आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
कुत्रा हा जगातील सर्वात इमानदार प्राणी म्हणून ओळखला जातो. बुद्धी आणि इमानदारीचा संगम म्हणजे हा प्राणी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या प्राण्याचा आपल्याला इतिहासातसुद्धा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आढळतो.
आपल्या मालकाच्या संरक्षणासाठी स्वतःचा जीव पणाला लावलेल्या कुत्र्यांबद्दल आपण खूप काही ऐकलं आहे. विविध चित्रपटांत सुद्धा हा विषय मांडला गेला. पण असं प्रत्यक्षात घडू शकतं का अशी खूप लोकांना शंका असते.
पण आपल्या इतिहासात एक अशी एक नोंद आहे की त्यावरून तुमचा अशा घटनांवर नक्कीच विश्वास बसेल. मालक आणि मालकाच्याप्रती कुत्र्याच्या निष्ठेची हे गोष्ट आहे राजस्थान आणि हरियाणा मधली.
हा किस्सा आहे बख्तावरसिंगचा आणि त्याच्या इमानदार कुत्र्याचा. आपल्या मालकासाठी या कुत्र्याने एका लढाईत तब्बल २८ सैनिकांना मारलं होतं आणि कित्येकांना जखमी केलं. इथे या कुत्र्याने केवळ मालकासाठीच नाही तर आपल्या राज्याप्रतिसुद्धा असलेली निष्ठा दाखवून दिली होती.
जगाच्या इतिहासात तेरावे शतक हे सर्वात जास्ती रक्तपात झालेलं शतक म्हणून ओळखलं जातं. या काळात मंगोलांनी चीनपासून रशियापर्यंत आणि त्यानंतर बगदाद आणि पोलंडपर्यंत कहर केला. त्याच वेळी भारतातसुद्धा रक्ताचे पाट वाहत होते.
जेव्हा सोळावे शतक आले तेव्हा भारतावर मुघलांची सत्ता होती, व या सत्तेचा राजा होता तो बादशहा औरंगजेब. औरंगजेब हा अतिशय कपटी, पराक्रमी म्हणून ओळखला जातो, इतिहासात तशा नोंदीसुद्धा आहेत.
असं म्हटलं जातं की औरंगजेब हा सर्वात ताकदवान राजा होता. त्याच्या ताकदीच्या पुढे सर्वांचे हात टेकले होते. पण काही व्यक्ती असे होते कि ज्यांना औरंगजेबाचा गुलाम होणं कदापि मान्य नव्हतं.
ते साल १६७०-७१ होते. लोहारू हे राजस्थान आणि हरियाणाच्या सीमेजवळ एक राज्य होतं. इथल्या राजाचं नाव होतं ‘ठाकूर मदन सिंह’. ठाकूर आपल्या स्वभावासाठी खूप प्रसिद्ध होते. अतिशय दानशूर असल्याने आणि गोरगरिबांना मदत करत असल्याने त्यांना निष्ठावंतांची कमतरताच नव्हती.
ठाकूर यांना पत्नी आणि दोन मुलं होते ते म्हणजे ‘महासिंह’ आणि ‘नौरबाजी’. हे दोघेही शस्त्रास्त्र पारंगत होते. ठाकुरांच्या कार्यकाळात सगळं काही अगदी व्यवस्थित चाललं होतं.
या दोन मुलांच्या शिवाय असाही एक व्यक्ती होता ज्यावर मदन सिंग यांचा डोळे झाकून विश्वास होता. त्या सरदाराचं नाव होतं ‘बख्तावरसिंग’. बख्तावरसिंग हा राजाच्या २४ तस सोबतच असायचा. त्याने आपलं घरदार आयुष्य सगळंच राजाला देऊन टाकलं होतं. त्याच्याकडे तशी काही खास संपत्ती नव्हती, हो पण एक कुत्रा होता जो महागड्या संपत्तीपेक्षा कमी नव्हता.
