आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
वसाहतवादाच्या भीषणतेविषयी आपण जाणतोच. युरोपियन वसाहतवादी व्यापाराचे निमित्त करून भारतासह समृद्ध आशियाई देशांमध्ये आले. व्यपाराच्या निमित्ताने त्यांनी येथील मोक्याच्या ठिकाणी आपल्या चौक्या आणि किल्ले उभारले. आशियातील स्थानिक शासकांच्या आपापसांतील भेदांचे फायदे घेऊन त्यांनी मोठमोठ्या साम्राज्यांचे पतन एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे केले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
१८१८ साली पेशवाईच्या समाप्तीनंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी इतर युरोपीय कंपन्या नियंत्रणाबाहेर गेल्या आणि ईआयसीने जुलमी कंपनी राजवट लागू केली. पण या लढ्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक पाठबळाची गरज होती. युरोपियन लोकांनी ते आर्थिक पाठबळ इथूनच मिळवलं आणि त्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घेतला. हे नेमकं झालं कसं याबद्दलच आजचा हा विशेष लेख..
सतरावे शतक म्हणजे युरोपियन वसाहतवादाचा सुवर्णकाळ होता. जागतिक इतिहासातील सर्वांत मोठ्या कंपन्या याच कालावधीत तयार झाल्या. आज मोठ्या समजल्या जाणाऱ्या कंपन्यांचा महसूलही या वसाहतवादी कंपन्यांच्या महसूलापुढे फिका पडेल एवढी “लूट” या युरोपीय वसाहतवादी ‘दरोडेखोरांनी’ केली होती. एवढ्या मोठ्या महसुलांमुळे या कंपन्यांची सरकारे उभी राहू लागली.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने फितुरांच्या मदतीने भारतात सत्ता स्थापन केली आणि भारताबरोबरच शेजारील देशांची लूट करून ब्रिटनमध्ये सुवर्णकाळ आणला. पण ‘ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी’च्या महसुलाची तुलना डच ईस्ट इंडिया कंपनीच्या महसुलाशी कधीही होऊ शकत नाही. वसाहतवादाच्या मदतीने डच ईस्ट इंडिया कंपनीने एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल जमा केला होता.
या कंपनीला इतिहासात अनेक नावांनी ओळखले जाते. व्ही. ओ. सी. किंवा ‘विरिंगदे इस्ट इंडीच कम्पनी’ किंवा ‘डच ईस्ट इंडिया कंपनी’. पण या कंपनीचे मूळ नाव आहे, ‘युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी’. ही कंपनी डच सरकारने स्थापन केलेली सर्वांत मोठी कंपनी होती. अनेक प्रतिस्पर्धी डच चार्टर कंपन्यांना एका मोठ्या कंपनीमध्ये एकत्र करून स्थापन व्हीओसीची स्थापना करण्यात आली होती. याचे मूळ उद्दिष्ट बाजारातील स्पर्धा कायमची संपवणे आणि मोठ्या प्रमाणात नफा कमावणे हेच होते.
डच कंपन्यांच्या या एकत्रीकरणानंतर ‘युनायटेड ईस्ट इंडिया कंपनी’ स्टॉक एक्सचेंजवर ‘एनलिस्ट’ होणारी जगातील पहिली कंपनी ठरली. या कंपनीमध्ये जे लोक आंतरराष्ट्रीय मोहिमांवर जात असत त्यांना कंपनीचे स्टॉक्स आणि शेअर्स खरेदी करण्याचे अधिकार डच सरकारने दिले होते. त्यामुळे १६०२ साली जगातील पहिले स्टॉक एक्सचेंज उभे राहिले, ते म्हणजे ‘ॲम्सटरडॅम स्टॉक एक्सचेंज’!
यानंतर आठच वर्षांत १६१० साली, डच मार्केट क्रॅश झाले आणि याबद्दल नेदरलँड्समधीलच एक प्रतिष्ठित व्यापारी आयझॅक ले मायरला दोषी ठरवण्यात आले. आयझॅक ले मायर हा ॲमस्टरडॅम स्टॉक एक्सचेंजमधील बऱ्याच स्टॉक्सचा मालक होता. तो मोठ्या प्रमाणात शॉर्ट सेलिंग करत होता. या प्रकरणामुळे ॲमस्टरडॅम स्टॉक एक्सचेंजमध्ये काही वर्षे शॉर्ट सेलिंगवर बंदी आणली गेली.
