आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
बॉलीवूडच्या आकर्षणाने देशाच्या कानाकोपऱ्यातून दर दिवशी हजारो तरुण तरुणी मुंबईत येत असतात. त्यांच्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या लोकांनाच आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळते. इतरांचे पुढे काय होते याच्याशी या मायानगरीला काही देणेघेणे नसते. मात्र, ही महानगरी कोणालाही उपाशी ठेवत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पोट भरण्याचे चांगले आणि वाईट मार्ग या शहरात नक्कीच उपलब्ध आहेत.
अशाच प्रकारे चित्रपटसृष्टीत अभिनय करून ‘तारका’ होण्यासाठी मुंबईत आलेल्या ‘त्या’ तरुणीच्या स्वप्नांचा पार चुराडा झाला. मात्र तिने खचून न जाता वेगळाच मार्ग पत्करला आणि महानगरीत टिकू राहिली. पुढे ती जे आयुष्य जगली ते एवढे नाट्यमय; खर तर थरारक होते ज्या चित्रपटसृष्टीचा उंबरा ओलांडण्यापूर्वीच माघारी फिरण्याची वेळ आलेल्या तिच्या आयुष्यावरच चित्रपट बनला आहे.
या तरुणीचे नाव आहे गंगा हरजीवनदास उर्फ गंगुबाई काठियावाडी उर्फ कोठेवाली. एकीकडे वेश्या व्यवसायाची मालकीण आणि मुंबईतील ‘माफिया क्वीन’ म्हणून बदनाम ठरली तरी फसवून किंवा अगतिकतेने वेश्या व्यवसायात आलेल्या मुलींना आईची माया देऊन त्यांच्या वेदना थेट प. नेहरू यांच्यापर्यंत पोहोचविणाऱ्या ‘कामाठीपुऱ्याच्या आदरणीय महिला’ असे आदराचे संबोधनही तिने प्राप्त केले.
कामाठीपुऱ्याच्या परिसरात नागरिकांनी त्यांचा पुतळाही उभारला आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक एस. हुसैन झैदी यांनी त्यांच्या ‘द माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या बेस्टसेलर पुस्तकात त्यांच्या नाट्यपूर्ण आयुष्याचा आलेख मांडला आहे.
गंगा हरजीवनदास हीचा जन्म १९३९ मध्ये गुजरातमधल्या काठियावाड प्रांतात एका संपन्न व्यापारी कुटुंबात झाला. वास्तविक त्या काळात संपन्न, सुसंकृत कुटुंबातही मुलींना शिक्षण देणं फारसं पसंत केलं जात नव्हतं. मात्र, तिचे वडील, भाऊ आणि अन्य कुटुंबीयही तिच्या शिक्षणाबद्दल आग्रही होते. गंगाने मात्र, लहानपणापासून अभिनेत्री होण्याचे स्वप्न उराशी बाळगलं होतं. त्यामुळेच असेल; गंगाला मुंबईचं प्रचंड आकर्षण होतं. मुंबईचे टोलेजंग रस्ते, उंच उंच इमारती, दिव्यांचा झगमगाट याचं नुसतं वर्णन ऐकूनच तिचे डोळे दिपले जायचे. कधी ना कधी मुंबई गाठायचीच, हे तिने मनाशी पक्कं केला होतं.
वयाच्या १६ व्या वर्षी ती रमणिक लाल या तरुणाच्या प्रेमात पडली. रमणिक तिच्या वडलांचा कारकून, सहाय्यक होता. तिच्या वडलांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. रमणिक याने तिच्याशी लग्न करून तिला मुंबईला घेऊन जाण्याचं कबूल केलं. त्याच्या सांगण्यावरून तिने आपल्याच घरातून काही पैसे, आपल्या आईचे दागिने आणि काही चीज़वस्तू घेतल्या. आपले मोजके कपडे एका छोट्या बॅगेत भरले आणि रमणिकबरोबर ती मुंबईत पळून आली मुंबईत आल्यावर त्यांनी लग्न केले. रमणिकने तिला चित्रपटसृष्टीत काम मिळवून देण्याचीही खात्री दिली.
काही दिवस ते दोघे एका लॉजमध्ये राहिले. मुंबईभर हिंडून झाल्यावर रमणिकने तिला लॉजमध्ये राहणं खर्चाचं असल्याने माझ्या मावशीकडे रहा म्हणून गंगाला शीला नावाच्या महिलेकडे घेऊन गेला. आपल्यासाठी मी भाड्याच्या खोलीची व्यवस्था करून तुला न्यायला परत येतो, असं सांगून गेलेला रमणिक परत आलाच नाही. त्याने कामाठीपुऱ्याच्या वेश्या व्यवसायात तिला ५०० रुपयांना विकले होते.