या कुत्र्याचे नाव इतिहासामध्ये कोठेही नोंदवले गेलेले नाही, परंतु जिथे जिथे पुस्तकांमध्ये लिहिलं आहे तिथे फक्त ‘बख्तावरसिंगचा कुत्रा’ असं संबोधित केलं आहे. लोहारू राज्याच्या असलेल्या अनेक कथांपैकी बऱ्याच कथांच्या मध्यभागी ‘बख्तावरसिंग कुत्रा’ आहे.
हा सामान्य कुत्रा नव्हता. देशी प्रजातीचा असलेल्या या कुत्र्याचं रक्त देखील त्याच्या मालकाप्रमाणे संपूर्ण स्वदेशी होते. सांगायचे तर ज्या प्रमाणे बख्तावरसिंग आपल्या राजासाठी होता तसाच हा कुत्रा बख्तावरसिंगसाठी होता.
अचानक हल्ला, संशयितांचा तपास आणि हल्ल्याआधीचा इशारा अशा अनेक गोष्टींसाठी बख्तावरसिंग याने आपल्या कुत्र्याला प्रशिक्षण दिले होते. आणि याच कारणामुळे त्या कुत्र्याला राजवाडा आणि तेथील रहिवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.
१६७१ मध्ये लोहारू सर्वात श्रीमंत राज्य होते. औरंगजेबाला या श्रीमंत राज्यातून रक्कम वसूल करता यावी या उद्देशाने त्याने ठाकूर यांना निरोप पाठवला की राज्याकडून मिळालेल्या कराचा काही टक्के हिस्सा औरंगजेबास द्यावा. याबदल्यात ते राज्याला सुरक्षा प्रदान करतील.
ठाकूर यांनी आजपर्यंत कधीच गुलामगिरी स्वीकारली नव्हती, आणि लोहारू राज्यातून महसूल वसूल करण्याचे धाडस कुठलाही मुघल अद्याप करू शकला नव्हता.
यावेळी ठाकूर यांनी औरंगजेबचा प्रस्ताव फेटाळून लावत उत्तर पाठविले की स्वतःचे व आपल्या राज्याचे रक्षण करण्याचे सामर्थ्य आमच्यात आहे. या उत्तरानं औरंगजेब चवताळला. त्याने ताबडतोब हिसारचे राज्यपाल अल्फू खान यांना निरोप पाठविला की लोहारू राज्याचे ठाकूर यांना आपल्या दरबारी हजर करावे. मग त्यासाठी लढावं लागलं तरी चालेल.
अल्फू खानने उशीर न करता ठाकूरांच्या राज्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू केली. ठाकुरांना ही माहिती गुप्तहेरांच्या मार्फत मिळते तोच औरंगजेबाची सेना त्यांच्या उंबरठ्यावर पोहचली होती. ठाकूर यांनी तत्काळ युद्धासाठी आपले सैन्य तयार केले. दोन्ही पुत्रांनी सैन्याचे नेतृत्व केले त्यांच्यासोबत ठाकुरांचा इमानदार सरदार बख्तावरसिंग हा देशील मैदानात उतरला.
बख्तावरसिंग रणांगणात असताना त्याचा कुत्रा तरी मालकाला एकटे कसे सोडील. म्हणून त्याचा कुत्रा देखील बख्तावरच्या घोड्याच्या मागे उभा होता. खानच्या सैन्याने आतापर्यंत युद्धात घोडे आणि हत्ती पाहिले होते पण त्या कुत्र्याला पाहून ते हसले.
त्यांना असं वाटलं की ठाकूर इतके अशक्त आहे की त्यांना युद्धासाठी कुत्र्यावर अवलंबून राहावे लागले आहे. युद्ध सुरू झाले. ठाकुरांचं सैन्य खानच्या सैन्यावर भारी पडत होतं, त्याच वेळी ‘महासिंग’ आणि ‘नौरबाजी’ या दोघांनी सुद्धा आपल्या पराक्रमाची शर्थ देत कित्येक सैनिकांना पाणी पाजलं होतं.
