आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
सप्टेंबर २००७ मध्ये पहिला टी-ट्वेंटी वर्ल्डकप पार पडला. त्यात भारतानं दणदणीत यश मिळवलं. त्यानंतर पाचंच महिन्यांच्या आत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळानं ‘इंडियन प्रीमियर लीग’ (आयपीएल) या आंतरराष्ट्रीय क्रिकेट लीगचं अनावरण केलं. संघांची संख्या ठरवली गेली, फ्रँचायझी तयार झाल्या.
कॉर्पोरेट जगतातील मोठे-मोठे उद्योगपती आणि बॉलिवूडचे सितारे क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाले. जगभरातील दिग्गज खेळांडूंसाठी कोट्यवधी रुपयांच्या बोली लावल्या गेल्या. तेव्हा कुणी कल्पनाही केली नसेल की, ही स्पर्धा जगभरातील फुटबॉल, हॉकी आणि बास्केटबॉल लीगच्या बरोबरीची होईल.
आतापर्यंत आयपीएलच्या सर्व सिझन्समध्ये कुठल्यानं कुठल्या संघानं आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. मात्र, दोन संघ असे आहेत ज्यांच्यामध्ये पहिल्या सिझनपासून अघोषित शत्रूत्व दिसतं. अगदी पहिल्या सिझनच्या लिलावापासून या अप्रत्यक्ष शत्रूत्वाला सुरुवात झाली होती अन् यामागचं कारण आहे कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी! हो महेंद्रसिंग धोनीमुळेच मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघांमध्ये कुठल्या न कुठल्या कारणावरून धुमश्चक्री होताना दिसते. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय? हे आपण जाणून घेऊया..
आयपीएलच्या इतिहासातील पहिला वहिला लिलाव २० फेब्रुवारी २००८ रोजी मुंबईत झाला. लिलावाच्या अशा एकूण आठ फेऱ्या झाल्या. या लिलाव प्रक्रियेत जगभरातील दिग्गज खेळाडूंची खरेदी-विक्री झाली. लिलावापूर्वी फ्रँचायझींसाठी काही नियम तयार करण्यात आले होते. त्यानियमांच्या अधिन राहूनच फ्रँचायझींना खेळाडूंची खरेदी करावी लागणार होती.
इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या सिझनमधील नियमांमध्ये ‘आयकॉन प्लेअर’ ही संकल्पना मांडण्यात आली होती. आयकॉन खेळाडूंच्या यादीमध्ये प्रमुख भारतीय खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंना त्यांच्या होम टाऊन फ्रँचायझींमध्ये सामील व्हावं लागणार होतं. आयकॉन प्लेअरर्ससाठी रक्कम निश्चित करण्यात आली होती. प्रत्यक्ष लिलावापूर्वीचं या खेळाडूंना खरेदी करण्याची परवानगी देखील फ्रँचायझींना देण्यात आली होती.
त्यामुळं आपोआप सचिन तेंडूलकर मुंबईच्या संघात, राहुल द्रविड बंगळुरूच्या संघात, सौरव गांगुली कोलकाताच्या संघात, युवराज सिंग पंजाबच्या संघात आणि विरेंद्र सेहवाग दिल्लीच्या संघात गेले. या खेळांडूंसाठी साडे सोळा लाख रुपये इतकी निश्चित रक्कम मिळाली होती. लीगची लोकप्रियता वाढवण्याच्या हेतूनं हा नियम करण्यात आला होता.
आयकॉन खेळाडूंना त्यांच्या संबंधित संघातील सर्वात महागड्या खेळाडूंपेक्षा १५ टक्के अधिक रक्कम मिळाली. डेक्कन चार्जर्सचा आयकॉन खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मणनं आपल्या संघासाठी स्वेच्छेने आपला दर्जा सोडला. आता केवळ राजस्थान आणि चेन्नईमध्ये कोणताही आयकॉन खेळाडू नव्हता.
एका फ्रँचायझीनं संपूर्ण लिलाव प्रक्रियेत किती पैसा खर्च करावा हा देखील नियम घालून देण्यात आला होता. या नियमानुसार खेळाडूंच्या खरेदीसाठी प्रत्येक फ्रँचायझी ५० लाख डॉलर्स खर्च करू शकणार होती. यातील ३३ टक्के रक्कम तर आयकॉन प्लेयरच्या खरेदीसाठीचं गेली होती. शिल्लक राहिलेली रक्कम वापरून बाकीची टीम उभी करावी लागणार होती.
