आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
शुद्ध बुद्धिवादी, मानवतावादी आणि कर्मकांडरहित बौद्ध धर्म गौतम बुद्धांनी केवळ भारताला नव्हे तर जगभरातल्या मानवजातीला प्रदान केला. त्यांच्या शिष्यांनी; विशेषतः बौद्ध धर्माचा स्वीकार केलेल्या सम्राट अशोकासारख्या राज्यकर्त्यांच्या प्रोत्साहनामुळे हा धर्म जगभर पोहोचला. अर्थातच, गौतम बुद्धांचे अनुयायी केवळ भारतातच नाही तर जगभरात पसरले आहेत.
स्वतः बुद्धांचा मूर्तिपूजा आणि व्यक्तिपूजेला विरोध असला तरीही सामान्य माणसांना काही प्रतीकांची आवश्यकता भासते. त्यानुसार जगभरात गौतम बुद्धांच्या भव्य आणि देखण्या मूर्ती घडविण्यात आल्या आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीतही बुद्धांच्या अनेक मूर्तींचा समावेश करण्यात आला आहे.
गौतम बुद्धांच्या बहुतेक मूर्ती ध्यानस्थ मुद्रेतल्या आहेत. त्यांचे रेखीव अर्धोन्मीलित डोळे आणि त्यांच्या चेहेऱ्यावरचे शांत प्रसन्न भाव पटकन आपलं लक्ष वेधून घेतात. याशिवाय लक्ष वेधून घेणारी आणखी एक गोष्ट म्हणजे गौतम बुद्धांचे कुरळे केस. इतर सर्व बौद्ध धर्मगुरू मुंडण केलेले आपण आजही पाहतो. मग, गौतम बुद्धांच्या डोक्यावर इतके कुरळे केस कसे हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही. या केसांमागे काही कथा किंवा दंतकथा आहेत.
बौद्ध भिक्खू ज्यावेळी दीक्षा घेतात त्या वेळी त्यांनी मुंडण करणे अनिवार्य आहे. बौद्ध धम्माचे धर्मग्रंथ असलेल्या त्रिपिटकांपैकी विनय पिटक ग्रंथात भिक्षूंसाठी अनेक मार्गदर्शक तत्त्वे नमूद करण्यात आली आहेत.
आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करून शरीर आणि मन दोन्ही पूर्णपणे शुद्ध करणे आवश्यक आहे. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शरीराच्या शुद्धतेसाठी बौद्ध भिक्खूंनी मुंडण करणे आवश्यक आहे.
राजपुत्र सिद्धार्थ जेव्हा राजत्याग करून आत्मशोधासाठी राजवाड्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांनीही मुंडण करून बुद्धत्वाकडे आपला प्रवास सुरू केला होता आणि वास्तवात गौतम बुद्धांच्या मूर्तीमध्ये दिसणारे कुरळे केस हे खरे केस नाहीतच! त्या गोगलगायी आहेत. आता गोगलगायी बुद्धांच्या डोक्यावर कशा आल्या, याबद्दलही कुतूहल जागं झाल्याशिवाय रहात नाही. याबाबत एक कथा प्रचलित आहे.
सिद्धार्थ जेव्हा आत्मशोधासाठी राज्य आणि राजसुखांचा त्याग करून बाहेर पडला तेव्हा त्याने प्रथम गुरूचा शोध सुरू केला. त्यासाठी त्या काळातल्या अनेक ऋषी-मुनी आणि आश्रमांना त्याने भेट दिली. मात्र, दुःखाचा उगम कष्ट आहे आणि दुःख नष्ट कसे करायचे; या मूलभूत प्रश्नांबाबत त्याचे समाधान करणारे गुरू त्याला भेटले नाहीत.
अखेर त्यानेच ध्यानाच्या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त करून घेतले आणि आपल्या शिष्यांना ‘अत्त दीपो भव:’ अर्थात, तूच तुझा दिवा हो आणि आपला मार्ग शोध असा संदेश दिला. त्यांच्या जीवनात आणि विचारात ध्यानाला खूप महत्त्व आहे.
तर, असेच गौतम बुद्ध एकदा ध्यानात मग्न होते. ध्यानात ते स्वतःचे देहभान विसरून जणू बाह्य जगापासून पूर्णतः वेगळे झाले होते. काळवेळाचे भान विसरलेल्या गौतम बुद्धांना डोक्यावरच्या सूर्याचे चटकेही जाणवत नव्हते. शरीराची काहिली करणारा उन्हाळा समाजात नव्हता.
