आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
प्रत्येकाचे आयुष्यात एकदा तरी विश्वभ्रमंतीचे स्वप्न असते. जगाची सफर करण्याची प्रत्येकाची इच्छा असते. सध्याच्या घडीला विश्वभ्रमंती करणे सहज शक्य असले तरी एकेकाळी ते इतकं सहज नव्हतं.
विचार करा एखाद्या बोटीने पृथ्वी प्रदक्षिणा करायला निघायचं, मार्गातील असंख्य अडथळे जसे समुद्री लुटेरे, वादळ, लाटा, युद्ध, साथीचे आजार इत्यादी. या सगळ्या गोष्टींवर मात करून ती प्रदक्षिणा पूर्ण करायची, हे नक्कीच एक मोठं अग्निदिव्य होतं.
पण हे अग्निदिव्य यशस्वीरित्या पार पाडणारा व्यक्ती म्हणजे फर्डिनांड मॅगलेन. जगाची प्रदक्षिणा पूर्ण करणारा पहिला माणूस, अशी त्याची ओळख आहे. खरंतर, त्याने ती प्रदक्षिणा पूर्ण केलीच नव्हती, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. पण त्या मोहिमेचा प्रमुख म्हणून तो इतिहासात अमर झाला.
फर्डिनांडचा जन्म पोर्तुगालमध्ये १४८० साली एका सधन घरात झाला. त्याचा परिवाराचा पोर्तुगालच्या राजघराण्याशी चांगले संबंध होते. फर्डिनांडचं बालपण राजवाड्याच्या आवारातच गेलं. तो याठिकाणी शिकार करायचा, तलवारबाजी शिकायचा, एकंदरीत एक सुंदर बालपण फर्डिनांड जगला.
पुढे त्याचे वडील ऑपोर्टो या पोर्तुगालच्या किनारपट्टीच्या भागात वसलेल्या शहरात रहायला गेले. ऑपोर्टोमध्ये फर्डिनांडला अनेक खलाशी भेटत, ज्यांच्या गप्पा ऐकून, त्याचा मनात सागर सफारीची इच्छा जागृत होत असे.
फर्डिनांडला लहानपणापासून जरी सागरी सफरीवर जाऊन व्यापार करावासा वाटत असला तरी त्याने सुरुवात लष्करी सेवेपासून केली. त्याने पोर्तुगालच्या रॉयल नेव्हीमध्ये प्रवेश मिळवला.
१५०५ साली फर्डिनांडने पोर्तुगाल सोडले आणि कॅप्टन फ्रान्सिस्को दि अल्मिडा या नाविकाच्या नेतृत्वाखाली तो भारतात आला. पोर्तुगालच्या राजाने अरबी समुद्रातील अरबी व्यापारांचा काटा काढण्यासाठी त्यांची भारतात रवानगी केली होती. मग पुढची अनेक वर्ष फर्डिनांडने युद्धात आणि लढायांत घालवली.
१५०६ मध्ये तो ईस्ट इंडिजला (इंडोनेशिया) गेला होता. त्याने पुढे १५०९ मध्ये दिऊच्या युद्धात सहभाग नोंदवला होता. या युद्धाने पुढे ओट्टोमन साम्राज्याचा पाडाव केला होता. १५१२ मध्ये तो पोर्तुगालला परतला. परंतु त्याला काही कमाई करता आली नव्हती. शिवाय मोरोक्कोमध्ये त्याला खोट्या चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती, त्या गुन्ह्यातून जरी तो निर्दोष सुटला असला तरी त्याची सर्व इज्जत त्याने गमावली होती.
फर्डिनांडला स्वतःचं एक जहाज घेऊन जगाच्या सफरीवर जायचे होते. परंतु त्याची आर्थिक परिस्थिती तितकी चांगली नसल्याने त्याने पोर्तुगालच्या राजाकडे मागणी केली. परंतु राजाने त्याचा प्रस्ताव तीन वेळा नाकारला. शेवटी निराश होऊन तो स्पेनच्या राज्याकडे गेला, त्याचा सुदैवाने स्पेनच्या राज्याने त्याचा या प्रवासाला मान्यता दिली एवढंच नव्हे मानधन ही दिले.
२० सप्टेंबर १५१९ साली त्यांने पाच जहाज आणि २०० माणसांना घेऊन आपला प्रवास सुरु केला.
त्रिनिदाद, सॅन अँटोनियो, कॉसिप्शियन, व्हिक्टोरिया, सँटियागो ही त्या पाच जहाजांची नावं होती, ज्यांचं नेतृत्व फर्डिनांड करणार होता. कॅनरी बेटांवरून त्यांनी आपल्या प्रवासासाठी ते आवश्यक सामना घेतले आणि जगाच्या प्रदक्षिणेला सुरुवात केली. अटलांटिकच्या मार्गे इंडोनेशिया, फिलिपाइन्सला जाऊन तेथून स्पेनला परतण्याची फर्डिनांडची योजना होती.
योजनेप्रमाणे त्याने मार्गक्रमण करायला सुरुवात केली. कॅनरी बेटांना सोडल्यानंतर त्याला मारण्यासाठी काही स्पॅनिश खलाशी त्याचा मागावर असल्याची त्याला माहिती मिळाली आणि त्याने त्याचा प्रवासाचा मार्ग बदलून ब्राझीलच्या दिशेने प्रगती करायला सुरुवात केली. २० नोव्हेंबर रोजी त्यांनी विषुववृत्ताला पार केलं. ते गुंबारा बेटांवर मुक्कामासाठी थांबले.
