आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
पश्चिम बंगाल प्रांतात तेभाग नावाची एक प्रथा पूर्वापार चालत आली होती. या प्रथेनुसार गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जे काही पिक येईल त्याचा निम्मा हिस्सा गावातील जमीनदारांना देणे भाग होते. शेतकऱ्यांकडून घेतला जाणारा हा हिस्सा म्हणजे कर असून त्यावर जमीनदारांचा हक्कच आहे अशी जमीनदारांची समजूत होती.
कधी कधी हे जमीनदार जबरदस्तीने हा कर वसूल करत. एक तर दुष्काळाचे सावट, बी-बियाण्यांची वाढती रक्कम, शेतात करावी लगणारी अंगमेहनत, त्यातून येणारे अपुरे उत्पन्न अशा अनेक अडचणींमुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकातून आपले आणि कुटुंबाचे पोट भरणे मुश्कील असताना हे जमीनदार जबरदस्तीने हा कर वसूल करत आणि वर हा आमचा हक्क आहे असे म्हणत.
जमीनदारांच्या या जाचक रूढीतून सामान्य शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची सुटका करून देण्याच्या हेतूने पश्चिम बंगालमधील नक्षलबाडी गावात एक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शस्त्रास्त्रांचा वापर करण्यात आला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.
गावातून रक्ताचे पाट वाहिले. शेतकऱ्यांच्या या आंदोलानाचे नेतृत्व करत होता कानू सन्याल. परंतु या सगळ्या आंदोलनाचे प्रणेते होते चारू मजुमदार.
१९६८ साली झालेल्या या आंदोलनाने देशात नक्षलवादाचा पाया घातला गेला. या आंदोलनाचे जनक होते चारू मजुमदार.
चारू मजुमदार यांचा जन्म बंगाल प्रांतातील सिलीगुडी येथे १९१८ साली झाला. त्यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते. एका बड्या जमीनदाराच्या घराण्यात जन्म झाला असला तरीही जमीनदारी या शब्दाबद्दलच चारू यांना प्रचंड चीड होती.
जमीनदारीची प्रथा म्हणजे एक राक्षसी प्रथा आहे, असे त्यांचे मत होते. देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी देशाला जमीनदारांपासून मुक्ती मिळवून देण्याचा निश्चय केला. सगळी सुखे पायाशी लोळण घेत असूनही त्यांनी क्रांतिकारी आयुष्य जगण्याचे ठरवले. १९३८ सालीच त्यांनी कॉलेज आणि त्यासोबत शिक्षणालाही रामराम ठोकला.
या क्रांतिकारी आयुष्याच्या प्रवासात चारू मजुमदार यांना अनेकदा जेलवारी करावी लागली. १९६२ साली काही काळ ते तुरुंगात होते.
या शेतकऱ्यांच्या आणि कष्टकरांना मुक्ती मिळवून देण्याच्या चारू मजुमदार यांच्या तत्वज्ञानानेच भारतात नक्षलवादाचा पाया घातला गेला. चारू मजुमदार यांना भारतातील नक्षलवादाचे जनक मानले जाते. चारू मजुमदार यांनी जे काही लिखाण केले त्यातून आजही नक्षलवाद्यांना प्रेरणा मिळते.
चारू यांचे साहित्य म्हणजे जणू नक्षलवाद्यांचे कुराण आणि बायबल आहे. चारू मजुमदार यांनी बंगालमधील प्रत्येक नेत्याचे विचार नाकारले. हे सगळे विद्वान, विचारवंत आणि नेते म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेचे भोई असल्याचा आरोप त्यांनी केला.
चारू यांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा प्रवास कॉंग्रेसमधूनच सुरु केला. सुरुवातीला त्यांनी बिडी कामगारांचे संघटन केले. कॉंग्रेसशी वैचारिक मतभेद झाल्यानंतर त्यांनी माकपमध्ये प्रवेश केला. माकपच्या प्रत्येक आंदोलानात त्यांनी हिरीरीने पुढाकार घेतला. या चळवळीसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले.
१९४८ साली माकपवर बंदी घालण्यात आली तेंव्हाही चारू यांना तीन महिने कारावास भोगावा लागला. परंतु तेभागा आंदोलनाने चारू यांच्या जीवनाला एक नवे वळण लागले. या आंदोलनाने चारू यांचे जीवनच बदलून गेले.
तेभागा प्रथेने बंगालच्या शेतकऱ्यांना जेरीस आणले होते. शेतकऱ्यांच्या मते जमीनदारांनी निम्मा हिस्सा घेण्याऐवजी एक तृतीयांश हिस्सा घ्यावा. परंतु जमीनदार शेतकऱ्यांच्या या मागणीला अजिबात भिक घालत नव्हते. उलट त्यांच्या मते शेतकऱ्यांकडून असा हिस्सा घेणे हा त्यांचा हक्कच होता.
