आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
२०२३ च्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताचा स्कोर ८-० असून शनिवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यामध्ये भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला नेहमीप्रमाणे धूळ चारली आहे. भारत वि. पाकिस्तान क्रिकेटचा सामना असेल तर क्रिकेट रसिकांमध्ये एक वेगळेच वारे संचारते. १९३२ साली भारतीय क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने मान्यता दिली. तेव्हापासून भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामने खेळत आला आहे. पुढे १९४७-४८ साली देशाच्या फाळणीमुळे भारतीय क्रिकेट संघाचेही विभाजन झाले. भारत आणि पाकिस्तानचे दोन वेगवेगळे संघ निर्माण झाले, तोपर्यंत या दोन्ही संघातील खेळाडू एकत्र खेळत होते.
१९५२ साली पाकिस्तानला कसोटी सामन्यात खेळण्याची अनुमती मिळाली आणि विशेष बाब म्हणजे, ही मान्यता मिळाल्यानंतर पाकिस्तानचा पहिलाच कसोटी सामना होता तो भारताविरुद्ध, तोही भारतीय खेळपट्टीवर!
भारत आणि पाकिस्तानमधील या पहिल्या-वहिल्या सामन्याचे एक खास वैशिष्ट्य हेच की आजपर्यंत जे खेळाडू एकमेकांसोबत खेळणार होते तेच खेळाडू आता एकमेकांविरोधात खेळणार होते. १९४७-४८ मध्ये हेच खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकत्र सामना खेळले होते. ज्यात कारदार आणि फजलसारखे खेळाडू सहभागी होते. दोन्हीकडील क्रिकेट रसिकांमध्येही उत्साह संचारला होता.
भारत आणि पाकिस्तान दरम्यानची पहिली कसोटी. कसा झाला असेल हा सामना, जाणून घेऊया..
स्वातंत्र्यानंतर पाच वर्षांनी पाकिस्तानी संघ भारत दौऱ्यावर आला. पाकिस्तानी संघाचा हा पहिलाच सामना होता. या संघाचा कॅप्टन होता कमान हफीज जो कधी भारतीय संघातून खेळायचा. दोन्ही संघातील खेळाडूंना एकमेकांची बलस्थाने आणि कमजोरी चांगलीच माहिती होती.
भारताचे कॅप्टन होते लाला अमरनाथ. दोन्ही संघांमध्ये एकूण पाच कसोटी सामने खेळले जाणार होते. १६ ऑक्टोबर १९५२ हाच तो ऐतिहासिक दिवस जेव्हा भारत आणि पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकले. भारताने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
सामना सुरु झाला. विनू मंकड आणि पंकज रॉय हे भारताचे सलामीवीर होते. पाकिस्तानचा गोलंदाज खान मोहम्मदने दोघांनाही तंबूत पाठवले. २६ धावांवर भारताच्या दोन विकेट पडल्या होत्या.
विजय हजारेने तेवढा टिकून राहण्याचा प्रयत्न केला. पण, पाकिस्तानच्या गोलंदाजांनी एकेक करून भारतीय फलंदाजांना बाद करण्याचे सत्र सुरूच ठेवले. १८० धावा झाल्या आणि अमीर इलाहीच्या चेंडूवर हजारेदेखील बाद झाला.
हेमू अधिकारी मैदानात उतरला आणि सामन्याचा चेहराच पालटवला. त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा दबाव झुगारून लावला आणि त्यांच्या आक्रमक खेळीचा धैर्याने सामना केला. १८० धावावरून त्याने ३७२ धावांपर्यंत मजल गाठली.
आता पाकिस्तानच्या फलंदाजांची कसोटी होती. भारतीय गोलंदाजांनी देखील त्यांच्या फलंदाजांना मैदानावर टिकूनच द्यायचे नाही असा जणू चंगच बांधला होता.
फक्त १५० धावावर संपूर्ण संघ आउट झाला. एकट्या विनू मंकडने पाकिस्तानच्या आठ विकेट घेतले.
