आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
कर्णन आवडलाय? लॉकडाऊनमधे कंटाळलाही असाल. खास पोस्टमनच्या वाचकांसाठी काही भन्नाट चित्रपटांची यादी घेऊन आलोय!
असुरन
कर्णनशी सर्वाधिक साम्य असलेला चित्रपट म्हणजे वेट्रीमरण दिग्दर्शित धनुषचा असुरन. सिवासामी दलित बहुल वस्तीत राहून शेती करत असतो. पण इथल्याच सवर्ण वस्तीतील जमीनदाराला यांची जमीन फॅक्ट्रीसाठी हवी असते. यातून वाढलेल्या वादात सीवासामीचा मुलगा जमीनदाराच्या मुलावर जीवघेणा हल्ला करतो. जमीनदाराची लोक मग या परिवाराच्या मागावर येतात.
जंगलात दडून प्रतिकार करणाऱ्या वडिलांच्या पात्राची अशीच एक कथा तरुण वयातील कथा असते. त्यालाही असंच झगडावं लागलं होतं, प्रसंगी परिवारातील लोकांना गमवावं लागलं होतं. स्वतंत्र भारतातही जंगलाप्रमाणे Powerful आणि powrless यांच्यातला संघर्ष एकांगीच असतो.
इथे जात ही पण एक पॉवर असते, “पॉवरलेस” खालच्या जातीचा असेल तर फक्त त्यामुळे वाढणारा अपमान भयंकर असतो.
सिवासामीची कसाबसा स्वतःच्या संघर्षातून बाहेर पडला होता तरी त्याच्या पुढच्या पिढीला तेच सहन करावं लागलं. यातून जातीभेद संपण्याचा प्रवास किती लांब पल्ल्याचा आहे हे कळतं. पण त्याच्या संघर्षातून, पलटवार करण्याच्या धाडसी प्रयत्नातून प्रेरणा ही मिळते. हॉंटिंग म्हणावी लागेल अशी सिनेमॅटोग्राफी, धनुषचा उत्तम अभिनय, वेट्रीमरणने यात भरलेले बारकावे यासाठी हा सिनेमा नक्की बघा.
वाडा चेन्नई
धनुष आणि दिग्दर्शक वेट्रीमरन या जोडीने बनवलेले असुरन, विसरनाई हे सिनेमे खुप गाजले, अगदी ऑस्करस्ला नामांकन मिळविण्याच्या स्पर्धेपर्यंत. पण त्यांचा वाडा चेन्नई हा सिनेमा फक्त समीक्षकांनाच नाही तर सामान्य प्रेक्षकांनाही खूप आवडला.
एका झोपडपट्टीमधल्या लोकांमधे काम करणारी एक गॅंग आणि त्या आसपासचं गुन्हेगारी विश्व या अत्यंत छोट्या जगातली ही भयंकर रंजक गोष्ट.
यातलं प्रत्येक पात्र एकार्थाने स्वतःच्या नजरेत हिरो असतं, प्रत्येकजण आहे ती ताकद राखून जास्तीत जास्त नियंत्रण मिळवायला झगडत असतो. वरवर दिसणाऱ्या शांततेच्या आत चालणाऱ्या खलबती, कट, संथ हालचाली यातून काहीतरी भयंकर होणार असा सस्पेन्स पूर्णवेळ आपल्या डोक्यात फिरत असतो. भल्या माणसाचं काम पुढे सुरू ठेवण्याची संधी, तशी इच्छा असणाऱ्या प्रत्येकाला असते, आणि हिम्मत करणारा ती मिळवूसुद्धा शकतो, असं या कथेचा सार सांगता येईल. पण कथेची ठेवण ही पॉवर गेम, फसवाफसवी, विनोदी वाटणारा झोपडपट्टीमधला रोमान्स आणि गरिबीतील लोकजीवन अशी आहे.
कथेतील पॉवर सेंटर्स अनेकदा बदलतात, अनपेक्षित पात्र समोर येतात, यातून अत्यंत वळणावळणाचा दर्जेदार सिनेमा आपल्या वाट्याला येतो.
गँग्स ऑफ वासेपुर नंतर असा गॅंग वॉर प्रकारातला वाडा चेन्नई हा सर्वोत्तम सिनेमा असेल. हा सिनेमा युट्युबवर हिंदीत हिंदीत उपलब्ध आहे. कर्णनप्रमाणे यातही एका टोळी विरुद्ध एक सामान्य असा झोपडपट्टीतील एकाच वर्गातला अंतर्गत संघर्ष आहे.
फँड्री
कर्णनमधे आपला नायक स्वतः हातात तलवार घेऊन लढायला उतरतो आणि त्या संघर्षाचा शेवट करतो. फँड्रीचा शेवट मात्र जब्याने प्रथमच बंधन तोडून विद्रोह करायचं ठरवलं तिथे होतो. कर्णनमधला नायक गोष्टी बदलतो पण फँड्रीमधलं लेकरू जणू मरत मरत जगण्यापेक्षा एक शेवटचा दगड मारून मरणं पसंत करतं.
गावाबाहेरच्या एका झोपडीत राहणारं जब्याचं कुटुंबं गावात पडेल ते काम करत असतं. पोटासाठी गावकऱ्यांचा अपमान सहन करणं, चालत आलंय ते मान खालून जगणं शाळकरी जब्याला पटत नसतं.