अखेर चित्रपटात चमकण्याची इच्छा उराशी बाळगून मुंबईत आलेल्या गंगाने आपल्या वाट्याला आलेलं देहविक्रयाचं कामही पत्करले. कामाठीपुऱ्यात वेश्यालयात ती गंगूबाई म्हणून ओळखली जाऊ लागली. ही तिच्या आयुष्याला मिळालेली पहिली कलाटणी ठरली.
मुंबईमध्ये १९५० च्या दशकात करीम लाला, हाजी मस्तान आणि वरदराजन मुदलियार हे तीन प्रमुख गुंड होते. त्यांच्यामध्ये कामाठीपुरा हा परिसर करीम लालाच्या ताब्यात होता. एकदा करीम लालाच्या एका ‘पंटर’ने कामाठीपुऱ्यात जाऊन गंगुबाईवर फारच वाईट पद्धतीने अत्याचार केले. तिला त्यानंतर रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, हा अन्याय गप्प बसून सहन करणे गंगूबाईला मान्य नव्हते. तिने या अत्याचाराच्या विरोधात दाद मागण्यासाठी थेट करीम लाला यालाच गाठले.
जाताना तिने नेलेली राखी लालाच्या हातावर बांधली. मी वेश्या असले म्हणू कोणीही मला कधीही त्याला हवं तसं वापरू शकतो का; असा सवाल गंगूबाईने लाला याला केला. रक्षाबंधनाने तिने लालाच्या बहिणीचे स्थान पटकावले.
करीम लाला याच्या संरक्षणामुळे गंगूबाईचे कामाठीपुऱ्यातले वजन एकदम वाढले. तिने स्वतःचे वेश्यालय सुरू केले. त्याचबरोबर ड्रग्जचा धंदाही चालवू लागली. खुनाच्या सुपाऱ्यांचीही देव घेव करू लागली. थोडक्यात आता ती केवळ एक वेश्या न राहता गुन्हेगारी वर्तुळातील प्रभावी आणि शक्तिशाली ‘लेडी डॉन’ बनली.
वेश्यांवर होणारे अत्याचार हे गंगूबाईने स्वतः अनुभवले होते आणि उघड्या डोळ्यांनी बघितले होते. त्यामुळे तिच्या मनात अशा अगतिक महिलांबद्दल कणव होती. स्वतः वेश्यालयाची मालकीण असूनही तिने कधी कोणत्याही महिलेवर देहविक्रय करण्याची जबरदस्ती केली नाही. उलट त्यांचं जगणं जास्तीतजास्त सुसह्य व्हावं यासाठीच तिने जास्तीत जास्त प्रयत्न केले.
याच काळात तिचा वेश्यांसाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेशी संपर्क आल्याने तिच्या समाजकार्याला एक नियोजनबद्धता आली. वागण्या बोलण्यातील आत्मविश्वास वाढला. मुळात संपन्न आणि सुशिक्षित पार्श्वभूमी असल्याने तिच्यामधल्या नेतृत्वगुणांना पैलू पडले. साक्षात तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर वेश्यांची कैफियत मांडण्याची संधी गंगूबाईला मिळाली. तिने हे काम चोखपणे पार पाडले.
खुद्द पं. नेहरू गंगूबाईच्या निवेदनाने प्रभावित झाले. सुक्षिक्षित असून आणि नेतृत्वगुण असून आपण वेश्या व्यवसायात का आलात, जेव्हा की तुम्ही लग्न करून नोकरी करून आयुष्यात स्थिरस्थावर होऊ शकला असतात; असा सवाल पंडितजींनी गंगूबाईला केला. तेव्हा हजरजबाबी गंगुबाईने त्यांनाच माझ्याशी तुम्ही लग्न करणार असा उलटा सवाल करत आपली परिस्थिती त्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र, अशा किती जणींची किती कर्मकहाणी पंतप्रधानांना सांगत बसणार होती ती.
एक स्त्री असूनही सर्व प्रकारची गुन्हेगारी कृत्य करणारी गंगूबाई तिच्या चांगल्या कामांमुळे स्थानिकांमध्ये केवळ लोकप्रियच नाही तर आदरणीय ठरली. तिने अनेक वेश्यांचा त्यांच्या अडचणीच्या काळात, वृद्धपकाळात सांभाळ केला. वेश्यांच्या मुलांना सांभाळले. आयुष्यभर तिरस्कार वाटावा असा व्यवसाय करूनही तिला लोक आदराने ‘कामाठीपुरातील आदरणीय महिला’ मानतात सन २००८ मध्ये वयाच्या ६८ व्या वर्षी गंगूबाई यांचे निधन झाले. मात्र, कामाठीपुऱ्यातल्या घर घरातल्या भिंतींवर आजही तिच्या फोटोंचे भक्तिभावाने पूजन केले जाते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.