेश होता.
घाशीरामाचा अंत
घाशीरामाचा अंत ज्या पद्धतीने झाला ती गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. त्या हकीकतीचा सारांश असा,
“१७९१ च्या ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस श्रावणमासाची दक्षिणा आटोपल्यानंतर पस्तीस द्राविडी ब्राम्हण घाशीरामाच्या बागेत गेले. तेथे त्यांनी माळ्याच्या परवानगीशिवाय काही कणसे तोडली. त्यावरून तंटा झाल्याने माळी घाशीरामाकडे आला व त्याला त्याने सांगितले की कित्येक चोर व कोमटी यांनी बागेत दंगा केला. तेव्हा कोतवालाने २५ प्यादे पाठवून ब्राम्हणांना पकडून स्वत:च्या (भवानी पेठेतील) वाड्यात, भुयारांत त्यांना कोंडले.
रविवारची रात्र, सोमवार दिवस-रात्र व मंगळवार दिवसपर्यंत ते तेथे होते. मानाजी फांकडयास ही गोष्ट कळल्यावर त्यानें जबरीनें कुलूप तोडून ब्राम्हण बाहेर काढले. त्यांत १८ ब्राम्हण मेले होते, तीन बाहेर काढल्यावर मेले. तेव्हा हे वर्तमान मानाजीने पेशव्यांना कळविलें.
त्यांनी नानांना सांगितल्यावरून त्यांनी घाशीरामास विचारिलें. त्याने ते कोमटी चोर होते असे उत्तर दिल्यावरून नानांनी मुडदे जाळण्यास परवानगी दिली. परंतु मानाजी मुडदे उचलूं देईना. तेव्हां नानांनी घाशीरामास चौकीत बसवून चौकशी चालविली.
इतक्यांत हजार तैलंगी ब्राम्हण नानांच्या वाड्यापुढे येऊन दंगा करू लागले. न्यायाधीश अय्याशास्त्री हे वाड्यात जात असता त्यांची शालजोडी व पागोटे ब्राम्हणांनी फाडले व मारामारी केली. शास्त्रीबुवांनी चौकशी करून घाशीरामास देहांतशासन शिक्षा दिली. तेव्हा मंगळवारी रात्री त्याची धिंड काढली व बुधवारी सायंकाळी भवानी पेठेच्या पलीकडे त्याला नेऊन सोडला. तेथे वरील द्रविड ब्राम्हणांनीं “दगड उचलून मस्तकावर घालून (त्यास) जीवें मारला” या हकीकतीचा उल्लेख चार्ल्स मॅलेट नावाचा ब्रिटीश अधिकारीसुद्धा आपल्या पुस्तकात करतो.
घाशीरामाच्या एकंदर घटनेवरून नाना फडणीस यांना अनेकदा दोष देण्यात येतो. मुळात नाटक आणि इतिहास यांच्यातील फरक जेव्हा महाराष्ट्रातील सुज्ञ जनतेला समजेल, तेव्हा आपल्या इथे इतिहासाला चांगले दिवस येतील असे म्हणायला हरकत नाही.
संदर्भ –
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.