आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांसाठी अस्मितेचा विषय आहे. पाकिस्तानच्या निर्मितीपासून काश्मीर प्रश्नावर दोन्ही देशात वाद, चर्चा, युद्ध सुरु आहे. काश्मीर प्रश्नाविषयी माहिती नाही असा व्यक्ती देशात सापडणार नाही. परंतु बलुचिस्तानचे तसे नाही.
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा एक प्रांत आहे एवढी जुजबी माहिती सोडल्यास त्याविषयी कुणालाही फारशी माहिती नाही. बलुचिस्तान हा सध्या पाकिस्तानचा एक भाग असला तरी स्वातंत्र्य काळापासून पाकिस्तानने या प्रांतावर जबरदस्तीने आपली पकड ठेवली आहे.
बलुचिस्तानला पाकिस्तानमध्ये समविष्ट व्हायचे नव्हते. १९४७ पासून बलुचिस्तान पाकिस्तान पासून स्वातंत्र्य मिळवण्याची धडपड करत आहे. परंतु स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या बलुचिस्तानच्या या स्वातंत्र्यसैनिकांना पाकिस्तान दहशतवाद्यांसारखी वागणूक देत आहे.
गेली ७३ वर्षे हे बलुची लोक आपल्या स्वतंत्र देशाच्या मागणीसाठी लढत आहेत. यासाठी अनेक बलुची लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे.
बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील आकारमानाने सर्वात मोठा प्रांत आहे. पाकिस्तानमधील ४४% भूभाग बलुचिस्तानचाच आहे. सामरिक दृष्ट्याही या भागाला प्रचंड महत्व आहे. बलुचिस्तानच्या सीमा इराण आणि अफगानिस्तानला जोडल्या गेल्या आहेत. या भागात नैसर्गिक संसाधनाचे भांडार आहे.
गॅस, कोळसा, आणि तांब्याच्या मोठमोठ्या खाणी या भागात आहे. नैसर्गिकदृष्ट्या विपुल संपन्नता आणि समृद्धी असूनही हा भाग पाकिस्तानमधील सर्वात गरीब प्रांत आहे.
पाकिस्तानमधील सरकार बलुचिस्तानमधील स्थानिक रहिवाशांवर नेहमीच अन्याय करत आली आहे असा आरोप बलुची नेते करतात. या बलुची नेत्यांच्या मते पाकिस्तान सरकारने त्यांचे मुलभूत हक्क देखील हिरावून घेतले आहेत.
याउलट पाकिस्तान सरकारच्या मते ते बलुचिस्तान मधील स्वातंत्र्यसैनिकांच्या विरोधात लढाई जिंकत आहेत. मात्र बलुची नेते मात्र सरकार लष्कराच्या मदतीने नागरिकांना त्रास देत आहे. अपहरण, हिंसा आणि खून यांना सरकार प्रोत्साहन देत असल्याचा या नेत्यांचा आरोप आहे. याच कारणाने बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान विरोधी भावना जास्त प्रबळ होत आहेत.
नैसर्गिक संसाधनांची विपुलता असूनही येथील नागरिक मात्र दारिद्र्याचे जीवन जगत आहेत. सरकारला बलुचिस्तानमधील या संसाधनांची मालकी हवी आहे. पाकिस्तान सरकारने या भागात काही प्रोजेक्ट सुरु केलेत. ज्यात चीनचीही भागीदारी आहे.
बलुचिस्तानच्या वालुकामय प्रदेशात युरेनियम, पेट्रोल, नैसर्गिक गॅस, तांबे आणि इतर अनेक धातूंच्या खाणी विपुल प्रमाणात आढळून येतात. सरकार इथल्या या नैसर्गिक संपन्नतेला ओरबाडत आहे. याला स्थानिक नागरिकांचा विरोध आहे.
स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीला इस्राईल आणि भारतानेही पाठींबा दिला आहे. पाकिस्तान सरकारला हाताशी धरून चीन इथल्या संसाधनांवर डल्ला मारत आहे. इथल्या भौगोलिक संसाधनाची चीनने लुट चालवली आहे.
१९४७ पासूनच बलुचिस्तान स्वातंत्र्याची मागणी करत आहे. पाकीस्तानच्या निर्मितीपासूनच बलुचिस्तान पाकिस्तानमध्ये विलीन होण्यास तयार नव्हता. परंतु १९४८मध्ये पाकिस्तान सरकारने इथल्या अहमद यार खान या संस्थानिकाला संस्थान विलीन करण्याची जबरदस्ती केली.
