आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
माणूस अश्मयुगात कंदमुळं आणि प्राण्यांचं कच्च मांस खाऊन जगत होता. आगीचा शोध लागल्यानंतर कच्च मांस आगीवर भाजून खाऊ लागला, हे आपण इतिहासाच्या पुस्तकात शिकलो आहोत. म्हणजेच शाकाहार आणि मांसाहार करण्याची वृत्ती अश्मयुगापासूनच मानवामध्ये आहे. मात्र, या दोन वृत्तींव्यतिरिक्त, न*रभ*क्षक, रक्त पिशाच्च अशा काही रहस्यमयी तसेच गूढ संकल्पना आणि त्यांच्याशी संबंधित दंतकथादेखील आपल्या ऐकीवात आहेत.
या कथांचा आधार घेऊन अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटही तयार करण्यात आले. मात्र, १९७२ साली उरुग्वेमधील काही लोकांनी ‘न*रभ*क्षक’ ही संकल्पना स्वत: जगून पाहिली आहे! अर्जेंटिनामधील अँडीज पर्वतावर १३ ऑक्टोबर १९७२ रोजी उरुग्वेयन एअर फोर्सची ‘फ्लाइट 571’ क्रॅश झाली. या फ्लाईटमध्ये उरुग्वेच्या रग्बी टीमसह एकूण ४५ जण प्रवास करत होते.
विमानाच्या अपघातानंतर त्यातील लोकांचा शोध घेण्यात आला मात्र, कुणाचाही तपास लागला नाही. घटना घडल्यानंतर दोन महिन्यांनी अचानक विमानातील १६ प्रवासी जिवंत आढळले. या घटनेला ‘मिरॅकल ऑफ द अँडीज’ किंवा ‘एल मिलाग्रो डे लॉस अँडीज’ असं देखील म्हणतात. या घटनेनं आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात लक्ष वेधून घेतलं. हा अपघात कसा झाला आणि अँडीजच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये १६ लोकांनी आपला जीव कसा वाचवला? हे जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा..
१९७२ साली उरुग्वेतील ‘ओल्ड ख्रिश्चन रग्बी क्लब’ उरुग्वेच्या मॉन्टेव्हिडिओ येथून चीलीतील सँटियागो येथे खेळण्यासाठी जाणार होता. त्यासाठी त्यांनी उरुग्वेयन हवाई दलाचं एक विमान भाड्यानं घेतलं होतं. १२ ऑक्टोबर रोजी हवाई दलाच्या ट्विन-इंजिन फेअरचाइल्ड टर्बोप्रॉप विमानानं कॅरास्को आंतरराष्ट्रीय विमानतळ सोडलं. त्यावेळी विमानात पाच क्रू मेंबर आणि ४० प्रवासी होते. प्रवाशांमध्ये क्लब टीमचे मेंबर, त्यांचे कुटुंबीय आणि काही मित्र होते.
खेळ झाल्यानंतर सँटियागोमध्ये फिरस्ती करता येईल, या हेतूनं हा लवाजमा चीलीला निघाला होता. पर्वतांमधील खराब हवामानामुळे, त्यांना दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजून १८ मिनीटांपर्यंत मेंडोझा विमानतळावर रात्रभर थांबावं लागलं. भौगोलिक स्थिती लक्षात घेता वैमानिकांनी प्लॅन्चॉनच्या खिंडीपर्यंत पोहचण्यासाठी दक्षिणेकडून जाण्याचा एक मार्ग आखला. जेणेकरून विमान सुरक्षितपणे अँडीज पर्वत पार करून जाईल.
दुपारी २ वाजून १८ मिनीटांनी ‘फ्लाइट 571’नं मेंडोझा विमानतळावरून उड्डाण केलं. टेक ऑफच्या साधारण तासाभरानंतर, पायलटनं एअर कंट्रोलर्सला सूचित केलं की तो, प्लॅन्चॉन खिंडीवरून उड्डाण करत आहे. इथूनचं सर्व गडबड सुरू झाली. पायलटकडून विमानाचं सध्याचं स्थान निश्चित करण्यात चूक झाली.
पायलटच्या अंदाजानुसार त्यांनी अँडीज पर्वत पार केला होता. मात्र, प्रत्यक्षात विमान अजूनही अँडीजमध्येचं होतं. या गोंधळापासून अनभिज्ञ असेलल्या कंट्रोलर्सनी विमानाला उतरण्याची परवानगी दिली. विमान आणि कंट्रोलरूमचा एकमेकांशी झालेला शेवटचा संपर्क ठरला. कारण, त्यानंतर चिलीच्या कंट्रोल टॉवरचा विमानाशी संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, १३ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास विमान एका पर्वतावर आदळलं आणि त्याचे दोन्ही पंख नष्ट झाले. चिलीच्या सीमेजवळ अर्जेंटिनाच्या दुर्गम दरीत हे विमान कोसळलं होतं. विमान बेपत्ता झाल्याचं लक्षात येताच तिकडे चीलीच्या कंट्रोल रूममध्ये गोंधळ उडाला. बेपत्ता विमानाचा शोध सुरू झाला. मात्र, विमानानं नोंदवलेलं शेवटचं लोकेशनचं चुकीच होतं.
