आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
मोबाईल हा आजच्या काळातील परवलीचा शब्द बनला आहे. मोबाईलमध्येही रोज नवनवे फीचर्स अपडेट होत असतात. त्यामुळे बाजारपेठेत आज एका मोबाईलची चलती असते तर उद्या दुसऱ्या. स्मार्टफोन आल्यापासून तर मोबाईलचे फीचर्स झपाट्याने बदलत आहेत. वर्ष-सहा महिन्यांनी प्रत्येक कंपनी आपल्या मोबाईलमध्ये काही तरी नवे बदल घेऊन येत असते.
आजवर असे कित्येक फोन आले गेले असतील, पण यातील एका मोबाईलला भारतीय लोक तरी कधीच विसरू शकणार नाहीत. अगदी बरोबर ओळखलंत. नोकिया 1100!
मोबाईल फोन वापरणे ही फक्त श्रीमंतांची गरज असते हा समज या मोबाईलने मोडीत काढला. पूर्वी इनकमिंग कॉलसाठीही पैसे मोजावे लागत त्यामुळे मोबाईल हा सर्वसामान्यांच्यासाठी काहीच कामाचा नव्हता, पण इनकमिंग फ्री झाल्यानंतर मात्र सामान्य मध्यमवर्गीयही मोबाईल वापराकडे वळू लागले. त्यात नोकिया 1100 आला आणि संपर्क क्षेत्रात एक क्रांतीच आली.
आजच्या स्मार्टफोनच्या तुलनेत नोकिया 1100 हा काही फार भारी फोन होता असे नाही. पण तरीही लोकांना हा फोन आवडत होता. भारतातील घराघरात हा फोन पोहोचला होता.
नोकियाने ही किमया कशी साधली हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला संपूर्ण लेख वाचावा लागेल.
२००३ पासून संपर्क क्षेत्र वेगाने बदलत होते. मोबाईल ही आजची निकड आहे हे अनेकांना जाणवत होते. त्यावेळी मोबाईलच्या किंमती मात्र सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या होत्या. त्यामुळे प्रत्येकालाच मोबाईलची चैन परवडणारी नव्हती. नोकिया फोनच्या किंमतीही काही फार स्वस्त नव्हत्या. २००० साली आलेल्या नोकिया 3310 ची किंमतच १२ हजाराच्या घरात होती. फोनसाठी बारा हजार ही रक्कम म्हणजे (तत्कालीन) सर्वसामान्यांसाठी आवाक्या बाहेरचीच गोष्ट झाली ना!?
मग नोकियाने 1100 आणला. याची किंमत सुरुवातीला ५ हजारच्या आसपास होती. ज्यामुळे सर्वसामान्यांना हा फोन जरा स्वस्त वाटू लागला. या फोनमध्ये इमेल आणि इंटरनेट सुविधा नव्हती हा एका अत्यंत साधासुधा फोन होता. ज्यात कॉलिंग, रेडीओ, अलार्म, आणि सगळ्यांचा आवडता स्नेक गेम असे फीचर्स होते. सामान्य लोकांना आणखी काय हवं होतं? फक्त एक संपर्काचं माध्यम एवढंच!
या मोबाईलने खूप काही दिल्याची भावना प्रत्येकाच्या मनात होती. हवा तेव्हा हवा त्या व्यक्तीशी संपर्क करता येत होता. घरातील व्यक्ती काही कामानिमित्त दूर गेली असली तरी ती सुखरूप आहे याची खात्री करून घेता येत होती. कामकाजाच्या ठिकाणीही लोकं एकमेकांच्या संपर्कात राहत होते.
नोकिया 1100ची आणखी एक खासियत म्हणजे फ्लॅश लाईट. भारतात अनेक ठिकाणी अचानक लाईट जाण्याची समस्या भेडसावत असे. अशावेळी रॉकेलचा दिवा शोधण्यासाठी का असेना पण या फ्लॅश लाईटचा ऐनवेळी उपयोग व्हायचा. रात्रीच्या वेळी शेतातून, पायवाटेने चालतानाही याचा उपयोग होऊ लागला. त्यामुळे या फिचरनेही अनेकांचे लक्ष वेधून घेतले. विशेषत: ग्रामीण भागात ही फारच उपयोगाची वस्तू ठरली.