मुंबई इंडियन्स फ्रँचायझीनं सचिन तेंडुलकरला सर्वांत अगोदर संघात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना पहिल्या टी-ट्वेंटी संघाचा विजेता कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर आपला डाव लावायचा होता. मात्र, चेन्नईची फ्रँचायझी आणि आयपीएलचे नियम आडवे आले. महेंद्रसिंग धोनीला होम फ्रँचायझी नव्हती. त्यामुळं त्याला लिलावात उतरवण्यात आलं. विश्वविजेता कर्णधार असल्यानं त्याच्यासाठी तगडी बोली लागली. धोनीला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबईची फ्रँचायझी उत्सुक होती. मात्र, निधी मर्यादेमुळं त्यांना ते शक्य झालं नाही.
याउलट चेन्नेईकडं आयकॉन प्लेयर नसल्यानं त्यांना जास्त रक्कम देऊन धोनीला खरेदी करणं सहज शक्य झालं. महेंद्रसिंग धोनी हा आयपीलएलच्या इतिहासातील प्रत्यक्ष लिलावात विकला गेलेला पहिला भारतीय खेळाडू ठरला. शिवाय तो आयपीएलच्या पहिल्या सिझनमधील सर्वांत महागडा खेळाडू देखील ठरला. चेन्नई सुपर किंग्सनं महेंद्रसिंग धोनीला आपल्या चमूमध्ये घेतलं आणि कर्णधार केलं. जर त्यावेळी महेंद्रसिंग धोनीला विकत घेण्यास मुंबईला यश आलं असतं तर आज कदाचित तोच मुंबईचा कर्णधार असता.
फ्रँचायझींचा विचार केला तर, मुंबई इंडियन्स फ्रँचायझीची स्थापना २००८ साली झाली असून तिची मालकी भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबनी ही फ्रँचायझी सांभाळतात. २०१७ साली, आयपीएल फ्रँचायझींपैकी ब्रँड व्हॅल्यूमध्ये १० करोड डॉलर्सचा टप्पा ओलांडणारी मुंबई इंडियन्स ही पहिली फ्रँचायझी बनली.
२०१९ साली मुंबई इंडियन्स ब्रँडची व्हॅल्यू अंदाजे ८०९ कोटी होती. मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाचवेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलेलं असून सध्या रोहित शर्मा या संघाचा कर्णधार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज या फ्रँचायझीची स्थापना देखील २००८ साली झाली असून तिची मालकी चेन्नई सुपर किंग्ज क्रिकेट लिमिटेड (बीसीसीआयचे माजी अध्यक्ष श्रीनीवसन यांची कंपनी) आणि इंडिया सिमेंट्सकडे आहे.
२०१३च्या आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या मालकांच्या सहभागामुळे दोन वर्षांचं निलंबन स्विकारावं लागलं होतं. महेंद्रसिंग धोनी कर्णधार चेन्नईच्या संघाचा कर्णधार आहे. चेन्नईनं आतापर्यंत तीन वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. २०१९ पर्यंत सुपर किंग्जची ब्रँड मूल्य अंदाजे ७३२ कोटी रुपये होती.
एकूणचं जेव्हा केव्हा चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सचे संघ एकमेकांविरोधात मैदानावर येतात. तेव्हा मैदानाबाहेर देखील वातावरण प्रचंड गरम होतं. दोन्ही संघांचे चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर तुंबळ शाब्दिक युद्ध रंगतं. म्हणूनच चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील लढतीला क्रिकेटचा ‘एल क्लासिको’ म्हटलं जातं. (रिअल माद्रिद आणि एफसी बार्सिलोना यांच्यातील डर्बी लढतीला एल क्लासिको म्हटलं जाई).
दोन्ही संघ लीगच्या इतिहासातील सर्वात जास्त यशस्वी संघ आहेत. मात्र, जर पहिल्या सिझनच्या लिलावावेळी लीगचे नियम आडवे आले नसते तर नीता अंबानींनी चेन्नईचा प्राण असलेल्या महेंद्रसिंग धोनीला नक्कीच मुंबईकर केलं असतं. ही गोष्ट सत्यात उतरली असती तर कदाचित आज चित्र वेगळं असतं, यात शंका नाही.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.