आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
जिज्ञासुवृती माणसाला रंकाचा राजा बनवू शकते. याच गोष्टीमुळे आज मानवाची अश्मयुगापासून आजपर्यंत प्रगती झाली आहे. स्वत:चा आणि सत्याचा शोध घेण्याचे भूत माणसाच्या डोक्यात आधीपासुनच होते.
भारताला शोधण्याची जिज्ञासुवृत्तीच वास्को-द-गामाला भारताच्या किनारपट्टीवर घेऊन आली. स्वत:ला शोधण्यासाठी मानवाने नेहमीच प्रवासाचा आधार घेतलाय. याची अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे भगवान गौतम बुध्दांनी स्वत:चे राज्य धुडकावून स्वीकारलेली भिक्षुकी.
गौतम बुध्दांपासुनच प्रेरित होऊन त्यांना देव मानणाऱ्या फाहीयान नावाच्या एका चिनी प्रवाशाने हाच मार्ग पत्करला.
फाहियान स्वत:च्या आणि गौतम बुध्दांच्या शोधात चीनवरुन पायपीट करत भारतात पोहचला. या प्रवासात त्याला अनेक अनुभव आले आणि विविध प्रकारच्या बौध्द भिक्कुंशी त्याची ओळख झाली. याच फाहियानबद्दल आज आपण जाणुन घेणार आहोत.
फाहियानच्या बालपणाचा त्याच्या आयुष्यावर खुप परिणाम पडला. चीनच्या वु यांगमध्ये जन्म झालेल्या फाहीयानला त्याच्या तिन्ही भावांच्या मृत्यूमुळे खेळायच्या वयात पूजापाठ करण्यास लावले गेले. तीन मुलांच्या मृत्यूमुळे घाबरून त्याच्या वडीलांनी त्याला बुध्द धर्माच्या सेवेसाठी अर्पण केले. परंतु , हा नशीबाचाच खेळ होता. मानवी इच्छा आकांक्षा यापासून फाहियान दुर गेला.
पुढे असे काहितरी होणार होते ज्याने फाहियान आणि त्याच्या परिवाराचे आयुष्य पालटणार होते. आपल्या आई-वडीलांबरोबर राहत असताना फाहियानला एक गंभीर आजार झाला होता. त्यानंतर त्याला बौध्द धर्मशाळेत पाठवण्यात आले. या निर्णयामुळे त्याला नेहमीच घरापासुन दुर रहावे लागले.
प्रकृती सुधारल्यानंतरही फाहियानने घरी जाण्यास नकार दिला. धर्मशाळेतील आयुष्य फाहियानने आत्मसात केलं होतं. सगळ्या मानवी मोहांपासुन त्यांची सुटका झाली होती. १० वर्ष वय असताना वडीलांच्या मृत्यूनंतर आईबरोबर राहण्यास सुद्धा फाहियानने नकार दिला.
धर्मशाळेतील आपले शिक्षण पुर्ण झाल्यावर फाहियानने भारतात जाण्याचा निर्णय घेतला. चीनच्या चांग आनपासुन सुरु झालेल्या त्याच्या प्रवासात त्याने आपल्या देशातील विविध साम्राज्यातील लोकांशी चर्चा केली आणि त्यांच्याबद्दल जाणुन घेतले.
प्रवासाच्या सुरुवातीलाच फाहियान आणि त्याच्या सोबत्यांना गोबी वाळवंटातील गरम हवा, आणि तप्त वातावरणास सामोरे जावे लागले. १७ दिवसात ६०० मैल प्रवास करुन त्यांनी ‘गोबी’ वाळवंट पार केले. तिथे त्यांची ओळख अनेक बौध्द भिक्खूंंशी झाली. तिथे फाहियान जवळ जवळ एक महिने थांबला. यावेळेत त्याला या बाकी बौध्द भिक्खूंंनी केलेल्या त्यागाची जाणीव झाली.
फाहियानच्या निदर्शनास आले की हे सगळे भिक्खू भारतीय पुस्तके, भारतीय भाषांमध्ये खूप गुंतले होते. त्यांनी अनेक भारतीय पुस्तकं वाचली होती. फाहियानने रचलेल्या पुस्तकांवरून त्याकाळी भारत-चीनमध्ये असलेल्या सांस्कृतिक देवाण-घेवाणीचा अंदाज आपल्याला येतो
शेनशेन साम्राज्यानंतर फाहियान ‘में युवी’मध्ये जास्त काळ नाही राहु शकला. तिथुन पुढे जाताना अवघड रस्त्यांनी फाहियान खुतनला पोहचला.
तिथे त्याने ‘यू तीन’ साम्राज्याचा अनुभव घेतला, जो त्याला खुप आवडला. आपल्या संस्मरणीकेत त्याने ‘यू तीन’ साम्राज्याची भरपुर स्तुती केली आहे. तिथल्या सम्राटाने केलेल्या आदरातिथ्याचे अतिशय सुन्दर वर्णन त्याने करुन ठेवले आहे. खुतनवरुन फाहियान सुंग पर्वतांकडे पोहचला, जिथे त्याची भेट तारतरशी झाली. तारतर स्वत: एक मोठे बुद्ध भक्त होते. मजल दरमजल करत फाहियान शेवटी भारतात पोहचला.
भारतयात्रेवर असताना फाहियान त्या प्रत्येक जागी गेला ज्याचा संबंध गौतम बुध्दांशी होता. मग ते एखादं छोटं गाव असो किंवा मोठे विश्वविद्यालय. या साखळीची सुरुवात त्याने केली ती तक्षशीला विद्यापीठापासुन. तक्षशीलाला जाण्याचे अजुन एक कारण म्हणजे फाहियान भारतात आला तो उत्तर दिशेने.
तो काश्मीरमार्गे स्वातला, स्वातवरुन पेशावर आणि तिथुन मग तक्षशीलाला पोहचला. तक्षशीलावरुन जलालाबाद, मथुरा, कनौज, पाटलीपुत्र, बोधगया आणि तिथून बनारसला गेला.
काही इतिहासकारांच्या मते फाहियान भारतात फक्त बुध्दांसाठी आला होता. त्याच्या संस्मरणीकेवरून या गोष्टी अजुन जास्त स्पष्ट होतात. त्यावेळी असलेल्या राजकीय स्थितीचे कसलेही विश्लेषण त्याने केलेले नाही. त्यातच त्यावेळी भारतातील परिस्थितीसुध्दा बौध्द धर्माच्या प्रसारासाठी एकदम अनुकूल होती.
याच प्रवासात तो बंगालला पण गेला. बंगालच्या तमरालिप्ता प्रदेशात जिथे बौद्ध धर्माच्या २४ धर्मशाळा होत्या. तिथे त्याने बुध्दांच्या अनेक शिकवणी लिहुन घेतल्या. या जागी तो २ वर्ष होता. तिथुन तो श्रीलंकेला गेला. श्रीलंकेत २ वर्षे थांबून तो बंगालची खाडी, जावा मार्गे परत चीनला पोहचला.
गौतम बुध्दांच्या शिकवणीकडे आकर्षित होऊन त्या गोष्टींसाठी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा वेळ देणारया फाहियानची ही गोष्ट आपल्या भारतीयांसाठी गौतम बुध्दांचे महत्त्व वाढवण्यात मदत करेल एवढं नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.