संस्थानाच्या विलीनीकरणाच्या कागदपात्रांवर जबरदस्तीने सही करवून घेतली. परंतु अहमद यांचे भाऊ प्रिन्स अब्दुल करीम खान यांना मात्र स्वतंत्र बलुचिस्तान हवा होता. अब्दुल करीम खान यांनीच १९४८ मध्ये पाकिस्तान विरोधात आवाज उठवला. परंतु पाकिस्तानने त्यांचाही छळ केला.
अब्दुल खान यांना पाकिस्तानमधून परागंदा व्हावे लागले. तेंव्हापासून हा संघर्स आजही सुरु आहे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीला इराक आणि अफगानिस्तानकडूनही मदत मिळत होती. इराक आणि अफगाणिस्तान या स्वातंत्र्यसैनिकांना लष्करी मदत पुरवत होते.
१९७० च्या दशकापासून इथे अराजकता माजली. १९७३ साली अफगानिस्तान कडून मिळणाऱ्या मदतीच्या आधारे बलुचिस्तानमध्ये सशस्त्र उठाव झाला. तत्कालीन पंतप्रधान भुट्टो यांनी १९७३ साली बलुचिस्तानचे प्रांतिक सरकार बरखास्त केले आणि बलुचिस्तानमध्ये लष्करी कायदा लादण्यात आला. यातूनच पुढे पाकिस्तान सरकारविरोधातील असंतोष वाढत गेला.
१९७६ साली “बलुचिस्तान पीपल्स लिबरेशन फ्रंट”ची स्थापना झाली. बलुचिस्तानमधील तरुण या चळवळीकडे ओढले गेले. बलुचिस्तान पीपल्स लिबरेशन फ्रंट आणि पाकिस्तान लष्कर यामध्ये सतत चकमकी होऊ लागल्या.
पुढे याला शीतयुद्धाचेच स्वरूप आले. या युद्धात बलुचिस्तानचे शेकडो नागरिक मारले गेले. सामान्य नागरिकांवर अत्याचार करण्यात आले. स्त्रिया आणि लहान मुले यांचे प्रचंड हाल झाले. कित्येकांची घरे नष्ट झली.
१९८५ पर्यंत इथे मार्शल लॉ लागू होता. सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होऊ लागल्याने पुढे हे युद्ध शांत झाले. पण, सरकार विरोधातील असंतोष खदखदत राहिला.
परंतु २००६ साली बलुची नेते नवाब अकबर बुगती यांची पाकिस्तान सरकारने हत्या घडवून आणल्यानंतर इथल्या स्वातंत्र्यसैनिकांनी पाकिस्तान विरोधात पुन्हा अधिक आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी लाहोरमधील काही महत्वाच्या इमारतींवर हल्ले केले.
या स्वातंत्र्यसैनिकांच्या मते, ते स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढत आहेत. या स्वातंत्र्यसैनिक लोकांनी डोंगराळ भागातून आपली चळवळ चालवली आहे. या फुटीरतावादी लोकांना स्थानिक आणि सामान्य नागरिकांचाही पाठींबा आहे.
इथे सरकारी कायद्यापेक्षा जमातींचाच कायदा जास्त चालतो. इथल्या स्थानिक लढाऊ जमिती सरकारी कायद्याला मानत नाहीत. या जमातीचे स्वतंत्र कायदे आहेत. त्यांच्या कायद्यानुसार जशास तसे उत्तर दिले जाते. शिराच्या बदल्यात शीर छाटले जाते.
सरकारी आणि लष्करी जबरदस्ती, स्थानिक जमातींमधील संघर्ष, यामुळे हा प्रांत नेहमीच अशांत असतो. इथल्या नागरिकांच्या हितासाठी सरकार कोणतीही भूमिका घेताना दिसत नाही.
उलट, स्वातंत्र्यसैनिकांच्या नावाखाली सरकार कुणालाही उचलून तुरुंगात डांबते. इथल्या लोकांच्या डोक्यावर सतत अनिश्चिततेची आणि भीतीची तलवार टांगलेली आहे.
बलुचिस्तानला अरबी समुद्राचा मोठा किनारा लाभलेला आहे. होर्मुजची समुद्रधुनीही इथून जवळ आहे. म्हणूनच सामरिकदृष्ट्या या भागाला खूपच महत्व आहे. याचा एका बाजूला इराण आणि दुसऱ्या बाजूला अफगाणिस्तानसारखे महत्वाचे देश आहेत.
कतार, इराण किंवा तुर्कमेनिस्तानसारख्या देशातून जर पाकिस्तानमध्ये गॅस किंवा तेलाची पाईपलाईन आलीच तर ती याच प्रांतातून जाईल. म्हणूनच पाकिस्तानला बलुचिस्तानवरील सत्ता सोडायची नाहीये.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.