नोकिया1100 ने भारताच्या ग्रामीण भागातही आपली छाप उमटवली. एकदा चार्ज केलेली बॅटरी दोनदोन दिवस पुरत असे त्यामुळेही ग्रामीण भागात याची जास्त चलती दिसू लागली.
नोकियाची ती रिंगटोन आजही कुणी विसरणार नाही. याशिवाय या मोबाईलमध्ये रिंगटोन कंपोजरसुद्धा होता ज्यामुळे लोकांना स्वतःला हवी ती रिंगटोनही सेट करता येत होती. टेक्स्ट मेसेज स्टोअर करण्याची क्षमताही जास्त होती. एकावेळी पन्नास मेसेज यामध्ये स्टोअर करता येऊ शकत होते. शिवाय प्रत्येक भाषेतून काम करणारा फोनेटिक कि-पॅड हेही याचे खास वैशिष्ट्य होते.
हळूहळू याच्या किंमती आणखी कमी होत गेल्या. आता हा फोन कॉलेज विद्यार्थ्यांच्या हातातही दिसू लागला. यातील स्नेक गेमसाठी तर तरुण जीव टाकत होते. तरुणच काय पण घरातील शाळकरी मुलेही या गेमसाठी फोन देण्याचा हट्ट करून रडत होते. फक्त गेमच नाही तर, आपल्या आवडत्या रेडीओ स्टेशनची गाणी ऐकण्याची सोयदेखील होती. आणखी काय पाहिजे? थोडक्यात काय तर या छोट्याशा फोनमध्ये इतके काही होते की हा फोन म्हणजे अल्लादिनचा दिवाच वाटत असे. म्हणूनच तर या फोनने लोकांच्या मनावर कब्जा केला होता.
आजपर्यंत कुठल्याच फोनची झाली नसेल इतकी विक्रमी विक्री नोकियाची झाली. कंपनीलाही आपल्या या फोनचे उत्पादन वाढवावे लागले. इतर देशात तर या कंपनीच्या मोबाईलला मागणी होतीच, पण भारतात नोकिया 1100ला विशेष मागणी होती. या फोनने उच्चांकी विक्रीचा विक्रम नोंदवला आहे.
२००३ पासून हा फोन बाजारात आला आणि २००७ पर्यंत हा फोन बाजारात होता. या चार वर्षांच्या काळात तब्बल २५० दशलक्ष फोन विकले गेले होते.
२००७ मध्ये कंपनीने आपला सेल्स रिपोर्ट जाहीर केला होता. इतक्या मोठ्या संख्येने नोकिया 1100 शिवाय दुसरा कुठलाही फोन विकला गेला नव्हता. यावरून नोकियाने लोकांच्या मनावर कसे गारुड केले होते हे लक्षात येते.
नोकिया 1100 बनवतानाच भारतीय ग्राहक वर्ग डोळ्यासमोर ठेवूनच बनवला होता. त्याकाळी भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची फारशी क्रेझ नव्हती. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर ही भारतीयांसाठी नवी गोष्ट होती. ग्रामीण भागातील लोक आत्ता कुठे या बदलाशी जुळवून घेत होते. अशा काळात आलेल्या नोकिया 1100ने कमाल करून दाखवली.
भारतातील शेतकऱ्यापासून ते कॉलेज तरुणापर्यंत प्रत्येकाच्या हातात हा मोबाईल दिसत होता. हाताळायला सुलभ आणि वापरण्यासही सोपा असा हा फोन लोकांच्या गळ्यातील ताईत न ठरता तर नवलच! ही बाब शब्दश: खरी आहे. अनेकदा खिशातून पडण्याचा किंवा पाकिटातून चोरीला जाण्याचा धोका अधिक असल्याने लोक याला एका चैनमध्ये अडकवून गळ्यातही बांधत होते.
पण नंतर इंटरनेटचा जमाना आला आणि या लाटेत हा फोन मागे पडला असला तरी लोकांच्या आठवणीतून हा फोन कधीही पुसला जाणार नाही हे नक्की. तुम्हालाही या फोनशी जुळलेल्या अनेक आठवणी आजही आठवत असतील, हो ना?
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.