आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब
देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविषयी कोणाला माहिती नाही? महात्मा गांधींना सर्व बापू म्हणून संबोधित करायचे. महात्मा गांधींना सर्वप्रथम बापू म्हणून चंपारणमध्ये संबोधित करण्यात आले होते. त्यांना बापू हे संबोधन देणारी व्यक्ती कुठली प्रसिद्ध व्यक्ती नव्हती. एका साधारण व्यक्तीने त्यांना सर्वप्रथम बापू म्हटले होते. राजकुमार शुक्ल असे त्या व्यक्तीचे नाव होते. ते साधारण शेतकरी होते. आज त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत..
राजकुमार शुक्ल हे इंग्रजांच्या जाचाला कंटाळले होते. शेतकऱ्यांचे दुःख त्यांच्याकडून बघितले जात नव्हते. पदोपदी इंग्रज शेतकऱ्यांवर कर लावून त्यांचे शोषण करत होते. कर न देणाऱ्या शेतकऱ्यांवर इंग्रज अत्याचार करायचे. इंग्रज गरिबांच्या तोंडचा घास पळवून आपल्या तिजोऱ्या भरत होते. गरीब शेतकरी आणि मजूर यांना त्यांच्या या शोषणाच्या विरोधात आवाज उठवण्याचे देखील स्वातंत्र्य नव्हते.
इंग्रज शेतकऱ्यांना जबरदस्ती नीळ उत्पादन करायला लावत होते. परंतु यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत होते. रासायनिक रंगांच्या वाढत्या मागणीमुळे निळीची मागणी घटली होती. असं असलं तरी इंग्रज जबरदस्तीने शेतकऱ्यांना नीळ उत्पादन करायला लावत होते. शेतकऱ्यांना हा आर्थिक बोजा परवडत नव्हता, एकीकडे पैसे निळीचे कारखाने बंद होत असताना सरकार अशाप्रकारे अतिरिक्त उत्पादन करून शेतकरी वर्गाचे एवढे शोषण करत होते, यामुळे शेतकरी वर्ग पिचलेला होता.
यात भरीस भर म्हणजे जमिनीच्या मालकांनी शेतकऱ्यांना पैसे देण्यास नकार दिला. यामुळे शेतकरी पेटून उठले आणि त्यांनी एक मोठे जनांदोलन उभे केले, ज्याचे नेतृत्व राजकुमार शुक्ल करत होते. १९१४मधे इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात जुलूम करण्यास सुरुवात केली. यामुळे शुक्ल यांनी महात्मा गांधींना चंपारणला बोलविण्याचा निर्णय घेतला.
त्यांनी २७ फेब्रुवारी १९१७ ला गांधीजींना एक पत्र लिहिले त्या पत्रात त्यांनी चंपारणमधे इंग्रज सरकार शेतकऱ्यांवर ज्याप्रकारे जुलूम करत आहेत, त्याचे वर्णन केले होते. त्यांना आशा होती महात्मा गांधींकडे शेतकऱ्यांच्या समस्येवर समाधान नक्की असेल.
गांधीजींना पत्र मिळाले आणि त्यांनी यानंतर चंपारणमधील शेतकरी वर्गाच्या मदतीला जाण्याचा निर्णय घेतला. १५ एप्रिल १९१७ ला महात्मा गांधी यांचे चंपारणमधे आगमन झाले. चंपारणमधे आल्यावर शेतकऱ्यांची दुरावस्था बघून गांधीजींनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्यांनी सत्याग्रह आंदोलन छेडले. इंग्रजांना गांधीजींचे हे पाऊल आवडले नाही, त्यांनी गांधीजींना तात्काळ परतण्यास सांगितले. परंतु गांधी मागे हटले नाहीत. इंग्रजांनी सक्तीने या विरोधात पाऊले टाकण्यास सुरुवात केली.
१८ एप्रिल १९१७ साली गांधीजींना तत्कालीन एसडीओच्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. इथे गांधीजींना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
गांधीजी तुरुंगात असले तरी त्यांच्या लढा सुरु होता. गांधीजींचा वाढत प्रभाव इंग्रजांना सहन होत नव्हता. गांधीजींना रस्त्यातून बाजूला करण्याचा त्यांचा डाव होता. त्यावेळी गोऱ्यांच्या आंदोलनाच्या विरोधात राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद, आचार्य कृपलानी आणि अनुग्रह नारायण सिंह महात्मा गांधींसोबत चंपारण येथे येऊन पोहचले.
इंग्रजांनी त्यांच्या दुधात विष कालवण्यासाठी आचाऱ्याला पैसे दिले. गांधीजींच्या दुधात विष कालवण्यात आले. पण आचाऱ्याने ही बातमी गांधीजींच्या कानावर घातली. यामुळे गांधीजींचे प्राण वाचले, परंतु आचाऱ्याला यामुळे दंड भरावा लागला.
शेतकऱ्यांची दुर्दशा बघून महात्मा गांधी चंपारणला आले. इथूनच त्यांना नवीन ओळख मिळाली. ज्यावेळी महात्मा गांधींनी चंपारण सत्याग्रहाला सुरुवात केली, त्यावेळी राजकुमार शुक्ल यांनी त्यांच्या या कार्यात महत्वपूर्ण योगदान दिले. जर गांधीजींना राजकुमार शुक्ल यांनी बोलावले नसते तर तेथील शेतकऱ्यांना कधीच न्याय मिळाला नसता. चंपारण येथे महात्मा गांधींनी इंग्रजांच्या सत्तेविरोधात बंड पुकारले होते त्यावेळी त्यांना राजकुमार शुक्ल यांनी सर्वप्रथम बापू म्हणून संबोधित केले होते. यानंतर त्यांना सर्वच बापू म्हणू लागले आणि त्यांचे नाव विश्वविख्यात झाले.
सतवारिया गावचे रहिवासी राजकुमार शुक्ल कोमल हृदयी होते. शेतकऱ्यांवर होणारा अन्याय त्यांना सहन होत नव्हता. त्यांनी अनेकवेळा इंग्रजांच्या विरोधात बंड पुकारले पण इंग्रजांनी त्यांच्यवरच आरोप केले. एकदा इंग्रजांनी विरोध करण्याची शिक्षा म्हणून शेतात लावलेल्या बटाट्यांच्या पिकाची नासधूस केली होती. राजकुमार यांनी गांधीजींना फक्त चंपारण नाही, तर बिहारच्या आसपासच्या अनेक भागात फिरून तेथील समस्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.
इंग्रज ज्याप्रकारे सामान्य शेतकरी वर्गाचे शोषण करत आहेत, हे बघून गांधीजी व्यथित झाले. त्यांनी इंग्रजांचा विरोध करण्यास सुरुवात केली होती. इंग्रजांनी गांधीजींना मार्गातून हटवण्याचा प्रयत्न केला पण उलट घडले आणि गांधीजी राष्ट्रीय स्तरावर अजून लोकप्रिय झाले.
शेवटी इंग्रजांना राजकुमार आणि इतर शेतकऱ्यांचा मागण्या मान्य कराव्या लागल्या. राजकुमार शुक्ल या व्यक्तीने महात्मा गांधींना राष्ट्रीय राजकारणात आणले होते. चंपारण सत्याग्रहानंतर महात्मा गांधींना तत्कालीन भारतीय राजकारणात मोठे महत्त्व प्राप्त झाले होते.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा: फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.