आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब
१९४९ला एक पतंगा नावाचा एक चित्रपट आला होता. त्यातील ‘मेरे पिया गये रंगून’, हे गाणं आजही अनेकजण अगदी सहजतेनं गुणगुणताना दिसतात. कदाचित त्या गाण्यामुळेच भारतातील कित्येक पिढ्यांना रंगून आणि म्यानमारची ओळख झाली आहे. म्यानमार, आपल्या पूर्वसीमेवर असणारा छोटासा देश. या देशाला निसर्गानं भरभरून दिलं आहे. मात्र, मानवी उठाठेवींमुळे गेल्या कित्येक दशकांपासून देशांत अस्थिरता आहे.
शांतीचा प्रसार करणारा बौद्ध हा राष्ट्रीय धर्म असूनही या देशात शांतता नांदत नाही, हा विरोधाभासच नाही का?
फेब्रुवारीमध्ये लष्करानं म्यानमार सरकारचा ताबा घेतल्याच्या काही दिवस अगोदर, ‘तातमाडा’ म्हणून ओळखल्या बौद्ध भिक्षूंनी सशस्त्र सैन्याच्या समर्थनार्थ निदर्शने केली. निवडणूकीत घोटाळे झाले आहेत, या दाव्याचं समर्थन करणारे बॅनर त्यांच्या हातात होते. सैन्यदलचं देशाचं रक्षक आहे, अशा घोषणांसह या भिक्षूंनी रंगूनचे रस्ते दणाणून सोडले होते. अशा प्रकारची दृश्ये म्यानमारमध्ये विशेष वाटत नाहीत कारण बौद्ध धर्म देशाच्या संस्कृतीशी अतिशय गंभीरपणे जोडलेला आहे.
लष्कराला पाठिंबा दर्शविणार्या बौद्ध राष्ट्रवादींना ही सत्ताबांधणी मुस्लिमांवर कुरघोडी करण्यासाठी कदाचित एक संधी वाटेल. परंतु, धार्मिक स्वातंत्र्यावर निर्बंध असल्यामुळे म्यानमारमधील बौद्ध धर्मासाठी लष्करी उठाव ही नक्कीच वाईट बातमी आहे.
बौद्ध भिक्षूंनी अशा प्रकारे गोंधळ घालण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. ब्रिटीश राजवटीचा शेवट झाल्यापासून म्यानमारच्या राजकीय पटलावर बौद्ध (संघ) समुदायाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आंग सान स्यू की यांची स्थानबद्धता संपुष्टात येऊन २०११ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही सरकारची स्थापना झाली. या सत्ता बदलामुळे म्यानमारमधील कट्टर देशभक्त संघटना आणि ९६९ सारख्या राष्ट्रवादी बौद्ध चळवळींना प्रेरणा मिळाली.
मात्र, एक व्यक्ती त्या अगोदरपासूनच म्यानमारमध्ये लष्करी राजवट आणि मुस्लिमविरोधी हिंसाचाराला खतपाणी देत होती. ‘विराथु’ असं या व्यक्तीचं नाव आहे. ‘अशिन विराथु’ या नावानं सध्या तो जागतिक राजकारणात ओळखला जातो. अशिन हे काही कौतुकाचं विशेषण नाही. अशिनचा अर्थ ‘भीतीदायक’ असा होतो. कोण आहे हा ‘विराथु’ आणि म्यानमारच्या राजकारणात त्याची भूमिका काय हे पाहणं गरजेचं आहे.
विराथुचा जन्म १० जुलै १९६८ मध्ये मंडालेजवळील मियान्सिंग गावात झाला होता. भिक्षु होण्यासाठी त्याने वयाच्या १४व्या वर्षीच शाळा सोडली. २००१मध्ये तो ‘९६९ चळवळीत’ सामील झाला. दोन वर्षांनंतर, २००३ मध्ये, त्याला प्रक्षोभक प्रवचनांसाठी २५ वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१२मध्ये इतर इतर अनेक राजकीय कैद्यांसह त्याची सुटका करण्यात आली. २०११ च्या सत्तापालटानंतर विराथु, यूट्यूब आणि सोशल मीडियावर सक्रिय आहे. प्रक्षोभक धार्मिक पोस्ट करू नये म्हणून फेसबुकने त्याला वारंवार इशारा दिला होता पण त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं. नंतर मात्र, फेसबुकने त्याच्या पेजवर बंदी घातली.
सप्टेंबर २०१२ मध्ये बर्मिज रोहिंग्या मुस्लिमांना तिसर्या देशात पाठवण्याचा निर्णय अध्यक्ष थिन सीन यांनी घेतला होता. त्याला समर्थन म्हणून विराथुने मंडाले येथे भिक्षुंच्या मोर्चाचे नेतृत्व केले. त्यानंतर एका महिन्यानंतर राखीन प्रातांत अधिक हिंसाचार सुरू झाला. मात्र, या हिंसाचाराशी आपला संबंध नसल्याचा दावा विराथुनं केला. राखीनमधील हिंसाचार हा म्यानमार येथील एक मध्यवर्ती शहर मैक्तिला येथे झालेल्या हिंसाचारासाठी ठिणगी होती. तिथे सोन्याच्या दुकानात झालेल्या वादावरून लूटमार व जाळपोळ झाली होती. यात एक बौद्ध भिक्षु आणि एक मुस्लिम व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात मॉन्टेसरीज, दुकानं आणि घरांची जाळपोळ झाली व १४ पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला.
