आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
आजपर्यंत माणसाने शोधलेली सर्वांत अदभुद गोष्ट म्हणजे संगणक. एक कम्प्युटर काय काय करू शकतो याची कल्पनाही आपण सध्या करू शकत नाही. कारण कम्प्युटर्सच्या संशोधनाआधीही कोणत्याही मानवाने असा काही शोध या पृथ्वीवर लागेल असा विचारही केला नव्हता. आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सर्वांना चिंतातुर केलं आहे. कम्प्युटर्स सोबतच असे अनेक आश्चर्यकारक शोध अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात लागले.
पण माणसाच्या कुतूहलाचा सर्वश्रुत मुद्दा म्हणजे भविष्यवाणी. जगाच्या सगळ्याच भागात विविध प्रकारे भविष्य सांगण्याचे शास्त्र किंवा तंत्र विकसित झाले आहेत. भारतात अशाच शास्त्राला ज्योतिषशास्त्र म्हणून ओळखले जाते. भविष्याचा वेध घेऊन आताच सावध होणे सगळ्यांनाच सोयीचे ठरते. आजवर भविष्याचा वेध घेण्याचे अशा प्रकारे अनेक प्रयत्न झाले. जगातील प्रत्येक संस्कृतीत भविष्याचा वेध घेण्यासाठी विशिष्ट शास्त्र किंवा गणिती आकडेमोड सांगितली आहे.
इतकंच काय तर भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आयझॅक न्यूटननेही भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला होता. सन १७०४ साली, न्यूटनने इसवी सन २०६० या वर्षाच्या आसपास (किंवा नंतर, पण आधी नाही) जगाच्या समाप्तीचा अंदाज लावला आहे. गणितीय गणनेची एक विचित्र मालिका वापरून त्याने हा अंदाज लावला. यालाच त्याने “निसर्गाचे पुस्तक” म्हटले.
अशी भविष्यवाणी नेहमीच ख्रिश्चन धर्मात मध्यवर्ती राहिली आहे. तथापि, न्यूटनच्या मते, मॅथ्यू स्टॅन्ली सायन्समध्ये लिहिल्याप्रमाणे, “आधुनिक भौतिकशास्त्र आणि खगोलशास्त्राचा पाया घालणे हे म्हणजे फक्त एक झलक होती. खरंतर प्राचीन शास्त्रांचा उलगडा करणे आणि ख्रिश्चन धर्माचे स्वरूप उघड करणे आहे हे त्याचे महत्वाचे कार्य होते.”
न्यूटननंतरही सुमारे तीनशे वर्षांहून अधिक काळानंतर, जगात अजूनही बायबलच्या सूत्रावर अभ्यास करून जगाच्या समाप्तीची भविष्यवाणी करणारे बरेच ख्रिश्चन धर्मगुरु आहेत. परंतु अलीकडच्या काळात त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अनेक शास्त्रज्ञांनी देखील जगाच्या समाप्तीची भविष्यवाणी केली आहे. त्यांच्यामते लोकसंख्या वाढ, घटते संसाधन आणि हवामान बदल यांमुळे जगाची समाप्ती जवळ आली आहे.
वैज्ञानिक भविष्यवाणी प्राचीन ग्रंथ किंवा ब्रह्मज्ञान इत्यादी गोष्टींवर आधारित भविष्यवाणी करीत नाहीत, किंवा जगाच्या समाप्तीसाठी चांगल्या आणि वाईट दरम्यानच्या अंतिम लढायांना कारणीभूत मानत नाहीत. विज्ञान क्षेत्राच्या मते, रोग आणि तद्वत काही इतर भयानक गोष्टी जगाच्या समाप्तीला कारणीभूत ठरू शकतात, पण या गोष्टी दैवी क्रोधापेक्षा जास्त ‘उत्पादन’ आणि ‘उपभोक्तावादाचे’ संभाव्य घातक परिणाम आहेत. तरीही काही विचित्र कारणांमुळे, विज्ञानक्षेत्र न्यूटनने सांगितलेल्या जगसमाप्तीच्या तारखांशी सहमत आहे.
अशाच एका पर्यावरण शास्त्रज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक असलेल्या ‘डोनेला हेगर मीडोज’ यांच्या नेतृत्वाखालील एमआयटीच्या पर्यावरण संशोधकांच्या टीमने एक सॉफ्टवेअर विकसित केले. ‘वर्ल्ड ३’ हे मूळ सॉफ्टवेअर ‘वर्ल्ड १ सिस्टीम’चेच विकसित व्हर्जन आहे. ‘जय राईट फॉरेस्टर’ हे एमआयटीमधील संगणक अभियांत्रिकीचे प्रणेते आणि एक महान ‘सिस्टीम सायंटिस्ट’ म्हणून ओळखले जातात.
