आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारत भूमी अनादी काळापासून देवभूमी आणि संतभूमी म्हणून ओळखली गेलेली आहे. अगदी आधुनिक युगातही इथे अस्सल “संत” होतात. संतत्वाचा आव आणून सामान्य जनांना लुटणारे अनेक भोंदू बाबा जरी या देशात असले, तरी अशा अत्यल्प प्रकरणांवरून संपूर्ण देश किंवा संस्कृती बदनाम होऊ शकत नाही, हे भारताने आणि भारतीयांनी वारंवार सिद्ध केलंय. पण डोळ्यांवर तथाकथित आधुनिकतेची आणि लटक्या प्रबोधनाची झापडं लावली असतील तर मात्र भारतीय संस्कृतीच्या व्यापकतेची कल्पना आपल्याला येणार नाही.
धर्म आणि जाती वगळून म्हणायचं झालं तर प्रत्येक सज्जन गृहस्थाच्या घरात निदान एका तरी संतांची प्रतिमा असते! महाराष्ट्र तर संतभूमी असल्याने इथे घराघरात ज्ञानोबा-तुकोबांच्या प्रतिमा आपल्याला दिसतात. आपण वारंवार “कलियुग” वाईट हे ऐकत आलोय, पण याच कलियुगी लोककल्याणाचा वसा घेतलेल्या अनेक संतांना आपण विसरायला नको. भारतीय ज्ञानाची परंपरा मोठी आहे. अगदी वेदकालापासून ते आदी शंकराचार्यांपर्यंत, तर संत ज्ञानेश्वरांपासून ते आधुनिक संतांपर्यंत ही परंपरा अबाधित राहिली आहे.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ।। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् |
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ||
भगवंताने दिलेल्या वचनाप्रमाणे जेव्हा जेव्हा या भारतवर्षात अधर्म माजेल तेव्हा दुष्टांचा संहार आणि साधूंचं रक्षण करून धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्याचा अवतार होईल.
आज सगळीकडे इतका अनाचार माजलेला असताना सुद्धा देवाचा अवतार का होत नाही, असा प्रश्न आपल्याला लहानपणीपासून एकदा तरी पडलाच असेल. याचं कारण म्हणजे मनुष्यप्राणी हा दुतोंडी असतो. वेगवेगळ्या वृत्तीचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. पण ते प्रत्येक वेळी आपल्या स्वभावाप्रमाणे वागतातच असं नाही. काही लोक फसवतातही, मग आपण म्हणतोच की, “मला वाटलं नव्हतं हा असाही असेल”, ते ‘असंही असणं’ म्हणजेच माणसाचा दुसरा चेहरा! माणसाला पूर्णपणे दुष्टही होता येत नाही, आणि काही अपवाद सोडले तर माणूस पूर्णपणे साधूही नसतो.
म्हणजेच अज्ञानामुळे सज्जन आणि दुर्जन या दोन अवस्थांमध्ये अडकलेल्या जीवाचं नाव माणूस असं म्हणायला काही हरकत नाही. मग अशा अर्ध्या सज्जन आणि अर्ध्या दुर्जन वृत्तीच्या लोकांसाठी देव का अवतार घेईल? असे लोक काही प्रमाणात ‘कौन्सेलिंग’ केल्यानेही सुधारतात, आणि जरी सुधारले नाहीत तर त्यांची क्षमता मर्यादित असते. म्हणून अशा द्विधा अवस्थेत सापडलेल्या दुर्बल मानवाला अज्ञान आणि अर्धज्ञानाच्या अंधःकारातून बाहेर काढण्यासाठी “संत” प्रयत्नशील असतात.
योग साधनेनंतर प्राप्त होणाऱ्या ज्ञानानंतरही समाजासाठी काम करण्याचा मोठा आदर्श संत ज्ञानेश्वरांनी आपल्या कारकिर्दीत घालून दिला, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आणि अद्वैत परंपरेतीलच अनेक संतांनी महाराष्ट्र आणि उत्तर भारतातही अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार केला. त्याचबरोबर योग साधनेनंतर प्राप्त होणाऱ्या ज्ञानानंतरही समाजासाठी काम करण्याच्या विचाराचा प्रसार होऊन उत्तर भारतात अनेक संत झाले. संत कबीर, तुलसीदास, इत्यादी.
