आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
शाह रुख खान आज ५८ वर्षाचा झालेला आहे. तसं बघायला गेलं तर शाह रुख खान फक्त भारतीय चित्रपट प्रेक्षकांचा प्रतिनिधी नाही तो जगभरातल्या प्रेक्षकांचा गळ्यातला ताईत आहे. धंद्याची गणिते त्याच्या इतकी क्वचित दुसऱ्या कुठल्या स्टारला जमली असतील.
शाहरुख खानने अमिताभच्या अँग्री यंग मॅनचा जमाना पूर्णपणे पुसून टाकला आणि त्याठिकाणी ‘किंग ऑफ रोमान्स’ अशी स्वतःची प्रतिमा तयार केली. हे सगळं त्याने स्वतःच्या मेहनतीने आणि कष्टाने केलं.
तसा तो बाहेरचाच. बॉलिवूडमध्ये त्याला कोणी गॉडफादर नव्हता. संघर्ष करत तो इथपर्यंत आला आणि आज ‘एस आर के’ हा नाही म्हटलं तरी बॉलिवूडचा ब्रँड ठरलेला आहे.
७४ पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम. फिल्मफेअर साठी ३० पेक्षा जास्त मानांकने. १४ फिल्मफेअर अवॉर्ड स्वतःच्या नावावर असलेला हा एकमेव अभिनेता.
शिवाय स्वतःच्या नावावर चार हजार करोडपेक्षा जास्त संपत्तीचा विक्रम करणारा देखील तो एकमेव खान आहे.
जो अभिनयाचा बादशहा आज इतक्या उंच शिखरावर पोहोचलेला आहे त्याची सुरुवात मात्र त्याने दूरदर्शनवरच्या एका मालिकेपासून केली होती. त्या मालिकेचं नाव आज बऱ्याच जणांना आठवत नसेल किंवा माहितीही नसेल.
ऐंशीच्या दशकात दूरदर्शन वरची सगळ्यात गाजलेली मालिका म्हणून ‘फौजी’ या मालिकेचे नाव घ्यावं लागेल. या मालिकेची अजून एक विशेषता म्हणजे शाह रुख खानने या मालिकेद्वारे पहिल्यांदा छोट्या पडद्यावर आगमन केले होते.
ऐंशीचे दशक म्हणजे आपल्याकडे एक भरलेला काळ होता. तुम्हाला आठवत असेल ऐंशीच्या दशकामध्ये रामायण आणि महाभारत या दोन महाकाव्यांनी भारतीय दूरदर्शनचा पडदा व्यापलेला होता. लोक रामायण आणि महाभारताचे प्रचंड चाहते होते.
रामायण सुरू झाल्यानंतर टीव्हीला हार घालायचे, टीव्हीसमोर अरुण गवळीच्या रूपातला राम दिसल्यानंतर त्याची आरती करायचे, प्रसाद वाटायचे. इतकी या मालिकांची लोकप्रियता टिपेला पोहोचलेली होती.
रामायण आणि महाभारताच्या यशानंतर दूरदर्शनवर ऐतिहासिक मालिका येण्याचे प्रस्थ वाढले होते.
अशात पौराणिक मालिका न काढता एका वेगळ्या विषयावरची मालिका आणण्याचे धाडस लेफ्टनंट कर्नल आर. के. कपूर यांनी केले. या मालिकेचे दिग्दर्शन देखील त्यांनीच केले होते. ही मालिका होती, फौजी!
या मालिकेचे प्रसारण १९८८ साली पहिल्यांदा दूरदर्शनवर झाले. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु केवळ १३ भागांमध्ये ही मालिका बनली होती.
पूर्वीच्या काळी दूरदर्शनवरच्या मालिका फक्त १३ ते १४ एपिसोडच्याच बनायच्या. या मालिकेमध्ये शाह रुख खानने अभिमन्यू रॉय नावाच्या एका प्रशिक्षणार्थी सैनिकाचे कॅरेक्टर रंगवलेले होते. या मालिकेने शाह रुख खानला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
असं म्हणतात शाह रुख खानने या मालिकेनंतर मागे वळून बघितले नाही. त्याला पुढे या मालिकेतील त्याचा अभिनय बघून बॉलिवूडमधून देखील ऑफर्स आल्या.