त्याच वेळी बुद्धांच्या बाजूने जाणाऱ्या एका गोगलगायीने हे दृश्य बघितले. तिला वाटले की उन्हाच्या चटक्यांनी बुद्धांना त्रास होणार आणि त्यांच्या ध्यानात व्यत्यय येणार. ध्यानातली एकाग्रता भंग होणार. त्यापेक्षा मी बुद्धांच्या डोक्यावर जाऊन बसले तर त्यांना थोडासा का होईना, थंडावा मिळेल. या विचाराने ती बुद्धांच्या डोक्यावर जाऊन बसली.
तिला बघून आजूबाजूच्या अनेक गोगालयींनाही तिचा विचार पटला आणि त्या देखील गौतम बुद्धांच्या डोक्याला थंडावा देण्यासाठी तिथे येऊन बसल्या. गौतम बुद्धांचे ध्यान भंग पावू नये आणि त्यांना आत्मज्ञान प्राप्त व्हावे, या उद्दात्त हेतूनं त्यांच्या डोक्यावर बसलेल्या गोगलगायी उन्हाच्या चटक्याने अखेर मरण पावल्या. मात्र, त्यांनी बुद्धांच्या डोक्यावरची आपली जागा सोडली नाही.
आपल्यापैकी बहुतेकांनी लहानपणी गोगलगाय बघितलीच असेल. पकडली ही असेल. गोगलगायीच्या गिळगिळीत शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्द्रता असते. त्यांचं शरीर थंड असतं. गौतम बुद्धांची कर्मभूमी असलेल्या बिहार आणि उत्तर भारतातील वातावरण अत्यंत रुक्ष आणि उष्ण असतं. या मुळेच गौतम बुद्धांच्या डोक्यावर दिसणारे कुरळे केस हे केस नसून गोगलगायी आहेत, ही कथा प्रचलित झाली असावी.
या कुरळ्या केसांबाबत आणखीही एक कथा सांगितली जाते. गौतम बुद्ध दीर्घकाळ ध्यानमग्न असताना त्यांच्या मुंडण केलेल्या डोक्यावर केस उगवले. उन्हाच्या झळांनी ते जळाले आणि कुरळे झाले. आजही आपण पहिले तर उष्ण कटीबंधातल्या आफ्रिकेसारख्या खंडातल्या देशांमध्ये लोकांचे केस कुरळे असतात.
गौतम बुद्धांच्या मूर्ती जगभरात आढळून येत असल्या तरी खरे गौतम बुद्ध कसे दिसत असतील याचा अंदाज त्या मूर्तीवरून बांधणे अयोग्य ठरेल, असा धम्म अभ्यासकांपैकी काहींचा दावा आहे. गौतम बुद्ध यांचा मूर्तिपूजा आणि व्यक्तिपूजेला विरोध होता. शिवाय त्यांच्या काळात शिल्पकला एवढी विकसित झालेली नव्हती. त्यामुळे त्यांच्यानंतर शेकडो वर्षांनी त्यांची काल्पनिक मूर्ती बनविण्यात आली असावी, असा काहींचा कयास आहे.
कनिष्क साम्राज्याच्या काळात शिल्पकला विकसित केली जात होती आणि जेव्हा सम्राटाने जागतिक बौद्ध परिषदेची बैठक आयोजित करायचं ठरवलं तेव्हा बोलावली तेव्हा बुद्धांची प्रतीकात्मक मूर्ती ठेवण्याची कल्पना पुढे आली. त्यानुसार जगभरातून येणाऱ्या प्रतिनिधींना आपापल्या संस्कृती आणि वंशाच्या वैशिष्ट्यांचे दर्शन घडेल अशा पद्धतीने काल्पनिक मूर्ती घडवण्यात आली. त्यावर ग्रीक, रोमन शैलीचा प्रभाव दिसून येतो. गौतम बुद्ध हे तुर्रानियां वंशाचे होते. मात्र, त्यांच्या मूर्तीची देहयष्टी आणि चेहरेपट्टीत या वंशाची वैशिष्ट्य दिसत नाहीत, असा एक प्रवाद आहे.
गौतम बुद्धांच्या केसांबद्दलची ही कहाणी कितपत खरी आहे हे तर ठाऊक नाही पण, गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त करून देण्यासाठी प्राणत्याग करणाऱ्या या १०८ गोगलगायींच्या बलिदानाला धम्मात महत्त्वाचे स्थान आहे.
संदर्भ- https://www.buddhafiguren.com/blog/108-dried-snails-on-buddhas-head
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.