आमचे सर्व लेख आणि व्हिडीओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | युट्युब
युद्धाने दोन्हीकडील लोकांना अतोनात नुकसान भोगावे लागते हे माहित असूनही युद्धाची खुमखुमी जात नाही. कधी कधी तर सरकारच आपल्या नागरिकांविरोधात नागरी युद्ध घोषित करते आणि हेच सगळ्यात दुर्दैवी आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे सिरीयातील नागरी युद्धाचे देता येईल, ज्यात आजपर्यंत लाखो-करोडो लोकांनी आपला जीव गमावला आणि तितकेच लोक आपला देश सोडून निर्वासित होऊन जगतायत.
सिरियातील अलेप्पो हे जगातील सर्वात जुन्या मानवी वसाहतींपैकी एक आहे. युनेस्कोने या शहराला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केले होते. पण सिरीयन युद्ध सुरू झाल्यानंतर या वारसास्थळाचे आता भग्न अवशेषात रुपांतरण झाले आहे.
सिरियातील नागरी युद्ध आजही संपलेले नाही. अलेप्पो शहरात हेलिकॉप्टरमधून करण्यात आलेल्या बॉम्ब वर्षावामुळे आज हे शहर होत्याचे नव्हते झाले आहे.
या शहारात प्राचीन काळापासूनच्या मशिदी, बाजारपेठा, असा कितीतरी सांस्कृतिक खजिना होता जो या युद्धात नष्ट झाला आहे. २०१२ पासून आतापर्यंत या शहरातील ३११८३ लोक मृत्युमुखी पडले आहेत. या लोकांचा नेमका दोष काय होता? हा प्रश्न अजूनही छळतो. त्यांना फक्त शांततामय सामान्य जीवनाची अपेक्षा होती.
अलेप्पोमधील ग्रेट मॉस्क ऑफ अलेप्पो ही खूप जुनी मशीद. ही मशीद तर पूर्णतः भग्न झाली आहे. बॉम्ब वर्षावात या मशिदीचे खूपच नुकसान झालेले आहे. या शहरात अनेक अशा इमारती होत्या, ज्यांना काहीना काही धार्मिक सांस्कृतिक इतिहास होता. त्यातील २२ वास्तू तर पूर्णत: नष्ट झाल्यात जमा आहेत, ४८ वास्तू मोडकळीस आलेल्या आहेत.
झालं असं की, सिरियातील बशर-अल-असद सरकारच्या हुकुमशाही विरोधात जनतेचा रोष वाढत होता. सरकार विरोधात ठिकठिकाणी आंदोलने केली जात होती. एका शाळेतील काही मुलांनी शाळेच्या भिंतीवर सरकार विरोधात काही तरी लिहिले आणि पोलिसांनी त्या चार शाळकरी मुलांना अटक केली. खरे तर शाळकरी मुलांच्या खोडी किती मनावर घ्याव्या याला काही मर्यादा असते. पण, जेव्हा सरकार आपल्याच जनतेकडे फक्त माणसांची झुंड याच नजरेने पाहते तेव्हा अशा सरकारकडून संवेदनशीलतेची अपेक्षाच गैरवाजवी ठरते.
शाळेच्या भिंतीवर सरकार विरोधातील रोष व्यक्त केला म्हणून त्या मुलांना चक्क पोलिसांनी उचलून नेले. त्यांना लवकर जामीनही मंजूर केला नाही. त्या कोवळ्या मुलांची सुटका व्हावी म्हणून नागरिकही मागण्या करू लागले तरीही कठोर सरकारला पाझर फुटला नाही. शेवटी हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले. रोज ठिकठिकाणी त्या मुलांच्या सुटकेसाठी आंदोलने होऊ लागली. आज या शहरात उद्या त्या शहरात अशा प्रकारे एका शहरातून दुसऱ्या शहरात हा आंदोलनाचा वणवा पसरू लागला. आंदोलकांच्या या वाढत्या संख्येनेही सरकार नमले नाही. उलट सरकारची मुजोरी आणखी वाढली. आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर लाठीमार करण्याचे आदेश दिले गेले. आधीच सरकारी हुकुमशाहीविरोधात प्रचंड संतापलेल्या नागरिकांची अशी मुस्कटदाबी सहन न झाल्याने तरूण आंदोलकांनीही आपल्या हातात हत्यारे घेतली.