अशाच संतांकडून प्रेरणा घेऊन राजकीय संकटांची पर्वा न करता अनेक लोकांनी योगसाधनेचा आणि भक्तिसाधनेचा मार्ग स्वीकारला, आणि आपल्या साधनापूर्तीनंतर समाजहितासाठी सुद्धा प्रयत्न केले. याच मोठ्या यादीतील एक नाव म्हणजे निम करोली बाबा!
सन १९००च्या सुमारास ब्रिटिश राजवटीतील यु.पी. (युनायटेड प्रोव्हिन्स ऑफ आग्रा अँड अवध) मधील तत्कालीन फैजाबाद जिल्ह्यातील अकबरपूर या गावी लक्ष्मण नारायण शर्मा यांचा जन्म एका श्रीमंत ब्राम्हण कुटुंबात झाला. लहानपणापासूनच लक्ष्मण नारायण शर्मा सांसारिक आसक्तींपासून अलिप्त होता. अकराव्या वर्षी कुटुंबीयांनी लक्ष्मणचं लग्न लावल्यानंतर त्याने साधू होण्यासाठी घर सोडलं आणि तो थेट गुजरातच्या परिसरात गेला.
उत्तर प्रदेश मधील फरुखाबाद स्टेशनवर एक योगी ट्रेन मध्ये बसला. पण हा योगी विना तिकीट प्रवास करतोय हे तिकीट चेकरच्या लक्षात आल्यावर त्याने लगेच या योग्याला अपमानित करून ट्रेनमधून नीब करोरी या गावात बाहेर काढले.
पुन्हा ट्रेन प्रवासासाठी सज्ज झाली, गार्ड ने हिरवा झेंडा दाखवला, पण ट्रेन सुरूच होईना! शक्य ते सगळे प्रयत्न झाले, बराच वेळ गेला, पण ट्रेन काही सुरु होत नव्हती. मग ट्रेनमधील एका व्यक्तीने त्या योग्याला पुन्हा ट्रेनमध्ये बोलावण्याचा सल्ला तिकीट चेकरला दिला. तिकीट चेकरने तसं केलंही, पण त्या योग्याच्या दोन अटी होत्या, एक म्हणजे नीब करोरी गावासाठी स्टेशन बांधणे, कारण या गावच्या लोकांना जवळच्या स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी मैलोन्मैल चालावं लागतं असे आणि दुसरी अट म्हणजे या पुढे रेल्वेमध्ये साधूंबरोबर गैरवर्तन होऊ नये.
या दोन्ही अटी तिकीट चेकर आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्या, आणि त्या योग्याला पुन्हा त्या गाडीत आणलं गेलं, तेव्हा तो गमतीने बोलला, “आता काय ट्रेन सुरु करणं माझ्यावर अवलंबून आहे का?” वास्तविक तसंच होतं, तो योगी ट्रेनमध्ये चढताच ट्रेन सुरु झाली, पण ट्रेन चालवणाऱ्यांनी त्या योग्याच्या आशिर्वादाशिवाय ट्रेन चालवणार नाही अशी भूमिका घेतली, त्या योग्याने ड्रायव्हर्सना आशीर्वाद दिले आणि ट्रेनचं प्रस्थान आपल्या पुढच्या प्रवासाकडे झालं.
या नंतर नीब करोरी गावात स्टेशन उभारलं गेलं. त्या योगीने नीब करोरी गावात काही काळासाठी वास्तव्य केलं, आणि स्थानिकांनी त्या योग्याला गावाचं नाव देऊन टाकलं आणि तेव्हापासूनच लक्ष्मण नारायण शर्माचा बाबा नीब करोरी किंवा बाबा निम करोली झाला.
