आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
स्वच्छताप्रिय नागरिक सुशिक्षित समाजाचं प्रतीक असतं असं आपण म्हणतो. पण भारतात, आपल्या घरच्या चार भिंतींपलीकडे स्वच्छतेबद्दलच कुणी विचार करत नाही, तर सफाई कर्मचाऱ्यांचा कसा विचार करतील?
रस्ता झाडणारे, कचरा गोळा करणारे, सार्वजनिक शौचालय साफ करणारे, गटार साफ करणारे असे अनेक सफाई कर्मचारी आपण आपल्या आजूबाजूला बघतो.
यापैकी, जिथे आपण १ मिनिटसुद्धा उभं राहण्याची हिंमत करु शकत नाही ते म्हणजे सेप्टिक टाकी आणि अशा परिस्थितीत माणसाचे मल-मूत्र असलेली सेप्टिक टाकी स्वच्छ करणारे कामगार काम करतात. कचरापेटीच्या बाजूने जाताना तोंडावर रुमाल लावणारे आपण, समाजाच्या या वर्गाकडे नकळतपणे दुर्लक्ष करतो. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार भारतात ७९४०० घरे ही या प्रकारे काम करून उदरनिर्वाह करतात!
यात महाराष्ट्रातील घरांची संख्या सर्वाधिक आहे. मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, त्रिपुरा, कर्नाटक ही राज्यं या आकडेवारीत खालोखाल आहेत. शिवाय स्वच्छता कर्मचारी कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचे अवजार दिले जात नाहीत.
ते स्वतः कपडे काढून उतरतात व विष्ठा आपल्या हाताने स्वच्छ करतात! एवढंच नाही तर यामुळे त्यांना अनेक रोगराई, आजारसुद्धा होतात.
अनेक घरं, तरूण मुलं मुली कुठलीच आशा न बाळगता अशाच प्रकारे जीवन जगत आले. पण २००४ साली मात्र त्यांच्याविषयी विचार करणारा, त्यांचं जीवन सुखकर करण्यासाठी एका व्यक्तीने काम हाती घेतलं. ती व्यक्ती म्हणजे ‘असिफ शेख’.
देवास येथे एका दलित मुस्लिम कुटुंबात जन्माला आलेल्या ३७ वर्षीय असिफ शेखने हे व्रत हाती घेतलं. ते म्हणतात, ‘देशात एक जरी सफाई कर्मचारी आणि मजूर अशा प्रकारें जीवन जगत असेल तर एक देश म्हणून कलंक आहे’
अत्यंत कमी वयात त्यांना समाजाच्या वाईट व दूषित चेहऱ्याशी सामना करावा लागला. पण ही खंत मनात ठेवण्यापलीकडे त्यांच्याकडे उपाय नव्हता. १९९९ साली अनेक लहान मुला मुलींना एकत्र करून त्यांनी युवा मंचची स्थापना केली. जिथे त्यांना बाल मजुरी करण्यासाठी परावृत केलं जायचं. पुढे ते काही सामाजिक संस्थांबरोबर काम करु लागले, जिथे त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागला.
आपलं शिक्षण पुर्ण करून २००४ साली ‘जन साहस’ या सामजिक संस्थेची सुरुवात केली. ही संस्था मुख्यत्वेकरून जातीवर आधारित अन्याय व त्यासंबंधी गैरप्रकारांविरोधात काम करते. या सफाई कर्मचाऱ्याचं पुनर्वसन करून त्यांना सामान्य जीवन जगण्यासाठी मदत करते. खरं तर अशा प्रकारचं काम करवून घेणं कायद्याने गुन्हा आहे. पण अशिक्षितेमुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचतच नाही.
संस्थेचं काम खुप आव्हानात्मक आहे, अशा कर्मचाऱ्यांना शोधून, त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संपर्क करावा लागतो. त्यांना कायद्याबद्दल माहिती देऊन, या कामापासून परावृत्त करतात. त्यांनी लहान मुलांसाठी रात्रीच्या शाळासुद्धा सुरू केल्या.
शिकायची इच्छा असूनही कामामुळे शिकायला मिळत नाही हे लक्षात आल्यावर त्यांच्या रोजगारावर भर देण्यात आला. पुढे कौशल्य विकासाच्या माध्यमातून त्यांना रोजगार दिला जातो. शिवाय बला*त्कार पीडितांचीसुद्धा मदत करते.
आत्तापर्यंत १५०० बला*त्कार पीडितांना न्याय देऊन, रोजगार व सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत. त्यांची स्वास्थसंबंधी काळजीसुद्धा संस्था करते. पैश्यांसाठी ज्या महिलांचं शोषण होतं अशा ६०० स्त्रियांचं पुनर्वसन संस्थेने केलं आहे.
या प्रश्नांबद्दल जनजागृती व्हावी म्हणून यात्रादेखील संस्थेने आयोजित केल्या. सगळ्यांत पहिली यात्रा ४० महिलांच्या समूहाने १६ गावांत पुर्ण केली. त्यानंतर जवळपास ६०० कर्मचाऱ्यांनी हें काम करणं सोडून दिलं.
पुढे अनेक यात्रा महिन्यांसाठी चालल्या ज्यात भारतातील २२ जिल्ह्यापर्यंत ही मंडळी पोहोचली.
आसिफ शेख आणि त्यांच्या टीमसाठी हे काम नक्कीच सोपं नव्हतं. त्यांना, ‘काम थांबवा’ म्हणून अनेक धमक्या आल्या, पण त्यांच्यापैकी कोणीच थांबलं नाही. अनेक कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक मिळाली पण ते काम करत राहीले.
समाजाच्या एका दुर्लक्षित घटकाचा विचार करून त्यांच्या उद्धारासाठी ते झटत आहेत. अशा निस्वार्थ भावाने काम करणाऱ्या ‘आसिफ शेख’सारख्या तरुणांची आज भारताला नितांत गरज आहे.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.