आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
फळांचा राजा म्हणुन ओळखला जाणाऱ्या आंब्यापासून बनवले गेलेले अमर्याद पदार्थ आज बाजारात उपलब्ध आहेत. त्यातच फ्रुटी, पेप्सी या शीतपेयांमध्येही आता हमखास आंब्यांची चव चाखता येतो.
भारतात आंब्याला पेयाच्या रुपात समोर आणण्याचे श्रेय दिले जाते ते ड्युक आणि सन्स यांच्या मँगोला या पेयास. १९५०च्या दशकात अगदी आंब्यासारखीच चव असणाऱ्या या पेयाने बाजारात धुमाकुळ घातला होता. काळाच्या ओघात प्रतीस्पर्ध्यांपेक्षा मागे राहून गेलेल्या या मँगोला पेयाचा इतिहासच आपण आज जाणून घेणार आहोत.
मँगोलाची चव अनुभवलेले अनेक लोक आजही आंब्याच्या चवीचे दुसरे एखादे पेय पिताना मँगोलाची आठवण काढतातच.
क्रिकेटचे सामने बघता बघता पिण्यासाठी मँगोला आणि सोबत बटाट्याचे चिप्स आजही त्या काळातील लोकांना आठवतात. बाकीच्या सगळ्या पेयांपेक्षा अधिक घट्ट असलेले मँगोला लोकांच्या आवडीचे पेय होते. आताच्या शीतपेयांसारखी कार्बोनेटेड चव त्याला नव्हती. अगदी आमरसासारखी चव असलेले हे पेय तरुणांसाठी, लहान मुलांसाठी तसेच वयस्कर व्यक्तींसाठीही अगदी योग्य होते.
सोनेरी रंग असलेले, अगदी घट्ट आंब्याच्या रसापासून बनवलेले हे पेय तयार झाले ते फेरोज पंडोल यांच्या पुढाकाराने. ड्युक आणि सन्सच्या सर्वोत्कृष्ट उत्पादनांपैकी एक म्हणजे मँगोला होते. ड्यूक आणि सन्सची स्थापना १८८९ साली एक भारतीय क्रिकेटर असलेले दिनशॉजी कुवरजी पंडोल यांनी केली होती.
आपल्या उत्पादनांची वैविधता वाढवण्यासाठी नवनवीन उत्पादनांचा शोध घेत असताना मँगोलाची कल्पना पंडोल यांना सुचली. आपले वडील, फेरोज यांनी मँगोलाची सुरुवात कशी केली हे आजपण नवल पंडोल यांना आठवते.
“ते एका फूड कॅनिंग कारखान्यात गेले आणि त्यांनी ३००० कॅन बनवायला सांगितले. त्यानंतर त्यांनी स्वत:चे एक विशेष सूत्र तयार केले. एक रंजक बाब म्हणजे त्यांनी हे पेय एरेटेड ड्रिंकच्या किंमतीवर विकले. लोकांना लेमनेडच्या किंमतीत १०० टक्के फळ-आधारित पेय मिळत होते. लोकांसाठी ही एक सुखद आणि आश्चर्यकारक बाब होती.”
कुरूश दलाल हे मुंबईतील पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि पाकशास्त्रज्ञ पंडोल घराण्याला वैयक्तिकरित्या ओळखत होते आणि ते अभिमान बाळगतात की पंडोल कधीच पुरेसे पेय निर्माण करू शकले नाहीत. त्यांच्या मते, “ते निर्माण करत त्यापेक्षा त्यांच्याकडे नेहमीच जास्त मागणी होती.”
कोल्ड ड्रिंक शॉप्स, पारसी इराणी कॅफे, पान टपऱ्या, क्लब, उडुपी रेस्टॉरंट्स आणि अगदी रेल्वेमार्गापासून शहरातील प्रत्येक कोपऱ्यात मँगोला विकले जात होते. मुळात रेफ्रिजरेटर किंवा कूलर जिथे होते तिथे प्रत्येक जागी हे पेय विकले जात होते असे दलाल म्हणतात.
ड्यूकच्या ब्रँडद्वारे निर्मित प्रथम नॉन-एरेटेड पेय असलेले मँगोला शीतपेयापेक्षा रसाप्रमाणे जास्त भासत होते. “मँगोला पिणे ही एक आनंददायक भावना होती,”म्हणून मँगोला हे नंतर बाजारपेठांना धक्का लावणाऱ्या ‘माझा’आणि ‘फ्रूटी’च्या कित्येक मैल पुढे होते हे सांगत दलाल मँगोलाच्या तत्कालीन क्रेझची आठवण करून देतात.
ड्यूक हा एक पारंपारिक पारसी ब्रँड होता आणि स्वाभाविकच पारसी समुदायाने त्याला स्वीकारले. कोणतेही पारसी विवाह कधीही लिंबू, आंबा, रास्पबेरी आणि आल्याची चव असलेल्या ड्यूकच्या पेयशिवाय पूर्ण होत नसे. ‘धंसाक’सह मँगोला असणे हे दक्षिण मुंबईत पसरलेल्या सर्व इराणी कॅफेमध्ये मुख्य गोष्ट होते.