लक्ष्मणच्या वडिलांना ‘नीब करोरी गावात तुमच्या मुलासारखा दिसणारा एक साधू आहे’ असं कोणीतरी सांगितलं, त्याच्या मुलाला भेटण्यासाठी आणि परत आणण्यासाठी त्याच्या वडिलांनी नीब करोरी गावात धाव घेतली. तेथे ते लक्ष्मणला भेटले आणि त्यांना घरी परतण्याचा आदेश दिला.
लक्ष्मणने वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं आणि ते परतले. लक्ष्मण जगलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनाची ही सुरुवात होती. एक गृहस्थाचं आणि दुसरं संताचं. त्याने एका गृहस्थाश्रमासाठी वेळ दिला आणि त्याच वेळी त्याने आपल्या मोठ्या कुटुंबाची म्हणजेच बाह्य जगाची काळजी घेणे चालू ठेवले. तथापि, घरगुती किंवा संताची कर्तव्ये पार पाडताना त्याच्या जीवनशैलीमध्ये कोणताही फरक नव्हता. त्याच्या कुटुंबात एक गृहस्थ म्हणून त्याला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे.
फलकट तो संसार । येथे सार भगवंत ।। अवघे निरसूनि काम । घ्यावे नाम विठोबाचे ।। तुका म्हणे देवावीण केला सीण तो मिथ्या ।।
तुकोबांच्या या ओळीला साजेसं वागून त्यांनी पुन्हा घरदार सोडलं आणि ‘संपूर्ण सत्याच्या’ शोधात सबंध उत्तर भारत पिंजून काढला. गुजरातमधील मोर्बी, उत्तर प्रदेशातील वृंदावन या ठिकाणी त्यांनी कठोर तपश्चर्या केली. या भ्रमणाच्या वेळी लोक त्यांना विविध नावांनी ओळखत असत. लक्ष्मणदास, हंडी वाला बाबा, तिकोनिया वाला बाबा, इत्यादी. गुजरात मधील मोर्बी येथे तपश्चर्या केल्यानंतर लोक त्यांना तलैय्या बाबाच्या नावाने ओळखत असत. तर वृंदावनमधील लोक त्यांना चमत्कार बाबा म्हणून ओळखत असत.
त्यांच्या जीवनकालात दोन आश्रम बांधले गेले, कैंची आश्रम आणि वृंदावन आश्रम. तर शेकडो मंदिरंही त्यांनी उभारली. या आश्रमांमध्ये बाबा निम करोली उन्हाळ्यात येत असत. आपल्या आयुष्याचा मोठा भाग त्यांनी कैंची आश्रमामध्येच काढला, त्यामुळे आज हे एक तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी १९६४ साली त्यांनी हनुमान मंदिराची उभारणी केली. दरवर्षी १५ जूनला मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त या ठिकाणी यात्रा भरवली जाते.
तत्कालीन सर्व राजकीय नेते, राज्यपाल, देशाचे पहिले प्रधानमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, जिल्हाधिकारी या सगळ्यांनीच बाबा निम करोलींची भेट घेतली होती.
ॲपलचे सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्स यांनी ॲपल कंपनीची सुरुवात करण्याआधी भारत वारी केली होती, या भारत भेटीत त्यांनी बाबा निम करोलींची भेट घेतल्याचे उल्लेख आहेत. बाबा निम करोलींनी दिलेल्या प्रेरणेतूनच त्यांना काही नवं करण्याची इच्छा झाली असंही सांगितलं जातं.
सप्टेंबर २०१५ मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फेसबुकचे सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्ग यांच्या फेसबुकच्या मुख्यालयात झालेल्या जाहीर संवादात झुकेरबर्गने बाबा निम करोलींची भेट घेतल्याचं सांगितलं होतं. त्यांनी ही भेट स्टीव्ह जॉब्सच्या सांगण्यावरून घेतल्याचं नमूद केलं. फेसबुक विकून टाकण्याचा निर्णय घेण्याच्या काही महिने आधी झुकेरबर्ग भारतात आला होता, पण परतल्यानंतर मात्र फेसबुकने मोठी भरारी घेतली.
