आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या कसोटी सामाने म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरले होते. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने या संपूर्ण मालिकाच चुरशीची ठरली.
आज भारत हा क्रिकेटमध्ये जगात एक तुल्यबळ संघ ओळखला जातो. परंतु ८५ वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. भारताने ज्यावेळी क्रिकेट खेळायला सुरुवात केली तेव्हा देश पारतंत्र्यात होता. आज आपण भारतीय संघाच्या त्या पहिल्या सामन्याच्या इतिहासावर प्रकाश टाकूया..
२५ जून १९३२, भारतीय संघ पहिल्यांदा इंग्लंडच्या विरोधात क्रिकेट सामना खेळायला, इंग्लंडला रवाना झाला. हा सामना क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स स्टेडियमवर खेळण्यात आला होता. जनार्दन नवले यांनी या सामन्यात भारताकडून ओपनिंग केली होती. त्यांनी भारताकडून या सामन्यात पहिला चेंडु खेळला होता. फक्त या एकाच गोष्टीमुळे त्यांचे नाव इतिहासात कायमचे नोंदवले गेले.
त्या सामन्याच्या पहिल्या फेरीत जनार्दन नवले यांनी १२ रन बनवले होते. दुसऱ्या फेरीत त्यांनी १३ रन काढले. हा सामना भारतीय संघाने १५८ धावांनी गमावला होता. खरंतर ही काही फार समाधानकारक कामगिरी नव्हती. पण यामुळे त्या सामन्याचे आणि त्या सामन्यात खेळलेल्या खेळाडूंचे योगदान कमी होत नाही. आज भारतीय क्रिकेटचे मोठे साम्राज्य यावरच उभे राहिले आहे.
जनार्दन ज्ञानोबा नवले, या भारतीय क्रिकेटपटूचा जन्म आपल्या महाराष्ट्रातील फुलगाव येथे झाला. ज्यावेळी त्यांनी सर्वप्रथम भारतासाठी क्रिकेट मॅच खेळली त्यावेळी त्यांचे वय हे फक्त ३० वर्षे इतके होते. त्यांनी त्या सामन्यात सलामीला फलंदाजी तर केलीच याशिवाय यष्टीरक्षणसुद्धा केले. ते एक उत्तम व वेगवान यष्टीरक्षक होते. विसडेन यांनी देखील त्यांच्या यष्टीरक्षणाचे कौतुक केले होते.
पण, नवले यांचे टेस्ट क्रिकेटर म्हणून करियर अधिक काळ चालु शकले नाही. पहिल्या मालिकेनंतर जेव्हा पुढच्या वर्षी इंग्लंडचा संघ पुन्हा भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा त्यांनी एक सामना खेळला होता. या सामान्यानंतर तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली. त्यांना पुन्हा कधीच संघात निवडले गेले नाही.
फक्त दोन कसोटी सामने खेळल्यानंतर ते कायमचेच बाद झाले. त्यांना क्रिकेट सोडल्यानंतर पुण्याजवळच्या एका साखर कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम मिळाले. त्यांचे यानंतरचे आयुष्य प्रचंड गरिबी आणि हालाखीच्या परिस्थितीत गेले.
आजकल आयपीएलमध्ये खेळणारे क्रिकेटपटू कोट्यवधी कमवतात, पण एकेकाळी हा खेळ ज्या माणसाने या मातीत रुजवला त्याला मात्र प्रचंड हालआपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या याचे वाईट वाटते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.