फर्डिनांडने दक्षिण अमेरिकेत आपला प्रवास सुरु ठेवला. तो अटलांटिक आणि पॅसिफिक समुद्राला जोडणाऱ्या आतल्या रस्त्याच्या शोधात होता. या दरम्यानच्या प्रवासात जहाजावर अन्न पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे फर्डिनांडच्या बरोबरच्या तीन जहाजांवरील कप्तानांनी त्याच्याविरोधात बंड पुकारले, पण फर्डिनांडने ते बंड मोठ्या शिताफीने चिरडून टाकले.
त्याने एका कप्तानाला मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तर दोघांना एका निर्जन बेटावर सोडून आपल्या पुढील प्रवासासाठी वाटचाल सुरु केली. फर्डिनांडने नेलेल्या पाच बोटींपैकी आता फक्त तीनच बोटी शिल्लक होत्या. दोन बोटी त्याने युद्धात गमावल्या होत्या. अखेरीस त्याने अटलांटिक आणि पॅसिफिक महासागराला जोडणाऱ्या त्या धुनीचा शोध लावला.
पुढे तीच जागा ‘स्ट्रेटा ऑफ मॅगलेन’ म्हणून प्रसिद्ध झाली.
तिथून फर्डिनांड आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला, त्याचं लक्ष पाश्चात्य दिशेने स्पाईस आयलंड अर्थात आजच्या इंडोनेशियाला पोहचणे हे होतं. रस्त्यात असंख्य अडथळ्यांचा सामना फर्डिनांडला करावा लागला. एका चक्रीवादळाचा तडाखा त्याचा जहाजाला बसला आणि त्यात त्याचं एक जहाज समुद्रात बुडालं.
आता त्याचाकडे फक्त दोन जहाज होते. यादरम्यानच त्याला दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्यावरून इंडोनेशियाकडे जाताना ट्रेड वाइंडसचा शोध लागला. ज्याचा बळावर अनेक सागरी खलाश्यानी पॅसिफिक महासागर पालथा घातला होता.
फर्डिनांड आणि त्याचा सहकाऱ्यांनी व्हिक्टोरिया आणि त्रिनिदाद हे दोन जहाज घेऊन मार्गक्रमण चालू ठेवले. शेवटी ते पूर्वेकडील एका किनाऱ्यावर उतरले, हा किनारा होता, फिलिपाईन्सचा. येथे उतरल्यावर त्यांना मुबलक अन्नसाठा उपलब्ध झाला. फर्डिनांडने येथील आदिवासी जमातीत ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुरु केला. त्याचा प्रचाराने प्रभावित होऊन एका गटाने आपलं धर्मांतरण करून घेतलं.
पण फर्डिनांडला मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करवून घ्यायची होती. जर असे केले असते तर त्याला मोठा इनाम मिळाला असता, आपला खर्च प्रचंड झाल्याने त्याचा धर्मांतर करून मिळणाऱ्या पैश्यावर डोळा होता.
त्याचा हा अट्टहास त्याच्याच जीवाशी आला, धर्मांतर करण्यास नकार दिल्याने त्याने ६० लोकांच्या आपल्या तुकड्यांंना घेऊन त्या आदिम जमातीवर हल्ला केला. परंतु त्या आदिम जमातीच्या १५०० लोकांच्या सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही.
आणि फर्डिनांडचा आपली प्रदक्षिणा पूर्ण करण्याआधीच २७ एप्रिल १५२१ मृत्युमुखी पडला.
त्याचा सहकाऱ्यांनी तिथून पळ काढत इंडोनेशियाच्या दिशेने जहाज नेले. ते इंडोनेशियाला पोहचले, तिथे त्यांनी मसाल्याच्या पदार्थांची जमवा जमव केली. व्हिक्टोरिया जहाजाची अवस्था खराब होती. यामुळे त्रिनिदाद जहाज घेऊन जहाजाचा कप्तान जुआन एलकॅनोने आपला प्रवास चालू ठेवला.
२१ डिसेंबर १५२१ ला ते जहाज स्पेनला पोहचलं. पुढे व्हिक्टोरिया जहाज देखील ६ सप्टेंबर १५२२ रोजी स्पेनच्या किनाऱ्यावर पोहचलं. २०० लोकांसोबत सुरु झालेला प्रवास फक्त १८ लोक पूर्ण करू शकले होते.
फर्डिनांड जरी हा प्रवास पूर्ण करू शकला नसला तरी त्याचा योजनेमुळे आणि त्याने लिहिलेल्या रोजनिशीमुळे भविष्यात प्रवास करणाऱ्या खलाश्यांना मोठा फायदा झाला.
त्याचा जहाजावर त्याने जमा केलेल्या मसाल्यांचा विविध व्हेेरायटीजमुळे युरोपियन खलाशी त्या मसाल्यांच्या शोधात निघाले. फर्डिनांड आणि त्याचा सागरी प्रवासाने पृथ्वी गोल आहे आणि तत्कालीन युरोपियनांच्या कल्पनेपेक्षा प्रचंड मोठी आहे, हे सिद्ध केले होते.
फर्डिनांडच्या या प्रवासामुळे जगाची वेगळी ओळख मानवी समुदायाला झाली होती. त्याचा दृढ निश्चयामुळेच हा प्रवास पूर्णत्वास आला होता. त्याचा त्या संघर्षाने त्याचं नाव इतिहासात अजरामर केलं.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.