सिरियातील गृहयुद्धाची ही बातमी बाहेरच्या जगात पसरू लागली तशी बाहेरच्या देशांनी यात हस्तक्षेप सुरू केला. काही दहशतवादी संघटनांनी विद्रोही नागरिकांना हत्यारे पोहोचवण्यास सुरूवात केली.
पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराक, लेबनान अशा राष्ट्रांनी सरकारच्या वतीने हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली. या परकीय हस्तक्षेपामुळे परिस्थिती आणखीनच चिघळत गेली.
सरकार आपल्याच नागरिकांविरोधात लढत होती. अलेप्पो शहर या विद्रोहींनी कसे ताब्यात घेतले आहे आणि तिथे त्यांनी कशी नासधूस चालवली आहे हे दाखवण्यासाठी सरकारने या शहराचे ड्रोनद्वारे चित्रीकरण सुरू केले. तेव्हा या शहरातील काही नागरिकांनी स्वतः ड्रोन खरेदी केले आणि खरी परिस्थिती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला. काही पत्रकारांनी आपल्या जीवावर खेळून इथल्या लोकांच्या मुलाखती प्रसारित केल्या तेव्हा कुठे इथल्या लोकांची होत असलेली पिळवणूक आणि सत्य जगासमोर आले.
पोलिसांनी अटक केलेल्या त्या शाळकरी मुलांचाही कोठडीतच मृत्यू झाला. सरकारने आपल्याच देशातील नागरिकांवर बॉम्ब वर्षाव सुरू केला. मध्यंतरी अलेप्पो शहरातील ओमरान दाकनिश या एका निरागस बालकाचा फोटो व्हायरल झाला होता, त्यावरून या शहरातील जीवन कसे नरकाहून भयाण होते याची कल्पना येते.
सरकारने आपल्याच नागरिकांवर बॉम्ब वर्षाव सुरू केला. या बॉम्ब वर्षावात अलेप्पो शहरातील कितीतरी इमारती जमीनदोस्त झाल्या. सुंदर सुंदर मशिदी, इमारती, गजबजलेल्या बाजारपेठा, शाळा, मैदाने, बगीचे यांनी सजलेले हे शहर काही काळातच पूर्णतः भकास होऊन गेले. कधीकाळी गजबजलेले इथले रस्ते सुनसान होऊन गेले. सगळ्या शहरालाच स्मशानाची अवकळा आली होती.
जिथे तिथे मातीचे, विटांचे ढिगारे आणि पडक्या इमारती. माणसांना राहता येईल अशी एकही इमारत आता या शहरात शिल्लक नाही. सगळ्याच इमारती मोडकळीस आल्या आहेत. या ठिकाणी एक पुरातन चर्च होते, जे आता ओळखू देखील येत नाही.
सिरियातील या गृहयुद्धाने सामान्य नागरिकांचे जगणे हराम करून टाकले. कितीतरी लोकांनी इतर देशात जाऊन आपले संसार उभारण्याच्या आशेने पलायन करण्याचा पयत्न केला. पण, या प्रयत्नात त्यांना स्वतःचा जीवही गमवावा लागला. एकूणच इकडे आड आणि तिकडे विहीर अशी या नागरिकांची अवस्था झाली आहे.
शांततेने आणि चर्चेने मार्ग निघाला असता पण सरकारने फक्त आपल्या अहंकारापोटी आपलाच देश पूर्णतः उध्वस्त करून टाकला!
आमचे इतर लेख वाचण्यासाठी आणि व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा : फेसबुक, युट्युब | Copyright © ThePostman.co.in | All Rights Reserved.