आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
इंग्रज भारतात आल्यानंतर भारत आणि इंग्लंड या दोन्ही देशांत
व्यापारी संबंध प्रस्थापित झाले. ज्याप्रमाणे इंग्लंडहून गोरे साहेब लोक भारतात येत होते, तसे भारतातून आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक इंग्लंडला जात होते.
महाराष्ट्रातून सर्वप्रथम ब्रिटनला जाणारे व्यक्ती म्हणून रंगो बापूजी गुप्ते आणि भोर संस्थानचे पंतसचिव भगवंतराव पंडित यांचे नाव घेतले जाते. परंतु यांच्याही चार वर्ष आधी दिनांक १९ मार्च १८३५ रोजी यशवंतराव शिर्के हे सातारहून लंडनला जाऊन पोहचले होते.
इंग्रज महाराष्ट्रात आल्यावर त्यांना इथल्या लोकांशी संवाद साधायला अडचण येत होती, त्यामुळे त्यांनी इथल्या काही लोकांना इंग्रजीचे शिक्षण दिले. स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांना इंग्रजी ज्ञात असल्याचे अनेक ठिकाणी उल्लेख आढळून येतात.
नारायण शेणवी या ब्रिटिश वकिलाकडून संभाजी महाराज वयाच्या पंधराव्या वर्षी इंग्रजी शिकले होते. १८१८ साली पेशवाई बुडाल्यानंतर पुण्यात राजदूत म्हणून वास्तव्यास असलेल्या लॉर्ड एलिफ़िस्टनला उत्तम मराठी लिहता, वाचता येत होती.
१८०० साली मराठी त्या तीन भारतीय भाषांपैकी एक होती, जी लंडनच्या हेलबरी कॉलेज, किंग्ज कॉलेज आणि प्रसिद्ध ऑक्सफोर्ड आणि केंब्रिज विद्यापीठात शिकवली जात होती. भारतात इंग्रजांची सत्ता बळकट होत होती, त्यामुळेच इंग्लंडमध्ये भारतात निर्माण झालेल्या नोकरीच्या संधी बळकावण्याची संधी निर्माण झाली होती.
इंडियन सिव्हील सर्व्हिसेसची परीक्षा देऊन भारतात नोकरी करण्यासाठी ब्रिटीश तरुण मोठ्या उत्साहाने पुढाकार घेत. भारतीय भाषांचे शिक्षण घेतल्यावर भारतात चांगल्या पदावर वर्णी लागण्याचा आशेतुनच ते मराठी व इतर भारतीय भाषांचे शिक्षण घेत होते.
१८४०-१८८० या काळात लंडनमध्ये मराठी भाषेच्या अध्यापनाचे काम एक गुजराती आणि एक पारसी प्राध्यापक करत होते. बडोद्याच्या महाराजांचे मंत्री हरिश्चंद्र चिंतामणराव हे देखील लंडनला मराठीचे अध्यापन करत होते.
१८१८ मध्ये झालेल्या यु*द्धात पराभूत झालेला दुसरा बाजीराव ब्रिटीशांना शरण आला, त्याला ब्रिटिशांनी कानपूर जवळच्या बिठूर येथे नजरकैद केले होते. तसेच सातार गादीचे वारसदार प्रतापसिंहराजेंना देखील काशीला नजरकैद केले होते. पुढे त्याच ठिकाणी १८४७ साली त्यांचे निधन झाले.
सातारा गादीला एलीफिस्टन याने ग्रँड डफ याला रेसिंडेंट म्हणून नेमले. छत्रपती सातारा सोडून काशीला असताना ग्रँड डफ कारभार बघत होता. त्याला शह देण्यासाठी छत्रपतींनी आपला एक राजदूत लंडनला पाठवण्याची तयारी सुरु केली.
लंडनच्या दरबारात आपला राजदूत असेल तर तो तिथल्या राजघराण्याशी चांगले संबंध प्रस्थापित करून ग्रँड डफ सुधारणेच्या नावाखाली जो तमाशा घालू पाहत आहे, त्यावर आळा घालू शकेल.