एके दिवशी बाबा निम करोली कानपुरला जात असताना त्यांनी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्रींना भेटण्याचं अमान्य केलं. निम करोली बाबा आपल्या दोनशे भक्तांसमवेत कानपूरच्या सरसैया घाटावर बसलेले असताना कानपूरचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक त्यांच्याकडे आले, आणि त्यांनी निम करोली बाबांना प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्रींना आणि गुलजारीलाल नंदा यांना भेटण्याची विनंती केली, पण निम करोली बाबांनी स्पष्ट नकार दिला.
असं असूनही पोलीस लालबहादूर शास्त्रींना आणि गुलजारीलाल नंदा यांना त्या ठिकाणी घेऊन आले, पण बाबा अचानक गायब झाल्याचं त्यांना कळालं. शास्त्री आणि नंदा तिथून निघून गेल्यानंतर बाबा पुन्हा आपल्या भक्तांमध्ये येऊन बसले असता एका भक्ताने त्यांना विचारलं, “शास्त्रींची भेट का नाही घेतली?” त्यावर उत्तर देताना बाबा म्हणाले, “मी गरीब-श्रीमंत, उच्च-नीच असा भेदभाव कधीच करीत नाही, आणि मला भेटू इच्छिणाऱ्यांनीही तो करू नये, पण शास्त्रींनी तो केला आणि माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये पोलिसांची भिंत उभी केली, म्हणून आमची भेट झाली नाही.”
‘नीब करोरी’च्या शुद्धलेखनाबद्दल खूप गोंधळ आहे. नीब करोरी हे हिंदीमधून त्याच शब्दाचे ध्वन्यात्मक भाषांतर आहे. नीब कधीकधी निब म्हणून लिहिले जाते आणि करोरी कधी कधी करौरी म्हणून लिहिले जाते. नीब करोरी हे नाव स्वतः निब-करोरी बाबांनी घेतले होते, हे लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांनी काही ठिकाणी या नावाने स्वाक्षरी केली आहे. नीब (शुद्ध हिंदीमध्ये – नीव) म्हणजे पाया आणि करोरी (शुद्ध हिंदीमध्ये – करारी) म्हणजे मजबूत. तर नीब करोरी म्हणजे मजबूत पाया.
मद, मोह, मात्सर्य, काम, क्रोध आणि लोभ या षड्-रिपूंचा त्याग करून सामान्य माणसाने जीवनाचा पाया मजबूत करावा म्हणून असे संत-महात्मे काम करत असतात. आपलं काम पूर्ण झाल्यानंतर “आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा” असं म्हणून ते जगाचा निरोप घेऊन चिरंतन तत्वात विलीन होतात. निम करोली बाबांनी ११ सप्टेंबर १९७३ रोजी, वृंदावन येथे मध्यरात्री आपले प्राण ठेवले.
पण आजही त्यांच्या वृंदावन आणि कैंची या आश्रमांमध्ये लाखो श्रद्धाळू जातात आणि आपल्या नैतिक मनोकामना पूर्ण करवून घेतात.
काही वर्षांत नीब करोरी हे नाव निब करोरी, नीब करौरी अशा विविध मार्गांनी अपभ्रंशित झाले आणि अखेरीस “निम करोली” हे नाव पडलं. हे नाव पाश्चात्य भक्तांमध्ये लोकप्रिय झाले आहे. निम करोली बाबांच्या इच्छेने हे नाव असावे आणि ते त्यांच्या भक्तांना खूप प्रिय झाले असावे.
पण ‘निम करोली’ या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. नीम म्हणजे कडुलिंब आणि करोली हे भारतातील एक ठिकाण आहे. पाश्चात्य भक्तांनी अखेरीस हिंदी भाषा आणि देवनागरी लिपी शिकली आहे, त्यांनीसुद्धा इंग्रजीतील शब्दलेखन खरोखर नीब करोरी असावे हे मान्य केलेलं आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.