परंतु सायकेडेलिक रंगाच्या पेयाची ३०० मिलीची बाटली मुंबई आणि पुण्यातील बर्याच जणांच्या आवडीची होती. शाळेच्या कॅन्टीनमध्ये मुले या बाटल्या खरेदी करण्यासाठी नियमितपणे त्यांचा पॉकेटमनी वाचवत असत. मेनन म्हणतात, “आम्ही मँगोला प्यायलो, कारण तो सभोवताली सहज उपलब्ध होता, स्वस्त होता, गोड होता आणि काला-खट्ट्यापेक्षा थोडासा फॅन्सीही होता.”
दलाल म्हणतात, ड्यूक ही एक आयकॉनिक कंपनी बनली आणि ‘ड्यूक का दादा, लेमनेड ज्यादा’सारख्या काही संस्मरणीय टॅग लाईन्सच्या मागे होती. पण त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मँगोला बाजारात आणण्यासाठी कधी जास्त जाहिरातींची गरज नव्हती कारण आंबाप्रेमी मुंबईकरांनी तातडीने मँगोला स्विकारले.
१९९०च्या दशकात अग्रगण्य जाहिरात एजन्सीसाठी सर्जनशील सल्लागार असलेल्या शबनम सिरूर सांगतात “ड्यूक आणि सन्स जाहिरातींवर मोठे पैसे खर्च करणारे नव्हतेच, म्हणून मँगोला मुख्यत्वे लोकांच्या स्तुतीच्या शब्दांद्वारे तयार केलेला ब्रँड होता.”
१९८५साली म्हणजेच मँगोला पेप्सीकोला विकला जाण्यापूर्वीच्या एका दशकाआधी मँगोलाला टेट्रा पॅक आणि स्ट्रॉ यांचा अंदाज नव्हता. सिरूर सांगतात की, “याचवेळी तरुण वर्गाची आवड असलेले फ्रुटी हे टेट्रा पैकमध्ये समोसा आणि सँडविचच्या दरम्यान विद्यार्थ्यांच्या डब्यात पोहचले होते.”
सुरुवातीला मँगोला हे एक हापूस आंब्यापासून बनवलेले एकमेव पेय आहे असा दावा करून, तसेच स्वत:ची असलेली पूर्ण ओळख वापरून त्यांनी मँगोला टिकवण्याचा प्रयत्न केला.
१९९४ साली ड्यूक आणि सन्स पेप्सीकोला विकण्यात आले. मँगोला आणि लेमनेडचा अपवाद वगळता बहुतेक सगळी पेये पेप्सीकोने बंद करून टाकली. सगळ्यांचा आवडता मँगोलाही पुढे जाऊन स्लाईसमध्ये रुपांतरीत झाला. हळूहळू मँगोलाने आपली ओळख पुर्णपणे हरवली.
त्यांच्याकडे मँगोला आणि त्यांचे स्वत:चे आंबा आधारित पेय होते आणि अमेरिकन मानकांनुसार आपल्याकडे समान ब्रँडमधून दोन समान पेय असू शकत नाही. म्हणून त्यांनी मँगोला टप्प्याटप्प्याने बंद केले. पर्याय नसला तरी मँगोलाचे बाजारातून जाणे हे दुख:दायक आहे असे पंडोल म्हणतात.
“जेव्हा मँगोला बंद करण्यात आला तेव्हा बहुतेक मुंबईकर उदास होते,” दलाल सांगतात. थम्सअप समूहाची ‘माझा’ बाजारात आली होती आणि जणू मँगोलाचे जाण्याचे दु;ख साजरे करण्यासाठीच ती जास्त विकली गेली.
सिरूर म्हणतात, “२००० च्या दशकात इराणी रेस्टॉरंट्समध्ये तीव्र स्पर्धा होती, कारण मॅक्डोनाल्ड्सने मुंबईतील सर्व कोपऱ्यातील रेस्टॉरंट्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला” पुढे त्या म्हणतात की “या निर्णयाचा मँगोलाला पुन्हा एकदा फटका बसला कारण त्यांच्या मुख्य विक्रेत्यांना स्वत:ची दुकाने विकण्याशिवाय पर्याय नव्हता. पिढी बदलत गेली तसतसे तरुण मँगोलाबद्दल विसरु लागले. एवढेच काय तर मला असं वाटत नाही की आज मुलांना मँगोला काय आहे हे देखील माहिती असेल.”
गेल्या वर्षी ड्यूक अँड सन्सच्या चेंबूर कारखान्याने आयकॉनिक सोडा बाटलीच्या आकाराचा आपला कारखाना जमीनदोस्त केला. तिथे आता रहिवाशी इमारत बांधली जाणार आहे. मँगोलाच्या सगळ्याच आठवणी आता जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. असे असले तरी तत्कालीन पिढीला अस्सल आंब्याच्या चवीचा अमृतानुभव देणारे मँगोला त्या पिढीच्या मनात एक गोड आठवण म्हणून नेहमीच राहील एवढं नक्की.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.