आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
भारतात मराठ्यांचा साम्राज्य विस्तार झपाट्याने होत होता, सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रापुरते मर्यादित असलेले स्वतंत्र, सार्वभौम मराठा साम्राज्य अटकेपार पसरले होते, जिथवर नजर जाईल तिथवरचा मुलुख आपलाच असे ही मराठा सैनिक अभिमानानं सांगायचे.
मराठा सल्तनतीच्या लाखो मर्द मावळ्या सैनिकांनी यासाठी कष्ट घेतले होते, प्राणाची बाजी लावत मराठा साम्राज्याच्या हद्दी वाढवून अखंड भारतावर भगवा फडकावण्याचा प्रण केलेल्या शूरवीर सरदारांपैकी होते श्रीमंत सरदार दत्ताजी शिंदे.
रुबाबदार चेहरा, पिळदार मिश्या, डोक्यावर सरदार पगडी, पहाडी आवाज आणि डोळ्यात दिल्लीच्या तख्तावर फडकणारा भगवा असा राजबिंडा त्यांचा पेहराव होता.
दत्ताजी शिंदे म्हणजे राणोजी शिंद्यांचे धाकटे चिरंजीव तर महादजी शिंद्यांचे सावत्र भाऊ. शिंद्यांचे संपूर्ण कुटुंबच स्वराज्याच्या सेवेत होते. दत्ताजींनाही हा वसा आपल्या कुटुंब कडूनच मिळाला.
दत्ताजी तसे बालपणापासून चतुर होते. तलवारबाजी, दांडपट्टा हा त्यांचा आवडीचा छंद. वयात आल्यानंतर आपल्या वडील आणि बांधवांप्रमाणे दत्ताजी मराठा सैन्यात दाखल झाले. मराठा साम्राज्यासाठी आपले प्राण गेले तरी बेहत्तर, पण भगवा अभिमाने डोलत रहायला हवा हा त्यांचा कटाक्ष असायचा.
दत्ताजी तसे रणमर्द गडी, त्यांच्या पराक्रमाची एक ओळख झाली ती कुकडीच्या लढाईत, या लढाई दरम्यान मराठा साम्राज्याच्या ११ असामींनी निजामाच्या हत्तीवर नियोजनपूर्ण चाल करून त्या हत्तीसह अंबारी खाली पाडली होती. डोलाची अंबारी. तीही फक्त ११ जणांनी मिळून पाडली ही खबर जेव्हा पसरली तेव्हा निजाम दरबारी सगळ्यांचा तिळपापड झाला.
त्यानंतर निजाम उपद्रव करू लागला, याला आळा घालण्यासाठी श्रीमंत पेशव्यांनी दत्ताजी शिंदे यांना सेनापती नेमले आणि विश्वासरावांसह शिन्द्खेड्याला निजामावर चाल करून पाठवले.
आपल्या नेतृत्व व कर्तृत्वाची चुणूक दाखवत दत्त्ताजीने निजामांना पळता भुई थोडी करत त्यांचा पराभव केला. आणि जवळपास २५ लक्षांचा प्रांत आणि नळदुर्गचा किल्ला स्वराज्यात मिळवला.
दत्ताजीचा थोरले भाऊ जयाप्पा शिंदे हे मारवाड प्रांताचा राजा बिजेसिंग याच्यावर चाल करून गेले, अर्थातच दत्ताजी देखील त्यांच्या सोबतच होते. या यु*द्धात जय्याप्पाचा खू*न झाला पण दत्त्ताजी खचले नाहीत त्यांनी उलट प्रयत्न व वीरतेचा कस लावत बिजेसिंगाला धूळ चारली.
संपूर्ण मारवाडवर वर्चस्व स्थापन करत त्याचा तिसरा हिस्सा मराठा साम्राज्यात सामाविष्ट केला. शिवाय ५ कोटींपेक्षाही अधिकची खंडणी वसूल करून मराठ्यांच्या खजिन्यात जमा केली.
मराठा साम्राज्याच्या विस्तार हा पेशव्यांच्या काळात झाला, पण पेशव्यांनी आपली निष्ठा कायम राखत राजधानी सातारलाच स्वामी मानले. पेशव्यांनी मराठा साम्राज्यासाठी अनेक शूरवीर सरदार नेमले ज्यात महादजी शिंदे, मल्हारराव होळकर असे एक ना अनेक वीर होते.
सेनापती म्हणून नेमलेल्या दत्ताजी शिंद्यांवर पेशव्यांना अतीव विश्वास होता.अर्थात दत्ताजीही पेशव्यांनी दाखवलेला विश्वास आपल्या कर्तव्यातून सार्थकी लावत होते. पेशव्यांचा ‘दत्ताजी चित्तावर धरील ते करील’ असा भरवसा होता.
याच विश्वासामुळे पेशव्यांनी पानिपतच्या यु*द्धाची जबाबदारीसुद्धा दत्ताजीच्या खांद्यावर दिली होती. स्वामींनी दिलेला आदेश शिरसावंद्य मानत दत्ताजी, विश्वासराव व सदाशिवराव भाऊ पानिपतकडे कूच करत होते.
दिल्ली मराठ्यांच्या ताब्यात आहे तोपर्यंत इस्लामी राजवटीचा विस्तार होणे शक्य नाही हे जवळपास सर्वच मुस्लिम राजांना उमगले होते. अखेर मराठ्यांचा कायमचा बंदोबस्त करायचा या उद्देशाने नजीब खान रोहिल्ला व त्याच्या सहकारी मुस्लीम सरदारांनी अब्दालीला हा विषय कळवला.