यामुळे शोधकार्यात प्रचंड अडचणी आल्या. शेवटी तज्ज्ञांच्या अंदाजानुसार बचावकार्य अँडीज पर्वतामध्ये नेण्यात आलं. मात्र, तिथेही बर्फाच्छादित पर्वतांमुळे पांढऱ्या विमानाचा शोध घेणे कठीण झालं. अँडीजमधील एकूण वातावरण पाहता विमानातील प्रवासी वाचण्याची शक्यता जवळपास शून्यच होती. त्यामुळं आठ दिवसांनंतर शोधकार्य थांबवण्यात आलं. परंतु, रग्बी खेळाडूंच्या नातेवाईकांनी बचावाचे प्रयत्न सुरू ठेवले.
तिकडे बेपत्ता विमानाचा शोध सुरू होता तर दुसऱ्या बाजूला अपघातातून वाचलेल्या लोकांची जीव वाचवण्यासाठी झुंज सुरू होती. अपघातात सुरुवातीला १२ लोकांचा मृत्यू झाला आणि ३३ जण वाचले होते. त्यापैकी काहीजण जखमी होते. अंदाजे ११ हजार ५०० फूट उंचीवर अडकलेल्या खेळाडूंना हाडं गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागला.
विमानाचा सांगाडा बऱ्यापैकी शाबूत असल्यानं त्यांना काही प्रमाणात आसरा मिळाला. मात्र, साधारण आठवडाभरात विमानातील कँडी बार आणि वाइन यासारखे खाण्यापिण्याचे पदार्थ संपून गेले. वाचलेल्या लोकांचे भूकेने हाल होण्यास सुरुवात झाली. एकमेकांशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर त्यांनी प्रेतांचं मांस खाण्याचा निर्णय घेतला. परिस्थितीमुळं अपघातातून वाचलेल्या लोकांना न*रभ*क्षक व्हावं लागलं. मात्र, तरीदेखील पुढील काही आठवड्यांत आणखी सहा जणांचा मृत्यू झाला. २९ ऑक्टोबर रोजी हिमस्खलनामुळं आणखी आठ जणांचा मृत्यू झाला.
शिल्लक राहिलेल्या १६ लोकांनी आपल्या सुटकेसाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आसपासच्या प्रदेशाचं सर्वेक्षण केलं. त्यातील तीघेजण मदत शोधण्यासाठी निघाले. मात्र, काही अंतरावर गेल्यानंतर त्यातील एकजण पुन्हा विमान कोसळलेल्या ठिकाणी परत गेला. इतर दोघेजण कठीण ट्रेक करून २० डिसेंबर रोजी चिलीच्या लॉस मैटेनेस गावातील तीन मेंढपाळांना भेटले. मात्र, ते मेंढपाळ नदीच्या दुसऱ्या बाजूला होते. त्यामुळं एकमेकांशी संवाद साधणं कठीण जात होतं.
दुसऱ्या दिवशी परत येण्याचं आश्वासन देऊन मेंढपाळ निघून गेले. दुसर्या दिवशी पहाटे, चिलीमधील मेंढपाळ पुन्हा आले आणि त्यांनी दगडांना कागद गुंडाळून एकमेकांशी संवाद साधला. नदीच्या पलीकडे दिसणारे दोन लोक हे विमान अपघातातील आहेत, याची खात्री झाल्यानंतर मेंढपाळांनी स्थानिक प्रशासनाला याची माहिती दिली. २२ डिसेंबर रोजी ज्या ठिकाणी विमान पडलं होतं त्या ठिकाणी हेलिकॉप्टर्स पाठवण्यात आले आणि तिथे असलेल्या एकूण १४ लोकांना वाचवण्यात यश आलं.
भयानक विमान अपघात आणि हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये हे १६ लोकं जिवंत सापडणं म्हणजे एक आश्चर्यच होतं. त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न पाहून अनेकांना जगण्याची प्रेरणा मिळाली. आपला जीव वाचवण्यासाठी आपल्याच ओळखीच्या लोकांचं मासं खाणं ही गोष्ट प्रचंड मानसिक ताण देणारी होती. मात्र, त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, अशी प्रतिक्रिया विमान अपघातातून वाचलेल्या लोकांनी दिली होती. त्यांच्या या धाडसी प्रयत्नांवर ‘अलाईव्ह’ नावाचं पुस्तक आणि चित्रपट काढण्यात आला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.