आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
संशोधन क्षेत्रात आजही स्त्रियांची संख्या तशी हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच आहे. आपल्याला पहिली भारतीय महिला डॉक्टर, पंतप्रधान, राज्यपाल, वगैरे माहिती आहेत. पण, पहिली भारतीय महिला संशोधक कोण असे विचारल्यास बहुतेकांना याचे उत्तर देता येणार नाही.
१९३६ साली कलकत्ता विद्यापीठातून भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतलेल्या बिभा चौधरी या महिला शास्त्रज्ञांचे नाव क्वचितच कुणाला माहित असेल. पण, सुमारे एका शतकापूर्वी होऊन गेलेल्या या महिला शास्त्रज्ञाने भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली होती. पण, तिच्याबद्दल कोणालाच फारशी माहिती नाही.
आजही डॉ. राजिंदर सिंग,ओल्डेनबर्ग युनिव्हर्सिटी जर्मनी येथील वैज्ञानिक इतिहासकार आणि कलकत्ता येथील बोस इन्स्टिट्यूटचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक सुप्रकाश सी. रॉय यांनी जर या महिला शास्त्रज्ञाच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणारे पुस्तक प्रकाशित केले नसते तर, बिभा चौधरी हे नाव आजही गुप्तच राहिले असते.
शंभर वर्षापूर्वी होऊन गेलेल्या या भारतीय महिला शास्त्रज्ञाची कहाणी जगासमोर आणताना या दोन शास्त्रज्ञांना बऱ्याच वैज्ञानिक नोंदीचा धांडोळा घ्यावा लागला.
बिभा चौधरी यांचा जन्म १९१३ साली बंगाल प्रांतात झाला. १९३६ मध्ये त्यांनी जेंव्हा भौतिकशास्त्रातील पदवी घेतली तेंव्हा त्यांच्या बॅचमधील त्या एकमेव महिला होत्या.
भौतिकशास्त्रात त्यांनी अनेक छोटे-मोठे शोध लावले. त्यांचे शोधनिबंध नेचर अँड प्रोसिंडींग्ज ऑफ द फिजिकल सोसायटी ऑफ लंडन या जर्नलमधून प्रकाशित होत असत.
अमेरिकेतील प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि नोबेल विजेते शास्त्रज्ञ पॅट्रिक स्टूअर्ट ब्लॅकेट यांच्या प्रयोगशाळेत त्या आपल्या पीएचडीसाठीचे संशोधन करत असत. बिभा यांच्या संशोधनातील योगदानाबद्दल बरीचशी माहिती उपलब्ध असली तरी, त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल मात्र तशी फारशी माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य भौतिकशास्त्र आणि संशोधनालाच वाहिलेले असल्याने त्यांचे व्यक्तिगत आयुष्य तसे फारसे उजेडात आलेच नाही. दिवसातील बराच काळ त्या आपल्या संशोधनात आणि प्रयोगशाळेतच व्यस्त असत.
सहा भावंडांच्या जमीनदार घराण्यात जन्मलेल्या बिभा आजन्म अविवाहित होत्या. सर जगदीशचंद्र बोस यांच्या त्या दूरच्या नातलग होत्या.
भौतिकशास्त्रातील पदवी प्राप्त होताच बोस इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून बिभा संशोधनाच्या क्षेत्रात उतरल्या. परंतु, त्यांचा हा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. १९४३ साली त्यांनी देबेन्द्र मोहन बोस यांच्यासोबत मिळून मेसन्सबाबत मुलभूत संशोधन मांडणारे तीन शोधनिबंध प्रकाशित केले. परंतु, एका महिला शास्त्राज्ञासोबत काम करण्यास बोस उत्सुक नव्हते.
त्या काळात युद्धजन्य परिस्थितीमुळे संशोधानास आवश्यक असणारे इमल्शन प्लेट्स उपलब्ध न झाल्याने त्यांना त्यांच्या या संशोधनाचा पाठपुरावा करता आला नाही.
