आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
व्हेनेझुएला
जिथं निसर्ग आपल्या सहाही ऋतूंची मुक्तहस्ते आणि मापात उधळण करतो, असं वरदान लाभलेल्या काही प्रदेशांपैकी एक. म्हणजे तसा बऱ्यापैकी आपल्या भारतासारखाच देश. पण त्यातूनही एक वरदान म्हणजे कच्च तेल.
पोटातले तेलाचे मोठे साठे ही व्हेनेझुएलाला मिळालेली निसर्गाची देणगी. व्हेनेझुएलाचे तेलसाठे सौदी अरेबियापेक्षाही मोठे आहेत. दक्षिण अमेरिकेत एकेकाळी समृद्धीचे प्रतीक ठरलेला हा देश.
त्यामुळे अर्थातच हा श्रीमंत लॅटिन अमेरिकन देश. देशाची तब्बल 96 % कमाई कच्च्या तेलावर अवलंबून. अशा परिस्थितीत या देशाला नजर लागली नसती तर नवलच…
आता काय परिस्थिती आहे?
- 5 लिटर पाणी 140 रुपये
- दूध 5 हजार रुपये लिटर (आधी 80 हजार रुपये होतं)
- बटाटे 17 हजार रुपये किलो
- ब्रेड 8 हजार रुपये
- एक किलो मांस तीन लाख रुपये
राजकीय संघर्षामुळे एकेकाळी अत्यंत श्रीमंती मिरवणाऱ्या आणि तेलाच्या भांडाराने समृद्ध असलेल्या व्हेनेझुएला देशाची आर्थिक स्थिती आता मात्र पुरती कोलमडली आहे. चलनाची किंमत कागदापेक्षा कमी झाली आहे. आणि दुर्देव म्हणजे इथल्या नागरिकांची सरासरी कमाई केवळ 420 रुपये आहे.
कार्ड पेमेंटची यंत्रेही बंद आहेत. लोकांना खाण्यापिण्याचे पदार्थही खरेदी करणे कठीण बनले आहे. म्हणजेच जर आपण या देशात प्रचंड पैसा घेऊन गेलो, तर आपल्याला फक्त एकवेळा जेवायला मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सुमारे साडेतीन कोटी लोकसंख्येच्या देशाला वीज, पाण्यापासून अन्नाच्या तुटवड्यापर्यंत अनेक समस्यांशी झुंजावं लागत आहे. देशातल्या 24 पैकी 23 राज्यांत दीड महिन्यापासून वीजपुरवठा नाही. गेल्या एक महिन्यात पाच वेळा ब्लॅक आऊट राहिले.
अन्न-पाणी आणि औषधींचा मोठा तुटवडा भासत आहे. यामुळे भूकबळींची संख्या वाढत आहे.
2016 नंतर महागाई 800 टक्क्यांनी वाढली. देशातल्या गुन्हेगारीतही मोठी वाढ झाली आहे. दहापैकी नऊ कुटुंबांकडे जगण्यासाठी अन्नच नाही, अशी परिस्थिती आहे. कुपोषणामुळे मुलांच्या मृत्यूदरात वाढ झाली आहे. चिकुनगुनियासारख्या साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. औषधांचा पुरवठा होत नसल्याने रुग्णसेवा बंद आहे. बाजारपेठांमधील दुकाने रिकामी पडली आहेत. एखाद्या दुकानात खाण्याच्या वस्तू दिसल्या, तर भूकेल्या नागरिकांनी अशी दुकाने लुटल्याचे प्रकार घडले आहेत. रेशन कार्ड असलेल्या नागरिकांना सरकारकडून अन्नाची पाकिटे वाटली जात आहेत.
कशामुळे झालं सगळं?
व्हेनेझुएला म्हटले की समोर नाव येतं अर्थात ह्युगो चावेझ यांचं. हुकुमशहीचा आरोप झालेल्या चावेझ यांच्या काळात देशात स्थैर्य होते. चावेझ यांचे 2013 मध्ये निधन झालं, आणि निकोलस मडुरो यांनी देशाची सूत्रे हाती घेतली. मडुरो यांनाही परिस्थिती हाताळता आली नाही. मात्र, व्हेनेझुएलाच्या सध्याच्या आर्थिक संकटाची बीजे चावेझ यांच्या राजवटीतच रोवली गेली.