बालपणीचं पहिलं प्रेम- शालू त्याला त्याच्या मुक्तीचं किंवा या सगळ्यातून बाहेर पडण्याचं एक साधन वाटत असतं. या भाबड्या वयातील समजुती ज्या सहज पूर्ण व्हाव्यात किंवा तशी संधी तरी मिळावी. पण त्यातही त्याचं खालच्या जातीचं असणं आड येतं. देशभक्ती, महापुरुषांचे विचार, अंधश्रद्धा यावर काही कमालीच्या दृश्यांतून टीका केली आहे.
डुकराला तुच्छतेने फँड्री म्हणतात, इथे जब्याला, त्याचा परिवारालाच त्या नावाने हाक मारली जाते. दोन मोठ्या बहिणी, आणि त्यात शाळकरी जब्या हे या व्यवस्थेत अडकलेले बघून भीती वाटावी असे अनेक बारकावे यात आहेत. या घुसमटीचा स्फोट होणार हे नक्की असतं, पण यातून नुकसानही जब्याच्या परिवाराचंच होणार असतं. जीवन, मृत्यू आणि संघर्ष कशातच मान न मिळणाऱ्या लोकांची ही गोष्ट.
पेरियरम पेरुमाल
बऱ्याचदा जातीवादावर सोपा उपाय म्हणून असं सांगितलं जातं की ‘शहराकडे जा’. शहरात तुमच्या शेजारी कोण राहतं, काय खातं, काय काम करतं याकडे लक्ष देण्याची प्रथा नाही. त्यामुळे आपल्या कर्तृत्वातून आपली सामाजिक ओळख बनेल आणि खालच्या पातळीची वागणूक मिळणार नाही अशी अपेक्षा असते.
स्वतः शिकून वकील बनणे आणि त्यातून गावाचा विकास करणे अशी योजना घेऊन आपला नायकही शहरात येतो. इथे येऊन तो “जो” नावाच्या सवर्ण मुलीच्या प्रेमात पडतो.
सैराटप्रमाणे इथेही अंतरजातीय प्रेमप्रकरणातून हाणामारी होते. या सगळ्यातून वाट काढणाऱ्या आणि त्यातून बदलत जाणाऱ्या नायकाची ही कथा.
चित्रपटाची सुरुवात एका कुत्रीच्या मृत्यूमधून होते. जसं कर्णनमध्ये गाढव, घोडा हे मुख्य प्रतिकं म्हणून वापरले गेलेत तसंच इथे या कुत्रीच्या मृत्यूला वापरलं गेलंय. मान खाली घालून जगणं आणि कुत्र्यासारखं मरणं, असा इंटेन्स ड्रामा दाखविण्याची पद्धत मात्र सटल आहे. मारी सेलव्हाराज बाकी आर्टफिल्म बनविणाऱ्या दिग्दर्शकांपेक्षा वेगळा यासाठी सुद्धा आहे की त्याच्या कथेतला नायक लढा देऊन तो जिंकतो. यातुन निराशादाई वास्तव अधोरेखित करून तो आशादायी भविष्य दाखवतो.
फिराक
मंटो चित्रपटामुळे नंदिता दास हे नाव चर्चेत आलं पण मंटो बनविण्यापूर्वी तिने दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं ते फारशा प्रसिद्ध नसलेल्या “फिराक” या चित्रपटातुन. गुजरातमधे झालेल्या हिंदू मुस्लिम दंगलीनंतर तिथल्या लोकांच्या पारिवारिक जीवनात झालेल्या बदलांची ही गोष्ट.
चार परिवार आणि एक अनाथ झालेल्या लेकराची गोष्ट दाखवताना नंदिताने गुजरात दंगलीचा खरा चेहरा, त्यामागचे विचार आणि त्यामुळे नामशेष होणाऱ्या जागा-लोकं यांचं बाहेर न आलेलं सत्य दाखवलं आहे. जर दंगल कशी झाली, नेमकं जबाबदार कोण हे सगळं दाखवलं असतं तर कदाचित वादविवादामुळे हा सिनेमा प्रदर्शितच नसता झाला. व नंदिताने जास्त महत्वाच्या असणाऱ्या वैयक्तिक बदलांना केंद्रस्थानी ठेवल्याने वादात न सापडलेला एक चांगला सिनेमा आपल्याला मिळाला.
गरीब रिक्षाचालकाचं जळालेलं घर, वृद्ध गायकाला बसलेला धक्का, सवर्ण कुटुंबात घुसमटणारी गृहिणी, आपल्या हिंदू बायकोच्या पदराआड सुरक्षित राहू शकलेला तरुण मुस्लिम दुकानदार आणि अनाथ झालेलं एक लेकरू.
हे सगळेजण दंगलीनंतर उदभवलेल्या शांततेला जो प्रतिसाद देताय, त्यातून नंदिता ने आपली बाजू मांडली आहे. या यादीत हा सिनेमा टाकायचं कारण म्हणजे कर्णनप्रमाणे इथले मुख्य पात्रही या धार्मिक बांधनाच्या घुसमटीला कंटाळून स्वतःच्या लपलेल्या अस्तित्वाचा स्वीकार करतात. आपापल्या पद्धतीने ते पलटवार करतात. इथली दरी फक्त जातीची नसून धर्माची आणि म्हणून जास्तं वैश्विक पातळीची आहे, त्या दरीचा भारतात असलेला व्याप सांगायला आपल्याकडे हा एकच चांगला सिनेमा आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.