नक्षलबाडी गावात चारू मजुमदार यांच्या प्रेरणेतून उभे राहिलेले आंदोलन यशस्वी झाल्यावर तर चारू शेतकऱ्यांच्या नजरेत हिरोच बनले. यानंतर प्रत्येक गाव याचप्रकारे जमीनदारांच्या कचाट्यातून मुक्त करणे हेच चारू यांनी आपल्या जीवनाचे ध्येय मानले.
नक्षलबाडी गावाला जमीनदारी प्रथेपासून मुक्त करण्यासाठी सशस्त्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनालाच पहिल्यांदा नक्षली आंदोलन म्हटले गेले. हे आंदोलन १९६८ साली करण्यात आले होते. या आंदोलनाच्या अनुषंगाने आणि जमीनदारी प्रथेविरोधात चारू यांनी जे काही लेखन केले त्यामुळेच संपूर्ण प्रदेशात नक्षलवादी चळवळ फोफावण्यास मदत झाली, असे म्हटले जाते.
माकपमध्ये असतानाच चारू यांची ओळख लीला सेनगुप्ता यांचाशी झाली. १९५४ साली दोघांनी विवाह केला. चारू यांच्या या नक्षली चळवळीला लीला मजुमदार यांनीही साथ दिली. लग्नानंतर चारू सिलीगुडीमध्येच कायमचे राहायला गेले.
सिलीगुडीमधील त्यांचे घर म्हणजे, नक्षलवादी कारवायांचे जन्मस्थानच होते. याच घरातून यांनी अनेक आंदोलनांची रूपरेषा आखली गेली. सिलिगुडीतील त्यांच्या या घराचा पत्ता आजही या गावातील प्रत्येक व्यक्तीला पाठ आहे.
महानंदा रोड वरील घर क्रं. २५ हे चारू यांचे राहते घर आज सिलीगुडीतील एक ऐतिहासिक वस्तू बनली आहे. याच घरात बसून त्यांनी ‘आठ ऐतिहासिक दस्तावेज’ लिहिले.
चीनप्रमाणेच भारतातही संपूर्ण क्रांती घडवून आणणे हेच चारू मजुमदार यांचे स्वप्न होते. आपल्या सहकाऱ्यांसह त्यांनी चीनमध्ये जाऊन माओची भेट देखील घेतली होती. १९६९ साली चारू यांनी ऑल इंडिया कोऑर्डिनेशन कमेटी ऑफ़ कम्युनिस्ट रेवोल्यूशनरीजची स्थापना केली. ते स्वतः या संघटनेचे सचिव होते.
१९७१ साली चीनसोबत युद्धाला तोंड फुटल्यानंतर पोलीस अगदी हात धुवून चारू मजुमदारच्या मागे लागले. चारू मजुमदार तेंव्हा कलकत्त्यात लपून बसले होते. कोणीही त्यांची माहिती देण्यास पुढे येत नव्हते.
खरे तर त्यांच्या बऱ्याच सहकाऱ्यांना त्यांची सगळी माहिती होती. परंतु कोणीही पोलिसांना मात्र खरी माहिती देत नव्हते. शेवटी, पोलिसांनी चारू यांच्या एका जवळच्या नातेवाईकाला पकडले. त्याला पोलीस कस्टडीत प्रचंड यातना दिल्या. तेंव्हा कुठे त्याने चारूंचा खरा पत्ता पोलिसांना दिला.
चारू पोलिसांच्या हाती लागल्या नंतर पोलिसांनी त्यांचे प्रचंड हाल केले. लाल बाजारमधील पोलीस स्टेशन म्हणजे नक्षलवाद्यांसाठी नरकच होता. त्याकाळी हे पोलीस स्टेशन नक्षल टॉर्चरसाठीच प्रसिद्ध होते.
पोलिसांनी कस्टडीत असताना चारू यांना कुणालाही भेटण्याची परवानगी दिली नाही. वकिलामार्फत कोर्टात केस दाखल केली नाही. कोर्टात त्यांच्या विरोधात सुनावणीही होऊ दिली नाही.
पोलिसांनी त्यांना इतक्या यातना दिल्या की पोलीस कस्टडीत असतानाच चारू मजुमदार यांचे निधन झाले. विशेष बाब म्हणजे चारू यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यासही पोलिसांनी नकार दिला. त्यांनी स्वतःच चारुंच्या पार्थिव देहाचे दहन केले.
चारू यांनी लिहिलेले साहित्य मात्र आजही नक्षलवादाला खतपाणी घालण्याचे काम करत आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.