अब्दाली येईपर्यंत मराठ्यांना खेळत ठेऊन ऐनवेळी त्यांच्यावर ह*ल्ला करण्याचा बेत मुस्लिम सरदार आखत होते. पण नजीबकडून येणारा संदेश, त्यात वारंवार होणारा बदल व वाढत जाणारा वेळ यामुळे नजीबच्या मनात काहीतरी काळबेरं आहे हे दत्ताजींनी ओळखले.
नजीबचा बंदोबस्त करायचा हे मनाशी ठरवून दत्ताजींनी नजीबर चाल करून जाण्याचे ठरवले आणि यशस्वीपणे चाल करत नजीबला शुक्रतालहून गंगेच्या तटापर्यंत रेटले. बरेच मराठा सैनिक जखमी झाले पण मराठ्यांनी प्राण हरले नाहीत.
मुस्लिम सरदार नजीब खान रोहिला व शहा शुजा यांनी ठरल्याप्रमाणे दत्ताजींंच्या मराठा सैन्याला अब्दाली येईपर्यंत अडकवून ठेवले.
समोर नजीब आणि मागे अब्दालीचे सैन्य अशा कात्रीत दत्ताजींंची तुकडी सापडली. मराठा सैन्य डगमगले नाही, त्यांनी शत्रुवर तुटून पडत अस्मान दाखवण्याचा पण केला. मराठा सैनिक तुटून पडले पण आपल्या सैन्याकडे केवळ तलवारी होत्या, आणि समोरच्या अफगाणी सैन्याकडे बंदुकी, तोफा. त्यामुळे त्यांचे भेदक मारे मराठा सैन्यावर होत होते.
अखेर जीवाची बाजी लावत सेनापती दत्ताजी मैदानात उतरले. आपल्या घोड्यावर स्वार होऊन कात्रीने कापड कापावे तसा तलवारीच्यापातीने एक एक शत्रू कापत पुढे जात होते. पण पराभवाचे भय असल्याने नजीब व कुतुबशाहने दत्ताजींंच्या पाठीवर मोठा दगडी गोळा डागला.
एखादा पहाडी हत्ती कोसळावा तसा दत्ताजी खाली कोसळला. रक्तबंबाळ झालेल्या दत्त्ताजींंच्या जवळ जाण्याची हिम्मत अजूनही नजीब व कुतुबशाहमध्ये नव्हती. अखेर दताजी जखमी झाला आहे हे पाहून कुतूब त्याच्या जवळ गेला.
नंतर दत्ताजींच्या डोक्यावरील पगडी हटवून त्याच्या केसांना पकडून दत्ताजींच्या डोळ्यासमोर भाला रोखत विचारलं “क्यो पाटील, और लढोगे?” मराठा सल्तनतीचं स्वप्न त्या वीराच्या मनात तेवत होतं. त्याने तेवढ्याच रुबाबात उत्तर दिले,
क्यूँ नहीँ, बचेंगे तो और भी लढेंगे.
कुतुबशाहला राग अनावर झाला त्याने दत्ताजींवर गोळी झाडली आणि त्यांच्या छातीवर बसून तलवारीचे वार करत, त्यांचा गळा कापला. आणि शीर घेऊन ते नाचवत अब्दालीकडे गेला.
मराठा सैन्याचं खच्चीकरण होऊ नये यासाठी काही मराठा सैनिकांनी यांचे धड लपवून ठेवले. रात्रीच्या अंधारात जखमी झालेले व प्राण वाचवून बसलेले मराठा सैनिक बाहेर आले त्यांनी मोडकळीस आलेल्या तोफांचे अवशेष एकत्र करून सरण रचले व कफन म्हणून दत्ताजींच्या अंगावर झाकण्यासाठी स्वतःची धोतर दिली. रात्रीचा अंधार आणि समोर धारार्तीर्थी पडलेल्या आपल्या सेनापतीचा मृतदेह! डोळ्यात अश्रू घेऊन, मराठा सैनिकांनी दत्त्ताजींचे अंत्यसंस्कार केले.
पुढे पानिपतच्या यु*द्धात मराठ्यांचा पराभव झाला. अनेकांनी या यु*द्धाचे वर्णन मराठ्यांच्या पराजयातील असामान्य विजय असेही वर्णन केले. मराठा साम्राज्याची कधी न भरून निघणारी हानी झाली. अनेक शूरवीर सरदार यात मारले गेले.
पानिपतानंतर मराठा साम्राज्याला जणू ग्रहणच लागले. या यु*द्धात तरुण तडफदार पेशवे विश्वासराव कामी आले. पुण्यासह मराठा साम्राज्यावर शोककळा पसरली. दत्ताजी शिन्द्यांसह तुकोजी शिंदे, जनकोजी शिंदे, येसाजी शिंदे, संभाजी शिंदे, मानाजी शिंदे, रवलोजी शिंदे असे शिंदे घराण्यातील वीर कामी आले होते. एकमेव महादजी शिंदे तेवढे वाचले. त्यांनीच पुढे नजीब खानाची कबर फोडून त्याची हाड इतरत्र फेकून “आज दत्ताजींचा आत्मा समाधानी झाला असेल” असे उद्गार काढले.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील कान्हेरखेड येथे या सर्व शिंद्यांचे एक स्मारक १६ खंबी आजही पहावयास मिळते. मराठा साम्राज्याचे सेनापती बाजिंदा लढवय्या दत्त्ताजी शिंदे याचं कर्तृत्व अजरामर आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.