दुसऱ्या फेरीतही पाकिस्तानची धावसंख्या फक्त १५२ इतकीच राहिली. विनू माकंडने ५ विकेट तर गुलाम अहमदने ४ विकेट घेतल्या. भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले होते.
सिरीजचा पहिला सामना जिंकल्याने भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला होता. भारताला आपला हा विजयाचा सूर कायम ठेवायचा होता तर पाकिस्तानला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करायचे होते. या सिरीजमधील पहिला सामना दिल्लीच्या फिरोजशहा स्टेडियमवर झाला होता तर दुसरा सामना लखनऊ शहरात झाला. या सामन्यात भारतीय संघाने पुन्हा एकदा पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पण, पाकिस्तानी गोलंदाजांनी यावेळी पहिल्यापेक्षाही आक्रमक खेळी करत भारताचा वारू रोखून धरला. पाकिस्तानचे गोलंदाज फजल महमूदने एकट्याने पाच विकेट घेतल्या. पहिल्या फेरी अंती भारताची धावसंख्या होती १०६.
पाकिस्तानने ३३१ धावा केल्या. यात एकट्या नझर मोहम्मदच्याच १२४ धावा होत्या. भारतीय गोलंदाजांची आक्रमकता यावेळी गंज खात पडली होती.
दुसऱ्या फेरीतही भारताची कामगिरी निराशाजनकच राहिली. ७७ धावा आणि चार विकेट अशी सुरुवातीची धावसंख्या होती. हा सामना पाकिस्तानने जिंकला होता. पाकिस्तानचा हा पहिलाच विजय होता. आता सिरीज १-१ च्या स्कोअरने बरोबरीत होती.
तिसरा सामना मुंबईत झाला. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरून गेले होते. पाकिस्तानने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने १८६ धावा बनवल्या. भारताच्या लाला अमरनाथ आणि विनू मंकड यांनी अनुक्रमे ४ आणि ३ विकेट घेतल्या.
भारताची फलंदाजी विनू मंकड आणि आपटेने सुरु केली. मंकडने ४१ धावा, विजय हजारेच्या १४६ धावा आणि पाली उमरीगरच्या १०२ धावा. सगळ्यांनीच पूर्ण क्षमतेने खेळ खेळला होता. ४ विकेट आणि ३८७ धावा अशी या सामन्याची अंतिम धावसंख्या होती.
पाकिस्तानने आपला खेळ सुरु केला. हनीफ मोहम्मदच्या ९६ धावा आणि वकार हसनच्या ६५ धावा आणि इतर खेळाडूंच्या धावा मिळून पाकिस्तानने एकूण २४२ पर्यंतची धावसंख्या गाठली. यावेळी पुन्हा एकदा विनू मंकडने पाच विकेट घेऊन आपल्या गोलंदाजीने पाकिस्तानी संघाला धक्का दिला.
हा दुसरा कसोटी सामनादेखील भारताने जिंकला होता. यानंतरचा सामना खेळला गेला चेन्नईमध्ये हा सामना देखील तितकाच रोमांचक झाला. पण, या सामन्याचा निकाल अनिर्णीत राहिला.
आता पाचवा आणि शेवटचा सामना होता. कोलकत्तामधे खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघाला स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचे दडपण होते. भारत २-१ अशा फरकाने पुढे होता. भारताला हा सामना स्वतःच्या नावावर नोंदवायचा होता तर, पाकिस्तानला भारताची बरोबरी साधायची होती. पण, हा सामना देखील अनिर्णीतच राहिला आणि अशा प्रकारे या सिरीजच्या विजयाचा मान भारतालाच मिळाला.
या संपूर्ण सिरीजमधे दोन्ही संघांनी अनेक विक्रम आपापल्या नावावर नोंदवले. भारताने या पहिल्या ऐतिहासिक सामन्याचा पहिला ऐतिहासिक विजय आपल्या नावावर नोंदवला होता.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.