आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब
१९३० आणि ४०चे दशक हे भारत आणि चीनसाठी प्रचंड उलथापालथ घडवून आणणारे होते. भारतात स्वातंत्र्यलढा शिगेला पोचला होता, त्याचवेळी चीनवर जपानने ह*ल्ला केला होता. चीन आणि जपानमधील हे यु*द्ध खूप काळ सुरु होते. चीनच्या जखमी सैनिकांवर उपचार करण्यासाठी चीनकडे पुरेसे डॉक्टर्स नव्हते. त्यावेळी जनरल झु दे यांनी जवाहरलाल नेहरू यांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी चीनच्या जखमी जवानांवर उपचार करण्यासाठी भारतातून स्वयंसेवक डॉक्टरांची टीम पाठवून देण्याची विनंती केली होती.
या पत्रात त्यांनी लिहिले होते,
“आमचे उत्थान, भारतीय आणि चीनच्या नागरिकांचे उत्थान म्हणजे सर्व शोषित आणि वंचित मानवजातीचे उत्थान असेल.”
त्याचवेळी सोलापूरच्या कोटणीस कुटुंबातील द्वारकानाथ कोटणीस हे मुंबई विद्यापीठातून डॉक्टर होऊन बाहेर पडले होते. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेतली होती पण त्यांना पदव्युत्तर पदवी देखील घ्यायची होती. तेव्हाच त्यांना ही बातमी समजली आणि भारतातून जे डॉक्टरांचे पथक चीनला जाणार होते त्यासोबत जाण्याची तयारी दर्शवली.
चीनबद्दल त्याकाळी कोटणीस किंवा त्यांच्या कुटुंबियांना काहीही माहिती नव्हती. फक्त चीनमध्ये यु*द्ध सुरु आहे एवढीच काय ते महिती. तरीही कोटणीसांना मानवतेची सेवा करण्यासाठी घेतलेल्या संकल्पाची परिपूर्ती म्हणून चीनला जाऊन तिथल्या सैन्यासाठी वैद्यकीय सेवा द्यायची होती. त्याच्या कुटुंबीयांनी देखील कोटणीस यांच्या या निर्णयात कसलीही आडकाठी आणली नाही.
“त्याला किंवा आम्हाला कुणालाच चीनबद्दल फारशी माहिती नव्हती. आम्हाला फक्त एवढीच माहिती होती की, चीनचे लोक इथे चीनी रेशीम विकण्यासाठी येतात”, कोटणीस यांच्या लहान बहिण मनोरमा ताईंनी एकदा ही आठवण सांगितली होती.
अर्थात, चीनबद्दल फारशी माहिती नसताना देखील, डॉ. कोटणीस त्या यु*द्धग्रस्त देशात जाण्याचे धाडस दाखवत होते. त्यांचा हा निर्णय त्यांच्यासाठी फारच महत्वाचा ठरला.
डॉ. कोटणीस यांचा जन्म १० ऑक्टोबर, १९१० रोजी सोलापूर येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजमधून त्यांनी डॉक्टर पदवी मिळवली. जगाच्या विविध भागात जाऊन वैद्यकीय सेवा देण्याची त्यांची इच्छा होती, नव्हे ते त्यांचे ध्येयच होते.
१९३८ साली त्यांची पदवी पूर्ण झाली. अवघे अठ्ठावीस वर्षांचे असताना डॉ. कोटणीस यांनी परमुलुखात जाऊन तिथल्या जवानांना वैद्यकीय सेवा देण्याचा निर्धार केला. त्यांच्यासोबत नागपूरचे डॉ. एम. चोळकर, कलकत्त्याचे डॉ. बी. के. बासू आणि डॉ. देबेश मुखर्जी, आणि अलाहाबादचे डॉ. एम. अटल हे त्या पथकात सामील होते.
या तरुण डॉक्टरांचे हे पथक चीनमध्ये पोचले तेव्हा जनरल झु डे स्वतः त्यांच्या स्वागतासाठी हजर होते. चीनच्या जवानांवर उपचार करण्यासाठी दाखल झालेले हे आशियातील पहिलेच पथक होते. जखमी जवानांवर उपचार करण्यासाठी या डॉक्टरांना फिरत्या क्लिनिकसोबत जावे लागे.
कुठल्याही लष्करी डॉक्टरांप्रमाणे त्यांचे काम खूपच तणावपूर्ण होते. प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या या यु*द्धात कधीकधी एका दिवसांत ८०० जवानांवर उपचार करावे लागत असे. कधीकधी तर डॉ. कोटणीस सलग ७२ तास काम करत. या ७२ तासात ते थोडीशी देखील विश्रांती घेत नसत.
