आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात पुरुषांइतकेच महिलांचेदेखील मोठे योगदान राहिले आहे. असे असूनही भारताचा इतिहास हा पुरुषांच्याच शौर्य कथांनी व्यापला आहे, स्त्रियांना इतिहासात मोलाचं स्थान मिळालं नाही. त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने जरी या आंदोलनात सहभाग नोंदवला असला तरी त्यांना फारसे महत्व न मिळाल्यामुळे त्यांचा इतिहास दुर्लक्षित राहायला आहे. अशाच दुर्लक्षित महिलांपैकी एक आहेत सरस्वती राजमानी, ज्यांनी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, पण अनेक क्रांतिकारकांप्रमाणेच त्यासुद्धा इतिहासाच्या पानात हरवल्या.
१९२७ साली सरस्वती राजमानी यांचा जन्म म्यानमारमधील एका श्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचे घर हे आधीपासूनच मुक्त विचाराचे होते. यामुळे सरस्वती यांना लहानपणापासून शिक्षण आणि ज्ञानग्रहणाची संधी उपलब्ध झाली होती. सरस्वतीचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नोंदवला होता. यामुळे सरस्वती यांच्यावर तसेच संस्कार झाले.
१९३७ साली महात्मा गांधी त्यांच्या घरी मुक्कामाला आले होते. त्यावेळी त्या राय*फल चालवण्याचा सराव करत होत्या. जेव्हा महात्मा गांधींनी त्यांना असे करण्याबाबत विचारणा केली तेव्हा त्या म्हणाल्या की हे ब्रिटिशांना संपविण्यासाठी करत आहे. यावरून त्यांच्या मनात असलेली स्वातंत्र्याप्रतीची उत्कट भावना दिसून आली होती.
त्यांच्यावर अहिं*सेचे संस्कार करण्याचे अनेक प्रयत्न महात्मा गांधींनी केले तरी त्यांच्यावर विशेष असा काही परिणाम याचा होऊ शकला नाही. सरस्वतींचे स्पष्ट मत होते की जर आपल्याला स्वातंत्र्य हवे असेल तर हिं*सेचा मार्ग पत्करावाच लागेल. यासाठी एक लढा उभारून आपण जोपर्यंत आपल्या लुटारूंचा प्रतिकार करत नाही, तोपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे. त्यांच्या या विचारांना काँग्रेसकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू शकत नाही म्हणून त्यांनी सुभाषबाबूंच्या चळवळीकडे जाण्याचा निर्णय घेतला.
सुभाषबाबूंच्या “तुम मुझे खून दो, में तुम्हे आझादी दूंगा,” या घोषणेने तेव्हा सबंध भारतातून हजारो तरुण त्यांच्या लढाईत सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यात सरस्वती राजमनीपण होत्या.
वयाच्या १६ व्या वर्षी सरस्वतींनी सुभाषबाबूंना पहिल्यांदा ऐकलं. त्यांची ब्रिटिशांविरोधातील भूमिका बघून त्या इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी सुभाषबाबूंचे भाषण संपल्यावर स्वातंत्र्याचा कार्यासाठी आपले दागिने दान केले होते. जेव्हा ही गोष्ट सुभाषबाबूंना समजली ते त्यांच्या घरी दागिने परत करायला गेले होते. परंतु मी ते दागिने परत घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतल्यामुळे सुभाषबाबूंचा नाईलाज झाला. सरस्वतींच्या वडिलांनी देखील सुभाषबाबूंच्या लढ्याला आपले समर्थन दिले होते.
सुभाषबाबू सरस्वतींच्या कार्याने प्रभावित झाले. त्यांनी आझाद हिंद सेनेत त्यांना सहभागी करून घेतले. त्यांच्यावर गुप्तचर यंत्रणेचे काम सोपविण्यात आले. आझाद हिंद सेनेच्या त्या सर्वांत तरुण सदस्य होत्या. सरस्वतींवर ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या गुप्त कामकाजावर नजर ठेवण्याची व त्यांच्या हालचालींची माहिती आझाद हिंद सेनेपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
त्या मनी नावाच्या मुलाचा वेश धारण करून ब्रिटिशांच्या व्यवहारावर पाळत ठेवून असायच्या, त्यांचा कुठल्याही हालचालींची माहिती मिळाली की ती आझाद हिंद सेनेपर्यंत पोहचवत होत्या.
एकदा त्यांच्या एका मित्राला ब्रिटिशांनी पकडले तेव्हा त्यांनी एका नाचणाऱ्या स्त्रीचा वेष धारण करून ब्रिटिशांच्या तंबूत प्रवेश केला. त्यांनी दारू पिऊन गुंग झालेल्या ब्रिटिश सैन्याच्या तावडीतून आपल्या मित्राची यशस्वीरित्या सुटका केली होती. तिने त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गुंगीच्या औषधाचा प्रयोग करून मित्राची सुटका केली होती.
परंतु हे करत असताना त्यांच्या पायाला गोळी लागली पण अशा अवस्थेत देखील त्यांनी पळत पळत जाऊन आझाद हिंद फौजेचा कॅम्प शोधून काढला होता. त्यांच्या बलदंड शौर्याचे सर्वत्र कौतृक करणात आले होते. त्यांनी आझाद हिंद सेनेच्या शेवटापर्यंत त्यात सहभाग नोंदवला.
स्वातंत्र्यानंतर इतर क्रांतिकारकांप्रमाणे सरस्वतींचा सन्मान करणात आला नाही. त्यांनी आपलं उर्वरीत आयुष्य चेन्नईत एका छोट्याश्या घरात व्यतित केलं. २००५ साली जयललिता सरकारने त्यांना नवीन घर देऊ केलं. परंतु त्यांनी त्या घरात सुभाषबाबूंच्या छायाचित्रांचे दालन उभारले. त्यांनी शेवटपर्यंत परोपकाराची भावना उराशी बाळगली. २००४ साली त्सुनामीने प्रभावित झालेल्या लोकांना त्यांनी आपली पेन्शन देऊ केली.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.