आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारतावर आलेल्या परकीय आक्र*मणांनी स्थानिक जनतेवर केलेले अ*त्याचार सर्वश्रुत आहेत. अशाच दोन परकीयांमधील सत्तेच्या हव्यासापोटी झालेले अनेक संघर्षसुद्धा मूळ भारतीयांनी पहिले. यापैकी गाजलेला संघर्ष म्हणजे बंगालचा नवाब सिराज-उद-दौलाह आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीमधील संघर्ष.
याच संघर्षाचे रूपांतर पुढे प्लासीच्या लढाईत झाले आणि या प्लासीच्या ‘कथित’ लढाईने हिंदुस्थानचा इतिहासाच बदलून टाकला. (‘कथित’ लढाई कारण, सिराजवर लढण्याची वेळच आली नाही.) फितूर झालेल्या मीर जाफरने सिराजचं सगळं सैन्य ईस्ट इंडिया कंपनीच्या बाजूने वळवलं होतं.
१७५६ साली ईस्ट इंडिया कंपनीने आणि काही निवडक फ्रेंचांनी कलकत्त्यामध्ये एक व्यापारी किल्ला उभारला होता. हा किल्ला मूळ भारतीयांपासून आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीपासून बंदराचे रक्षण करण्यासाठी बांधण्यात आला होता. भारतीयांना, मोगलांना आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिशांचे येथील अस्तित्व मान्य नव्हते.
या किल्ल्याच्या बांधकामामुळे मोगल अधिपत्य असलेल्या बंगालच्या सुभ्याचे सार्वभौमत्व धोक्यात आले होते. सिराज-उद-दौलाने फ्रेंच आणि ब्रिटीशांनी किल्ल्याचे बांधकाम थांबवण्याचा आदेश दिला. इंग्रजांनी साफ नकार दिला तर फ्रेंचांनी त्याचे पालन केले. इंग्रजांनी नकार देऊन फार मोठी चूक केली होती.
नागपूरच्या राघोजी भोसल्यांच्या भास्करराम कोल्हटकर नावाच्या सेनानीने मोगली बंगाल सुभ्यावर १७४१ ते १७५१ या सलग दहा वर्षांत अनेक स्वाऱ्या करून ते उ*ध्वस्त केले होते, त्या धक्क्यातून बंगाल सावरतच होते, इतक्यात या ईस्ट इंडिया कंपनीच्या किल्याचे बांधकाम रोखण्यासाठी बंगालचा नवाब सिराज-उद-दौलाहने सुमारे ५० हजाराच्या फौजेनिशी कलकत्त्याकडे कूच केले.
ही बातमी मिळताच ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी किल्ल्यातून पळ काढला. त्यांनी स्थानिक भाडोत्री सैन्याने तयार केलेली चौकी आणि काही लोक किल्ल्यावर ठेवले. किल्ल्यावरील लोकांची संख्या १५० पेक्षा जास्त नव्हती, तर ईस्ट इंडियाचे उर्वरित अधिकारी बंदरात सुरक्षित असलेल्या त्यांच्या व्यापारी जहाजांवर पळून गेले.
याठिकाणी ब्लॅक होल म्हणजे कोणतीही खगोलशास्त्रीय गोष्ट नाही, तर किल्ल्यावर बांधल्या गेलेल्या एका खोलीला हे नाव दिले गेले होते. किल्ल्यावरील ब्लॅक होल सुरुवातीला काही फार उल्लेखनीय गोष्ट नव्हती. साधारण १४ बाय १८ फुटाची ती लहानशी खोली अडगळीचं सामान ठेवण्यासाठी आणि क्वचित प्रसंगी त्रास देणाऱ्या लोकांना डांबून ठेवण्यासाठी बांधली होती. पण ही जागा काही तुरुंग नव्हती. या अंधारकोठडीला फक्त एक दरवाजा आणि दोन लहान खिडक्या होत्या. माणसांना जास्त काळ राहण्यासाठी ती जागा नव्हती. पण या खोलीतील २० जून १७५६ रोजी घडलेल्या घटना खूप भयानक होत्या.
सिराज-उद-दौलाने कलकत्ता काबीज केल्यानन्तर किल्ल्यावरील ब्रिटिशांना आणि त्यांच्या साथीदारांना त्याने गोळा केले. एका प्रत्यक्षदर्शीने बंगाली सैन्याने ताब्यात घेतलेल्या लोकांची संख्या १४६ सांगितली. नवाबाने सर्व १४६ कैद्यांना एका रात्रीसाठी ब्लॅक होलमध्ये डांबण्याचे आदेश दिले. साधारण आजच्या फ्लॅट संस्कृतीतील किचनच्या साईझइतकी ती ब्लॅक होल नावाची खोली होती आणि आता यात सुमारे १५० लोक “कोंबले” जाणार होते.
जूनच्या महिन्यात कलकत्त्याचे तापमान साधारणतः ३४ अंश सेल्सियस असते. त्या दिवशी ब्लॅक होलमध्ये भरलेल्या लोकांपैकी एक हॉलवेल नावाचा ब्रिटन होता. त्याने एक पत्र लिहिले ज्यात भयानक अग्निपरीक्षेची माहिती दिली आहे.
त्यांच्यावर गोळीबार करावा जेणेकरून त्यांना दरवाजे उघडण्यास जागा मिळावी अशी ते रक्षकांना विनंती करीत होते, इतकी वाईट परिस्थिती होती. ब्रिटिशांपैकी फक्त हॉलवेल वाचला कारण त्याचे तोंड खिडकीच्या गजांमध्ये दाबले गेल्याने त्याला बाहेरील ताजी हवा मिळत होती. हॉलवेलच्या म्हणण्यानुसार, १४६ पैकी फक्त २३ जण यातून वाचले.
दुसऱ्या दिवशी सकाळी बंगाली सैन्याने ब्लॅक होलचे दरवाजे उघडले तेव्हा आत डझनभर मृतदेहांचा ढीग होता. भयंकर उष्णता, ताजी हवा आणि पाण्याचा आभाव यामुळे एवढी मोठी जीवितहानी झाली होती. ज्यांना खिडक्या किंवा दरवाजाजवळ स्थान मिळाले नाही त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेबद्दल हॉलवेलचे वर्णन वाचून ब्रिटिशांना आश्चर्याचा धक्का बसला. काही ब्रिटिश इतिहासकार आणि लेखकांच्या मते, याच घटनेचा बदला ब्रिटिशांनी १७५७ च्या प्लासीच्या लढाईत नवाब सिराज-उद-दौलाहला ठार मारून घेतला. यानंतर ब्लॅक होल कधीही कारागृह म्हणून वापरले गेले नाही. त्याचे स्टोरेज रूममध्ये रूपांतर करण्यात आले. ती जागा कलकत्त्यात अजूनही अस्तित्वात आहे आणि मृतांच्या स्मरणार्थ कर्झनने तेथे स्मारकही बांधले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.