त्यांच्या या अथक परिश्रमाने त्याच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होत असे. परंतु तरुण भारतीय डॉक्टरांनी हे आव्हान स्वतःहून स्वीकारले होते. चीनचे सैनिक ज्या वेदना सहन करत होते, त्याच वेदना त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आलेल्या या पथकाला देखील सहन कराव्या लागत.
शेवटी एक दिवस यु*द्ध संपले. भारतातून आलेले हे पथक मायदेशी परतण्यासाठी पुन्हा सज्ज झाले. मात्र, डॉ. कोटणीस चीनच्या प्रेमात पडले होते. त्यांनी अजून काही काळ चीनमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.
मनोरमा सांगायच्या, “तो तिथे खूप खुश होता. लोक येऊन त्याला धन्यवाद द्यायचे. तो नेहमी तिथल्या लोकांबद्दल सकारात्मक गोष्टी सांगायचा.”
एक भारतीय येऊन इथल्या लोकांसाठी दिवसरात्र कष्ट घेतो म्हणूनच फक्त चीनी लोक त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात असे नाही. डॉ. कोटणीस त्यांच्यातीलच एक बनून राहिले. ते चीनी भाषेतील गाणी म्हणायचे, चीनी भाषेतील विनोद सांगायचे, चीनी भाषा लिहायला देखील शिकले होते. चीनमध्ये डॉ. कोटणीसांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढत होती.
उत्तर चीनच्या सैन्यासाठी सेवा दिल्यानंतर डॉ. कोटणीस १९३९ साली माओच्या नेतृत्वाखालील एट्थ रूट आर्मीमध्ये रुजू झाले. इथे देखील ते दिवस-दिवसभर रुग्ण सेवेत व्यस्त राहायचे. त्यांच्या कष्टाची सैनिकांकडून दखल घेतली जायची. पुढच्याच वर्षी त्यांची बेथेन्यू इंटरनॅशनल पीस हॉस्पिटलच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली.
इथेच त्यांची ओळख गुओ किंग्लान हिच्याशी झाली. गुओ एका पुरोगामी ख्रिश्चन परिवारातून आली होती. वयाच्या २३व्या वर्षी ती एट्थ रूट आर्मीमध्ये नर्स म्हणून रुजू झाली होती. उंचपुऱ्या, कुरळे केस असणाऱ्या डॉ. कोटणीस यांना पाहताच किंग्लान त्यांचा प्रेमात पडली. डॉक्टरांचे आर्मी जाकेट थोडे उसवले होते, हे पाहताच किंग्लानने त्यांना एक नवे स्वेटर भेट म्हणून दिले. किंग्लानचा डॉक्टरांप्रती असलेला स्नेह आणि ओढ पाहून डॉक्टर देखील तिच्या प्रेमात पडले.
१९४१ च्या डिसेंबरमध्ये दोघेही विवाहबद्ध झाले. पुढच्याच वर्षी त्यांना एका पुत्ररत्नाचा लाभ देखील झाला. त्यांनी त्याचे नाव यीनहुआ ठेवले, यीन म्हणजे भारत आणि हुआ म्हणजे चीन.
परंतु, या दाम्पत्यासाठी विवाह सुख फार काळ टिकू शकले नाही. डॉ. कोटणीस यांच्यावरील कामाचा ताण इतका होता की त्याचा त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला.
यीनहुआच्या जन्मानंतर अगदी काही महिन्यांनी डॉक्टरांना एपिलेप्सिचा अटॅक आला. ९ डिसेंबर १९४२ साली म्हणजे वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी डॉक्टरांचा मृत्यू ओढवला होता. चीनच्या नांकन गावातील हिरोज कोर्टयार्ड या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
“डॉक्टरांनी केलेले काम हे फक्त तुमच्या-आमच्या साठीच नाही तर अखिल मानवजातीच्या सेवेसाठी जे जे झटत आहेत त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात तर त्यांचा आदर अधिकाधिक वाढेल कारण, त्यांचे काम हे फक्त वर्तमानकाळापुरते नव्हतेच. त्यांनी काम केले ते येणाऱ्या भविष्यासाठी,” अशा शब्दांत चीनच्या नेत्या मॅडम सून यात्सेन यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दोन्ही देशांतील बंधूभाव वृद्धिंगत करण्यासाठी डॉ. कोटणीस त्यांचे काम नेहमीच प्रेरणादायी ठरेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा :फेसबुक ,युट्युब | Copyright ©ThePostman.co.in | All Rights Reserved.