१ जुलै २०१३ रोजी जगप्रसिद्ध ‘टाइम्स मॅगझिन’ने विराखुवर कव्हर स्टोरी केली होती. त्यात त्याचा उल्लेख ‘द फेस ऑफ बुद्धिस्ट टेरर’, असा केला होता. त्यावर विराथुने आपली प्रतिक्रिया दिली होती-
‘तुम्ही कितीही प्रेमळ आणि दयाळू असा मात्र, एका पिसाळलेल्या कुत्र्याच्या जवळ नक्कीच झोपू शकत नाहीत. जर बौद्ध लोक कमजोर पडले तर सर्व देश मुस्लिमांच्या अधिपत्याखाली येईल’.
टाइम्समध्ये स्टोरी आल्यानंतर स्थानिक विरोधकांनी देखील विराथुचा उल्लेख ‘बर्मिज बिन लादेन’, असा केला होता. ‘विरोधक माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी फक्त दहशतवादाला विरोध करत आहे,’ असेही तो म्हणाला. अध्यक्ष थिन सीनसुद्धा विराथुच्या समर्थनार्थ पुढे आले होते. विराथुवर टीका करून टाइम्स मासिक म्यानमारची आणि बौद्ध धर्माची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे. विराथु शांतता प्रियव्यक्ती असून ‘बुद्धांचा पुत्र’ आहे, असे सीन म्हणाले होते.
२१ जुलै २०१३ ला एका बॉम्ब स्फोटाचा तो प्रथमदर्शी टार्गेट होता, असे म्हटले जाते. त्या बॉम्ब स्फोटात पाच लोक जखमी झाले होते. आपल्या आवाज बंद करण्यासाठी मुस्लिम कट्टरतावाद्यांनी हा स्फोट घडवून आणला होता, असा दावा विराथुने केला होता. त्यानंतर मुस्लिम आणि बौद्ध यांच्यातील आंतरधर्मीय विवाहावर बंदी घालण्यासाठी विराथुने प्रयत्न केले आणि मुस्लिमांची मालकी असलेल्या सर्व व्यवसायांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन बौद्ध धर्मियांना केले होते.
असे असले तरी बौद्ध धर्मातील सर्वच लोक विराथुचे समर्थन करत नाहीत. मंडालेच्या म्यावाड्डी सयादो मठातील अरिया वुथ्था बेवुंथा यांनी विराथुचा निषेध केला आहे. अनेक महिलांनी देखील विराथुला विरोध केला आहे. बर्मा महिला लीगच्या सरचिटणीस टिन टिन नायो यांनी त्यावर टीका केली आहे.
विराथुनं आपल्या वर्तनातून देशाची आणि घातलेल्या वस्त्रांची प्रतिमा मलिन केली आहे. बौद्ध महिलांना आंतरधर्मिय विवाह करण्यास मनाई करण्याचा फतवा त्यानं काढला. हा महिलांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असे नायो म्हणाल्या आहेत.
सप्टेंबर २०१३ मध्ये मुस्लिम लोकसंख्या मर्यादित करण्यासाठी नागरी हक्क कायदे तयार केल्यामुळे राज्य संघ महा नायक समितीने ‘९६९ चळवळी’वर बंदी घातली. जानेवारी २०१५मध्ये विराथुनं जाहिरपणे संयुक्त राष्ट्र संघाच्या राजदूत यांग ली यांच्याविषयी अश्लिल अपशब्द वापरले होते. त्यानंतर संघ महानायक समितीने विराथुवर बंदी घातली होती. त्यामुळे त्याला कोणतेही धार्मिक विधी करता येणार नव्हते.
मात्र, बंदी संपल्यानंतर त्याने आपल्या धार्मिक कारवाया सुरू ठेवल्या. त्याने आंग सान स्यू की यांची सत्ता उलथून टाकण्याचे देखील संकेत दिले होते. लोक जसे बुद्धाची उपासना करतात तशी त्यांनी लष्कराची केली पाहिजे, असे त्याचे म्हणणे आहे. मे २०१९ला मेयिक याठिकाणी त्याने स्यू की यांना ‘वेश्या’ म्हटले होते. त्यानंतर विराथुविरोधात अरेस्ट वॉरन्ट जारी करण्यात आले होते. २०२०मध्ये म्यानमारच्या सार्वत्रिक निवडणुंकांच्या अगोदर त्याने रंगुन (यंगुन) आत्मसमर्पण केले.
जगभरातील देशांमध्ये बौद्ध भिक्षुंकडे शांततेचे प्रतिक म्हणून पाहिले जाते. मात्र, विराथुनं या सर्व प्रतिमांना तडे दिले आहेत, असेच म्हणावे लागेल.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.