आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब
भारत ब्रिटिशांच्या अंमलाखाली आल्यानंतर स्वातंत्र्य चळवळ उभी राहिली. बंगालचा नवाब सिराजउद्दौलाचा प्लासीच्या लढाईत ब्रिटिशांनी पराभव केला आणि कलकत्ता शहर व ‘२४ परगणा’ जिल्हा यांचे राज्य स्थापन झाले. पुढे या राज्याचा विस्तार होत गेला आणि एक विशाल व बलाढ्य ब्रिटिश साम्राज्य निर्माण झाले.
ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार पाचही खंडांत पसरलेला होता. हिंदी साम्राज्य हा त्याचा एक भाग होता. याआधी भारतावर राज्य करणाऱ्या परकीय राज्यकर्त्यांनी भारतात सत्ता स्थापन केल्यानंतर भारतीय शेती व उद्योगधंद्यांना प्रोत्साहन दिले होते. त्यामुळे भारताची आर्थिक भरभराट होत राहिली. ब्रिटिशांनी मात्र ही चक्रे उलटी फिरवली.
ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भारत म्हणजे ग्रेट ब्रिटनमधील कारखान्यांत तयार होणाऱ्या मालासाठी निव्वळ एक हुकमी बाजारपेठ होती. त्यामुळे स्थानिक उद्योगधंदे बुडाले, जमिनीचा सारा वाढला आणि अनेक निरक्षर शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या मालकीच्या बनल्या. देशात सतत कुठे ना कुठे दुष्काळ पडू लागला. गरिबी आणि भूकबळी या नित्याच्या समस्या होऊन बसल्या.
व्यापारी म्हणून येण्याची बतावणी करत राज्यकर्ते बनलेल्या ब्रिटिशांविरोधात असंतोष वाढू लागला आणि त्यातूनच त्यांच्याविरुद्ध भारतीयांनी दंड थोपटले. पण हा संग्राम साधासुधा नव्हता. ब्रिटिशांच्या प्रचंड साम्राज्यविरुद्ध एतद्देशीयांनी छेडलेले हे स्वातंत्र्य आंदोलन जवळजवळ १८६ वर्षे सुरूच होते. अनेकांनी त्यासाठी आपले प्राण अर्पण केले. कित्येकांनी घरदार, संसार, कुटुंब यांचा त्याग केला. माणसे देशोधडीला लागली. एवढेच नव्हे तर परिचित अशा स्वातंत्र्यसेनानींखेरीज अनेक अपरिचित, फारशा माहीत नसलेल्या अशा पडद्यामागच्या कलाकारांनी पण इतिहासाची पाने लिहिली.
अन्नपूर्णा महाराणा या यापैकीच एक.
अन्नपूर्णा महाराणा यांचा परिचय आजही आपल्याकडे फारसा कुणाला नाही. महाराष्ट्रात तर जवळपास नाहीच. त्या एक थोर स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक होत्या. आयुष्यभर त्या गांधीवादी विचार आणि तत्त्वांचे पालन करत राहिल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्या सामाजिक जीवनात सक्रिय होत्या. समाजातील महिला, बालके, आदिवासी समाजासाठी त्यांनी जे कार्य केले त्यातून त्या आजही स्मरणात आहेत. अन्नपूर्णा महाराणा यांचे जीवन हे निःस्वार्थ भावनेने समर्पण आणि देशभक्ती यांचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
०३ नोव्हेंबर १९१७ रोजी नवकृष्ण चौधरी कुटुंबात जन्म झालेल्या अन्नपूर्णा यांचे वडील गोपबंधू चौधरी हे ब्रिटिश सरकारमध्ये मॅजिस्ट्रेट होते. चांगले खानदानी कुटुंब. समाजात मानमरातब, पैसा सर्वकाही होते. परंतु महात्मा गांधींच्या संपर्कात गोपबंधू आले नि चित्रच पालटले. गांधीजींच्या आवाहनावरून त्यांनी ब्रिटिश सरकारची नोकरी सोडली आणि स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. आपल्या वडिलांच्या कृतीने प्रभावित झालेली अन्नपूर्णाही मग मागे राहिली नाही. अगदी लहान वयातच तिने स्वातंत्र्यलढ्यात भाग घ्यायला सुरुवात केली.
वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच त्यांनी इंग्रजांविरुद्ध कारवाया करायला सुरुवात केली. १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहादरम्यान त्यांनी पहिल्यांदा अटकेचा अनुभव घेतला. यादरम्यान त्या सहा महिने तुरुंगात होत्या. १९३१ मध्ये, त्या कराचीमध्ये झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बैठकीत सहभागी झाल्या.
या वयात त्यांचा अनेकांशी संपर्क आला. सरहद्द गांधी या नावाने ओळखले जाणाऱ्या खान अब्दुल गफ्फार खान यांना भेटण्याचीही संधी मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या सक्रिय सदस्य असल्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक संमेलनात सहभागी होण्याची त्यांना संधी मिळत असे. महात्मा गांधी यांच्या १९३४ आणि १९३८ मधील ओडिशा दौऱ्याच्या वेळी त्यांनी ओडिशाच्या समन्वयक म्हणून आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व केले. १९३४ साली महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली पुरी ते भद्रक अशी ‘हरिजन पद यात्रा’ काढण्यात आली, तेव्हाही त्या या यात्रेत उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. या यात्रेच्या वेळी त्यांनी तब्बल १८० किलोमीटर अंतर चालून पार केले.
देश स्वतंत्र झाल्यानंतरही अन्नपूर्णा सामाजिक कार्यात सक्रिय राहिल्या. महिला आणि मुलांच्या उन्नतीसाठी त्यांनी सतत काम केले. विनोवा भावे यांच्या भूदान चळवळीतही त्या सहभागी झाल्या. १९६४ साली ओडिशातील राउरकेला येथे जातीय दंगल झाली, तेव्हा त्यांनी शांतता प्रस्थापित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. ओडिशातील आदिवासी समाजासाठी, विशेषतः मुलांसाठी त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे.
स्वातंत्र्यानंतर, अन्नपूर्णा या जणू भारतातील महिला आणि मुलांचा आवाज बनल्या. त्यांनी ओडिशातील रायगडा जिल्ह्यात आदिवासी जमातीच्या मुलांसाठी शाळा उघडली. आणीबाणीच्या काळातही त्या सक्रिय होत्या. त्यांनी रामदेवी चौधरी यांच्या ग्रामसेवा प्रेसने प्रसिद्ध केलेल्या वृत्तपत्राच्या मदतीने सरकारच्या धोरणांचा निषेध केला. त्याचा परिणाम म्ह्णून सरकारने या वृत्तपत्रावर बंदी घातली. तसेच रामदेवी चौधरी आणि नबकृष्ण चौधरी, हरिकेशन महाबत, मनमोहन चौधरी, जयकृष्ण मोहंती आणि इतर उडिया नेत्यांसह अन्नपूर्णा यांना अटक करण्यात आली.
अन्नपूर्णा महाराणा हे नाव केवळ स्वतंत्र भारतातील सामाजिक कार्यापुरते मर्यादित नाही. ही अशी व्यक्ती होती जिला भावी पिढीसाठी लिखित इतिहास रचायचा होता. त्यातूनच त्या वेळात वेळ काढून नियमितपणे लेखन-वाचन करू लागल्या. त्यांनी महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची पुस्तके ओडिया भाषेत अनुवादित केली. याशिवाय त्यांनी चंबळ डाकुंच्या आत्मसमर्पणाच्या अनुभवांवर ‘दास्यु हृदयरा वादा’ लिहिले. ‘अमृता अनुभव’ हा विनोबा भावे यांच्या विचारांवर आधारित ग्रंथ ही त्यांचीच निर्मिती. याशिवाय स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित अनुभवांवरही त्यांनी विपुल लिखाण केले.
अन्नपूर्णा यांनी सरतचंद महाराणा यांच्याशी १९४२ साली विवाह केला. हा आंतरजातीय विवाह होता. समाजातील जातिभेदांविरोधात उचललेले ते एक महत्त्वाचे पाऊल होते. त्यांचे पती सरतचंद महाराणा हे समाज आणि देशाच्या हितासाठी वाहून घेतलेले ओडिशाचे प्रसिद्ध शिक्षणतज्ञ होते.
अन्नपूर्णा यांना जीवनात अनेक सन्मान आणि पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यांना उत्कल रत्न या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. एक अतिशय सक्रिय, समृद्ध आणि अर्थपूर्ण जीवन जगलेल्या या सेवाव्रतीने ३१ डिसेंबर २०१२ रोजी वयाच्या ९६ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला.
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक , युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.