ग्रँड डफ सातारा संस्थानात अवाजवी कर लादणे, निर्लष्करीकरण करणे, सरदारांच्या जहागिरी जप्त करण्याचे काम करत होता, त्यावर अंकुश ठेवण्यासाठी महाराजांनी हा मार्ग स्वीकारला होता.
महाराजांनी सुरवातीला १८३५ साली यशवंतराव शिर्केंना तिकडे पाठवले. नंतर १८३९ साली रंगो बापूजी गुप्ते आणि भगवंतराव पंडित हे लंडनला रवाना झाले होते. या तिन्ही लोकांनी अफगाण – इराक – सीरिया – तुर्कस्तान या मार्गाने इंग्लंड गाठले होते.
शिर्के, गुप्ते, पंडीत हे तीन मराठी आणि अन्य पाच भारतीय, ज्यात एक बंगाली मुस्लीमही होते. हे वेगवेगळ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांना भेटायचे. आठही जण एक बंगला भाड्याने घेऊन त्यात वास्तव्य करत होते.
१८४१ साली हे सर्व लोक लंडनहून मायदेशी परतण्यासाठी जहाजात बसले असता माल्टाच्या सामुद्रधुनीजवळ रंगो बापूजी गुप्ते यांना सातारा संस्थान खालसा करून, प्रतापसिंहराजेंचे धाकटे बंधू अप्पासाहेब भोसले यांचा वारसाहक्क नाकारण्याची ब्रिटिशांच्या योजनेची माहिती मिळाली. यावेळी क्षणाचा देखील विचार न करता, रंगो बापूजी लंडनला परतले आणि प्रतापसिंह राजेंच्या बंधमुक्ततेसाठी व संस्थान टिकवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्यास सुरुवात केली.
त्यांनी पुढील १४ वर्षे लंडनमध्ये काढली. एखाद्या परकीय देशात, ओळखीचे जवळ कोणीच नसताना, त्यांनी इतके वर्ष आपली संस्कृती टिकवून ठेवली. त्यांनी कुठल्याही प्रकारचे व्यसन केले नाही आणि इतक्या बोचऱ्या थंडीत देखील त्यांनी मद्याला हात लावला नाही.
ज्यावेळी इंग्लंडमधील एखाद्या साहेबाच्या घरी त्यावेळी देखील ते तिथे अन्नपाणी ग्रहण करत नव्हते. त्यांनी लिहलेला एक लेख लंडनच्या बातमीपत्रात छापून आला होता.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र मोठ्या प्रमाणावर लोक लंडनला वास्तव्यासाठी जाऊ लागले. यात बहुतांश लोक उच्च शिक्षण व चाकरीच्या कामासाठी तेथे निवासाला जात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, आचार्य अत्रे, सेनापती बापट हे लोक लंडनला शिक्षणासाठी गेले होते.
चिरोलक्याच्या खटल्याचा वेळी लोकमान्य टिळक देखील लंडनला वास्तव्यास होते. १९६१ मध्ये पु. ल. देशपांडे हे देखील एका टीव्ही कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाच्या हेतूने दोन वर्षे लंडनला वास्तव्यास गेले होते.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक ब्रिटनला स्थयिक होत आहेत अथवा शिक्षणासाठी जाऊ लागले. परंतु सुरुवातीपासूनच यात मराठी लोकांचा आकडा बंगाली, पंजाबी आणि गुजराती यांच्या तुलनेत कमी होता. असं असून देखील सदाशिव देशमुख आणि माधव पाटील या दोन मराठी लोकांनी इंग्लडच्या राजकारणात मोठा सहभाग नोंदवला होता.
आज इंग्लंडमध्ये एकूण भारतीय समाजाच्या ५ टक्के मराठी लोक आहेत. मराठी लोकांची संख्या ७० ते ८० हजाराच्या घरात आहे.
पुढे नजीकच्या भविष्यात ब्रेक्झिटमुळे अजून भारतीयांना लंडनमध्ये वास्तव्यासाठी एक संधी चालून येणार आहे. उच्च शिक्षणासाठी आजही इंग्लंड एक उत्तम पर्याय आहे.
या माध्यमावर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मते असतात. संपादक मंडळ त्या प्रत्येक मताशी कदाचित सहमत असेलही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.