व्हीओसीने जगभरात आपल्या व्यापाराचे नेटवर्क उभारले. त्यांनी प्रामुख्याने दक्षिण आशिया, भारत आणि चीनमधून मोठ्या प्रमाणात व्यापार केला. दक्षिण आशिया आणि भारतातून युरोपमध्ये माल नेत असताना सुदूर पूर्वेकडील बटाविया आणि आफ्रिकेतील केपटाऊन ही बंदरे त्यांच्या कामकाजासाठी आणि वाहतुकीसाठी मुख्य बंदरे म्हणून वापरली जात होती.
डच ईस्ट इंडिया कंपनीने एकेकाळी ७.८ ट्रिलियन डॉलर्सचा नफा कमावला होता. म्हणजेच सध्याच्या जगातील श्रीमंत कंपन्यांपैकी एक असलेल्या ॲपल कंपनीच्या आठ पट नफा तत्कालीन डच ईस्ट इंडिया कंपनीने कमावला होता.
कंपनीची आणखी प्रगती होण्यासाठी डच ईस्ट इंडिया कंपनीने अनेक कामे करण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांची आंतरराष्ट्रीय मक्तेदारी निर्माण झाली. जगभरातले अनेक लोक आणि व्यवसाय त्यांच्या जहाजबांधणी, वाहतूक आणि आर्किटेक्चर इत्यादी व्यापारांवर अवलंबून होते.
प्रचंड आर्थिक सामर्थ्यामुळे डच लोक जगभरातील अनेक भागांवर राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या प्रभाव पाडू शकले. याकाळात नेदरलँड्स ही एक महासत्ता होती असं म्हटलं तर अतिशयोक्त ठरणार नाही. अशा चार्टर कंपन्यांच्या निर्मितीमुळे जागतिकीकरणाची ओळख सबंध जगाला होऊ शकली.
ज्या वस्तू युरोपमध्ये मिळत नव्हत्या किंवा जगाच्या दुसर्या भागात स्वस्त किमतीत किंवा कोणतीही रक्कम न देता तयार होऊ शकत होत्या, म्हणजेच थोडक्यात लूट करून, त्या वस्तू युरोपमध्ये आणल्या जात असत आणि त्यातूनच मोठ्या प्रमाणात नफा कमावला जात असत. यामुळे डच अर्थव्यवस्था प्रचंड प्रमाणात वाढली.
डच बंदरे सुदूर पूर्वेकडील विदेशी साधन-सामग्रीसाठी युरोपचे प्रवेशद्वार बनले. ८० वर्षांच्या यु*द्धात आशियाई देशांचा त्यांच्या शेजार्यांशी किंवा आपापसांत संघर्ष सुरू असताना या आर्थिक शक्तीचा युरोपला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. व्हीओसीने डच आणि एकूणच युरोपियन लोकांना लढण्यासाठी आणि यु*द्ध जिंकण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले.
अशा मोठ्या कंपन्यांचा इतिहास अभ्यासणे नेहमीच उपयुक्त ठरते. युरोपियन शक्तींनी वसाहतवादाच्या युगात किती संपत्ती मिळवली हे अनेकांना माहीत नाही. आधुनिकतेच्या या युगात ॲपलसारख्या कंपन्यांनी मिळवलेली आर्थिक ताकद हीच काय ती इतिहासातील सर्वोत्तम श्रीमंती आहे असे अनेकांना वाटते.
‘ॲपल ही जगातील ट्रिलियन डॉलर्स नफा कमावणारी पहिली कंपनी आहे’ अशा आशयाचे लेख कोणत्याही ऐतिहासिक संदर्भांशिवाय लिहिले जातात. फक्त डच ईस्ट इंडिया कंपनीनेच १ ट्रिलियनचा डॉलर्स नफ्याचा टप्पा पार केला असे नाही. नफ्याचा एवढा टप्पा पार करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. यामध्ये सध्याच्या अल्फाबेट, ॲमेझॉन, सौदी आरामको, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांचा समावेश होतो. तर ऐतिहासिकदृष्ट्या मिसिसिपी कंपनी आणि साऊथ सी कंपनी या कंपन्यांच्या उलाढालीसुद्धा ट्रिलियन डॉलर्समध्ये होत असत.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.