या मालिकेचे कथानक १३ भागांमध्ये दाखवण्यात आले होते. कमांडो म्हणून सिलेक्ट झाल्यानंतर त्यांचे ट्रेनिंग कशाप्रकारे होते हा या मालिकेचा विषय होता. कमांडो म्हणून निवड होणे हा एक अभिमानाचा क्षण असतो. परंतु याचे ट्रेनिंग जे असते ते प्रचंड खडतर स्वरूपाचे असते. फार कमी लोक ते पूर्ण करू शकतात.
सर्वसामान्य लोकांना आपले जवान कशाप्रकारे ट्रेनिंग येतात याची देखील माहिती नसते. सैन्यामध्ये सिलेक्ट झाल्यानंतर त्यांचा जो ट्रेनिंग प्रोग्राम असतो तो समग्र प्रोग्रॅम फौजी मालिकेच्या निर्मात्यांनी १३ भागांमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला होता.
या मालिकेमध्ये शाह रुख खानची मध्यवर्ती भूमिका होती. विश्वजीत प्रधान या अभिनेत्याने शाह रुख खानच्या मोठ्या भावाची भूमिका या मालिकेमध्ये केली होती. तो शाह रुख खान आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचा वरिष्ठ अधिकारी असतो.
निवड झालेले कमांडो आपले खडतर प्रशिक्षण पूर्ण करून कशाप्रकारे सैन्यामध्ये आपली ड्युटी बजावण्यासाठी तयार राहतात हे या मालिकेचे कथानक आहे.
१९८० चा काळ असल्यामुळे तंत्रज्ञान तेव्हा जास्त प्रगत देखील नव्हते. त्यामुळे या मालिकेमध्ये तुम्हाला आजच्या मालिकेत जशी दिसते तशी उत्तम सिनेमॅटोग्राफी, उत्तम तंत्रज्ञान, प्रकाश योजना, ध्वनि नियोजन, कलाकारांचे व्हॉईस ओव्हर, डबिंग अशा कुठल्याही गोष्टी दिसणार नाहीत. तरीही मालिका त्या काळामध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली होती.
या मालिकेचे दिग्दर्शक स्वतः सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नल होते. त्यामुळेच हा विषय त्यांनी लोकांसमोर मांडला. त्या काळात प्रत्येक एपिसोड बनवण्यासाठी दोन लाखापेक्षा जास्त खर्च होत असे. त्या काळात कुठल्याही मालिकेच्या एका भागासाठी खर्च केली जाणारी ही सगळ्यात मोठी रक्कम होती.
या मालिकेच्या प्रसारामध्ये देखील भरपूर अडथळे आले. तसेच चित्रीकरणासाठीसुद्धा सगळ्या मालिकेच्या या टीम मेंबर्सना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. शाह रुख खान या मालिकेच्या चित्रीकरणासाठी रोज सेटवर उशिरा येत असे. दिग्दर्शक कर्नल एन के कपूर हे स्वतः सैनिकी शिस्तीत इतकी वर्ष राहिल्यामुळे त्यांना शाहरुखचे हे बेशिस्त वागणे बिलकुल खपत नव्हते.
एकदा शाह रुख सेटवर उशिरा आला तेव्हा कपूर चक्क त्याच्या पाठीमागे दगड घेऊन लागले होते. त्यानंतर शाह रुख खानने आपली सेटवर येण्याची वेळ कधीही चुकवली नाही.
फौजीनंतर बरेच दिवस अशाप्रकारची दुसरी मालिका आली नाही.
भारतात त्यानंतर बॉलीवूडने अनेक यु*द्धपट मोठ्या पडद्यावर आणले. कारगिल यु*द्धानंतर सगळ्यात गाजलेले चित्रपट म्हणजे एलओसी कारगिल आणि बॉर्डर. तिथून आजच्या “उरी – द सर्जिकल स्ट्राइक”पर्यंत यु*द्धाच्या विषयावर अनेक उत्तम चित्रपट आपल्याला बॉलीवूडने दिले.
पण आज जरी हे चित्रपट आपण भव्यदिव्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर पाहू शकत असलो तरीही १९८० च्या दशकात अत्यंत कमी साधनसामग्रीमध्ये यु*द्धाच्या तयारीचा विषय मांडणारी फौजी ही मालिका मात्र लोकांच्या कायम स्मरणात राहील!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.