पृथ्वीवर मर्यादित संसाधने आहेत या वस्तुस्थितीच्या आधारावर हे संशोधन होणार होते. जगभरातील वाढीचे भविष्य कसे असेल याचा अंदाज बांधणे हे त्यांचे मूळ लक्ष्य होते. संशोधकांनी १९७० च्या दशकात पाश्चिमात्त्य जगात सादर केलेल्या आकडेवारीच्या आधारे पृथ्वीच्या सर्व संसाधनांद्वारे जग किती लवकर समाप्त होईल हे पाहण्याचा प्रयत्न केला.
‘क्लब ऑफ रोम’ ही अशी संस्था होती ज्यांना हे संशोधन करायचे होते आणि म्हणून या संस्थेने जय राईट फॉरेस्टर यांना “भविष्याचा अंदाज” लावू शकणारी प्रणाली तयार करण्याचे काम सोपवले. क्लब ऑफ रोम ही एक खाजगी संस्था आहे. ही संस्था १९६८ मध्ये जगभरातील उच्च-स्तरीय राजकारण्यांनी आणि उद्योजकांनी बनवली होती. या राजकारण्यांचा हेतू भांडवलशाहीवर भविष्यात काय परिणाम होईल हे जाणून घेण्याचा होता. पण प्रत्यक्ष तसे न दाखवता त्यांनी ‘कारखानदारीचा पर्यावरणावर कसा परिणाम होईल’ हे पाहण्यासाठी या यंत्राची मदत घेतल्याचे भासवून दिले.
जय राईट फॉरेस्टर सह चार माजी विद्यार्थ्यांची संशोधन टीम होती. डोनेला हॅगर मेडोज, डेनिस मेडोज, जॉर्गेन रँडर्स आणि विल्यम बेहरन्स. १९७३ साली या संशोधनात सहभागी झालेले सर्व शास्त्रज्ञ निकालांमध्ये उज्ज्वल भविष्य पाहण्यासाठी उत्सुक होते, परंतु प्रत्यक्षात त्यांनी जे पाहिले ते पाहून हे पर्यावरण शास्त्रज्ञांना धक्काच बसला.
वर्ष २०२० साली जीवनातील बहुतेक श्रेणींमध्ये जगाची वाटचाल विनाशाकडे होत असल्याचे दिसून आले. प्रामुख्याने या श्रेणी म्हणजे: जागतिक लोकसंख्या वाढ, अतिरिक्त उपभोक्तावाद, पुनर्निर्मिती न होणाऱ्या संसाधनांचा अति-वापर, वाढतं प्रदूषण आणि रासायनिक शेतीची मोठ्या प्रमाणात होणारी वाढ.
चार शास्त्रज्ञांनी ‘लिमिट्स टू ग्रोथ’ नावाच्या पुस्तकात हे निकाल जाहीरपणे प्रकाशित केले आहेत. या पुस्तकावर ‘चुकीचा डेटा सादर केल्याबद्दल’ आणि ‘वापरण्यात आलेली प्रणाली चुकीची असल्याने’ प्रकाशन झाल्यानंतर बरीच टीका झाली. एक प्रमुख भविष्यवाणी जी बरोबर होती ती म्हणजे व्हेरिएबलची गणना करणारी प्रणाली. यावरच त्या काळात मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.
यामुळे मानवाच्या विविध कृत्यांद्वारे हवामानात बदल होत असल्याचे मानले गेले. एकदा हवामान बदलाने शिखर गाठल्यानंतर सर्व नैसर्गिक संसाधने हळूहळू कमी होऊ लागतील आणि त्या सोबतच मानवी जीवनातील आरोग्याचा दर्जाही कमी होईल, हे मात्र निकालाने अचूकरीत्या दाखवून दिले. हवामानबदलामुळे असो वा महामारीमुळे, मानवी जीवनातील आरोग्याचा दर्जा मात्र नक्कीच कमी झाला आहे.
आज निकाल पाहता, सॉफ्टवेअरने २०२० साली हवामान बदलाचे शिखर गाठण्याची भविष्यवाणी कशी केली हे अगदी विचित्र वाटण्यासारखं आहे. अंदाज वर्तवलेल्या परिस्थितीमुळे, २०४० च्या जवळपास विविध “मानवनिर्मित” कामांमधून मानवता संपुष्टात येईल, असे या यंत्रणेतून समोर आले आहे. जे लोक या संशोधनाची विश्वसनीयता आणि अचूकतेचे तथ्यांनिशी निश्चितपणे समर्थन करतात त्यांच्यासोबत आपण वाद घालू शकत नाही.
मानवी संस्कृतीला नैसर्गिक संकटांपासून वाचवण्याची वेळ तर निघून गेली आहे. पण निदान या संकटाची तीव्रता आपण कमी करू शकतो. जगभरातील समाजाने आणि राष्ट्रांनी आपले वाद-विवाद बाजूला ठेऊन संयुक्त राष्ट्रसंघाने आखून दिलेल्या शाश्वत विकासाची ध्येय गाठण्याचा प्रयत्न करावा. तसेच ‘मानव’ म्हणून आणि जागतिक राजकारणात ‘जबाबदार देशाचा’ जबाबदार नागरिक म्हणून आपल्यापासूनच पर्यावरण रक्षणाची सुरुवात करायला हवी.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.