व्हेनेझुएलाच्या निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी 95 % वाटा तेलनिर्यातीचा आहे. चावेझ यांनी व्हेनेझुएलातील सरकारी तेल कंपनीचा कारभार आपल्या ताब्यात घेतला होता. या सरकारी तेल कंपनीने देशाच्या मध्यवर्ती बँकेकडे नफ्यातील काही हिस्सा देण्याची तरतूद होती. चावेझ यांनी बँकेला असा वाटा देण्याचे बंद केले. तेल कंपनीत स्वत:च्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. कंपनीच्या उत्पन्नातून आपल्या आवडीच्या योजनांसाठी निधी वळवला.
तेलाचे दर प्रति बॅरल शंभर डॉलरच्या वर होते. तेव्हा काही अडचण नव्हती. मात्र, 2014 मध्ये नंतर बाजारात तेलाच्या दरांमध्ये घसरण झाल्यानंतर व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेला झटके बसायला सुरुवात झाली.
व्हेनेझुएलन बोलिव्हर हे तिथलं चलन. अध्यक्ष निकोलस मडुरो यांनी डिसेंबर 2016 मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेतला. आणि त्यानंतर गेल्या दोन वर्षांत तेलाच्या किमती घटल्याने व्हेनेझुएलाचे उत्पन्न घटत गेले. त्यामुळे चलनाचं इतकं अवमूल्यन झालं, की अनेक नागरिकांनी या नोटा कचऱ्यात फेकून दिल्या. महागाई, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य यांच्या तुटवड्यामुळे जनतेचे जगणे मुश्कील झाले. पैशासाठी नागरिकांना मोठ्या रांगा बँकांसमोर लागत आहेत.
त्यातच 2018 च्या मे महिन्यात इथं निवडणुका झाल्या. आणि इथं एका नवीन नायकाची भर पडली… विरोधी नेते जॉन गोइडो.
एकतर ह्या निवडणूकांवर सगळ्यांनी बहिष्कार घातला होता. तशातही निवडणूक घेऊन निकोलस मडुरो पुन्हा अध्यक्ष झाले. सगळ्यांनी याचा विरोध केला.
अमेरिका आणि इतर तेलासाठी हापापलेल्या देशांनी जॉन गोइडो यांना पाठिंबा दिला, आणि ह्या देशांच्या हस्तक्षेपामुळे गोइडो ह्यांनी स्वतःचा अध्यक्ष म्हणून राज्याभिषेक करून घेतला. अर्थात माडुरोंनी त्यांना अटक केली.
राष्ट्रप्रमुखाची हुकुमशाही वृत्ती, देशांतर्गत परिस्थितीला परदेशी शक्तींचा अक्षम्य हस्तक्षेप, नोटाबंदीसारख्या निर्णयाने अर्थव्यवस्थेचे मोडलेले कंबरडे, सरकारने दडपलेली नागरिकांची आंदोलनं, एकजुटीअभावी कमकुवत झालेले विरोधी पक्ष अशा गर्तेत व्हेनेझुएला सापडला आहे. आतापर्यंत कोलंबियात सुमारे 10 लाख लोकांनी पलायन केले आहे…
त्यामुळे जगातील सर्वांत मोठे तेलसाठे ताब्यात असू्न खायला मात्र अन्न नाही, अशी अवस्था या देशाची झाली आहे.
राजकीय संघर्ष कितीही टोकाचा असला, तरी तो आपल्या आपल्यातच असायला हवा. परकीयांनी हस्तक्षेप केला, की काय होतं, हे व्हेनेझुएलाकडे बघून कळतं.
नोटबंदीतून आपण अलगद बाजूला पडलो. मागे आपल्याकडे इतक्यातच काश्मीर साठी वेगळा पंतप्रधानाची मागणी झाली आहे, ही खूप वाईट गोष्ट. त्यामुळे किमान व्हेनेझुएलाच्या परिस्थितीकडे बघून तरी आपण शहाणे होऊया.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.