बख्तावरसिंगही त्याचा मोर्चा सांभाळून होता. या युद्धात बख्तावरच्या कुत्र्यानेही चमत्कार केले. तो खानच्या सैनिकांचा पाठलाग करून पळत पळवून बखतवरच्या इथे आणत असे. बख्तावार त्यांना जखमी करायचा आणि नंतर कुत्र्याने जखमी सैनिकांचे लचके तोडायचा.
युद्धाच्या वेळी ‘महासिंह’ आणि ‘नौरबाजी’ यांना मृत्यूने घेरलं, आणि बख्तावरसिंगही गंभीर जखमी झाला होता पण खानच्या सैन्यापुढे झुकणे त्याला मान्य नव्हते. तो आपल्या कुत्र्याच्या मदतीने लढा देत राहिला. त्यावेळी बख्तावरसिंग याने सुमारे १०० सैनिक मारले. त्याचवेळी त्याच्या कुत्र्याने सुमारे २८ सैनिक मारले. तर कित्येक सैनिक घायाळ केले जेणेकरून त्यांना लढता येऊ नये
या कुत्र्याचे धाडस पाहून सैनिकांनी त्याच्यावर हल्ला केला. यावेळी बख्तावरखानने आपल्या कुत्र्याचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो सैनिकांचा बळी ठरले आणि मृत्युमुखी पडला.
आपला मालक डोळ्यासमोर मरत आहे हे पाहून कुत्रा बख्तवारच्या मदतीला धावत आला पण याच वेळी एका सैनिकाने त्याच्या मानेवर वार केला आणि त्याचे डोके धडापासून वेगळे केले.
अशाप्रकारे मालक आणि त्याच्या निष्ठावान कुत्र्याने रणांगणात स्वत:चे प्राण सोडले. पण तोपर्यंत खानच्या सैन्याचा जवळपास पराभव झाला होता. उर्वरित सैनिक प्राण वाचवून पळून गेले. अल्फू खान यानेही रणांगण सोडले. ठाकूर मदन सिंह आणि त्यांचे राज्य आता सुरक्षित होते. पण त्यांनी आपले महत्वाचे योद्धे गमावले होते.
युद्ध संपल्यानंतर ठाकूर यांनी आपला निष्ठावान सरदार बख्तावरसिंग आणि त्याच्या कुत्र्याच्या स्मरणार्थ रणांगणातच त्या दोघांची एक समाधी बांधली.
लोहारू राज्याच्या बचावासाठी ‘बख्तावरसिंगचा कुत्रा’ हे नावही मोठ्या मानाने घेतले जाते. पण काही महिन्यांनंतर औरंगजेबाने पुन्हा हल्ला करुन त्या राज्यावर ताबा मिळवला. यानंतर येथे मुघल व नवाबांनी राज्य केले. या काळात राज्याचे लोक गुलामांसारखे राहत होते.
इतकंच नाही तर १५ ऑगस्ट रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतरही नवाबांनी ही रियासत विलीन करण्यास नकार दिला. भारत सरकारला लोहारू राज्य बीकानेरमध्ये विलीन करायचे होते, पण हे (नबाब) राजा त्यासाठी तयार नव्हते.
माजी आमदार कै चंद्रभान ओबरा यांच्या ‘लोहारू बावणीचा इतिहास’ या पुस्तकात असे लिहिले आहे की नवाबांनी १८०३ मध्ये इ.स मध्ये लोहारू राज्याची पुन्हा स्थापना केली आणि २३ फेब्रुवारी १९४८ रोजी लोकांना नवाबी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. या स्वातंत्र्यासाठी आर्य समाज आणि जनतेला नवाबांशी इंग्रजांशी स्पर्धा करावी लागली. ही आणखी एक दीर्घ कथा आहे.
परंतु असे आजही म्हटले जाते की दिवंगत ‘बख्तवारसिंगच्या कुत्र्याने आणि त्याच्या कहाणीने’ कथांनी लोहारू लोकांना एकत्र करण्यासाठी खूप मदत केली. आणि याच गोष्टीमुळे त्यांना स्वातंत्र्य मिळाले.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.