सात वर्षानंतर सीएफ पॉवेल या ब्रिटीश संशोधकाने हीच पद्धत वापरून याबाबतचे संशोधन पूर्ण केले. त्याच्या या संशोधनासाठी त्याला नोबेल पारितोषिकही मिळाले. सीएफ पॉवेल याने बिभा चौधरी यांच्या प्राथमिक संशोधनाचा फायदा झाल्याचेही कृतज्ञतेने कबुल केले.
१९४५ मध्ये बिभा चौधरी यांनी कॉस्मिक रे प्रयोगशाळेच्या संशोधनासाठी अमेरिकेत गेल्या. त्याकाळी जगभरात या विषयावर मोठ्याप्रमाणात संशोधन सुरु होते. नंतर पॅट्रिक स्टूअर्ट ब्लॅकेट यांना याच विषयातील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त झाला.
पीएचडीचे संशोधन पूर्ण होताच बिभा भारतात परत आल्या आणि मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेत रुजू झाल्या. इथे आठ वर्षे काम केल्यानंतर त्या अहमदाबाद मधील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये दाखल झाल्या.
त्यावेळी विक्रम साराभाई पीआरएलचे डिरेक्टर होते. त्यांनी साराभाईशी आपल्या संशोधनाचा विषय आणि त्याबाबतच्या तपशीलवार अराखड्याची चर्चा केली. त्यांना कोलार गोल्ड फिल्ड मध्ये संशोधन करायचे होते. पण, दुर्दैवाने त्यांचा हे संशोधन पूर्ण होऊ शकले नाही. साराभाईशी चर्चा झाल्यानंतर काही कालावधीतच साराभाईचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आलेल्या संबधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या संशोधनाला संमती दिली नाही.
करिअरच्या महत्वपूर्ण अशा दोन टप्प्यांवर बिभा यांना नकार पचवावा लागला, ही अत्यंत दुर्भाग्याची गोष्ट आहे. यावरून महिला संशोधकांना सुरुवातीच्याकाळी कशाप्रकारे भेदभावाला सामोरे जावे लागले असेल याची कल्पना येते. विज्ञानासारख्या पुरुषप्रधान क्षेत्रात महिला संशोधकांना पार कराव्या लागणाऱ्या अडथळ्यांचीही यावरून कल्पना येते.
एकतर त्या काळात संशोधनाच्या क्षेत्रात महिलांचे योगदान अगदीच कमी होते किंवा काहीच नव्हते अशी परिस्थिती असताना बिभा यांनी भौतिकशास्त्रसारख्या विषयात संशोधन करण्याची जिद्द दाखवली होती. जिथे उच्चस्तरीय गणिती कौशल्याची आवश्यकता असते.
असे अनुभव आल्यानंतर बिभा कलकत्त्याला परत आल्या. तिथे त्यांनी अणू-उर्जा भौतिकीचा अभ्यास सुरु केला. सहा इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लीअर फिजिक्स आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टीव्हेशन ऑफ सायन्स या संस्थांसोबतही काम केले. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले संशोधन आणि अभ्यास सुरु ठेवला. त्यांचे अनेक शोधनिबंध प्रकाशित होत राहिले. १९९१ साली कलकत्ता येथे त्यांचे देहावसान झाले.
भारतातील सुरुवातीच्या सर्वच्या सर्व संशोधन संस्थामध्ये काम करूनही बिभा चौधरी हे नाव कधीच समोर आले नाही. त्यांच्या हयातीत त्यांच्या कामाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नाही. परंतु, भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
‘अ जीवेल अनअर्थ्ड : बिभा चौधरी’ या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ राजिंदर सिंग आणि सुप्रकाश सी रॉय यांनी या संशोधकाच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकून येणाऱ्या पिढ्यांसाठी एक अनमोल ठेवा प्राप्त करून दिला आहे. यामुळे आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची तोंडओळख होईल. भारत सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा मरणोत्तर उचित गौरव केला पाहिजे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.